Thursday, August 16, 2018

प्रतिक्षारत....

                   सांज बावरी घडी..रात येण्याचा प्रहर.. गोठ्याकडे वासराच्या ओढीने निघालेल्या गायीच्या खुराने ऊधळलेल्या  मातीने आसमंत बावरताना...मी त्या पाऊल वाटेच्या शेवटी.....ऊभा तुझ्या पावलांचा कानोसा घेत...वासराच्या प्रतिक्षारत नयनाने..   अन् त्याचवेळी घरट्याकडे परतणारा एक पक्षी दिशा चुकतो मला पाहून...आणी भरकटतो दिशाहीन....
                    चांदवा उगवण्याआधी चांदण्याचे दिप पेटवतो...  आणी हळुवार डोकावतो नभाआडून...रात दाटते...रान पेटते...काजवेही तुला शोधायला निघतात...अन् माळरानांचे दिर्घ निःश्वास ..मनास हुरहुरीचा बहर येतो..
फुलत्या चांदण्याखाली रातराणीही बहरते..हळुवार मी तुझ्या नसलेपणाशी मुक्याने बोलू लागतो...अन् माझ्या शब्दांस बासरीची गोकुळधुन स्पर्श करते...भाव मोहरतात... विरहिणी दवात भिजते ...तुझ्या तनुकांतीच्या आभासाने चांदवा अजुनच प्रकाशमान होतो...रात बहरते...तगमगते..अन् थकुन जाते तुझ्या नसलेपणाने  ....
                  मी गंधाळल्या रातव्यात तुला शोधत राहतो....प्रतिक्षेची घडी युगात रूपांतरीत होते...रातराणीच्या फांदीवरून फुले पेंगुन ओघळायला लागतात....काजवे पहाटेच्या नजरेस पडु नये या धडपडीत विझले जात असतानाच ....चांदणेही फिके होत असते....त्यावेळी मी चंद्र विझवून परतायला लागतो घराकडे....अन् चालायला लागतो तु न आलेल्या वाटेवरुन !!!!...पुन्हा ऊद्या याच वळणावर येण्यासाठी....!!!
    तु न आया तो क्या..ए मेहबूब..
    रात तो आएगी ।
    फुलो की शहादत का मातम क्यों?
    ॠत तो आएगी ।
  माझ्या ललित लेखातुन...
                                     (प्रताप)    

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...