स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 8: दगडावरील पहिला थर निघताना.....
शाहू काॅलेज...स्वप्न पहायला शिकवणारं काॅलेज....इथे स्वप्नाची बाग होती..पण फुलपाखरांचे पंख घेवून येथे आलोच नव्हतो मुळात...एक गरूडपंखी खदखद मनात होती...काॅलेजचा पहिला दिवस..आणि सोबत कोण तर..माझे वडील..!!! काॅलेजला आलो..लातूर व राज्यातून सर्व थरांचे व स्तराचे, श्रीमंत, गरीब, ग्रामीण, शहरी,नाना परीचे विद्यार्थी. आयुष्य समृद्ध करणारे व अनुभवाची शिदोरी देणारे हे काॅलेज..अत्यंत कडक शिस्त..युनिफॉर्म असेल तरच आत प्रवेश..लेक्चर ऑफ असेल तर सरळ लाएब्रेरी किंवा इमारती बाहेर...कोणासही तुलना करायला संधी मिळू नये या साठी गणवेशाचा आग्रह.....वैचारिक खुलेपणा बाबतीत आग्रही पण स्वैराचारास प्रतिबंध करणारे काॅलेज..दरमहा पाल्यांच्या महाविद्यालयात उपस्थितीचा रिपोर्ट थेट पालकांना पाठवणारे काॅलेज..!!! इथे शिकायला मिळणे हे ही भाग्यच!
काॅलेज सुरू झाले.. वेगवेगळ्या विषयांवर शिकायला मिळत होतं. वर्गात एकाचढ एक हुशार मुलं, मुली..सगळे जण शिकायचे..वर्गात उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचे. ग्रामीण भागातील मुलं ही हळुहळु धिटाइने पुढे यायला लागले..मलाही धडपड कराविशी वाटायची..प्रामाणिक प्रयत्न करायचो..सुदैवाने लातूर बसस्थानका पासुन काॅलेज अगदी दोन मिनीटावर होते. त्यामुळे इतर त्रास नव्हता..काॅलेज ते घर..घर ते काॅलेज एवढाच दिनक्रम..हळूहळू काॅलेज मधे रूळू लागलो..प्राध्यापकांची ओळख व्हायला लागली..वर्गात चांगले मित्र मैत्रिणी झाल्या,बहुतांश सगळेच अभ्यास करणारे, सचोटीने राहणारे..
वेळ मिळेल तसा लाएब्रेरीतुन पुस्तके घेणे सुरू झाले..गावातल्या साने गुरूजी वाचनालयाच्या चकराही वाढल्या, अभ्यास, वाचन, मित्र यात दिवस संपून जायचा....काही प्राध्यापक खुप जिव तोडून शिकवायचे..काही जणांच्या शिकवण्याच्या त-हा वेगळ्याच...पण सारे गुणवत्तेसाठी आग्रही..वर्गातले मुलं मुली वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेवू लागले..जसे गावात सरतेशेवटी काही झोपड्या असतात तशाच शहराच्या शेवटी काही वस्त्या असतात..तिथले मुलं मित्र झाले..ते "कमवा शिका" योजनेत काॅलेज सुटल्यावर काॅलेज मधेच काम करायचे..त्यातीलच काही जण खुप चांगले अर्थात राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होते..काही जण एन सी सी मधे होते, मी मात्र "राष्ट्रीय सेवा योजना " मधे सहभागी झालो..त्याचे वेगवेगळे उपक्रम चालायचे..कोणी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायचे तर कोणी नुसतेच वादात पण इथेही..काॅलेजच्या बाहेर...
मी काॅलेज मधे रममाण झालो होतो..आम्हाला " सी "डिव्हीजनला राज्यशास्त्र शिकवायला एक सर आले..नविन..ते खुप विश्लेषणात्मक शिकवायचे..काही मुलं मागे बसून शेरेबाजी करायचे..पण त्यांचा संयम ढळायचा नाही..एके दिवशी लेक्चर संपल्यास मी त्यांना काही अडचणी विचारण्यासाठी बाहेर भेटलो तेंव्हा त्यांनी त्या सोडवल्या , माहिती दिली व सरते शेवटी ते म्हणाले की असा विश्लेषणात्मक अभ्यास केल्यास त्याचा MPSC ला खुप फायदा होतो.....आणी दगडा वरील पहिला थर निघाल्याचा मला भास झाला !! मी नंतर वर्गात बसून फक्त इंटरव्हल व्हायची वाट पहात होतो..तो झाला आणी मी तडक लाएब्रेरी गाठली..आणी " स्पर्धा परीक्षा " हे त्या काळातील एकमेव मासीक घेतले...त्यातले काहीच समजत नसताना मी ते जिज्ञासेने पाहिले..काहीच समजत नव्हते सगळे एकदम अवघड वाटले..पण त्यातील यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत वाचल्यास एक हुरहुर मनात भरून आली...पण लातुरला त्या काळात MPSC बाबत कुठलीही सोय नव्हती..मला खुप प्रश्न निर्माण झाले..मी एकट्यानेच ते पुस्तक पाहीले व वाचून अलगद ठेवून दिले..... विचार येत होता ही सिलेक्शन झालेली मुले कसे पास होत असतील...काय करत असतील...?? मनात सतत विचार घोळत असायचे..काॅलेज मधिल आयुष्य तर समरसून जगत होतो पण एक हुरहुर मनास लागलेली असायची..घरी यायचो..आई चुलीवर स्वयंपाक करत असायची..चुलीसमोर बसून मी घरच्याशी बोलायचो.. वडील सातत्याने अभ्यास करायला पाहिजे, काहीतरी करून दाखवायला पाहिजे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे विषय बोलत असायचे..लहान भाऊ निशांत त्यावेळी गावातल्या जिल्हा परिषद शाळेतून सातवी पास होवून आठवी साठी गावानजिकच्या सेलू गावातील गणेश हायस्कूल ला जात होता..आम्ही ऐकायचो..भूकंपा मुळे पक्की घरे बांधण्यासाठी शासना कडून गावात लोकांना अनुदान मिळाले होते..आमचे घर पण विटाचे झाले होते पण त्याला वरती जुने पत्रे..जवळपास अपूर्ण अवस्थेत असलेले व त्याला प्लास्टर नसलेले ते एक सांगाडा सदृश्य घर होते .. ते एका बाजुने जवळपास भिंत नसणारे होते..मागे एक आडवी खोली जिला एक तात्पुरता दरवाजा, जास्त पाऊस आला की पुन्हा चिखल..समोर पत्र्याचे छप्पर...तिथे एक आडोसा केला होता..तेथे आई स्वयंपाक करायची..या घराचा एक फायदा होता सगळी जागा ओली होत नव्हती.. माझे सिलेक्शन होइ पर्यंत त्यात कुठलीच भर आम्ही घालू शकलो नाही .. फक्त एक लोखंडाची एकमेव फोल्डींग चेअर तेथे वाढली...उलट नंतर ते घर जास्तच जीर्ण होत गेले... सिलेक्शनच्या दिवशी चिखल भेटवण्यासाठी...!!!
बाजुलाच मोठ्या व छोट्या मामाची घरे होती..मोठे मामा पुण्याला राहत असल्याने त्यांनी या भुकंप अनुदानातुन एक खोली काढली होती..तिथे सिंगल फेजवर चालणारा एकुलता एक बल्ब ..त्याचा मंद उजेड..त्या खोलीत मी, लहान भाऊ, छोट्या मामाचा मुलगा आणी आज्जी असे सगळे झोपायचो...त्या खोलीत एक भिंत होती भिंतिंच्या पलिकडे मी ...तेथे माझे स्वप्नरंजन, मनसुब्याचे बोलणे, लिहिणे, वाचन, अभ्यास हे सगळे चालायचे..मी तेथे जाऊन वडील बोललेल्या विषयावर विचार करायचो, डोळ्यांसमोर सतत परिस्थिती दिसायची , वाटायचं कसं होईल आपलं...? खुप काही ठरवायचो.. भिती वाटायची..पण ती काहीतरी करून दाखवायची सल मात्र सतत मनात असायची.....असं एक स्वप्न वंचनेत धुसर होईल का, मन आक्रंदायचं...सतत जिव झटपटत रहायचा...
दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या अगोदर काॅलेजचं राष्ट्रीय सेवा योजनेचं निवासी शिबीर नेमकं माझ्याच गावात लागलं...मला ते सात दिवस एकच प्रश्न सतावत होता...कोणी चल तुझ्या घरी म्हटलं तर काय करायचं? त्यासाठी मी फार जपूनच शिबिरात राहिलो सुदैवाने तसे कोणी म्हटले नाही..पण गरीबीची जाणीव जास्तच होवू लागली..काॅलेज मधे माझ्या सारख्या फाटक्या परिस्थिती असणा-या मुलांची संख्या कमी नव्हती पण मला का कोण जाणे ती जरा जास्तच जाणवायची..शिबीर संपलं...मग आता काय? घरी बसायची चैन करता येत नव्हती..आणी दहावीच्या फिसची आठवण तिव्र होतीच आणी ताजीही.. घरी काही तरी मदत होईल म्हणून मी शेतात ज्वारी कापायच्या मजुरीच्या कामाला गेलो..दोन दिवस काम केले आणी तिस-या दिवशी आजारी पडलो..थेट शासकीय रूग्णालयात अॅडमीट..मग लक्षात आले आपण असे काम करू शकत नाही..पण अत्यंत कमी काळासाठी कंपनीत ही कामाला जाणे योग्य नव्हते..शांत राहीलो..काॅलेज सुरू झालं...
आयुष्य शिकायला मिळणा-या घटना घडण्याचा हा काळ..वर्ग सुरू झाले.. भुगोलाचा तास...अचानक सर शिकवता शिकवता सुट्ट्या कशा गेल्या? काय केलं? या विषयावर आले आणी विचारता विचारता पुढे आयुष्यात काय करणार? या विषया कडे ते वळले..सगळे मुलं मुली ऊठून उत्तर देवू लागले..कोणास शिक्षक व्हायचं होतं..कोणाला प्राध्यापक..कोणाला प्रगतीशील शेती करायची होती..कोणा कोणाला अजून माहितंच नव्हतं काय करायचं ते..अशा माहिती नसणा-या विद्यार्थ्यावर मग साग्रसंगीत टिप्पणी व्हायला लागली..सर एकदम मुड मधे येवून पोरांना झापत होते..दबक्या आवाजात हसण्याचे आवाज येत होते..माझा नंबर आला!!! सरांनी मान तिरकी करून विचारलं"बोला साहेब! आपल्याला काय व्हायचं आहे?(कारण माझ्या अगोदरच्या तिन मुलांना उत्तर देता आले नव्हते..त्या मुळे सरांचा मुड टिकून होता त्या मुळे त्यांचा टोन" काय हे आजकालचे पोरं..!!".असा होता) मी उभा झालो..आणी सांगीतले "सर मला MPSC करायची आहे!" आणी एकदम सरांच्या तोंडून निघून गेले" काय!!!! MPSC ?आणि तु???!!! अरे आम्ही नाही झालो MPSC, तु कसा होणार???" वर्गात एकदम हास्याचा स्फोट झाला..मुलींच्या बाजुने पहिल्यांदाच दबका आवाज जाऊन हसण्याचा मोठा आवाज आला..मला एकदम अपमानीत झालं..मान खाली झुकली..मुलं मुली हसत होती...आयुष्यात पहिल्यांदा जाहिररित्या MPSC बद्दल बोलण्याचं धाडंस केलं आणि हसू झालं...खुप वाईट वाटलं..बोलण्या सारखं काही नव्हतं...मी एका गर्तेत कोसळणा-या दगडा सारखा जड होऊन खाली बसलो..सर सहज बोलून गेले...त्यांचा काही वाईट हेतू नव्हता पण ...या वाक्याने पुढील पाच वर्षे मला सतत टोचणी दिली..सतत मला जाणीव करून दिली की मला खुप दूरचा पल्ला गाठायचा आहे ..या घटनेने माझ्या मनावर एक डागणी दिली...मला माझा आरसा दाखवून दिला...सरांना ही गोष्ट खुप रूटीन वाटली..वर्गातल्या मुलामुलींना पण लक्षात राहील अशी ही घटना नव्हती पण माझ्या मनपटलावर या घटनेचा ओरखडा ऊमटला होता....क्लास सुटल्यावर मित्र परस्परांशी टाळ्या देवून हसत होते सर एकेकाला कसे बोलले त्याची नक्कल करत होते..पण अक्कल ठिकाणावर आणणारी ही घटना मला वास्तवाची जाणीव देवून गेली......आता 'काळे' ढग जमायला सुरूवात झाली होती आणी मी सुसाट वा-यात वास्तवाच्या खुल्या माळरानावर घरासाठी उडणारा पाचोळा जणू जमा करत होतो.....मी स्वप्नाचं छप्पर शाकारायला घेतलं होतं....
पण सहज साध्य होईल ते स्वप्न कसलं...'भाव डागाळणा-या' घटना पिच्छा सोडत नव्हत्या..मी ढासळणा-या बुरूजाला पाठ लाऊन ऊभे राहण्याचा प्रयत्न करत होतो...एकवेळ अशी आली की वाटलं काॅलेज बदलून टाकावं की काय....पण पर्याय नव्हता आणि घरी सांगायला तोंड ही!!! मी गारपीट झेलणा-या झाडा सारखा ऊभा होतो गुमान... आणि सगळ्याच स्तरातून परिस्थिती लचके तोडत होती...नियतीने वार करायला सुरूवात केली होती...मी पाय रोवण्याचा प्रयत्न करत होतो..थकायला व्हायचं खुपदा... वाटायचं आपण मृगजळी स्वप्न पाहतोय...आपले खायचे वांदे, आणी आपण काय विचार करतो आहोत? ज्या लातूर मधे MPSC चा M म्हणन्याची सोय नाही, तेथे आपला कसा निभाव लागणार ??? ऊगी शांत रहावं , शिक्षण पुर्ण करावं..मग पाहू काय होते ते....पण दुसरं मन स्वस्थ बसू देत नव्हतं..इतरांचे आयुष्य खेळ समजणा-या काही टाकाऊ आणी बेगडी आयुष्य जगणा-या लोकांच्या प्रवेशाने मानसिक व भावनिक त्रास वाढला....मी विस्कटलो होतो....MPSC करण्यासाठी मराठवाड्यातील दोनच ठिकाणं होती परभणीचं कृषी विद्यापीठ आणी औरंगाबाद..पण दोन्ही ठिकाणी मी जाऊ शकत नव्हतो.
वडिलांना त्याच काळात श्वासाचा त्रास वाढला ते रात्र रात्र जागून काढत...पण या हिवाळ्यात त्यांना खुपच जास्त त्रास सुरू झाला होता..दरवेळी शासकीय रूग्णालयात जाऊन उपचार घेणारे ते..पण या वेळी त्यांना कसलाच आराम न पडल्याने ते एका खाजगी दवाखान्यात जाऊन अॅडमीट झाले..सोबत कोणीच नाही..खिशात पैसे नाहीत...मी सरकारी दवाखान्यात जाऊन पाहिले ते तेथे नव्हते...शोधाशोध करत फिरलो..पत्ता नाही..खुप परेशान होवून, शोधून शोधून शेवटी मी टाऊन हाॅलच्या मैदानावर हताश होवून बसलो होतो..काय करावं काहीच सुचत नव्हतं...वेड लागायची स्थिती आली होती.....कोणी नाही...शेवटी उठलो ऊद्या पुन्हा शोधायचं ठरवून गावाकडे आलो...घरी आई उसने आणलेले पैसे घेवून वाट पाहत बसली होती ..मी गेल्या बरोबर तीने सांगितले की गावाकडून रोज लातुरला जाणा-या एका व्यक्ती जवळ ते ज्या दवाखान्यात अॅडमीट होते त्याचा वडिलांनी निरोप व पत्ता पाठवला होता ..सकाळी लवकर ऊठून ते पैसे घेवून मी दवाखान्यात गेलो...वडील नुकतेच सावरले होते..मी काहीच बोलू शकत नव्हतो..वडिलांनी डाॅक्टरला लवकर सोडता येईल का? म्हणून विचारले..( अर्थातच वाढीव उपचाराचे बिल देवू शकत नाही हे माहित असल्याने) डाॅक्टरनी जायला हरकत नाही म्हटल्यास बिल देताना जाणवले ते देण्यासाठी हवे तेवढे पैसेही नाहीत..पण ऐनवेळी लहान मामा आल्याने अडचण सुटली..मी आता खुप वैतागलो होतो..आणी मी पक्कं ठरवलं..."आता एक तर डोकं फुटेल नाही तर दगड...आता डोकं तर आपटायचंच" सगळे जाचणारे,टोचणारे क्षण एकदमच दिसू लागले...मी रणशिंग फुंकले...मी आता थांबायचे नाही असे ठरवले....काहीही होवो आपण MPSC करायचीच...नशिब आडवे आले तरी त्याला अंगावर घ्यायचे...पण नुसता निर्धार करून स्थिती एका दिवसात बदलणार नव्हती त्या साठी काही काळ नक्की जावा लागणार होता..आणी तो काळ कितीही कठीण असला तरी तो भोगावा लागणारच होता..
जिवन घडवणे म्हणजे सोप्पी गोष्ट असत नाही..खुप सोसावं लागतं..वंचनेची साथ असेल तर वेदना नक्षीदार होते..पण या वेदनेला घेवून जगताना खुप मनस्ताप होतो आज त्या आयुष्यातील घटनांची आठवण जरी आली तरी एक रिक्त अवस्था येते ते हुरहुरीचे पर्व मनात वादळ बनून घोंघावत राहते..
गावात शिकणारी मुलं आणी न शिकणारी मुलं यांच्यात एक दरी असते..त्यातील न शिकणारी मुलं जर चांगल्या घरची असतील तर मग त्या भेदाची भावना अजुन जास्तच टोकदार होते. गावात विविध जाती धर्माच्या मुलांशी माझी मैत्री होती..काॅलेजला जाणारे..शाळा सोडून दिलेले जुने सहकारी..अधुन मधुन त्यांची भेट व्हायची पण गाव म्हणजे स्वतःची व आपल्या बापजाद्याची मालमत्ता समजणा-या अर्धवट शिकलेल्या अर्धवटरावची संख्या गावात असतेच.आणी अशा चौथी नापास सधन कुटुंबातील लोकांना खुप जातीभिमान आणि असूया असते. अशाच एका अर्धवटरावने विनाकारण माझ्याशी भांडण केले मला आजपर्यंत समजले नाही त्याचे कारण काय होते. त्या भांडणामुळे मला खुप चिड आली. मी व माझे कुटुंबीय कोणाच्याही भानगडीत पडत नसतानाही हे प्रकरण उद्भवले मी ज्या भागात राहत होतो त्या भागातील मित्र खुप चिडले..आणी त्याला धडा शिकवण्यासाठी निघाले..पण माझ्या वडीलांना ही बाब समजल्याने त्यांनी तात्काळ सर्वांना थांबवून दिले व स्वतः जावून विनाकारण भांडण करणा-या अर्धवटरावच्या वडिलाला योग्य भाषेत समज दिली..त्याच्या वडिलाने त्याला खुप झापले, शिव्या घातल्या. आणी सर्वांशी चांगले वागणारे त्या मुलाचे वडील त्यांच्या अर्धवटराव मुलाच्या मनात एवढी तिव्र जातभावना कोठून आली त्या बद्दल परेशान झाले..माझ्या वडीलांनी त्यांना आदरपुर्वक सांगितले 'दादा हे पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या' हा विषय तेथेच संपला पण ओरखडा ओढणारी ही घटना मला खुप दिवस त्रास देत राहीली..तो मुलगा आता कधी गावात भेटला तर आदराने 'साहेब नमस्कार !' म्हणतो आणी मी त्याला तेवढ्याच चांगुलपणाने प्रतिसाद देतो . कारण असूया किंवा किल्मिष मनात ठेवणे मला व्यक्तीमत्वाचा दोष वाटतो.
अशा विविध घटना घडत, पाहता पाहता अकरावीचे वर्ष संपत आले.. मी खुप अभ्यास करून अकरावीची परिक्षा दिली ..त्यात समाधानकारक मार्क मिळाले आणी लगेच बारावीचे व्हेकेशन सुरू होणार होते...(क्रमशः)
भाग 8: दगडावरील पहिला थर निघताना.....
शाहू काॅलेज...स्वप्न पहायला शिकवणारं काॅलेज....इथे स्वप्नाची बाग होती..पण फुलपाखरांचे पंख घेवून येथे आलोच नव्हतो मुळात...एक गरूडपंखी खदखद मनात होती...काॅलेजचा पहिला दिवस..आणि सोबत कोण तर..माझे वडील..!!! काॅलेजला आलो..लातूर व राज्यातून सर्व थरांचे व स्तराचे, श्रीमंत, गरीब, ग्रामीण, शहरी,नाना परीचे विद्यार्थी. आयुष्य समृद्ध करणारे व अनुभवाची शिदोरी देणारे हे काॅलेज..अत्यंत कडक शिस्त..युनिफॉर्म असेल तरच आत प्रवेश..लेक्चर ऑफ असेल तर सरळ लाएब्रेरी किंवा इमारती बाहेर...कोणासही तुलना करायला संधी मिळू नये या साठी गणवेशाचा आग्रह.....वैचारिक खुलेपणा बाबतीत आग्रही पण स्वैराचारास प्रतिबंध करणारे काॅलेज..दरमहा पाल्यांच्या महाविद्यालयात उपस्थितीचा रिपोर्ट थेट पालकांना पाठवणारे काॅलेज..!!! इथे शिकायला मिळणे हे ही भाग्यच!
काॅलेज सुरू झाले.. वेगवेगळ्या विषयांवर शिकायला मिळत होतं. वर्गात एकाचढ एक हुशार मुलं, मुली..सगळे जण शिकायचे..वर्गात उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचे. ग्रामीण भागातील मुलं ही हळुहळु धिटाइने पुढे यायला लागले..मलाही धडपड कराविशी वाटायची..प्रामाणिक प्रयत्न करायचो..सुदैवाने लातूर बसस्थानका पासुन काॅलेज अगदी दोन मिनीटावर होते. त्यामुळे इतर त्रास नव्हता..काॅलेज ते घर..घर ते काॅलेज एवढाच दिनक्रम..हळूहळू काॅलेज मधे रूळू लागलो..प्राध्यापकांची ओळख व्हायला लागली..वर्गात चांगले मित्र मैत्रिणी झाल्या,बहुतांश सगळेच अभ्यास करणारे, सचोटीने राहणारे..
वेळ मिळेल तसा लाएब्रेरीतुन पुस्तके घेणे सुरू झाले..गावातल्या साने गुरूजी वाचनालयाच्या चकराही वाढल्या, अभ्यास, वाचन, मित्र यात दिवस संपून जायचा....काही प्राध्यापक खुप जिव तोडून शिकवायचे..काही जणांच्या शिकवण्याच्या त-हा वेगळ्याच...पण सारे गुणवत्तेसाठी आग्रही..वर्गातले मुलं मुली वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेवू लागले..जसे गावात सरतेशेवटी काही झोपड्या असतात तशाच शहराच्या शेवटी काही वस्त्या असतात..तिथले मुलं मित्र झाले..ते "कमवा शिका" योजनेत काॅलेज सुटल्यावर काॅलेज मधेच काम करायचे..त्यातीलच काही जण खुप चांगले अर्थात राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होते..काही जण एन सी सी मधे होते, मी मात्र "राष्ट्रीय सेवा योजना " मधे सहभागी झालो..त्याचे वेगवेगळे उपक्रम चालायचे..कोणी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व्हायचे तर कोणी नुसतेच वादात पण इथेही..काॅलेजच्या बाहेर...
मी काॅलेज मधे रममाण झालो होतो..आम्हाला " सी "डिव्हीजनला राज्यशास्त्र शिकवायला एक सर आले..नविन..ते खुप विश्लेषणात्मक शिकवायचे..काही मुलं मागे बसून शेरेबाजी करायचे..पण त्यांचा संयम ढळायचा नाही..एके दिवशी लेक्चर संपल्यास मी त्यांना काही अडचणी विचारण्यासाठी बाहेर भेटलो तेंव्हा त्यांनी त्या सोडवल्या , माहिती दिली व सरते शेवटी ते म्हणाले की असा विश्लेषणात्मक अभ्यास केल्यास त्याचा MPSC ला खुप फायदा होतो.....आणी दगडा वरील पहिला थर निघाल्याचा मला भास झाला !! मी नंतर वर्गात बसून फक्त इंटरव्हल व्हायची वाट पहात होतो..तो झाला आणी मी तडक लाएब्रेरी गाठली..आणी " स्पर्धा परीक्षा " हे त्या काळातील एकमेव मासीक घेतले...त्यातले काहीच समजत नसताना मी ते जिज्ञासेने पाहिले..काहीच समजत नव्हते सगळे एकदम अवघड वाटले..पण त्यातील यशस्वी विद्यार्थ्याची मुलाखत वाचल्यास एक हुरहुर मनात भरून आली...पण लातुरला त्या काळात MPSC बाबत कुठलीही सोय नव्हती..मला खुप प्रश्न निर्माण झाले..मी एकट्यानेच ते पुस्तक पाहीले व वाचून अलगद ठेवून दिले..... विचार येत होता ही सिलेक्शन झालेली मुले कसे पास होत असतील...काय करत असतील...?? मनात सतत विचार घोळत असायचे..काॅलेज मधिल आयुष्य तर समरसून जगत होतो पण एक हुरहुर मनास लागलेली असायची..घरी यायचो..आई चुलीवर स्वयंपाक करत असायची..चुलीसमोर बसून मी घरच्याशी बोलायचो.. वडील सातत्याने अभ्यास करायला पाहिजे, काहीतरी करून दाखवायला पाहिजे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे विषय बोलत असायचे..लहान भाऊ निशांत त्यावेळी गावातल्या जिल्हा परिषद शाळेतून सातवी पास होवून आठवी साठी गावानजिकच्या सेलू गावातील गणेश हायस्कूल ला जात होता..आम्ही ऐकायचो..भूकंपा मुळे पक्की घरे बांधण्यासाठी शासना कडून गावात लोकांना अनुदान मिळाले होते..आमचे घर पण विटाचे झाले होते पण त्याला वरती जुने पत्रे..जवळपास अपूर्ण अवस्थेत असलेले व त्याला प्लास्टर नसलेले ते एक सांगाडा सदृश्य घर होते .. ते एका बाजुने जवळपास भिंत नसणारे होते..मागे एक आडवी खोली जिला एक तात्पुरता दरवाजा, जास्त पाऊस आला की पुन्हा चिखल..समोर पत्र्याचे छप्पर...तिथे एक आडोसा केला होता..तेथे आई स्वयंपाक करायची..या घराचा एक फायदा होता सगळी जागा ओली होत नव्हती.. माझे सिलेक्शन होइ पर्यंत त्यात कुठलीच भर आम्ही घालू शकलो नाही .. फक्त एक लोखंडाची एकमेव फोल्डींग चेअर तेथे वाढली...उलट नंतर ते घर जास्तच जीर्ण होत गेले... सिलेक्शनच्या दिवशी चिखल भेटवण्यासाठी...!!!
बाजुलाच मोठ्या व छोट्या मामाची घरे होती..मोठे मामा पुण्याला राहत असल्याने त्यांनी या भुकंप अनुदानातुन एक खोली काढली होती..तिथे सिंगल फेजवर चालणारा एकुलता एक बल्ब ..त्याचा मंद उजेड..त्या खोलीत मी, लहान भाऊ, छोट्या मामाचा मुलगा आणी आज्जी असे सगळे झोपायचो...त्या खोलीत एक भिंत होती भिंतिंच्या पलिकडे मी ...तेथे माझे स्वप्नरंजन, मनसुब्याचे बोलणे, लिहिणे, वाचन, अभ्यास हे सगळे चालायचे..मी तेथे जाऊन वडील बोललेल्या विषयावर विचार करायचो, डोळ्यांसमोर सतत परिस्थिती दिसायची , वाटायचं कसं होईल आपलं...? खुप काही ठरवायचो.. भिती वाटायची..पण ती काहीतरी करून दाखवायची सल मात्र सतत मनात असायची.....असं एक स्वप्न वंचनेत धुसर होईल का, मन आक्रंदायचं...सतत जिव झटपटत रहायचा...
दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या अगोदर काॅलेजचं राष्ट्रीय सेवा योजनेचं निवासी शिबीर नेमकं माझ्याच गावात लागलं...मला ते सात दिवस एकच प्रश्न सतावत होता...कोणी चल तुझ्या घरी म्हटलं तर काय करायचं? त्यासाठी मी फार जपूनच शिबिरात राहिलो सुदैवाने तसे कोणी म्हटले नाही..पण गरीबीची जाणीव जास्तच होवू लागली..काॅलेज मधे माझ्या सारख्या फाटक्या परिस्थिती असणा-या मुलांची संख्या कमी नव्हती पण मला का कोण जाणे ती जरा जास्तच जाणवायची..शिबीर संपलं...मग आता काय? घरी बसायची चैन करता येत नव्हती..आणी दहावीच्या फिसची आठवण तिव्र होतीच आणी ताजीही.. घरी काही तरी मदत होईल म्हणून मी शेतात ज्वारी कापायच्या मजुरीच्या कामाला गेलो..दोन दिवस काम केले आणी तिस-या दिवशी आजारी पडलो..थेट शासकीय रूग्णालयात अॅडमीट..मग लक्षात आले आपण असे काम करू शकत नाही..पण अत्यंत कमी काळासाठी कंपनीत ही कामाला जाणे योग्य नव्हते..शांत राहीलो..काॅलेज सुरू झालं...
आयुष्य शिकायला मिळणा-या घटना घडण्याचा हा काळ..वर्ग सुरू झाले.. भुगोलाचा तास...अचानक सर शिकवता शिकवता सुट्ट्या कशा गेल्या? काय केलं? या विषयावर आले आणी विचारता विचारता पुढे आयुष्यात काय करणार? या विषया कडे ते वळले..सगळे मुलं मुली ऊठून उत्तर देवू लागले..कोणास शिक्षक व्हायचं होतं..कोणाला प्राध्यापक..कोणाला प्रगतीशील शेती करायची होती..कोणा कोणाला अजून माहितंच नव्हतं काय करायचं ते..अशा माहिती नसणा-या विद्यार्थ्यावर मग साग्रसंगीत टिप्पणी व्हायला लागली..सर एकदम मुड मधे येवून पोरांना झापत होते..दबक्या आवाजात हसण्याचे आवाज येत होते..माझा नंबर आला!!! सरांनी मान तिरकी करून विचारलं"बोला साहेब! आपल्याला काय व्हायचं आहे?(कारण माझ्या अगोदरच्या तिन मुलांना उत्तर देता आले नव्हते..त्या मुळे सरांचा मुड टिकून होता त्या मुळे त्यांचा टोन" काय हे आजकालचे पोरं..!!".असा होता) मी उभा झालो..आणी सांगीतले "सर मला MPSC करायची आहे!" आणी एकदम सरांच्या तोंडून निघून गेले" काय!!!! MPSC ?आणि तु???!!! अरे आम्ही नाही झालो MPSC, तु कसा होणार???" वर्गात एकदम हास्याचा स्फोट झाला..मुलींच्या बाजुने पहिल्यांदाच दबका आवाज जाऊन हसण्याचा मोठा आवाज आला..मला एकदम अपमानीत झालं..मान खाली झुकली..मुलं मुली हसत होती...आयुष्यात पहिल्यांदा जाहिररित्या MPSC बद्दल बोलण्याचं धाडंस केलं आणि हसू झालं...खुप वाईट वाटलं..बोलण्या सारखं काही नव्हतं...मी एका गर्तेत कोसळणा-या दगडा सारखा जड होऊन खाली बसलो..सर सहज बोलून गेले...त्यांचा काही वाईट हेतू नव्हता पण ...या वाक्याने पुढील पाच वर्षे मला सतत टोचणी दिली..सतत मला जाणीव करून दिली की मला खुप दूरचा पल्ला गाठायचा आहे ..या घटनेने माझ्या मनावर एक डागणी दिली...मला माझा आरसा दाखवून दिला...सरांना ही गोष्ट खुप रूटीन वाटली..वर्गातल्या मुलामुलींना पण लक्षात राहील अशी ही घटना नव्हती पण माझ्या मनपटलावर या घटनेचा ओरखडा ऊमटला होता....क्लास सुटल्यावर मित्र परस्परांशी टाळ्या देवून हसत होते सर एकेकाला कसे बोलले त्याची नक्कल करत होते..पण अक्कल ठिकाणावर आणणारी ही घटना मला वास्तवाची जाणीव देवून गेली......आता 'काळे' ढग जमायला सुरूवात झाली होती आणी मी सुसाट वा-यात वास्तवाच्या खुल्या माळरानावर घरासाठी उडणारा पाचोळा जणू जमा करत होतो.....मी स्वप्नाचं छप्पर शाकारायला घेतलं होतं....
पण सहज साध्य होईल ते स्वप्न कसलं...'भाव डागाळणा-या' घटना पिच्छा सोडत नव्हत्या..मी ढासळणा-या बुरूजाला पाठ लाऊन ऊभे राहण्याचा प्रयत्न करत होतो...एकवेळ अशी आली की वाटलं काॅलेज बदलून टाकावं की काय....पण पर्याय नव्हता आणि घरी सांगायला तोंड ही!!! मी गारपीट झेलणा-या झाडा सारखा ऊभा होतो गुमान... आणि सगळ्याच स्तरातून परिस्थिती लचके तोडत होती...नियतीने वार करायला सुरूवात केली होती...मी पाय रोवण्याचा प्रयत्न करत होतो..थकायला व्हायचं खुपदा... वाटायचं आपण मृगजळी स्वप्न पाहतोय...आपले खायचे वांदे, आणी आपण काय विचार करतो आहोत? ज्या लातूर मधे MPSC चा M म्हणन्याची सोय नाही, तेथे आपला कसा निभाव लागणार ??? ऊगी शांत रहावं , शिक्षण पुर्ण करावं..मग पाहू काय होते ते....पण दुसरं मन स्वस्थ बसू देत नव्हतं..इतरांचे आयुष्य खेळ समजणा-या काही टाकाऊ आणी बेगडी आयुष्य जगणा-या लोकांच्या प्रवेशाने मानसिक व भावनिक त्रास वाढला....मी विस्कटलो होतो....MPSC करण्यासाठी मराठवाड्यातील दोनच ठिकाणं होती परभणीचं कृषी विद्यापीठ आणी औरंगाबाद..पण दोन्ही ठिकाणी मी जाऊ शकत नव्हतो.
वडिलांना त्याच काळात श्वासाचा त्रास वाढला ते रात्र रात्र जागून काढत...पण या हिवाळ्यात त्यांना खुपच जास्त त्रास सुरू झाला होता..दरवेळी शासकीय रूग्णालयात जाऊन उपचार घेणारे ते..पण या वेळी त्यांना कसलाच आराम न पडल्याने ते एका खाजगी दवाखान्यात जाऊन अॅडमीट झाले..सोबत कोणीच नाही..खिशात पैसे नाहीत...मी सरकारी दवाखान्यात जाऊन पाहिले ते तेथे नव्हते...शोधाशोध करत फिरलो..पत्ता नाही..खुप परेशान होवून, शोधून शोधून शेवटी मी टाऊन हाॅलच्या मैदानावर हताश होवून बसलो होतो..काय करावं काहीच सुचत नव्हतं...वेड लागायची स्थिती आली होती.....कोणी नाही...शेवटी उठलो ऊद्या पुन्हा शोधायचं ठरवून गावाकडे आलो...घरी आई उसने आणलेले पैसे घेवून वाट पाहत बसली होती ..मी गेल्या बरोबर तीने सांगितले की गावाकडून रोज लातुरला जाणा-या एका व्यक्ती जवळ ते ज्या दवाखान्यात अॅडमीट होते त्याचा वडिलांनी निरोप व पत्ता पाठवला होता ..सकाळी लवकर ऊठून ते पैसे घेवून मी दवाखान्यात गेलो...वडील नुकतेच सावरले होते..मी काहीच बोलू शकत नव्हतो..वडिलांनी डाॅक्टरला लवकर सोडता येईल का? म्हणून विचारले..( अर्थातच वाढीव उपचाराचे बिल देवू शकत नाही हे माहित असल्याने) डाॅक्टरनी जायला हरकत नाही म्हटल्यास बिल देताना जाणवले ते देण्यासाठी हवे तेवढे पैसेही नाहीत..पण ऐनवेळी लहान मामा आल्याने अडचण सुटली..मी आता खुप वैतागलो होतो..आणी मी पक्कं ठरवलं..."आता एक तर डोकं फुटेल नाही तर दगड...आता डोकं तर आपटायचंच" सगळे जाचणारे,टोचणारे क्षण एकदमच दिसू लागले...मी रणशिंग फुंकले...मी आता थांबायचे नाही असे ठरवले....काहीही होवो आपण MPSC करायचीच...नशिब आडवे आले तरी त्याला अंगावर घ्यायचे...पण नुसता निर्धार करून स्थिती एका दिवसात बदलणार नव्हती त्या साठी काही काळ नक्की जावा लागणार होता..आणी तो काळ कितीही कठीण असला तरी तो भोगावा लागणारच होता..
जिवन घडवणे म्हणजे सोप्पी गोष्ट असत नाही..खुप सोसावं लागतं..वंचनेची साथ असेल तर वेदना नक्षीदार होते..पण या वेदनेला घेवून जगताना खुप मनस्ताप होतो आज त्या आयुष्यातील घटनांची आठवण जरी आली तरी एक रिक्त अवस्था येते ते हुरहुरीचे पर्व मनात वादळ बनून घोंघावत राहते..
गावात शिकणारी मुलं आणी न शिकणारी मुलं यांच्यात एक दरी असते..त्यातील न शिकणारी मुलं जर चांगल्या घरची असतील तर मग त्या भेदाची भावना अजुन जास्तच टोकदार होते. गावात विविध जाती धर्माच्या मुलांशी माझी मैत्री होती..काॅलेजला जाणारे..शाळा सोडून दिलेले जुने सहकारी..अधुन मधुन त्यांची भेट व्हायची पण गाव म्हणजे स्वतःची व आपल्या बापजाद्याची मालमत्ता समजणा-या अर्धवट शिकलेल्या अर्धवटरावची संख्या गावात असतेच.आणी अशा चौथी नापास सधन कुटुंबातील लोकांना खुप जातीभिमान आणि असूया असते. अशाच एका अर्धवटरावने विनाकारण माझ्याशी भांडण केले मला आजपर्यंत समजले नाही त्याचे कारण काय होते. त्या भांडणामुळे मला खुप चिड आली. मी व माझे कुटुंबीय कोणाच्याही भानगडीत पडत नसतानाही हे प्रकरण उद्भवले मी ज्या भागात राहत होतो त्या भागातील मित्र खुप चिडले..आणी त्याला धडा शिकवण्यासाठी निघाले..पण माझ्या वडीलांना ही बाब समजल्याने त्यांनी तात्काळ सर्वांना थांबवून दिले व स्वतः जावून विनाकारण भांडण करणा-या अर्धवटरावच्या वडिलाला योग्य भाषेत समज दिली..त्याच्या वडिलाने त्याला खुप झापले, शिव्या घातल्या. आणी सर्वांशी चांगले वागणारे त्या मुलाचे वडील त्यांच्या अर्धवटराव मुलाच्या मनात एवढी तिव्र जातभावना कोठून आली त्या बद्दल परेशान झाले..माझ्या वडीलांनी त्यांना आदरपुर्वक सांगितले 'दादा हे पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या' हा विषय तेथेच संपला पण ओरखडा ओढणारी ही घटना मला खुप दिवस त्रास देत राहीली..तो मुलगा आता कधी गावात भेटला तर आदराने 'साहेब नमस्कार !' म्हणतो आणी मी त्याला तेवढ्याच चांगुलपणाने प्रतिसाद देतो . कारण असूया किंवा किल्मिष मनात ठेवणे मला व्यक्तीमत्वाचा दोष वाटतो.
अशा विविध घटना घडत, पाहता पाहता अकरावीचे वर्ष संपत आले.. मी खुप अभ्यास करून अकरावीची परिक्षा दिली ..त्यात समाधानकारक मार्क मिळाले आणी लगेच बारावीचे व्हेकेशन सुरू होणार होते...(क्रमशः)

