Monday, May 27, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 15 : ठोकर..ते शिखर....पावलांची सुरूवात...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 15 : ठोकर..ते शिखर....पावलांची सुरूवात...

               व्हायचे तेच झाले..! लाॅ फर्स्ट सेमिस्टर क्लिअर होवूनही सेकंड सेमिस्टर मी दिले नाही...आयुष्यात पहिल्यांदा ओकंबोकं वाटत होतं...MPSC साठी कित्ती निगरगट्ट झालो होतो मी!! एवढे हाल असताना चक्क सेमिस्टर स्किप...! न परवडणारा शौक जडला होता...मग काय पुन्हा किर्तीत वाढ!! "पोरगं पुर्ण वाया गेलं!!"...एक बेफिकरी घेरू लागली...नैराश्य जास्त आक्रमक बनवत होतं..तांदळे सर व्यक्ती म्हणून खुप चांगले..पण स्पर्धक म्हणून खुप बेमुर्वत!! दिवसभर मी केलेल्या अभ्यासाचा सायंकाळी येवून चारपाच प्रश्नातच निकाल लावून टाकायचे...अक्षरशः गांगारून जाई पर्यंत प्रश्नाचा भडीमार...मी अक्षरशः दबून जायचो..मानसिकता उध्वस्त व्हायची...एखाद्या तगड्या पहिलवानानं नवशिक्याला पहिल्यां शड्डूतच चितपट करून आस्मान दाखवावं...तसंच काही माझ्या सोबत व्हायचं..जिव आक्रसून जायचा...मी धुमसत रहायचो..खुन्नस यायची...पण नुसती खुन्नस काही कामाची नाही हे लगेच दुस-या दिवशी जाणवायचं... कारण सर दुस-या दिवशी अभ्यासलेल्या विषयाच्या चर्चेत अक्षरशः झिंजाडून टाकायचे....मी यामुळे अभ्यासा बाबत खुप गंभीर होवू लागलो...मला जाणवायला लागलं..."दिल्ली बहोत दुर है।" नुसता अभ्यास नाही तर प्रचंड ताकदीचा अभ्यास करावा लागेल...मी गॅलरीत झोपलेला असताना निम्म्या रात्रीही दचकून ऊठून विषय आठवत रहायचो....!!

             वर्ष सरले, शिक्षणात खंड पडायला नको म्हणुन एम.ए. (लोकप्रशासन) साठी, दयानंद काॅलेज लातुर येथे प्रवेश घेतला. काॅलेज सुरू झाले. लातूर बाहेर राहत होतो...खर्चाला पैसे नाहीत. काय करणार...?? तांदळे सरांनी सल्ला दिला..काॅलनीतील मुलांचे ट्युशन घेता येईल गच्चीवर..!! त्यांनीच बिल्डींग मधे सांगीतले...मुलं ट्युशनला येवू लागली..थोडा फार खर्च भागु लागला..मग सकाळी काॅलेज, दुपारी घरी...अभ्यास...ट्युशन..चक्र सुरू झालं...तांदळे सर अधून मधून म्हणायचे "प्रतापराव! आयुष्यात काही मजा नाही, सोबतचे सगळे क्लास वन क्लास टू झाले..मी ईथे लॅब टेक्नीशीयन म्हणुन काम करत आहे, ही MPSC खुप छळत आहे! नशिबात सिलेक्शन आहे की नाही माहित नाही..पण मी सोडणार नाही MPSC ला सिलेक्शन घेतल्या शिवाय !!!!" "Selected but not recommended " या पातळीपर्यंत जाऊन आलेले सर!! खुप हळहळ वाटायची...भितीही वाटायची आपलं कसं होईल??? आपल्याकडे तर काहीच नाही..आपण तगणार कसे...सिलेक्शनला जास्त वेळ लागला तर आपण तर तगणारच नाही....मग पक्के ठरवायचो.. ..स्वतःला वारंवार बजावायचो..."एकाच सिरीयस अॅटेम्प्ट मधे आपण सिलेक्शन घेवून बाहेर पडायचे"...कारण सरांची परवड बघवत नसायची.....आणी तसं जास्त अॅटेम्प्ट देत बसणं मला परवडणार ही नव्हतं.....!!

                                  असेच एक झुंजारू व्यक्तिमत्व!! सन्माननीय प्रकाश कुलकर्णी सर ( सध्या Asst commissioner VAT/ GST)माझे शाहू काॅलेजचे सिनीयर...अंधाराचे अग्रप्रवासी...यांच्याही वाट्याला भोगच भोग , पण अत्यंत संयत पध्दतीने वागणारे.. काॅलेजच्या गॅदरींगमधे सुंदर आवाजात गाणे गाऊन बक्षिस जिंकणारे.. हस-या चेह-या आड दुःख झाकून टाकणारे ..तांदळे सर पण यांचा खुप रेस्पेक्ट करायचे...कारण अभ्यास!!!!! प्रकाश सरांनी बि एस सी नंतर MPSC करण्याचा निर्णय घेतला होता...लातुर मधे पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीचे क्लास सुधिर पोतदार सर (अरूण पोतदार यांचे नातेवाईक) यांनी आणले होते..तेथे प्रकाश सर असायचे..11 ऑगस्ट 2002 ची राज्यसेवा , फक्त 78 जागा..700 पैकी 590 मार्क्स घेवून उपअधीक्षक भुमीअभिलेख या पदावर निवडले गेले...(जर जागा असत्या तर या मार्कावर सहज डेप्युटी कलेक्टर मिळेल एवढे मार्क्स त्यांना ! पण या जाहिरातीत फक्त भुमीअभिलेख विभाच्याच जागा जास्त होत्या) "आलीया भोगासी, असावे सादर। " या ऊक्ती प्रमाणे कधी कधी जगावे लागते...पण 2004 च्या अॅटेम्प्टला सरांनी सध्याची पोस्ट मिळवून बरोबरी साधली...यांचा संदर्भ या साठी की तेही लातुर मधे असेच शुन्यातुन घडलेले.. आमच्या जडणघडणीच्या काळात सातत्याने प्रेरणा देणारे..रस्त्याने मी चालत जात असताना मधेच कुठेतरी चालत भेटणारे..स्वतःच्या व्यक्तीमत्वाने भारणारे...अभिप्रेरीत करणारे...त्यांचे सिलेक्शन माझ्या सारख्या अनेकांच्या स्व्प्नांना तारणारे ठरले...जवळचा माणुस एवढ्या कमी जागा असताना सिलेक्ट झाला...ही आत्मविश्वास वाढवणारी घटना....नकळत त्यांनी ऊभारी दिली मनाला...अशा अनमोल प्रसंगातून मी माझ्यासाठी आत्मबळाचे कण साठवत होतो...वाटायचे.. होईल आपलेही सिलेक्शन!! पण तो योग आला नव्हता अजुन...तो आणावा लागेलच हा निर्धार मनात वाढत मात्र होता....

                    हा 2002 चा अॅटेम्प्ट आला तसा गेला. त्या नंतर एक दीर्घ अवकाश....रिती पोकळी...निर्वात...!! महाराष्ट्रात कितीतरी मुलंमुली स्वप्न जपत तगत होती...जाहिरात यायचे नाव नाही...पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, कृषी विद्यापीठे..ही तगड्या ऊमेदवारांची ठिकाणे....शांतता काळातही आपल्या शस्त्रांना धार लावणारे दिग्गज स्पर्धक येथे असायचे ...असतात...मी थोडासा सजग झालो होतो...शहरात ज्ञानप्रबोधिनी आली होती...वाटायचे..जाऊ तेथे..क्लास लावू..पण फिस.....???? गुमान बसावे लागायचे....काय करावे सुचत नव्हते...तांबे सरांनी पण क्लास काढले होते....माझी अॅडमिशन घ्यायची ताकत नव्हती..वाटले आपण शहराबाहेर राहिलो तर प्रवाहा बाहेर पडू...नाही क्लास लावला तरी किमान क्लासच्या त्या पोरांच्या संपर्कात राहता येईल...तगमग वाढली...मोठ्या भावाला भेटलो...त्याला सगळं सांगीतलं...ठरलं...काहीतरी पार्टटाईम जाॅब करत करत अभ्यास करावा...तांदळे सरांना खुप वाईट वाटले...त्यांचा 2002 चा अॅटेम्प्ट निगेटिव्ह आला होता...आणी त्याच्या नंतर मीही निघत होतो तेथुन....पण मला पर्याय राहीला नव्हता....मला त्यांनी दिलेला आधार..मार्गदर्शन याची नक्की किंमत होती पण सगळा गाडाच चिखलात रुतून बसला होता. काहीच बदलत नव्हतं..माझा तुटलेला संपर्क मला खुणावत होता..मलाच काहीतरी धाडसी निर्णय घ्यावा वाटत होता...म्हणुन मी शहरात यायचं ठरवलं....सर पण शहरात काॅलेजला यायचेच..त्यांनाही भेटता येईल..तांबे सरांच्या क्लास जवळपास थांबता येईल...गावाकडून कोणी आले तर त्यांनाही सहज माझ्याकडे येता येईल..काॅलेज जवळ पडेल अशा ठिकाणी रूम करायची असे आम्ही दोघा भावांनी ठरवले....मग पुन्हा तेच...!! स्वस्तातील पण मोक्याची रूम शोधा...झोपडपट्टी पासुन सुरूवात ......विंचवाचे बि-हाड पाठीवर....!!

                       सात आठ भांडे..स्वंयपाकाचं सामान...त्याचं चित्रकलेचं साहित्य..माझी पुस्तकं...अंथरूण पांघरून...एका दिवसात मित्राची सायकल घेवून रूम शिफ्ट केली...अडगळीची असणारी पण मौक्यावरील जागेत रूम मिळाली...मी नववी पासून ज्या शाळेत होतो...त्या केशवराज शाळेजवळ....आयुष्य पुन्हा त्याच जागेकडं वळलं होतं...ज्या शाळेच्या कोप-यावर मी दहावीची परिक्षा फिस भरण्यासाठी तळमळत ऊभा होतो...व त्या जाणीव निर्माण केलेल्या क्षणाने मला आयुष्यात काहीतरी मोठ्ठं करण्याची जाणीव करून दिली होती व त्याच शाळेनं मला आयुष्याचं गोड स्वप्न दिलं होतं..!"द अल्केमीस्ट" पुस्तकातील सॅतिएगो प्रमाणे.......

         ठरल्याप्रमाणे जाॅब शोधत फिरत असताना मी काॅलेजच्या समोरच असणा-या "एकलव्य स्वाध्यायमाला" येथे गेलो...विनंती केली..त्यांनी जाॅब दिला...तेथे मुलांचे अॅडमीशन करून आणायचे ही जबाबदारी मिळाली...त्यासाठी एरीया वाटून दिला गेला...मी झुंजत होतो..गल्ली गल्लीत फिरत होतो...ठोकरा खात होतो...घरोघरी जात होतो...लोक कधी ऐकायचे..कधी ऊभेही करायचे नाहीत...अपमान व्हायचा..जिव्हारी लागायचा...मी बजावत रहायचो...स्वतःला.."हीच तुझी लायकी आहे..अभ्यास केला असता तर 2002 च्या अॅटेम्प्ट मधे पण सिलेक्शन होवू शकले असते...खा आता ठोकरा" वाटायचं आभाळ फाडून टाकावं...जिव कासावीस व्हायचा...पण पर्याय नव्हता तांदळे सरांकडून निघुन आलो होतो..रूमचे भाडे असायचे...तगुन रहायचं होतं...लातुरभर चालत फिरावं लागायचं...दमायला झाल्यावर...कुठेतरी थांबायचो..विचार करायचो...वर्गातल्या मुलामुलींचे , ओळखीचे घर टाळून पुढे जायचो...पण व्हायचाच कधितरी धोका आणी जिव आक्रसून जायचा..नेमकं ओळखीचंच कोणी तरी दरवाजा ऊघडायचे.....पण वाटायचं..नाही आपण काम करत आहोत..यात लाज कसली??? काम केल्याने थोडेच आपण लहान होतो?? स्वाभिमान वाढायचा...पण पुन्हा वाटायचं...अभ्यास करायलाच पाहिजे नाहीतर............. "आयुष्य जगण्याच्या संघर्षात ते घडवायचे राहून जाईल"(पण या बाबतीत मी खरंच सुदैवी आहे ज्यांनी ज्यांनी मला असं काम करताना पाहिलं..त्यांनी कधीच माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहचेल असं काही केलं नाही उलट त्यांनी जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे माझे कौतुकच केले)..मी एकलव्याच्या ठिकाणी चांगले काम करू लागलो.. मोठमोठी अॅडमीशन आणु लागलो...पगार भेटायचा...खर्च भागायचा.. पण MPSC........जाहीरातीची प्रतिक्षा फक्त....

                    तेथेही मला अत्यंत चांगले व दर्जेदार म्हणावी अशी माणसे भेटली...राजेंद्र चापेकर सर..(ज्यांनी माझ्या विचाराची दिशाच बदलली, मार्केटिंग क्षेत्रात खुप परफेक्ट असणारे सर त्याही पेक्षा माणसे वाचण्यात व त्यांना अभिप्रेरीत करण्यात जास्त परफेक्ट होते, मला त्यांनी मार्केटिंग मधेही चांगले करिअर आहे पण तु तुला आवडेल व ज्याचा ध्यास आहे तेच कर असा सतत सल्ला दिला व मनाला अत्यंत ऊभारी दिली...माझ्या क्षेत्राबाहेरील गुरू पैकी हे एक माझे गुरू!!) दुसरा मित्र नव्हे भाऊच ...किशोर गवळी, MSW झालेला पण परिस्थितीने तेथे आलेला...आजचा आमचा कुटुंबाचा सदस्य किशोर भाऊ!! सतत "भाऊ होतंय रे सलेक्शन! फक्त जाहिरात यायला पाहीजे" म्हणून माझ्यातील धुनी विझू न देणारा... अॅड. उध्दव रोहिणीकर...ज्यांनी नंतर शिकून एल एल बी केले...आज लातूर कोर्टात प्रॅक्टीस करतात.. ज्येष्ठ वयाचे पाटील सर, भागवत खंडापुरे...असे अनेकजण...आयुष्य शिकवणारे...घडवणारे...तगवणारे....

             मी अधुन मधुन काॅलेज पण करत होतो..M.A. फर्स्ट इयरची परिक्षा जवळ आली होती..अभ्यास करणे आवश्यक होते...परिक्षा आणी जाॅब..यात मी परिक्षेला प्राधान्य दिले..लाॅ चे एक वर्ष वाया गेले होते..आता पुन्हा शिक्षण सोडणे परवडणारे नव्हते...मी परीक्षेची तयारी केली...खुप चांगले पेपर लिहले...विभाग प्रमुख आदरणीय प्रा. सुभाष भिंगे सर , लोकप्रशासन विषयातील व समाजकारणातील आणी बहुजनवादी चळवळीतील महाराष्ट्रातील एक मोठे नाव..त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रशासन शिकणे म्हणजे पर्वणीच....सरांचा विषयातील वकूब फार मोठा...माझ्या सोबत वर्गात यशोदा सांडुर (लोकप्रशासन विषयातील महाराष्ट्रातील सध्याची लेखिका...युनिव्हर्सिटी टाॅपर) मनिषा गंपले (एम ए प्रथम वर्ष झाल्या बरोबरच लोकप्रशासनात नेट परिक्षा उत्तीर्ण करणारी...सोबतच MPSC करणारी पण नेट नंतर दिर्घ प्रयत्न करूनही जाॅब न लागल्याने MPSC मधुन नंतर Asst. Commissioner VAT/GST झालेली युनिव्हर्सिटी रॅकर) ह्या होत्या..भिंगे सर आम्हा सर्वांना खुप चांगल्या त-हेने शिकवायचे...समजुन घ्यायचे..मलाही खुप चांगले मार्क्स आले... मी MPSC करतो म्हणुन सर सतत प्रेरणा द्यायचे..विषय कसा लिहायचा यावर अखंड बोलायचे...

         सुट्ट्या लागल्या! परिक्षेनंतर जाॅब नव्हता चापेकर सरांना भेटलो..सरांनी प्रविण शेळके( MPSC चे जुने विद्यार्थी, माझ्या ग्रुप मधील सिनियर, बॅंकिंग व इंग्रजी या विषयात MPSC मधे कायम चांगले मार्क्स घेणारे पण सरतेशेवटी सिलेक्शन न झालेले) यांचे सोबत मिळून "क्वालीटी पब्लिकेशन" नावाचे पब्लिकेशन सुरू केले होते..त्यांची पुस्तके विकण्याचे काम मिळाले..एकलव्याचा जुना ग्रुप भेटला...ते ही तिथेच काम करत होते...माझे असे काम करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी होते..पण पर्याय नव्हता...निवांत बसून अभ्यास करण्याचे नशिब नव्हते...तांदळेसर भेटायचे..क्लासेसच्या टेस्टपेपर बद्दल बोलायचे...मी क्लास लावू शकत नव्हतो..क्लासच्या आसपास ही जाता यायचे नाही...कारण ती चैन परवडणारी नव्हती..जगण्याचे वांधे होते...जेवढे पुस्तके विकू तेवढे पैसे भेटायचे...मी आणी किशोर मिळून फिरायचो...एका पुस्तकामागे 15 रूपये...रूमचे भाडे..खर्च..सगळी जुळवाजुळव..मोठा भाऊही शिकत शिकत काम करायचा कधी पेजर कार्यालयात ऑपरेटर म्हणून ..तर कधी (चित्रकलेच्या ओढीने) स्टेज डेकोरेशन, पेंटींग, गणेश ऊत्सवावेळी थर्माकोलचे मखर बनवणे...

         अधुन मधुन गावाकडून वडील यायचे...इकडचे तिकडचे बोलायचे...तळमळ पहायचे...मनातल्या मनात तळतळ करायचे...आई बिचारी काही बाही पाठवत रहायची.....तीला भेटून कितीतरी दिवस झालेले असायचे....वाटायचं कधी संपेल हे सगळं...? कधी जातील हे असे विस्कळीत झालेले दिवस....या पुस्तके विकायच्या कामाला नाही म्हणन्या इतपत स्थिती व परिस्थिती आली नव्हती... वणवण फिरत होतो...लातुर शहर संपले फिरून..मग आम्ही इतर तालुक्याला जाऊन पुस्तके विकू लागलो...भेटणारे मित्र MPSC बद्दल बोलायचे..मुक्रम भैय्या, तांदळे सर, प्रदीप ईके(पाटील), अतुल कुलकर्णी ( कक्ष अधिकारी मंत्रालय) ...पण मी काही करू शकत नव्हतो...शांततेत बसुन अभ्यास करण्या इतपत नसणा-या परिस्थितीशी मी झगडत होतो...वाटायचं खुप अभ्यास करावा...मन लावून अभ्यास करावा...पटपट परीक्षा देवून टाकावी..प्रत्येक टप्प्यात पास व्हावं....मुक्त व्हावं या दडपणातुन.....त्यासाठी सगळं कालचक्र फिरवून टाकावं...पण..... " कालै तस्मै नमःl " ...फक्त त्यास सादर असणे एवढेच माझ्या हातात होते....

                एक दिशाहिनता घेरत असते...आभाळ विरळत असते....जिव कासाविस होत असतो...तुम्ही सर्वात असुनही एकटे असता... विविध तालुक्यात पुस्तके विकायला गेल्यावर आम्ही सगळे एखाद्या लाॅजवर थांबायचो....सकाळी तयार होवून निघायचो....एका एरियातुन दुस-या एरियात जाताना व घरनिहाय अपमान किंवा विक्री होताना... पडणा-या पावलासोबत मी माझ्याशीच मुका संवाद साधायचो...माझ्या गावाबाहेरच्या माळरानावरून एक अनामिक हुरहुर येत रहायची माझ्याकडे सतत...मला व्यापत रहायची... अपमानाने डोळे पाणावायचे...चेहरा उतरून जायचा...काय करतोय आपण? काय करायचे ठरवलंय आणी चाललंय काय??? मनात यक्ष प्रश्न नुसते....झुकल्या खांद्याने मुक होवून मनात आकांत चालायचा आक्रोश चालायचा....किशोरला बरोबर समजायचं...तो उत्साह बांधायचा" भाऊ! अॅडव्हरटाइज येवू दे! बघ तु होणार!!! हे काय रं काही दिवस करायचं आहे" त्याच्या शब्दांनी मन ऊभारी घ्यायचं...खुणगाठ बांधायचं.... सांगायचं स्वतःला...काळाने ही माझी कथा कितीही दडपण्याचा प्रयत्न चालवला तरी....मी नामशेष होणार नाही... काहीही होवो...मी संपणारही नाही ! मी त्याच्याखाली नष्ट न होता त्याला भिडणार ...माझी कथा मी लिहीणारच!!!! मग मला फुरफुरल्या सारखं व्हायचं...मन आभाळाला भिडायचं.....मन आकाश व्हायचं......कुठुन एवढा यज्ञ आत चेतला होता मला माहित नाही..कित्ती अनंत मर्यादा होत्या माझ्या समोर ....पुस्तके नाहीत..मार्गदर्शन नाही..क्लास नाही..ते लावायची ऐपत नाही... आपण इतरा सारखे पुणे, औरंगाबादला अभ्यासासाठी जाऊ शकत नाही.. इतर सगळे जण अभ्यास करत आहेत..आपण दररोज जगण्यासाठीच धडपडत आहोत ..... पण एवढ्या मर्यादा जरी होत्या तरी त्याही पेक्षा जास्त पटीने मला ठाम विश्वास होता!!! आपण होणार!!! होणार म्हणजे होणारच....!! ...कसे? कधी? काही माहित नाही...पण आतला आवाज सांगायचा...मी हुरूपाने चालू लागायचो...माझी पावले अनंत व्यापण्यासाठी झपाटून पडत रहायची..कधी ...ठोकर खात..कधी..स्वतःला रोवत....!!!
(क्रमशः)



Saturday, May 25, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 14: वाट ...न सापडणारी...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 14: वाट ...न सापडणारी...



           बि ए फायनल झाले !! काॅलेज म्हणजे बाग समजुन फुलपाखरासम विहरणा-या विद्यार्थ्यांना बाहेरील वास्तविकतेशी जोडणारा हा टप्पा. एक सुरक्षित कोष फुटून खुल्या जगात येण्याचा व जागृत करणारा हा टप्पा. स्पर्धेचं निर्दयी वादळ घोंगावत असते बाहेर...आणी फुलपाखराच्या पंखाने वादळ चिरता येत नाही हे समजे समजे पर्यंत अनंत फुलपाखरे चिरडली जातात त्या वादळात असा हा टप्पा ! अशी वादळे चिरून, त्या वादळाच्या वर जाऊन जर ते दिमाखात पहायचे असेल तर पंखात गरूड बळ आणावे लागते. झुंजण्याचा सराव असावा लागतो..म्हणजे भिडता येते वादळाला थेट!! पण माझ्यासाठी ती बागच काटेरी असल्याने मला पंखाना धार लावण्याशिवाय पर्याय नव्हता. मी "काय करायचे आता ?" या पोटी व लवकर काही तरी करता येईल या साठी दयानंद लाॅ काॅलेजला प्रवेश घेतला. Mpsc करे पर्यंत अजून काही करता येईल ही धारणा तर होतीच पण ते काॅलेज सकाळी असल्याने व 12.00 वाजेपर्यंत ते संपत असल्याने दिवसभर अभ्यास करता येईल हा उद्देश पण समोर होता.
               लाॅ काॅलेजला सुर्यवंशी सर प्राचार्य होते, ते भारतीय राज्यघटना शिकवायचे. सकाळी काॅलेज सुरू झाले. पण ते शिकण्यात आता मन लागत नव्हते. एक उदासवाणी परिस्थिती होती. बिए झालो म्हणून आणी निवांत बसून रहायचे नाही म्हणून पुढे शिकायचे असं काहीसं ढकलगाडी सारखं उगीच चालत राहणं सुरू झालं..लाॅ काॅलेजला वेगवेगळ्या काॅलेज मधून व शाखेतुन मुलंमुली आलेली...त्यातील काहिना वकील व्हायचं होतं..काहींना जगापासून, बेकारी पासून आणी त्यांना कोरडेपणाने हिणवणा-या नजरांपासून लपायचं होतं त्यासाठी हे एक ठिकाण त्यांनी शोधलं होतं...मी पण त्यापैकी एक .....एक " अॅडेन्टिटी क्रायसीस" न थांबणारा...दिवसेंदिवस ओरखडे ओढणारा... आणी ते ओरखडे जास्त बेसूर दिसताहेत म्हणुन पुन्हा बोचकरणारा....रोज सकाळी काॅलेजला जायचं..आलो म्हणून बसायचं..लक्ष मात्र सगळं MPSC कडे लागलेलं.. ग्रुप मधे केलेला अभ्यास आठवायचा..हुरहूर वाटायची...पण Mpsc ची जाहिरात काही तिन महिन्याला येत नाही..ती कधी येइल माहिती नाही...तो काळही असा की जाहिरात येणं ही नशिबाचाच भाग!!(नेमक्या या चक्रात मी अडकणार होतो पुढील 3 वर्ष जाहिरातच येणार नव्हती!!! एक फक्त 78 पदाची -2002 हा एक अपवाद) मी काॅलेजला जात होतो त्यात काही राम नव्हता ! ऊगी स्वतःला कसंबसं थोपवणं होतं...फुटणा-या धरणाच्या भिंतीला पाठ लावून थोपवल्यासारखं.....वर्गात मुलंमुली चढाओढिनं शिकायची....आणी मी हरवत चाललो होतो....

            जमून आलेला MPSC चा सगळा ग्रुप विस्कटला होता. काही दिवसांनी दिलेल्या पुर्व परीक्षेचा निकाल आला...फक्त अरूण पोतदार हे क्लिअर!!!.या पुर्वी मुलाखती दिलेले तांदळे सर सह सगळे नापास....मी तर लिंबूटिंबूच...!!! अरूणभैय्या मेन्ससाठी पुर्वीच निघून गेलेले...नोकरीमुळे तांदळेसर लातुरात अडकून पडलेले...पराभवाचे दुःख एकट्याने पचवणारे...गावाकडे दुचाकीवर जायला निघून...दुःखाने ओघळणारे अश्रू ...गाडी चालवताना वारा लागल्याने आलेत असे वाटावे...अशा पध्दतीने गावाकडे जात जात मनसोक्त रडून घेणारे...सगळं मळंभ दाटून आल्यासारखं....मी सर्वच दृष्टीकोणातुन कटलेल्या पतंगासारखा झालो होतो...रूमवर ही सगळी उदासीच..मोठा भाऊही बिए झाला होता..त्याने एटिडी या कोर्सला अॅडमीशन घेतले होते..तो आपले चित्रकलेचे पॅशन घेवून चालला होता..तो एका आर्टिस्टकडे काम पण करू लागला...लहान भाऊ शाहू काॅलेज मधे वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा गाजवत होता..राज्यभर फिरायचा...बक्षिसं आणायचा..आणी परत आल्यावर पुन्हा गावाकडून ये जा करायचा...मी मात्र रद्दाड झालो होतो....वाळवंटात भर ऊन्हात कितीही चाला...हिरवळ दिसणारच नाही आणी दृश्य ही बदलणार नाही अशी अवस्था नुसती...
गावाकडे लातुरला येणा-या लोकांनी तिकडे गावात आमची अखंड किर्ती चालवली होती..."पोरं वाया गेली !!!"

                 कोणी विचारत नव्हतं....कोणाच्या लेखी आमचं काहीच अस्तित्व नव्हतं ..फक्त या फाटक्या काळात काही फाटके मित्र मात्र सतत आपले अस्तित्व राखुन होते...हरिकृष्ण कुलकर्णी , दिपक बाभुळसरे, गज्या अधुन मधुन येत रहायचे रूमवर...हरिकृष्ण आता सामाजिक व बॅकिंग क्षेत्रात एक मोठं नाव आहे नाशिक मधे.शाहू काॅलेजमधे काॅमर्स शाखा असणारा हा बहाद्दर..पण आम्हा तिन्ही भावाचा दोस्त!...राजकीय, सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र व ठाम मते असणारा, वैचारीक विरोध करणारा पण त्या विरोधासह मैत्रीचे अस्तित्व जपणारा....हरिकृष्ण ऊर्फ ह-या...ऊर्फ हरीपंत!! तो आपल्या दर्दभ-या आवाजात जुनी गाणी म्हणायचा...रूमवर बसायचा..सुखदुःख वाटत रहायचा...सोबत जेवण करायचा...तो कसा जुडला गेला हे माहित नाही पण आज पण तेवढाच तिघा भावाशी जुडला गेला आहे...मनातुन.....तसाच अजुन एक जिवलग मित्र सतीश कागदे.. सर्वांचा लाडका "!!!"....अत्यंत कष्टाळू...अत्यंत संघर्ष करणारा तरीही दिलखुलास व सर्वांचा प्रिय..सबंध काॅलेजचा काळ शिक्षण, मित्र व जाॅब ..!! स्वतः कष्ट करून घर चालवणारा...आज एका फायनान्स कंपनीत मोठ्या हुद्दयावर आहे...आजही संघर्ष करणारा...लातुरला गेल्यास...भावा कधी भेटायचे...म्हणत आग्रही असणारा....

            काॅलेजमधे काही रस ऊरला नव्हता..रोजचे जगणे अवघड झाले...रूमचे भाडे प्रती महिना सहाशे रुपये ....पण तेही गेल्या सात महिन्याचे थकले होते..घरमालकीण आजी चांगली होती..पण तिलाही पैशाची गरज भासायची......सगळं जग दुरावल्या सारखं व महाग होवून आवाक्या बाहेर झालं होतं.....सगळी जगण्याची धुगधुगी थंडावलेली अवस्था.....पण स्पर्धा परिक्षा म्हणजे एक असा निखारा आहे जो कधी विझत नाही....विझु देत नाही....

             अचानक एके दिवशी तांदळेसर रूमवर आले..त्यांनी आमचे हाल पाहिले...आणी त्यांनी मला आग्रह केला.."मला शासकीय क्वार्टर मिळाले आहे,मी एकटाच राहीन..त्यापेक्षा आपण दोघे क्वार्टरवर राहू, रूम च्या भाड्याचे पैसे वाचतील,मी दिवसभर ऑफिसला जात जाईन, माझे पुस्तके घेवून अभ्यास करत जा दिवसभर, मी आल्यावर मग डिस्कशन करत जाऊ! रेशन भरण्याची आवश्यकता नाही,गावाकडून काही मागवायची आवश्यकता नाही " मी विचार केला रोज एकटेच निरंतर ऊदास होवून फिरण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.... पण ते क्वार्टर होते एकदम शहराबाहेर..शासकीय काॅलनीत...मी विचार केला शहरात राहून तर काय असे लक्षणीय करत आहोत, आणी काय तिर मारत आहोत आपण! त्या पेक्षा जाऊ , किमान अभ्यास तरी करता येईल.सर्व चंबू गबाळ आवरून मी निघालो..दिशा नाही दशा नाही..ऊगवता सुर्य नविन काही घेवून येत नव्हता...शहरात मित्र होते पण सर्वापासून तुटुन गेलो होतो..सारेच बिचारे गांजलेले...शिकायला शहरात यायचे... डिग्री झाली आईवडीलांना वाटायचे आता शिक्षण झाले काही चांगले होईल..आपला पोरगा काही मोठं काम करील.पण शिकणा-यांनाच माहिती नव्हतं काय करायचे....आयुष्य खरंच किती गुंतागुंत निर्माण करतं....त्यातील काही बिचारे आजही संघर्ष करत आहेत जगण्याचा ...तगण्याचा....

               MPSC साठी आवश्यक म्हणून मी एम एस सि आयटी चा क्लास लावला...रोज तांदळे सर त्यांच्या गाडीवर घेवून शहरात यायचे..मी क्लास करायचो...काॅलेज शक्यतो टाळून परत चालत निघायचो...येवून काही बाही वाचत रहायचो...दिवस कटायचा नाही..मन भिरभिर असायचं..आश्रित झालं होतं आयुष्य ...तांदळेसर काही जाणवू द्यायचे नाहीत..लहान भावा सारखे जपायचे...पण मन खात रहायचं....कुठलीही झुळुक नसणा-या स्थिर पाण्या सारखं आयुष्य झालं होतं...त्यावर नैराश्याचं शेवाळ जमा होणार नाही याची दक्षता घ्यायची होती....पण काळ थांबला होता...मी एम एस सी आय टी पास झालो..तेवढीच एक कमाई पण लाॅ साठी सेमीस्टर पध्दती असल्याने आणी त्याच्या ऐवजी एम पी एस सी चा अभ्यास करत असल्याने लाॅ आपण करू शकत नाही हे समजले व त्यात वेळ जाणे योग्य नाही हे मनात ठाम केले ...आणी वर्ष संपायची वाट पाहत राहीलो...अधूनमधून भाऊ भेटत रहायचे.एकमेकांशी भेटण्यासाठी मित्राकरवी निरोप द्यायचो..दिशा ओघळून गेल्या सारखा एक निर्वात अवकाश घेरत असायचा....एकाच शहरात आम्ही तिन टोकाला तिघे.......आणी परिस्थितीशी झुंजत व कधीतरी दिवस सरतील या आशेवर आमच्या पाठीशी ठाम ऊभे असलेले आईवडील.....

                 जिव कासावीस होऊन, तगमग असुन काही चालत नाही तो काळ यावा लागतो...तो क्षण यावा लागतो...मी माळावरचा दगड होवून निपचित पडलो होतो...ऊगवणारा हर दिवस अंगावर झेलत...मला माझे दगडपण झटकून द्यायचे होते....आणी घडायचे होते एक सुबक रूपात पण मुर्तीकार ही नव्हता....जडशिळ आयुष्याला प्रतिक्षा होती एका टाक हातोड्याची...मी भविष्याचा वेध घेत तगत होतो...एमपीएससीची जाहिरात नव्हती..ऊगी वाचत रहायचो...लिहीत रहायचो...नोट्स काढायचो...पण त्याला धार नव्हती...वादळ चिरत जाणा-या बाणासारखा वेधक अभ्यास होत नव्हता..काय करावं सुचत नव्हतं...एखाद्या किरर्र जंगलात वाट हरवावी...त्यात धो धो पाऊस कोसळत रहावा...रात्र व्हावी...तो तो आपण रस्ता सापडण्यासाठी आकांताने प्रयत्न करावेत...आणी सतत चालत रहावं...आणी अधुन मधुन आपल्याला जाणवत रहावं....आपण अजुन खोल जंगलात जातोय.......(क्रमशः)

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...