Thursday, November 8, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 13 :बिन पावसाचा भरकटणारा ढग !!

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 13 :बिन पावसाचा भरकटणारा ढग !!



          आपण ध्येय ठरवतो, एकांताच्या अनंत पोकळीत व परिस्थितीच्या रेट्यात ते प्राप्त झाल्याचे स्वप्नही पाहतो, आणी मनोराज्य करून काही क्षणच ते स्वप्न जगतो, आणी नंतर विसरून जातो. परिस्थिती शरण होवून चालत राहतो, एवढ्या अल्प काळासाठी त्यांना जवळ करून जर आपल्याच स्व्प्नांना आपण पोरके केले तर ते जगतील कसे? त्यांना जोजवावे लागते, त्याचे लालनपोषण करावे लागते, त्यांना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांचे पालकत्व घ्यावे लागते. संकटाच्या काळात त्यांना पाठीशी घेवून झुंज द्यावी लागते, करावे लागते युध्द पराभव अंताचे . भळभळणा-या जखमांना येथे स्वतःच दुरूस्त करून घ्यावे लागते, अन्यथा अपयशाच्या अरण्यात अश्वत्थाम्यासम अनाथ रुदन नशिबी येते. त्रास होतो स्वप्न अस्तित्वात येताना पण त्यांच्या पुर्तिचा आनंद शब्दात मांडता येत नाही.ती अनुभूतीच एवढी श्रेष्ठ आहे की सगळे दुःख, वेदना,यातना यांची क्षणात फुले होतात.पण ती फुले येण्यासाठी काटे जोजवावे लागतात अगोदर....

माझे बि ए तृतीय वर्ष सुरू झाले. मी काॅलेजला जाऊ लागलो. पण आता काॅलेज मधे मन लागेल असे काही ऊरले नव्हते. एकतर ते खुप दुर होते...आणी ते जास्तच दुर वाटेल अशा घटनांनी मला वेढले होते. पण तेथे उपस्थिती अनिवार्य असल्याने नाईलाजाने जावे लागत होते. सकाळी लवकर काॅलेज असल्याने काहीच न खातापिता काॅलेजला जाणे नित्याचे झाले. धावत पळत येवून, मोठ्या भावाने केलेला किंवा केला नसेल तर तो मिळून करून कसेबसे खाऊन धावत पळत अरूण भैय्याच्या रूमवर जात होतो. त्यांचा चाललेला अभ्यास पाहून मला ऊगीचच फुरफुरल्या सारखं व्हायचे. पण माझी लिंबूटिंबू सारखी अवस्था होती. माझी धावपळ पाहून माझा वर्गमित्र सचिन आडाणे(राष्ट्रीय ख्यातीचा बास्केटबॉल खेळाडू, सध्याच्या क्रिडा शिक्षक) याने त्याची जुनी एक सायकल वापरायला दिली. ती मी काही दिवस वापरली. थोडी वेळेची बचत होत होती. दिवस झपाट्याने चालले होते. तांदळे सर , अरूण पोतदार व प्रविण शेळके तेथे खुप अभ्यास करायचे. पण अत्यंत गांभीर्याने तो करताना तांदळेसर दिसायचे. ते गेलेल्या पुर्वीच्या अॅटेम्प्ट बद्दल फार कळवळून सांगायचे त्यांची तळमळ जास्त बेचैन करायची, वाटायचे किती अपार दुःख होते निकाल गेल्यावर..!! स्पर्धा परीक्षेचे तिन टप्पे, तुम्ही कुठल्याही टप्प्यावर नापास झाले की, पुन्हा पहिल्या पासून सुरूवात..सापशिडीचा खेळ नुसता..संपेल आत्ता हा टप्पा म्हणून थोडेही गाफील राहिले की अपयशाचा साप तोंड वासून ऊभाच असतो म्हणजे तुम्ही नव्याण्णव वरून थेट एकवर...!! त्या सर्व सिनियर मुळे "सदैव सज्जता" हे स्पर्धा परीक्षेचे ब्रीद मनात ठसले. अरूण पोतदार यांच्यामुळे संदर्भ साहित्याची माहिती मिळू लागली. पण हवे ते गांभीर्य अजून यायचे होते मला...

          आता हळूहळू गावाचा विसर पडत होता. तिकडे येणे जाणे ही कमी झाले होते. आईवडिल एकीकडे आम्ही एकीकडे असे झाले होते. त्यांची काय अवस्था होत असेल हा विचार येवून व आपण आज पर्यंत काहीच का नाही केले यावरून नुसता त्रागा व्हायचा, स्वतःलाच रागे भरून घ्यायचो, पण माझ्यातील मीच मला नाईलाजाने समजवायचो...डिग्री तर पुर्ण होऊ दे.... कारण स्वप्न माझे होते..त्याच्या वेदना मला सहन करायच्याच होत्या...हे असे ओझे होते की त्याचा भार मी माझ्या शिवाय कोणालाच देवू शकत नव्हतो. लहान भाऊही आता, त्याच काॅलेज मधे शिकत होता. वादविवाद स्पर्धेत महाराष्ट्रात महाविद्यालयाचे नाव वाढवत होता. त्याचा अभिमान वाटायचा, कारण दहावी पर्यंत तो बाजुच्या गावात शिकला होता. चालत जात असल्याने, त्याला एक जुनी सायकल घरच्यांनी घेतली होती, त्या वेळी इतर मुलभुत बाबीही मिळायची मारामार...आम्ही सारेच या शिक्षणामुळे खुप काही भोगत होतो.... गेल्या वर्षी काॅलेज मधे आम्हाला नविन दोन सर शिकवायला आले होते. दोघेही प्रचंड हुशार !! दहिफळे सर राज्यशास्त्र,तर बैनाडे सर लोकप्रशासन शिकवायचे.यांच्यापैकी बैनाडे सर औरंगाबाद वरून आले होते.त्यांना MPSC चे बैकग्राउंड होते. वर्गात ते MPSC चा संदर्भ देवून शिकवायचे, त्यामुळे MPSC ची धुगधुगी माझ्या मनात सतत मेंटेन होत होती. पण आता वर्गात ती दिसणार नाही असाच मी वागत होतो. पण चुकून एकदा माझ्या तोंडून ऊत्तर देताना जास्तीची माहिती निघालीच!! सरांनी तात्काळ मला क्राॅस केले, "बाकी जास्तीचे काही सांगु नको , मला माहित आहे" म्हटले...वर्गात खसखस पिकली. मी खाली मान घालून बसलो. अपमान जिव्हारी लागला. बैनाडे सरांनाही ते ठळकपणे जाणवले...त्यांना वाईट वाटले. त्यांनी ते ज्या हाॅस्टेलवर राहत होते तेथे भेटायला सांगितले, मी गेलो..सरांना भेटलो..अत्यंत अनौपचारिक पध्दतीने त्यांनी माझा उत्साह वाढवला..स्पर्धा परिक्षा हे करिअर हातातुन सुटत जाताना त्या कॅन्डिडेटला काय वाटते याचा प्रत्यय तेथे आला...त्यावरून क्षणीक परिस्थिती सुधारण्यासाठी आपण दिर्घ दुःखी व्हायचे नाही असे मी ठरवले....मी एमपीएससी करण्यासाठी अजुन दृढ होत चाललो होतो...

                परिक्षा जवळ येत चालली होती. अभ्यास टिपेला पोहचला होता. सगळे सिनियर जिव तोडून अभ्यास करत होते. मला अभ्यासाचे गांभीर्य कळू लागले. परिक्षेचा दिवस उगवला.मी थर्ड इअर पुर्ण नसतानाही अनुभव म्हणून फाॅर्म भरला होता. प्रत्येकजण आपापल्या सेंटर वर गेले. तांबे सरांच्या क्लासवरील सिनीयर्स पण तेथे भेटले. सर्वजण गंभीर होते. सेंटर वर ज्यांना MPSC चा गंधही नव्हता ते जास्त काॅन्फिडन्स मधे दिसत होते.तर जे सिरीयस कॅन्डिडेट होते ते गंभीर!! वर्गात गेलो. पेपर पाहीला. त्यातील बहुतांश प्रश्न ओळखीचे वाटत होते. पण भरपूर प्रश्न असेही होते जे अभ्यासातील उणीव दाखवून देत होते. पेपर सोडवला. धावत पळत अरूण भैय्याच्या रूम वर आलो. आल्यावर पाहिले, सिनीयर्स उत्तरे शोधत होते.(तो काळच असा होता, त्यावेळी ना वेबसाईट, ना मोबाईल, ना यु ट्यूब, ना व्हाट्सअॅप,ना टेलिग्राम चॅनेल. जाहिरात पेपर मधे यायची, हाताने फार्म भरून पोस्टात टाकायचा, पोस्टाने हाॅलटिकीट येणार, पुर्वपरीक्षेचा निकाल कलेक्टर ऑफिसला फॅक्स रूपात यायचा. त्यामुळे आन्सर की पण स्वतःच शोधावी लागायची. जेवढे सापडले उत्तरे तेवढाच पेपर तपासून व्हायचा. मग न सापडलेल्या उत्तरासाठी आगामी "स्पर्धा परीक्षा " या मासिकाच्या अंकाची वाट पहायची नाहीतर पुणे, औरंगाबाद येथील क्लास किंवा कृषी विद्यापिठातील आन्सर की मिळवण्याची धडपड करायची. ती मिळाली की आन्सर की नुसार बरोबर आलेल्या उत्तरांची संख्या कमी जास्त व्हायची.निकाल लागेपर्यंत जिव टांगणीला रहायचा. तो कधी लागेल हे पण माहिती नसायचं) त्यावेळी 200 मार्क्स चा एकच पेपर राज्यसेवा पुर्व परिक्षेसाठी असायचा, व 170 च्या मागे पुढे कटऑफ असायचा. सगळ्याची उत्तरे तपासून झाली. सगळ्यात कमी माझे बिट होते. 132 फक्त!! मला निकाल नाही येणार या बद्दल वाईट वाटत होते.(तसा येऊन तरी मी थोडाच मुख्य परिक्षा देवू शकत होतो) पण माझ्या अभ्यासाची पातळी उंचावली आहे याचे आत्मभान मला त्यामुळे आले, मला अजून किती अभ्यास करायचा आहे याचा अंदाज आला.आणी आपण या परीक्षेला सामोरे जाऊ शकतो हे समजले.. लातूर मधे साधारणतः मुख्य परिक्षे साठी कुठलीच मुले थांबत नसत, ते सरळ पुणे किंवा औरंगाबादला जायचे . तांदळेसर व मी वगळता प्रत्येकाला लातूर सोडायला संधी होती. मी अधून मधून तांबे सरांच्या क्लास कडे पण जाऊन येत होतो. तेथे काय सुरू आहे हे ही पाहत होतो.सगळेजण अभ्यासासाठी परेशान असायचे....कोंडी मात्र फुटत नव्हती.जणू काळाचा गुंता झाला होता.पुर्वपरिक्षे नंतर अरूण भैय्या लातूर मधे थांबले नाहीत...तांदळेसर राहिले फक्त...सुगीचे दिवस सरल्यास पाखरांचे थवे निघून जातात आणी रानात एखादे बाभळीचे झाड एकटेच ऊभे रहावे अशी अवस्था झाली होती...माझी...

               रूमवर थांबत होतो. तेथे प्रदिप इके (सध्या महाराष्ट्र अकॅडमी चा संचालक, पुण्यातील सध्याचा नामांकित एमपीएससी मार्गदर्शक )हा रहायला आला. तो ही एकदम खेड्यातून आलेला होता. त्याच्या मागोमाग लहू भोसले व त्याचा चुलत भाऊ भुजंग भोसले हे ही रहायला आले. हे ज्युनिअर मुले पण स्वप्नाचं गाठोडं घेवून शहराकडे अपेक्षेने निघणा-या रांगेतील सहप्रवाशी...आम्ही सगळे एकमेकांशी जुळवून रहायचो..गावाकडील खबरबात कधीतरी मिळायची..सणासुदीला कोणाकडून तरी डबा यायचा..आलेच कधी घरून कोणी तर घरचं जेवण...कधिकधी हे सोबती त्यांच्या गावाकडे जावून यायचे..मी मात्र तेथेच पाण्याने वेढलेल्या बेटा सारखा..अनंत प्रवाह झेलत...!! आई बिचारी गावाकडे कुढायची..वडील झगडत रहायचे..आम्ही सगळेच परिस्थितीशी दोन हात करत होतो जेथे आहोत तेथे राहून! मी तिकडे अभ्यासासाठी मरमर फिरायचो.. तर गावात इकडे काही अर्धवट रावांनी पोरं बिघडले आहेत बि ए साठी कधी रूम करावी लागते का? मुलं आईबापाला मूर्खात काढत आहेत अशी बदनामी (की किर्ती) चालवली....वडील कधि बोलायचे नाहीत पण येवून अंदाज घ्यायचे आमचा....आणी चार सुज्ञपणाच्या गोष्टी सांगून अभ्यास करत रहा म्हणून आम्हाला सांगायचे... सहा सहा महिन्याचे रूमचे भाडे थकल्याने जिव मेटाकुटीस यायचा.

             परिक्षा झाली होती, गांभीर्याने अभ्यास करणारा ग्रुप जागेवर नव्हता. मी काॅलेजला जात होतो. पण मन सदैव बेचैन असायचे. काही नविन मित्र झाले. त्यापैकी एक म्हणजे दिपक बाभळसुरे. त्याचे इंटरनेट कॅफे काॅलेजच्या रोडवर होते व घर माझ्या रूम च्या रस्त्यावर. त्याची गजा मुळे ओळख झाली. मग ऊगीचच मी कॅफेवर जाऊन बसू लागलो. तो ही येता जाता रूमसमोर येवून आवाज द्यायचा. मी जात रहायचो.. रिती अवस्था नुसती..

          बि ए तृतीय वर्षाची परिक्षा जवळ आली..पुन्हा गजा रूमवर यायला सुरूवात झाली. मग तेच..नोट्स, झेराॅक्स, परिक्षा...इत्यादी.. मी अभ्यास करून परिक्षा दिली..आणी दुस-याच दिवसा पासून एमपीएससीच्या अभ्यासासाठी तगमग सुरू झाली...तांबे सरांनी आता व्यावसायिक स्तरावर क्लास सुरू केले होते...पण मी तेथे जाऊन काय करणार होतो...मी रूम च्या आसपास राहू लागलो..तिकडे तांबे सरांच्या क्लास मधे धनवंतकुमार माळी सर (पुर्विचे शिक्षक, अत्यंत जिद्दी स्पर्धक , दररोज नोकरी करून औसा या तालूक्याच्या ठिकाणी येवून मग नंतर क्लासला येणारे, तरीही क्लास मधे सर्वाधिक मार्क घेणारे, माझ्या अगोदर राज्यसेवेची परिक्षा दिलेले , पण माझ्या नंतरच्या अॅटेम्प्टला प्रथम नायब तहसीलदार व नंतर महाराष्ट्रात एमपीएससी च्या यादीत अव्वल क्रमांकाने पास होऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवड होऊन अभ्यास सातत्याने कसा करावा याचे व नोकरी करत करत अभ्यास कसा करावा याचे रोलमाॅडेल ठरलेले) ,लहान असुनही सचोटीने अभ्यास करून नंतर सिलेक्शनच्या यादीत आलेला अतुल कुलकर्णी ( एक उत्कृष्ट कवी, चांगला स्पर्धक व व्यक्ती, सध्या  कक्ष अधिकारी - मंत्रालय) यांची नावे समजली..इतर मुले ही अभ्यास करत होती. त्यात प्रकर्षाने माहिती झालेले नाव म्हणजे प्रकाश कुलकर्णी सर ( अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले, उत्कृष्ट गायक असणारे, अत्यंत सज्जन व्यक्ती ,माझे काॅलेजचे सिनियर , युपिएससी मधे धडपडणारे,नंतरच्या राज्यसेवेच्या अॅटेम्प्टला ऊपजिल्हाधिकारी संवर्गात सहज निवड होऊ शकेल इतपत उत्कृष्ट मार्क येवूनही निव्वळ त्या वर्षिच्या जाहिरातीत केवळ 78 एवढ्याच पोस्ट असल्याने त्या ऊपलब्ध पोस्ट पैकी उपअधिक्षक भुमि अभिलेख झालेले, मात्र नंतरच्या काळात सहा. आयुक्त (विक्रिकर) म्हणून निवड झालेले, एक अनुकरणीय व्यक्तीमत्व) यांची नावे कळायला सुरूवात झाली. ते चांगली तयारी करतात हे कानावर येवू लागले.लातूर मधे हळुहळु MPSC बाबत प्रयत्न सुरू झाले होते. माझी बि ए तृतीय वर्षाची परिक्षा संपल्याने मी रिकामा झालो होतो, लातूर मधेच थांबलो होतो.आणी जाण्यासारखं कोणतं ठिकाण तरी होतं मला? काही मुलंमुली आवश्यकते प्रमाणे पुण्याला क्रॅश कोर्स साठी जायचे. आणी परत येवून अभ्यास करायचे. पण माझ्या आर्थिक मर्यादा असल्याने मी कुठेच जाऊ शकत नव्हतो. माझी अवस्था चिखलात रूतलेल्या बैलगाडीसारखी झाली होती...जायचं आहे..धडपड ही सुरू आहे..पण जो जो निघावे.. तो तो रूतत जावे जास्त खोल अशी....

             त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी काय केले....???? जसा बिन पावसाचा ढग भर दुपारी आकाशात भरकटत असतो तसा भरकटत राहिलो...नाही म्हणायला तांदळेसरांना माझ्या परिस्थितीचा थोडा अंदाज आला होता. पण ते दररोज आपल्या नोकरीला जायचे..अरूण भैय्याही गेले निघून, तांबे सरांचे क्लास ही तेथुन निघुन गेले, ज्या काॅलेज मधे गेली पाच वर्ष शिकलो, आयुष्य घडवणा-या विविध घटना जगलो, ते काॅलेजही संपले...आता तिथेही बदल... रित्या क्षणांची दिर्घ मालिका..वेढलेल्या गर्दितही तळमळणारे एकाकीपण ......दिशाहीन प्रवास..जायची तळमळ खुप पण काहिच जुळून न येणारे...अवकाळी पाऊस तरी अचानक येतो, धांदल ऊडवतो पण तो येवून गेला की सुखद वाटते....तसं काही अवचित घडावं असं ही काही नाही..निरंतर तेच ते सुर्य उगवणे...मावळणे..रात्र होणे आणी उजाडणे.... मी मात्र आस घेवून त्या नवसुर्याची ..निःशब्द चालत होतो दिशाहीन कधी पावलांना टाकत तर कधी पावलांनी पुढे ओढल्याने...या सुट्ट्यात मी आत्मचिंतन केले, अनंत विचार केले...मनोराज्य केले..स्वप्न पाहीली, ते वास्तवात येत नाहीत म्हणून..त्यांना शिव्याही घातल्या..मुका मुका आकांत नुसता...काय करू काय नको नुसती तगमग नियती माझी सत्वपरीक्षा घेत होती जणू...आणी मी त्याच त्या अवस्थेला कंटाळलो असल्याने बदल माझी वाट पाहत दबा धरून बसला होता..तो योग्य वेळी माझ्यावर झडप घालणार होता ..आणी फरफटत नेणार होता मला....त्या क्षणा पर्यंत..ज्या क्षणाला मी टाचा रोवून थांबणार होतो, आणी बदलाला अंगावर झेलून त्यालाच भिडून, त्या बदलालाच बदलण्यासाठी निकराची झुंज देणार होतो...आणी त्यालाच फरफटत नेणार होतो स्वप्नपुर्तिच्या टप्प्यावर..युध्दाचे ढग जमु लागले होते... आणी येणारे दररोजचे सुर्य उजाडण्या अगोदरच शंखनाद करणार होते....आणी मीही लढायच्या आणी भिडायच्या टप्प्याकडे नकळत निघालो होतो....(क्रमशः)
(प्रताप)

Saturday, November 3, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 12 : दगडपण गळून पडताना.... !

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 12 : दगडपण गळून पडताना.... !!


           शाहू काॅलेजच्या क्लासेसला आम्ही सगळे जण बसत होतो. अनेक मुलंमुली नव्याने येत होते. काही काॅलेज बाहेरच्या मुलांना पण प्रवेश दिला गेला ...तेथे अत्यंत स्टायलीश पध्दतीने येणारे दोघे म्हणजे राजा आणी संदिप!! ( हे नंतरच्या काळात आयुष्य भराचे मित्र झाले, राजेंद्र ढाकणे(शालेय पोषण आहार अधिक्षक) ऊर्फ राजा...वयाने मोठा असुनही आम्हा सगळ्या लहानांना भावंडाप्रमाणे वागवणारा अत्यंत मॅच्युअर व धाडसी असणारा पण तसा न दिसणारा!!, महाराष्ट्रातील नामांकित बुध्दीमापण चाचणी शिकवणारा, ट्रेकिंगवेडा, आणी सगळ्यात अगोदर संदिपचा जिगरी दोस्त व त्यानंतर सगळ्याचा दोस्त असणारा मित्रवेडा मित्र!! .....आणी दुसरा माझ्यासाठी एकदम खास!! एकदमच जिगरी म्हणजे संदिप जाधव ! ऊर्फ ...त्याला मर्यादाच नाही...!! सध्याचा (असिस्टंट डेस्क ऑफिसर) पण त्या काळातील माझा सच्चा साथी..दिलदार मित्र आणी माझ्या पडत्या काळात मला सर्वस्तरीय व यथाशक्ती मदत करणारा, सणासुदीला मी सण सोडून उपाशी बसलो आहे हे माहित असल्याने घरून गुपचुप डबा आणनारा व तो खास कारणाने आणला आहे हे कळू न देण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा, दुःखाच्या प्रसंगी हक्काने बोलवणारा आणी दुस-याच्या दुःखात न सांगता येऊन आधार देणारा, यामाह वेडा, रायडर, अत्यंत मॅच्युअर व धाडसी दिसणारा पण मुळात तसा नसणारा!!! , स्पर्धापरिक्षा क्षेत्रात खुप काही पाहिलेला.. आणी आजही जसा होता तसाच संपर्कात असणारा अत्यंत हळवा, संवेदनशील असा मोठा भाऊच जणू !!) ते दोघंही अनुभवी स्पर्धक होते. ते आल्याने अजुन स्पर्धेत चुरस यायला लागली, मी मात्र खिंड लढवत होतो...न घाबरता भिडत होतो..थोडं दुर्लक्ष झाले की फटके बसायचे अक्कल ठिकाणावर यायची..अभ्यासाची रंगत वाढली होती..अवघड अवघड विषय डोकं जड करत असायचे...तरीही प्रयत्न करत असायचो...निसर्गरम्य ठिकाणी जायची ओढ असावी, फुरसतही असावी , मुबलक पैसा असावा..आपण निघावं..आवडती गाडी असावी..भरधाव वेगानं आपण निघावं...आणी अचानक रस्त्यात ट्रॅफिक जाम लागावा..तस्सच झालं. काॅलेजच्या वार्षिक परिक्षा जवळ आल्याने काॅलेजचे क्लास बंद झाले..शेवटी कितीही झालं तरी हा क्लास म्हणजे काॅलेजसाठी एक उपक्रमच होता..! जो काही चार पाच महिन्याचा काळ मला शिकायला भेटले ते अनमोल होते पण अपूर्णता जाणवत होती. जिव था-यावर नव्हता. ऐकून होतो परभणीला कृषिविद्यापिठात खुप मुलं तयारी करतात पण तेथे मी जाऊ शकत नव्हतो. औरंगाबादला क्लास चालतात हे ही माहित होतं पण क्लासची फिस मी भरूच शकत नव्हतो. तशी ऐपतच नव्हती (आयुष्यात मी पहिल्यांदाच औरंगाबाद पाहिले तेही मुळात राज्यसेवा मुख्यपरिक्षा द्यायला गेल्यावर!!) कालय तस्समैय नमः!!!!माझी वेळ आलीच नव्हती, ती आणावीच लागेल हे मात्र मला जाणवत होते..मांडलेला सारा डाव तुटत जाणे हे स्पर्धा परीक्षेचे वैशिष्ट्य आहे. आणी जिद्दीने पुनः वारंवार ऊभे राहणे हे सच्च्या स्पर्धकाचे लक्षण..!!

                जगद्गुरु तुकोबा म्हणतात "आलिया भोगासी असावे सादर" मी गुमान काॅलेजचा अभ्यास सुरू केला.डिग्री असल्याशिवाय आपल्याला परिक्षा देता येणार नाही हे स्वतःला बजावून मी वाचत होतो. रात्री बसायचो, नोट्स काढायचो, दुस-या दिवशी त्या नोट्सच्या अनेक झेराॅक्स निघायच्या! रात्री अभ्यास करण्यासाठी गज्या यायचा, सोबत बसायचा,इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या,   मोठा भाऊ अर्थात भैय्या ही क्लासमेट असल्याने तोही सोबत अभ्यास करायचा. भविष्यात काय करायचे चर्चा व्हायची..माझ्या मनातील जखमेची खपली निघायची,मी मुकामुका होवून कुढत कुढत अभ्यास करायचो, मी आत्ममग्न होऊन माझी जखम भळभळताना अनुभवायचो, उदास उदास वाटत रहायचं. आपण कधी MPSC करू शकू का? कसं होणार आपलं? पुस्तके नाहीत, पैसे नाहीत, मार्गदर्शन नाही, लातूर सारख्या ठिकाणी दहा पंधराजण कसेबसे एकत्र येवून तुटपुंजा प्रयत्न करत होते तर तो ही तडीस जात नाही....अनंत प्रश्न घेरत असायचे...वडील यायचे, काहीतरी खायला आणायचे..गावाकडले हाल सांगायचे, प्रयत्न करत रहा म्हणायचे..खिशात एक रुपया नसायचा..कुठे जायचेच असेल तर चालत फिरावं लागायचं...कोणी मित्र आलाच तर त्याच्या गाडीवर जायचो...शेवटी डिग्री शिवाय पर्याय नाही..पाहू अगोदर ती तरी करून घेवू हा विचार करून मी अभ्यास करत रहायचो. काॅलेजच्या लाएब्रेरी मधून क्रमिक पुस्तके घ्यायचे कुठल्या मित्राने गाईड आणले तर ते मागुन वापरायचं असं करत करत मी परिक्षा दिली. सुट्ट्या लागल्या, पण गावाकडे जाता येत नव्हतं, कारण गेलो तर मिळालेली रूम जाइल ही भिती ! आणी सुट्टयात लातुरात रहायचे तर कसे टिकायचे? काय करायचे? रूमचे भाडे कसे द्यायचे ही त्याहूनही जास्त भिती!! इकडे आड तिकडे विहीर!!!सुट्टयात MPSC चा अभ्यास करायचा तर माझ्याकडे फक्त दोनच पुस्तके , एक म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा संच आणी दुसरं के'सागर चं सामान्य अध्ययन ,आणी तुटपुंज्या काही विषयाच्या नोट्स. ना काॅलेज,ना क्लास, ना गावाकडे,ना मित्राच्या घरी , जायचे तर कोठे आणी कसे? का? दर सुट्ट्यात काम करून शिकायचं नशिबी..वाटायचं या सुट्ट्यात कुठंतरी काम करावं..पण काही सुचत नव्हतं...सगळा अंधार....ठार अंधार......पण मनात होती आशा प्रकाशाची...वाटायचं येईल कधीतरी तो कवडसा...आपण फक्त टिकून रहायचं...तग धरायची...उगवेल कधी दिवस आपलाही..जातील हेही दिवस!बाजुच्या रूम मधे कैलास, त्याचा लहान भाऊ जयराम रहायला आले होते, खेड्यातून आलेले मुलं होते ओळखी झाल्या, तेही तगत होते. आम्ही ऊगीचच भरकटलेल्या पतंगाप्रमाणे काही बाही बोलत असायचो. दिवस काढत होतो पण मन MPSC च्या आभाळात गिरक्या घेत असायचं.......

      एके दिवशी मित्राने सांगितले नांदेड नाक्यावर(माझ्या रूम पासून आठ किलोमीटर अंदाजे) एक मुलगा राहतो तो दरवर्षी पुर्वपरिक्षा पास होतो, वाटले चला त्याला भेटून मार्गदर्शन घेऊ, त्याला विचारू, आणी मग मी सकाळी चालत निघालो, जाताना हातात अभ्यासाचे मुद्दे काढलेली छोटी डायरी होती..पाठ करत करत तेथे पोहचलो. त्याच्या घरी जाऊन विचारले. तो बाहेर आला त्याने मला बाहेरूनच चौकशी केली.आणी मग मी बि.ए. सेकंड ईअरची परिक्षा दिली आहे हे माहित झाल्याने त्याने मला डिग्री झाल्यावर भेटायला सांगितले. मी त्यांना विनंती केली की मी थोडासा अभ्यास करू शकेन जर त्यांनी मला काही मार्गदर्शन केले तर, त्यावर त्यांनी मला म्हटले," मित्रा तिन वर्ष मी MPSC मधे घासतो आहे, खुप अभ्यास करावा लागतो, तुला एका दिवसात काय सांगु?" मी निराश होऊन त्याचे आभार मानून निघालो. पुन्हा त्याला काय वाटले माहित नाही मला परत बोलाऊन त्यांनी मला एक फोन नंबर लिहून दिला.आणी सांगितले "हा नंबर ठेव, डिग्री झाल्यावर फोन कर, तो पर्यंत माझे सिलेक्शन झाले असेल, माझी पोस्टिंग कुठे झाली ते तुला कळेल, तु मला तेथे येवून भेट ,मी तुला सांगेन मग सगळं!" मी होय म्हटले. मी परत निघालो. त्या मित्राची चुक नव्हती, मी परिक्षे बद्दल किती गंभीर आहे हे कदाचित त्यांच्या पर्यंत पोहचले नव्हते. ऊन तापले होते. मी ही खुप तापलो होतो. माझ्या मनात नाना विचार येत होते. सरतेशेवटी माझ्या मनात विचार आला हे हात आता मदती साठी असे कधी पसरायचे नाहीत स्वतःच ईतके मजबूत व्हायचे की आपण दुस-याला मदत करायची.( माझे सिलेक्शन झाल्यावर तोच मित्र- एक ग्रुप लातूर मधे आख्खा सिलेक्ट झाला आहे हे समजल्याने भेटायला आला त्याचा शेवटचा अॅटेम्प्ट तरी त्याला जाऊ द्यायचा नव्हता म्हणून तो आला होता, तेथे मला पाहून त्याला आश्चर्य वाटले, मी त्याला दादा तुम्हीही होऊ शकता ,माझ्या सा-या नोट्स घेवून जा! असे म्हणून पुर्ण बंच झेराॅक्स करून दिला, मी त्यांना कुठलीच अट टाकली नाही, ते म्हणाले "मी तुला त्यावेळीच सिरीयस घेतले असते तर माझेही सिलेक्शन झाले असते,मी म्हणालो मग आता घ्या!व्हाल तुम्ही!! त्यांनी खुप वेळा आभार मानून माझी माफी मागितली, मी त्यांना आपल्या पेक्षा मी खुप लहान आहे कृपया माफी मागु नका, मी दुस-या नोट्स मिळाल्यास नक्कीच पाठवतो म्हणून मी त्यांना रवाना केले, दुर्दैवाने पुढे त्यांचे MPSC त सिलेक्शन झाले नाही ते आज प्रगतिशील शेती करतात,आणी अधुन मधुन स्वतः होवून मला फोन!!!)


     जसे पाणी आपला मार्ग शोधतेच, तसे स्वप्न ही आपला मार्ग शोधत असते. गरज असते ती त्यावर विश्वास ठेवण्याची आणी त्याला घट्ट पकडून स्वतः सोबत चालत ठेवण्याची, दृढ इच्छाशक्ती असेल व स्वप्नपूर्तीचा ध्यास असेल तर नियती काही मददगार स्वतः पेरते आयुष्यात! आश्चर्य वाटेल इतपत काही असंबंध व्यक्ती संपर्कात येवून आपल्या स्व्प्नांना आधार देतात.आणी पथदर्शी ठरतात.आणी प्रत्येक ध्येय्यवेड्या व्यक्तीचा हा अतिविशिष्ठ अनुभव असतोच.उन्हाळ्याच्या सुट्ट्या एकदम भकास पध्दतीने चालत होत्या, वैताग येत चालला होता, मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो. एकदा असाच एमपीएससीचे पुस्तक हातात घेऊन मी गल्लीतुन चालत जात होतो.अचानक बाजुच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून मला आवाज देणारा एक मुलगा दिसला.मी थांबलो..तो खाली उतरला. त्याने मला विचारले, तु MPSC चा अभ्यास करतोस का?, मी तुझ्या हातात पुस्तक बघितले म्हणून विचारले अशी पुस्ती त्याने जोडली. मी नुकताच सिनीयरला विचारायला जायच्या अनूभूतीने निराश होतो. मी त्यांना सांगितले "प्रयत्न करत आहे." त्यावर त्यांनी मला या अगोदर पुर्वपरिक्षा दिली का? कुठली तयारी करतो वगैरे सखोल चौकशी केली. मला तांबे सर मुळे किमान माहिती होतीच. मी त्यांना मला जे जे माहिती होते, व मी किती अभ्यास केला हे सगळं सांगितले. त्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी अरूण पोतदार,(अत्यंत पॅशनअसणारा, कोमल मनाचा हा व्यक्ती, सगळ्यात असूनही आपले अस्तित्व जतन करणारा व MPSC या शब्दा खातर कोणावरही विश्वास ठेवून त्याला मदत करण्यास तत्पर असणारा हा व्यक्ती) राज्यसेवा पुर्वपरिक्षा या अगोदर पास झालो होतो. पण मुख्य परीक्षेची तयारी न झाल्याने मी ती दिली नाही.आता 2001 ची पुर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी आलो आहे. तु माझ्या सोबत अभ्यासाला बसशील का? मला एकदम धक्का बसला. खुप आनंद ही झाला.मी त्यांना सांगितले की, मी इथेच बाजुला राहतो. मी बसत जाईन तुमच्या सोबत. पण माझ्याकडे जास्त पुस्तके नाहीत. त्यावर ते म्हणाले माझ्याकडे पुस्तके आहेत. तु माझ्या रूमवरच बसत जा. मला विश्वास बसत नव्हता की मी जिथे राहतो तेथेच आसपास एवढा सिरीयस आणी अनुभवी व्यक्ती भेटेल. म्हणून मला पुन्हा सांगावेसे वाटते. आपले स्वप्न जिवंत असेल तर नियती मदत करतेच!!.( पुढे अरूण पोतदार STI झाले आणी आता ते असिस्टंट कमिशनर व्हॅट म्हणून कार्यरत आहेत. त्याच अॅटेम्प्टला त्यांची छोटी बहीण रोहिणी ही PSI झाली आता ती API पदी कार्यरत आहे..आणी त्याच वर्षीच्या राज्यसेवेतुन माझेही सिलेक्शन आहे..पण तो अॅटेम्प्ट 2001 चा नव्हता!!!! अजून खुप खस्ता खाणे बाकी होते..आयुष्य शिकायला मिळायचे होते. नविन धक्के बसायचे होते!!)
माझ्या Mpsc च्या यशाचे अत्यंत महत्वाचे कारक म्हणजे अरूण भैय्या!! ज्यांनी विस्कटलेला आमचा ग्रुप एकत्रीत करून ही यशोगाथा लिहिण्याची संधी मला मिळवून दिली.

          मी अरूणभैय्याच्या रूमवर अभ्यासाला बसू लागलो. इतके दिवस माझा अभ्यास इतरांच्या साथीने सुरू होता.त्याला एक कोष होता. पण येथे तो कोष विरून गेला. जिव टांगणीला लागावा ईतके खुजेपण अभ्यासात जाणवू लागले. मी ते कमी व्हावे या साठी जिव तोडून अभ्यास करत होतो. तेथे त्यांचे अत्यंत अनूभवी व सिनियर असणारे मित्र प्रविण शेळके अभ्यासाला यायला लागले. राज्यसेवेची मुलाखत दिलेला हा माणूस (दुर्दैवाने त्यांचे सिलेक्शन नंतर झाले नाही) ते अभ्यास, चर्चा करत आणी मी विचारच करत रहायचो की हे दोघं जे बोलत आहेत त्याचे तर बेसिक नाॅलेज पण आपल्याला अजून आले नाही. त्यांनी माझी दखल घेण्याइतपत ना माझा अभ्यास होता ना माझे वय! त्यांच्या लेखी मी एक काॅलेजचा विद्यार्थी होतो. आणी हे खरे ही होते. त्यांनी त्या टप्प्यावर मला तेथे बसायला संधी दिली हिच मोठी गोष्ट होती. ते दोघं 2001 च्या पुर्व परिक्षे बद्दल गंभीर होवून अभ्यास करायचे. माझ्या अनुभवाची रुंदी वाढत होती..मी सारे काही टिपून घेत होतो..मला खुप दूरचा पल्ला गाठायचा होता. मी एक एक टप्पा पार करायचे ठरवले...हा पाया भरणीचा टप्पा होता.

           रूमवर जे ऊपलब्ध सामान असायचे त्यातुन आम्ही जमेल तसा स्वयंपाक करायचो, कधी तो व्हायचा, कधी तो व्हायचा नाही. तरीही दिवस ढकलत रहायचो. मोठा भाऊ चित्रकलेच्या छंदाने लातुरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी जायचा,मी अभ्यासाला जायचो. अभ्यास करत होतो.खुप प्रयत्न करून चर्चेची तरी पातळी गाठावी हा उद्देश होता.परीक्षेला सामोरे जाताना अभ्यास कसा करायचा याचे धडे मिळत होते.पण अजुन एक कठोर समीक्षक, ज्येष्ठ बंधुसम असणारे, खंदे स्पर्धक, व जवळपास संपुष्टात आलेली व मृतप्राय झालेली संधी अक्षरशः जिवंत करून तिचे सोने करणारे, आम्हा सगळ्यांनाच ज्येष्ठ असणारे, अनुभवी असणारे, ज्यांनी ऑलरेडी राज्यसेवेच्या मुलाखती देऊनही पराभवाचे विष पचवून लातुरला लॅब टेक्निशीयन पदावर नोकरी निमित्त आलेले सौदागर तांदळे सर (सध्या नायब तहसीलदार)यांचा नाट्यमय प्रवेश होणे बाकी होते( आमच्या ग्रुप मध्ये सर्वाधिक अॅटेम्प्ट देवूनही न थकता, न हारता,MPSC ने वारंवार पीछेहाट करूनही सरते शेवटी MPSC ला आपली जिगर दाखवून तिलाच धोबीपछाड देवून शब्दशः यश खेचून घेणारे हे सर! मला ज्यांनी अभ्यास कसा खुन्नस आणी जिगरने करायला पाहिजे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिकवले, आजही आम्ही आमच्या पदांची कुठलीही वरिष्ठता कनिष्ठता न ठेवता त्यांना सरच म्हणतो. अत्यंत मायाळू पण त्याहूनही जास्त कडवा स्पर्धक असणारा हा व्यक्ती यांनी मला जे सहकार्य केले ते कदाचित एखादा भाऊच करू शकला असता. माझ्या संघर्षाला यांनी टोकदार केले, यांच्या संघर्षाची कहाणी खुप उद्बोधक आहे.)

        अरूणभैय्या जेथे राहत होते. ती बिल्डींग मोठी होती,तेथे विद्यार्थी भाड्याने राहत होते. तेथे रूम पाहण्यासाठी तांदळे सर आले. ते मुळचे बिड जिल्हयातील पण लातुरच्या पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन शासकीय महाविद्यालय येथे पोस्टिंग मिळाल्याने ते रूम शोधत नेमके तेथेच आले आणी नेमके त्यांनी अरूण पोतदार यांच्या रूम बाहेरील चिकटवलेला " कृपया गोंधळ करू नये, येथे MPSC चा अभ्यास करणारी मुले राहतात" या आशयाचा कागद त्यांनी पाहिला.मग काय!! दारावर एक जेंटल नाॅक , रितसर प्रवेश, एकमेकांचा अंदाज घेणे, पहिलवान कुस्ती अगोदर एकमेकाला कसे जोखतात तसेच मला वाटत होते, ते दोघे बोलताना. त्यांचे बोलून झाले.सर म्हणाले मला अपेक्षाच नव्हती, लातुरात MPSC करणारे कोणी भेटेल!! आणी सरतेशेवटी तो एक प्रश्न, माझ्याकडे पाहून, " हा बारावीचा मुलगा येथे काय करत आहे?" माझी त्यांनी त्यावेळी घेतलेली ही दखल!! आणी माझे सिलेक्शन झाल्यानंतर त्या अॅटेम्पटला ते नसतानाही त्यांनी मला दिलेली दाद व आजही अत्यंत अभिमानाने त्यांचे माझ्या बद्दल बोलणे... सगळंच स्वप्नवत व आयुष्य नितीतत्वाने जगायला शिकवणारे....!! सरांनी त्या सायंकाळी आपले सामान बाजुच्या रूम मधे टाकले..आठवले तर हे योगायोग स्वप्न वाटतात निव्वळ! "स्वप्न आपला मार्ग शोधतेच शोधते!!"
सर रहायला आले मग काय अभ्यासाची रणधुमाळीच!!! पण मी मैदानात नसतानाही स्वतःचा कस वाढवत होतो.चर्चेत प्रश्नाचा भडिमार झेलत  होतो, पराभूत होवून पुन्हा पुन्हा भडिमाराला सामोरे जात होतो...टाकाचे घाव बसायला सुरूवात झाली होती.. माझे दगडपण गळून पडायला सुरूवात झाली होती......(क्रमशः )
(प्रताप )

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...