Monday, August 20, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 3

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस


भाग 3:      विज्ञान प्रदर्शन..... आणी अंधारी दिवाळी...!!!!
        
               गावातल्या जिल्हा परिषद शाळेत त्यावेळी प्रौढशिक्षणाचं काम आलं. गावातल्या थोडंफार शिकलेल्या महिला पुरूष यांना स्वयंसेवक म्हणून सोबत घेऊन गुरूजी लोकांनी काम सुरू केलं. त्यावेळी गावात एक जनशिक्षण निलामय केंद्रही सुरू झालं आणी पहिल्यांदाच तेथील पुस्तकाचा खजिना हाताला लागला. मग काय  रोज नविन पुस्तक !!!! अधाशासारखं वाचन सुरू झालं. (ते आजतागायत सुरूच आहे!!!) 
            बघता बघता दिवस सरत होते.बालपणीचा काळ वाचन ,खेळ , किरायाने घेऊन सायकल शिकणं, ग्रामपंचायतीच्या टिव्ही वर पिक्चर, रामायण आणि चित्रहार व छायागीत पाहंणं  हे सगळं सुरू होतं.घर बेतानच चालत होतं. पण आता  वंचनेची सवय झाली होती. संवेदना बोथट झाली होती जणू!  मानसिकता रद्दाड झाली होती.. पण सोडेल ती नियती कसली!!! अचानक पुन्हा काही जाणिवेचे क्षण आले आणी त्यांनी टोचणारी आठवण करून दिली......आणी माझ्यावर साचलेल्या राखेला उडवून लावलं !!!!
             गावाच्या बाजुला आठ एक किलोमिटर वर आमचे मुळ गाव आलमला आहे. तेथे एक मोठं काॅलेज आणी शाळा होती. तिथे विज्ञान प्रदर्शनांचं आयोजन  करण्यात आलं होतं. आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते प्रदर्शन पाहण्यासाठी नेण्यात आलं. सगळे जण खुशीत होते. उल्हासाने प्रदर्शन पाहत होते.  उन चढत होतं आणी दुपारी जेवणाची वेळ झाली. सगळे जण अंगतपंगत करून जेवायला बसले.  पण......मी आणी माझा एक मित्र मात्र तिथे बसू शकलो नाही कारण फक्त  आम्हा दोघांचेच जेवणाचे डबे सहलीचे डबे नव्हते!! उगाच भिती दाटून आली! आणी आम्ही दोघे मुकाट्याने तेथुन निघुन  इकडच्या तिकडच्या गप्पा मारत एकमेकांसोबत तिकडे दुस-या झाडाखाली बसून जेवलो. आमच्या त्या गप्पांना मात्र काहीच 'चव' नव्हती!!!.
            प्रदर्शन संपलं ! सायंकाळी  आम्ही रांगेने चालत गावाकडे परत निघालो. गावाजवळ येता येता पौर्णिमेचा चंद्र गडद झाला होता.  सगळे जण त्या चंद्रप्रकाशाचा आनंद घेत एकमेकांशी  विज्ञानाच्या प्रयोगावर बोलत होते आणी मी मात्र अंधारावर मात करण्याचं रसायन  शोधत त्यांच्या मागे  फरफटत  मुकपणेचालत होतो. घरी उशिरा पोहचलो. सोबत नेलेला रिकामा जेवणाचा डब्बा जरा जोरातच  ठेवून  जुजबी बोलून मी न जेवताच झोपलो. घरच्यांना वाटले की चालून थकल्याने झाले असेल बहुधा. पण त्या विज्ञानाच्या प्रदर्शनाने मात्र माझ्या मनात वंचनेचं मांडलेलं प्रदर्शन  घोळत होतं....
           खेड्यात लहानपणी दिवाळीचा सण म्हटले की नुसती हुरहुर,आनंद, फटाके, फराळ !!एखाद महिना अगोदर पासूनच हुरहुर वाटायचे ते वय...दिवाळीला लोक अंधारावर मात होण्याचे प्रतिक म्हणुन दिवे लावतात.पण अशा कित्ती दिवाळी त्याच राॅकेलच्या दिव्याने साज-या झाल्या याची नोंद मी  आजही ठेवली आहे... आणी गोडधोडाचा हा  सण ,आहे ते अन्न गोड माणुन मुकपणे साजरा करणारे आमचे घर मी पाहीले आहे .  पण इतरांच्या दिवाळी बाबत मात्र त्याही वयात  कधी असूया अथवा कुठला मोह झाला नाही. रूखरूख मात्र वाटायची.
          तरीही, अंतरीचा दिप प्रज्जवलीत होण्यासाठी त्या अंधा-या दिवाळीने मला खुप काही दिले. तीने दिलेला अंधार मला शिलगवून गेला...तो आजही शिलगवतो!!  वंचनेची  दिवाळी "वंचिताची दिवाळी" म्हणुन परावर्तित   करण्याचा हुरूप तेथुनच मला मिळाला.
           आता दिवाळी नटूनथटून येते, पण मी तीला साजरे करत नाही!! कारण लहानपणी तीने माझ्या ओंजळीत टाकलेला तो अंधारच गुंतवून मी प्रवास सुरू केला होता प्रकाशाकडे...तीने अंधार पुरवला नसता तर 'अत्त दिप भवो' याचा अर्थच लागला नसता.... आणी 'दुरितांचे तिमीर जावो  ' हे  आर्जव ही भिनले नसते डोक्यात!!तेजाळून येण्यासाठी दिवाळीने पुरवलेला  तो घनघोर अंधार मला तीच्या पेक्षा जास्त मोलाचा वाटतो.
                  गावातले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण संपत आले होते, त्याच वेळी मिडलस्कूल स्काॅलरशीप ची परिक्षा दिली होती.  सुट्टयात मोठा भाऊ यायचा , नवोदयच्या गमतीजमती सांगायचा, मनात पुढील शिक्षणासाठी लातुरच्या वस्तीगृहात रहावं आणी तिथल्याच शाळेत जावं असा विचार येत होता.....पण माहीत नव्हतं पुढे काय वाढून ठेवले होतं...! (क्रमशः)
(प्रताप )

1 comment:

  1. खूपच सुंदर.....भाऊक झाले मन....

    ReplyDelete

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...