Saturday, May 25, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 14: वाट ...न सापडणारी...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 14: वाट ...न सापडणारी...



           बि ए फायनल झाले !! काॅलेज म्हणजे बाग समजुन फुलपाखरासम विहरणा-या विद्यार्थ्यांना बाहेरील वास्तविकतेशी जोडणारा हा टप्पा. एक सुरक्षित कोष फुटून खुल्या जगात येण्याचा व जागृत करणारा हा टप्पा. स्पर्धेचं निर्दयी वादळ घोंगावत असते बाहेर...आणी फुलपाखराच्या पंखाने वादळ चिरता येत नाही हे समजे समजे पर्यंत अनंत फुलपाखरे चिरडली जातात त्या वादळात असा हा टप्पा ! अशी वादळे चिरून, त्या वादळाच्या वर जाऊन जर ते दिमाखात पहायचे असेल तर पंखात गरूड बळ आणावे लागते. झुंजण्याचा सराव असावा लागतो..म्हणजे भिडता येते वादळाला थेट!! पण माझ्यासाठी ती बागच काटेरी असल्याने मला पंखाना धार लावण्याशिवाय पर्याय नव्हता. मी "काय करायचे आता ?" या पोटी व लवकर काही तरी करता येईल या साठी दयानंद लाॅ काॅलेजला प्रवेश घेतला. Mpsc करे पर्यंत अजून काही करता येईल ही धारणा तर होतीच पण ते काॅलेज सकाळी असल्याने व 12.00 वाजेपर्यंत ते संपत असल्याने दिवसभर अभ्यास करता येईल हा उद्देश पण समोर होता.
               लाॅ काॅलेजला सुर्यवंशी सर प्राचार्य होते, ते भारतीय राज्यघटना शिकवायचे. सकाळी काॅलेज सुरू झाले. पण ते शिकण्यात आता मन लागत नव्हते. एक उदासवाणी परिस्थिती होती. बिए झालो म्हणून आणी निवांत बसून रहायचे नाही म्हणून पुढे शिकायचे असं काहीसं ढकलगाडी सारखं उगीच चालत राहणं सुरू झालं..लाॅ काॅलेजला वेगवेगळ्या काॅलेज मधून व शाखेतुन मुलंमुली आलेली...त्यातील काहिना वकील व्हायचं होतं..काहींना जगापासून, बेकारी पासून आणी त्यांना कोरडेपणाने हिणवणा-या नजरांपासून लपायचं होतं त्यासाठी हे एक ठिकाण त्यांनी शोधलं होतं...मी पण त्यापैकी एक .....एक " अॅडेन्टिटी क्रायसीस" न थांबणारा...दिवसेंदिवस ओरखडे ओढणारा... आणी ते ओरखडे जास्त बेसूर दिसताहेत म्हणुन पुन्हा बोचकरणारा....रोज सकाळी काॅलेजला जायचं..आलो म्हणून बसायचं..लक्ष मात्र सगळं MPSC कडे लागलेलं.. ग्रुप मधे केलेला अभ्यास आठवायचा..हुरहूर वाटायची...पण Mpsc ची जाहिरात काही तिन महिन्याला येत नाही..ती कधी येइल माहिती नाही...तो काळही असा की जाहिरात येणं ही नशिबाचाच भाग!!(नेमक्या या चक्रात मी अडकणार होतो पुढील 3 वर्ष जाहिरातच येणार नव्हती!!! एक फक्त 78 पदाची -2002 हा एक अपवाद) मी काॅलेजला जात होतो त्यात काही राम नव्हता ! ऊगी स्वतःला कसंबसं थोपवणं होतं...फुटणा-या धरणाच्या भिंतीला पाठ लावून थोपवल्यासारखं.....वर्गात मुलंमुली चढाओढिनं शिकायची....आणी मी हरवत चाललो होतो....

            जमून आलेला MPSC चा सगळा ग्रुप विस्कटला होता. काही दिवसांनी दिलेल्या पुर्व परीक्षेचा निकाल आला...फक्त अरूण पोतदार हे क्लिअर!!!.या पुर्वी मुलाखती दिलेले तांदळे सर सह सगळे नापास....मी तर लिंबूटिंबूच...!!! अरूणभैय्या मेन्ससाठी पुर्वीच निघून गेलेले...नोकरीमुळे तांदळेसर लातुरात अडकून पडलेले...पराभवाचे दुःख एकट्याने पचवणारे...गावाकडे दुचाकीवर जायला निघून...दुःखाने ओघळणारे अश्रू ...गाडी चालवताना वारा लागल्याने आलेत असे वाटावे...अशा पध्दतीने गावाकडे जात जात मनसोक्त रडून घेणारे...सगळं मळंभ दाटून आल्यासारखं....मी सर्वच दृष्टीकोणातुन कटलेल्या पतंगासारखा झालो होतो...रूमवर ही सगळी उदासीच..मोठा भाऊही बिए झाला होता..त्याने एटिडी या कोर्सला अॅडमीशन घेतले होते..तो आपले चित्रकलेचे पॅशन घेवून चालला होता..तो एका आर्टिस्टकडे काम पण करू लागला...लहान भाऊ शाहू काॅलेज मधे वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा गाजवत होता..राज्यभर फिरायचा...बक्षिसं आणायचा..आणी परत आल्यावर पुन्हा गावाकडून ये जा करायचा...मी मात्र रद्दाड झालो होतो....वाळवंटात भर ऊन्हात कितीही चाला...हिरवळ दिसणारच नाही आणी दृश्य ही बदलणार नाही अशी अवस्था नुसती...
गावाकडे लातुरला येणा-या लोकांनी तिकडे गावात आमची अखंड किर्ती चालवली होती..."पोरं वाया गेली !!!"

                 कोणी विचारत नव्हतं....कोणाच्या लेखी आमचं काहीच अस्तित्व नव्हतं ..फक्त या फाटक्या काळात काही फाटके मित्र मात्र सतत आपले अस्तित्व राखुन होते...हरिकृष्ण कुलकर्णी , दिपक बाभुळसरे, गज्या अधुन मधुन येत रहायचे रूमवर...हरिकृष्ण आता सामाजिक व बॅकिंग क्षेत्रात एक मोठं नाव आहे नाशिक मधे.शाहू काॅलेजमधे काॅमर्स शाखा असणारा हा बहाद्दर..पण आम्हा तिन्ही भावाचा दोस्त!...राजकीय, सामाजिकदृष्ट्या स्वतंत्र व ठाम मते असणारा, वैचारीक विरोध करणारा पण त्या विरोधासह मैत्रीचे अस्तित्व जपणारा....हरिकृष्ण ऊर्फ ह-या...ऊर्फ हरीपंत!! तो आपल्या दर्दभ-या आवाजात जुनी गाणी म्हणायचा...रूमवर बसायचा..सुखदुःख वाटत रहायचा...सोबत जेवण करायचा...तो कसा जुडला गेला हे माहित नाही पण आज पण तेवढाच तिघा भावाशी जुडला गेला आहे...मनातुन.....तसाच अजुन एक जिवलग मित्र सतीश कागदे.. सर्वांचा लाडका "!!!"....अत्यंत कष्टाळू...अत्यंत संघर्ष करणारा तरीही दिलखुलास व सर्वांचा प्रिय..सबंध काॅलेजचा काळ शिक्षण, मित्र व जाॅब ..!! स्वतः कष्ट करून घर चालवणारा...आज एका फायनान्स कंपनीत मोठ्या हुद्दयावर आहे...आजही संघर्ष करणारा...लातुरला गेल्यास...भावा कधी भेटायचे...म्हणत आग्रही असणारा....

            काॅलेजमधे काही रस ऊरला नव्हता..रोजचे जगणे अवघड झाले...रूमचे भाडे प्रती महिना सहाशे रुपये ....पण तेही गेल्या सात महिन्याचे थकले होते..घरमालकीण आजी चांगली होती..पण तिलाही पैशाची गरज भासायची......सगळं जग दुरावल्या सारखं व महाग होवून आवाक्या बाहेर झालं होतं.....सगळी जगण्याची धुगधुगी थंडावलेली अवस्था.....पण स्पर्धा परिक्षा म्हणजे एक असा निखारा आहे जो कधी विझत नाही....विझु देत नाही....

             अचानक एके दिवशी तांदळेसर रूमवर आले..त्यांनी आमचे हाल पाहिले...आणी त्यांनी मला आग्रह केला.."मला शासकीय क्वार्टर मिळाले आहे,मी एकटाच राहीन..त्यापेक्षा आपण दोघे क्वार्टरवर राहू, रूम च्या भाड्याचे पैसे वाचतील,मी दिवसभर ऑफिसला जात जाईन, माझे पुस्तके घेवून अभ्यास करत जा दिवसभर, मी आल्यावर मग डिस्कशन करत जाऊ! रेशन भरण्याची आवश्यकता नाही,गावाकडून काही मागवायची आवश्यकता नाही " मी विचार केला रोज एकटेच निरंतर ऊदास होवून फिरण्यापेक्षा हा पर्याय चांगला आहे.... पण ते क्वार्टर होते एकदम शहराबाहेर..शासकीय काॅलनीत...मी विचार केला शहरात राहून तर काय असे लक्षणीय करत आहोत, आणी काय तिर मारत आहोत आपण! त्या पेक्षा जाऊ , किमान अभ्यास तरी करता येईल.सर्व चंबू गबाळ आवरून मी निघालो..दिशा नाही दशा नाही..ऊगवता सुर्य नविन काही घेवून येत नव्हता...शहरात मित्र होते पण सर्वापासून तुटुन गेलो होतो..सारेच बिचारे गांजलेले...शिकायला शहरात यायचे... डिग्री झाली आईवडीलांना वाटायचे आता शिक्षण झाले काही चांगले होईल..आपला पोरगा काही मोठं काम करील.पण शिकणा-यांनाच माहिती नव्हतं काय करायचे....आयुष्य खरंच किती गुंतागुंत निर्माण करतं....त्यातील काही बिचारे आजही संघर्ष करत आहेत जगण्याचा ...तगण्याचा....

               MPSC साठी आवश्यक म्हणून मी एम एस सि आयटी चा क्लास लावला...रोज तांदळे सर त्यांच्या गाडीवर घेवून शहरात यायचे..मी क्लास करायचो...काॅलेज शक्यतो टाळून परत चालत निघायचो...येवून काही बाही वाचत रहायचो...दिवस कटायचा नाही..मन भिरभिर असायचं..आश्रित झालं होतं आयुष्य ...तांदळेसर काही जाणवू द्यायचे नाहीत..लहान भावा सारखे जपायचे...पण मन खात रहायचं....कुठलीही झुळुक नसणा-या स्थिर पाण्या सारखं आयुष्य झालं होतं...त्यावर नैराश्याचं शेवाळ जमा होणार नाही याची दक्षता घ्यायची होती....पण काळ थांबला होता...मी एम एस सी आय टी पास झालो..तेवढीच एक कमाई पण लाॅ साठी सेमीस्टर पध्दती असल्याने आणी त्याच्या ऐवजी एम पी एस सी चा अभ्यास करत असल्याने लाॅ आपण करू शकत नाही हे समजले व त्यात वेळ जाणे योग्य नाही हे मनात ठाम केले ...आणी वर्ष संपायची वाट पाहत राहीलो...अधूनमधून भाऊ भेटत रहायचे.एकमेकांशी भेटण्यासाठी मित्राकरवी निरोप द्यायचो..दिशा ओघळून गेल्या सारखा एक निर्वात अवकाश घेरत असायचा....एकाच शहरात आम्ही तिन टोकाला तिघे.......आणी परिस्थितीशी झुंजत व कधीतरी दिवस सरतील या आशेवर आमच्या पाठीशी ठाम ऊभे असलेले आईवडील.....

                 जिव कासावीस होऊन, तगमग असुन काही चालत नाही तो काळ यावा लागतो...तो क्षण यावा लागतो...मी माळावरचा दगड होवून निपचित पडलो होतो...ऊगवणारा हर दिवस अंगावर झेलत...मला माझे दगडपण झटकून द्यायचे होते....आणी घडायचे होते एक सुबक रूपात पण मुर्तीकार ही नव्हता....जडशिळ आयुष्याला प्रतिक्षा होती एका टाक हातोड्याची...मी भविष्याचा वेध घेत तगत होतो...एमपीएससीची जाहिरात नव्हती..ऊगी वाचत रहायचो...लिहीत रहायचो...नोट्स काढायचो...पण त्याला धार नव्हती...वादळ चिरत जाणा-या बाणासारखा वेधक अभ्यास होत नव्हता..काय करावं सुचत नव्हतं...एखाद्या किरर्र जंगलात वाट हरवावी...त्यात धो धो पाऊस कोसळत रहावा...रात्र व्हावी...तो तो आपण रस्ता सापडण्यासाठी आकांताने प्रयत्न करावेत...आणी सतत चालत रहावं...आणी अधुन मधुन आपल्याला जाणवत रहावं....आपण अजुन खोल जंगलात जातोय.......(क्रमशः)

No comments:

Post a Comment

तोडून...?

गोकुळ निघाले मथुरा अनाथ झाल्या गायी राधा हृदय चालले कृष्ण दिशेने पायी येईल परतून कान्हा देईल हाक हासरी? की थेट वृंदावनी मूक्ती तोडून प्राणप्...