Sunday, June 23, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 18: निकालाने दिलेला चकवा....!



स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 18: निकालाने दिलेला चकवा....!


         परिक्षा खुप जवळ आली होती.PSI च्या परिक्षेची तयारी करणारे सर्व मित्र पुन्हा राज्यसेवा कडे वळले. आता त्यांना खुप कमी दिवस मिळत आहेत राज्यसेवा पुर्व परिक्षा तयारी साठी याची जाणीव झाली. माझ्याकडच्या मी काढलेल्या नोट्सला घेण्याची झुंबड व्हायची ,रिव्हिजन साठी व एकत्रित सारेच मुद्दे जवळपास त्यात होते त्यामुळे सर्वांनाच फायदा व्हायचा. मी ही त्या देत असे कारण मला ही त्यात नविन काही अपडेशन करायला मिळायचे. सर्वांचा अभ्यासाचा झपाटा वाढला. पावसाळ्याची चाहूल लागल्यावर मुंग्या जशा वारूळ बनवायला भिडतात!! तसे सर्व जण अभ्यासाला भिडले होते. मीही त्यात सामील झालो. अभ्यासात, अभ्यासाच्या कालावधीत व अभ्यासाच्या दर्जात मी कुठेच मागे पडत नव्हतो. तो अक्षरशः झपाटलेला काळ होता!! एकाच 15×15 च्या खोलीत आम्ही सगळे जण अभ्यासाला बसायचो, पण रात्री सगळे गेल्यावर झोपताना कोण कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता हे आठवायचा प्रयत्न केला तर तो आठवायचा सुध्दा नाही!!! कारण काय? तर अभ्यास करण्याच्या चक्कर मधे तेवढीही उसंत व सैलपणा घेतलेला नसायचा. भारून जाणे काय असते जर कोणी सांगत असेल तर मला तोच काळ आठवतो आजही!!!! अभ्यासाच्या ठिकाणी कोण येत आहे, कोण येवून गेले? काही लक्ष नाही. एके सायंकाळी रूम बाहेर निघताना दाराच्या जवळच्या लोखंडी खुर्चीवर डझनभर केळी असलेली एक पिशवी ठेवलेली दिसली..प्रत्येकाला वाटले आमच्या पैकी कोणी आणुन ठेवली असेल..!! रात्री रूमवर गेल्यास भावाने सांगितले वडील येवून गेले होते..! आणी जाताना सांगुन गेले होते. "जपून अभ्यास करायला सांग त्याला , जास्त ताण घेवू नको म्हणावं! " मला हुरहुर लागली! रात्री आपोआप डोळ्यात पाणी आलं..रात्रभर विचार..डोळ्या समोर पावसात गळणारं घर..आई वडीलांचा चेहरा.. अभ्यासाच्या विषयातील मुद्दे, नोट्सच्या कोप-यात वेगळ्या शाईने लिहिलेले चालू घडामोडीचे मुद्दे... रूम वरील ओढाताण..सगळंच दाटून येत होतं..स्वप्न झोपू देत नव्हतं.........!!!!



          शेवटच्या टप्प्यात अक्षरशः अभ्यासा व्यतिरिक्त काहीच केलं नाही. माझी रूम जवळच असल्याने मी रात्री सर्वात शेवटी निघत असायचो..पण शेवटी शेवटी असं वाटायचं की फक्त 5 तासासाठी रूमवर कशाला जात बसू? मग मी कधी कधी तेथेच थांबू लागलो. तिन लोखंडी खुर्च्या जोडायच्या आणी मिळेल तेवढी झोप घेवून, सकाळी सगळे येण्या अगोदर तेथेच तयार होवून बसून जायचे...हिमायत भाई पहाटेच हाॅटेल सुरू करायचे..थोडासा चहा घेतला की मग दुपार पर्यंत दगडाची मुर्ती बनून जायचो. सर्वांचा अभ्यास खुप चांगला झाला होता. दररोज अपडेशन, डिस्कशन, रिव्हिजन, व्ह्यल्यु अॅडिशन...बस्स..जणु रणधुमाळीच...अभ्यासात एवढी हातघाई आणी चढाओढ की..जणु अभ्यास केला तरच जिव वाचणार आहे..परिक्षेचा दिवस येइतो अक्षरशः सारे मुखोद्गत झाले होते..

         सरते शेवटी 30 मे आला..मिळालेल्या हाॅल टिकीटला कितीतरी वेळा पाहून ठेवले होते. सगळे जण एकत्र भेटलो..परस्परांना शुभेच्छा दिल्या. चुका करायच्या नाहीत, येते ते चुकायचे नाही, जे येत नसेल त्यालाही सहजासहजी सोडायचे नाही, रोल नंबर व उत्तरांचे गोल काळे करताना त्यांचा क्रम, हे दोन्ही चुकवायचे नाहीत.एकापेक्षा अधिक काळे बाॅलपेन घेतले का? ते व्यवस्थित रूळवलेले आहेत का? इत्यादी लहानात लहान तपशील एकमेकांना विचारून, आम्ही निघालो. मी जाताना कुठलेही दडपण येणार नाही याची काळजी घेत होतो..परिक्षा केंद्रावर पोहचल्यावर पाहीले, भरपूर गर्दी, गर्दीत ओळखीचे चेहरे..कोणी सिनीयर्स, कोणी नवखे.. कोणी घाबरलेला,कोणी उत्साहात, कोणाच्या पोटात गोळा उठत आहे..कोणी मित्रमैत्रिणीना बोलत आहे...मी एका कोप-यात ऊभा होतो...स्वतःला शांत ठेवत..बजावत स्वतःला "आपल्याला एकही चुक परवडणार नाही..." वडीलांचे शब्द आठवत होते.." घडी गेली की पिढी जाते" मी ही परीक्षेची घडी आयुष्यातून जाऊ द्यायची नाही हा निग्रह करून वर्गात गेलो...

       पेपर मिळाला..प्रत्येक गोष्ट अचुक ठरवल्याप्रमाणे घडत होती..प्रश्नाची गुंतागुंत भुलभुलैया तयार नाही करू शकली.. थेट ऊत्तरापर्यंत पोहचू शकत होतो. केलेला अभ्यास, मित्रांचे योगदान कामी येत होते..जसजसे प्रश्न सुटत होते,तसतसा आत्मविश्वास येत होता. प्रथम टप्प्यात आलेले दडपण निघून गेले होते.....वेळे अगोदरच येणारे प्रश्न सोडवून संपले होते ..ऊरलेल्या वेळात न येणा-या प्रश्नाना सोडवण्यासाठी प्रयत्न केला..त्यातील भरपूर प्रश्न बरोबर आल्याचा विश्वास वाटत होता. वेळ संपली..पेपर समाधानकारकरित्या सुटला होता..पण वाटते तसे काही नसते..जो पर्यंत आन्सर की शी ताडून पाहत नाही तो पर्यंत काहीच सांगता येत नसते हे माहित असल्याने त्वरीत अभ्यासाच्या ठिकाणी पोहचलो..एकेकजण जमले...अगोदर एकमेकाचा चेहरा पाहून घेऊन ,पेपर कसा गेला? हे विचारून सगळे जण उत्तरे शोधायला बसलो.( त्या काळी MPSC आन्सर की देत नसे) 200 पैकी बहुतेक प्रश्नाची उत्तरे(192) शोधली. अत्यंत अवघड प्रश्नाची उत्तरे पण आमच्याकडे होती. उरलेले प्रश्नाची उत्तरे इकडे तिकडे फोन करून घेतली. अत्यंत अभिमान तेंव्हा वाटला जेंव्हा पुण्यात पण दोन प्रश्नाची उत्तरे सापडत नाहीत असे तिकडून सांगितले गेले, त्यावर त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही सांगितले. ( ते माझ्या नोट्स मधे होते)खरंच असा ग्रुप होणे नाही!!!

       सर्व सोडवलेले प्रश्न तपासून घेतले. आम्ही सगळेच सेफ झोन मधे होतो!! मला खुप आनंद झाला.माझा रिझल्ट पॉझिटीव्ह येईल याचा अंदाज आल्याने मी लगेच मुख्य परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी जुळवाजुळव करायला सुरूवात केली. संदिप म्हणाला "अबे! मरशील ना, एक तर दिवस थांब!" मी ऐकूनही माझे काम सुरूच ठेवले.मुख्य परिक्षा माझ्या टाईप साठी अत्यंत योग्य होती. दिर्घोत्तरी स्वरूपाची!! मला माझी स्ट्रेंथ माहीत होती. मी कितीही अवघड पेपर आला तरी उत्कृष्ट लिहू शकतो हा आत्मविश्वास मला होता. मी नुकतीच M.A. ची परीक्षा दिली असल्याने लोकप्रशासन हा एक विषय जवळपास तयार होता पण त्याला MPSC च्या पध्दतीने तयार करायचे होते. जनरल स्टडीज, ईंग्रजी, मराठी व बॅकिग हा दुसरा ऑप्शनल निवडून मी तयारी करायला बसलो.
पुर्व परिक्षा झाल्यानंतर तांदळे सर, अतुल पाटील यांच्या रजा संपल्या ते जाॅईन झाले. अरूण भैया बाहेरगावी निघून गेले. राहिलो मी आणी संदिप!! संदिपचा खरा इंटरेस्ट ऑब्जेक्टीव्ह टाईप परिक्षेत होता. दिर्घोत्तरी प्रश्नाच्या परिक्षेला मला मर्यादा येतात हे तो स्वतः कबुल करायचा. आणी ते होते ही खरेच! कारण 200 पैकी पुर्व परिक्षेला 192 बिट असणारा तो एकटाच होता!! मी परिक्षा झाल्यानंतर एकदा घरी जाऊन आलो. आईवडील व दोन्ही भाऊ यांना माझे पेपर चांगले गेल्याचा खुप आनंद झाला होता. माझा पुर्व परिक्षेचा रिझल्ट येणारच या बाबत त्यांना माझ्या एवढाच आत्मविश्वास होता. मी जवळपास एकट्यानेच अभ्यास करत होतो. मुख्य परिक्षा कशी असते. कसे पेपर सोडवायचे असतात या बाबत निव्वळ कोरी पाटी!! पण शाहू काॅलेज व दयानंद काॅलेज मधे कला शाखेत शिकायला मिळाले होते!! मी अत्यंत कल्पकतेने मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागलो. पुर्व परिक्षेचा निकाल कधी लागेल याचा विचार असायचा सतत मनात. एक महिन्याने एम ए चा निकाल लागला युनिव्हर्सिटीच्या गुणवत्ता यादी मधे यायला फक्त 3 मार्क कमी पडले. पण हे मार्क्स काही कमी नव्हते. आता प्रचलीत पध्दतीने ऑफिसीयली काॅलेज शिकणे संपले होते!!

          दरम्यानच्या काळात कधी कधी दोन तीन दिवस सेंटर कडे कोणीही यायचे नाही. मग मी तरीही बसायचो एकटाच ....अभ्यास करत .दरम्यानच्या काळात मला मुख्य परिक्षा साठी सोहम सोबतच ज्ञानप्रबोधिनी या क्लासेस वर संचालक सुधिर पोतदार सरांनी शिकवण्यासाठी बोलावले. तेथेही तयारी करणा-यांची संख्या खुप चांगली होती. विशेष म्हणजे तेथे धन्वंतकुमार माळी सर ( नंतर Dy.Ceo), महेश वरुडकर सर (माझ्या सोबतच कक्ष अधिकारी) ज्योती चव्हाण मॅडम( नायब तहसीलदार), भांबरे सर , प्रकाश कुलकर्णी सर या सर्वांचा संच तेथे भेटला. पण तेथे मी शिकवायला जात असल्याने एकत्रित अभ्यास करायला मिळाला नाही कधी! तसेही आमचा ग्रुप वेगळ्यानेच अभ्यास करत होता. व तिकडे ते अभ्यास करत असत. तेथे शिकवताना जाणवले की, मुख्य परिक्षा बाबत आपल्याला नैसर्गिक समज तर आहेच पण विषय मांडण्याचीही विशेष शैली आहे. कारण शिकवत असताना या सिनीयर मंडळीकडून कधी निगेटिव्ह फिडबॅक तर आला नाहीच. उलट त्यांनी प्रचंड कौतुकच केले.शिकवत असताना काही सिनीयर्सनी त्यांच्या मटेरिअल मधे व्ह्यल्यु अॅडिशन होत आहे हे स्पष्टपणे सांगितले. आत्मविश्वास होताच ! तो वाढला.( कदाचित मी असा एकमेव असेन, ज्याने स्वतः पुर्व परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवले, ती झाल्यावर मुख्य परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवायची संधी मिळाली, आणी मुलाखतीची तयारी करताना ही इतरांना मुलाखती बाबत शिकवायला मिळाले...!! इतर सर्वजण सिलेक्शन झाल्यावर अथवा परिक्षेचा तो विशीष्ठ टप्पा पुर्ण झाल्यावर त्या अगोदरचा टप्पा इतरांना शिकवतात पण मी ज्या टप्प्याची तयारी करत होतो त्याच काळात तो द्यायच्या अगोदरच इतरांनाही शिकवत होतो) नंतरच्या काळात ज्ञानप्रबोधिनी लातुर मधे गेस्ट लेक्चरर म्हणून रंजन कोळंबे सर, राहूल माकणीकर सर (सध्या DCP नागपुर पोलीस -ज्यांनी महाराष्ट्रात STI मधे रेकाॅर्ड मार्क्स घेवून सिलेक्शन मिळवले, सबंध महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक त्यांच्या अभ्यासामुळे व शिकवण्यामुळे होता व नंतर त्यांचेही आमच्या सेम बॅचमधेच Dysp म्हणून सिलेक्शन झाले.) यजुवेंद्र महाजन सर इत्यादी दिग्गजांशी तेथे संबंध आला. मी शिकवलेल्या विषयात तेथील मुलांची झालेली तयारी पाहून माकणीकर सरांनी केलेले कौतुक तर प्रचंड आत्मविश्वास देवून गेले..

        मी एकट्याने शिकत होतो, शिकवायला जाण्याने माझी मेन्सची दशा व दिशा योग्य आहे याचा अंदाज आल्याने मी तयारी वेगाने करत होतो. दिवसभर सोबत बसेल असे कोणी नव्हते. संदिप, तांदळे सर , अरूण भैया येत रहायचे अधुन मधुन .मी तेथेच अभ्यासाला बसायचो. पोलीस बाॅइजची एक बॅच आली. अरूण भैयाही मग रेग्युलर येवू लागले, कारण त्यांनाच ती बॅच चालवायची जबाबदारी होती. तेथे मला भारतीय राज्यघटना शिकवण्याची संधी मिळाली. एकदा भर रंगात येवून शिकवत होतो. अचानक नांगरे पाटील सर वर्गाच्या दारात ऊभे!!. थोडेसे टेन्शन आले पण मी शिकवण्याची गती व पद्धत बदलली नाही. सर साधारणतः2 मिनीटे थांबून , पाहून ,जाताना सर स्माईल करून गेले! ते निघून गेल्यावर मला जाणवले की अक्षरशः सर होते !

        पुर्व परिक्षा होवून खुप काळ लोटला होता..निकाल लागण्याची चिन्हे दिसत नव्हती. एक तर खुप गॅप नंतर, 2003 ची म्हणून 2005 मधे हातात आलेली जाहिरात ! पहिल्या वर्षी पुर्व परिक्षा तर दुस-या वर्षी मुख्य परिक्षा होणार आहे हे माहित नव्हते!!! अस्वस्थता दाटून येत होती. निकाल कधी लागेल याची खात्री नव्हती. दरम्यानच्या काळात PSI पुर्व परिक्षेचा निकाल लागला!! आख्खा ग्रुप पास झाला!! अर्थात मी ही!! पण मला वेध लागले होते ते राज्यसेवा पुर्व परिक्षा निकालाचे, सर्वजण PSI मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागले . इंग्लिशच्या तयारी साठी प्रा. लखादिवे सर मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी अत्यंत तळमळीने आम्हाला शिकवले. दरम्यानच्या काळात मी माझ्या स्तरावर मुख्य परिक्षेचा अभ्यास करत होतो.वडील अधून मधून निकाल कधी आहे म्हणून विचारायचे. त्यांना PSI चा निकाल आला आहे हे सांगितले. पण ते विचारायचे राज्यसेवे बाबत!!

          दरम्यानच्या काळात बरिश्ता हाॅटेलवर सगळेजण जमा होत होते.मी ज्यांना शिकवायचो, ज्यांना मला भेटायला यायचे आहे ते तिकडे यायचे. मग आम्ही अभ्यास, तयारी यावर बोलत असू..दरम्यानच्या काळात संदिपचा पुर्वाश्रमीचा( पण आमचा सगळ्यांचाच !!) मित्र, कायम धडपड्या, अत्यंत उत्साही व दोस्तीच्या व्याखेत चपखल बसणारा मित्र राजेंद्र ढाकणे शालेय पोषण आहार अधिक्षक म्हणुन सिलेक्ट झाला होता. त्याला अगोदर पासून ओळखत असल्याने खुप आनंद झाला. संदिप ही खुष होता. पण तो हलकेच एक मर्मभेदी प्रश्न विचारायचा,"कधी होइल यार आपले सिलेक्शन?"..मी त्याला आधार द्यायचो तो मला मानसिक आधार द्यायचा!!

           गज्या अनायसे सुट्टीला लातुरला आला होता, तो एम बी ए करून एका कंपनीत पुण्यात जाॅब करत होता. सचिन आडाणे पण होताच . एके सकाळी ते दोघेही बरिश्ता कडे आले. आमची चर्चा सुरू होती. शाळा काॅलेजचे मित्र असल्याने जरा जास्त आत्मीयतेने चर्चा सुरू होती. लवकर काही तरी सिलेक्शन झाले पाहिजे या बाबतच बोलत होतो तेवढ्यात बातमी आली आज पुर्व परिक्षेचा निकाल लागू शकतो!! एकदम धाकधूक वाढली! सगळे जमा व्हायला लागले! त्या काळात निकाल कलेक्टर ऑफिस मध्ये फॅक्स ने यायचा. पण MPSC ने नुकतीच वेबसाईट सुरू केली होती. सगळे जमा झाल्यावर वातावरणात एकदम टेन्स वाढून गेला. सगळे जण बसून बोलत तर होतो पण कधी चार वाजतील आणी कधी निकाल येईल याचीच वाट बघणे सुरू होते!! सरते शेवटी आम्ही सगळेच जण कलेक्टर ऑफिसला निघालो. तेथे पोहचल्यावर पाहीले खुपजण जमा झाले होते. दोन तीन वेळा आत जाऊन विचारणा केली. निकाल लावला जाईल म्हणून सांगितले, मन कशातच लागत नव्हते. सरतेशेवटी निकालाची प्रत भिंतीवर लावण्यात आली. खुप गर्दी होती..गर्दीतुन काही जण पास झाल्याचा निकाल लागल्याच्या खुशीत ओरडत तर काही जण पांढरा पडलेला, नाराज झालेला चेहरा घेवून बाजूला निघत होते. आम्ही ही गर्दीत घुसलो. आम्ही निकाल पहायला सुरूवात केली. अरूण पोतदार पास! , संदिप जाधव पास! तांदळे सर नापास!! माझाही नंबर काही केल्या मला सापडला नाही! लातुर सेंटर वरून एकुण 107 मुले पास झाली होती. काही तरी गल्लत होत असेल म्हणून मी पुन्हा पुन्हा माझा नंबर पाहीला. माझा चेहरा पाहून तो पर्यंत बाकीच्यांनी ओळखले..गज्या ने मला बाजुला घेतले. आम्ही काहीही न बोलता परत निघालो.परत येत असताना क्लासेस वरील मुले भेटली. विचारलं काय झाले ? मी सांगितले माझा नंबर नाही या यादीत म्हणून. थोडंसं पुढे आल्यावर मागून आवाज येत होता" असं होवूच शकत नाही, वाघमारे सर, प्रकाश कुलकर्णी सर यांचा अभ्यास खुप चांगला आहे पण तरीही त्यांचा रिझल्ट गेला यावर विश्वास बसत नाही " मी काहीच न बोलता परत आलो. सगळे जण जमा झाले होते. यशापयशाची चर्चा, समीक्षा , काहींना निकाल गेल्याचं दुःख,तर काहींना निकाल आल्याचा आनंद..! गेलेले आलेल्यांच्या आनंदात मनातुन सहभागी होवू शकत नाहीत आणी मित्रांचे निकाल गेले म्हणून ज्यांचे निकाल आले ते मनातुन आनंद व्यक्त करत नाहीत. यशापयशाचा फरक जाणवतो लगेच!! एक दिर्घ दरी असते...लांघताही येत नाही टाळताही येत नाही!!!

          मला प्रचंड दुःख झालं होतं. मी मनातुन अक्षरशः मोडून पडलो होतो, काय चुकलं, काय कमी पडलं, आपण तर सगळंच केलं होतं..तरीही निकाल निगेटिव्ह???? मनात प्रश्नाचं वादळ आलं होतं. काही बोलताच येत नव्हतं. परत येतो तो मोठा भाऊ राहूल भैय्या आणी वडील आलेले..लगेच त्यांनी ताडलं..मोठ्या भावाने विचारले..तुझा तर खुप अभ्यास झाला होता...पण जाऊ दे पुन्हा तयारी करू! असे तो म्हणाला. वडील म्हणाले PSI चा निकाल आलाच आहे तर त्याची तयारी कर तो पर्यंत पाहू राज्यसेवा देता येईलच !! मी मात्र मनातल्या मनात कुढत ऊभा होतो. माझ्या डोळ्यासमोर घर..येणारे एकटेपण, अभ्यास हे सगळं तरळत होतं . आता मी काय करणार होतो???? ते खुप वेळ बोलले. आणी मला समजवून निघून गेले. माझा मूड व चेहरा पाहून संदिप पण समजवत होता, बाकी सगळे जण समजावत होते..सरतेशेवटी या परिस्थितीत सर्वांनी तोडगा काढला आपण सगळे जेवायला जाऊ. थोडंसं वातावरण बदलेल..पुढचा विचार करता येईल. मला बिलकुल ईच्छा नव्हती. मी नकार दिला..सगळे जण माझ्यावर चिडले एवढे टेन्शन कशाला घेतो म्हणून, पण माझं आक्रंदनारं मन मी ऊघड करू शकत नव्हतो, हे सगळं सुरू असताना गजा शांत होता! तो काही तरी विचार करत होता. तो अचानक बोलला " किती जण पास आहेत लातुर सेंटर वरून?" कोणीतरी सांगितले 107! त्यावर तो म्हणाला ," लावलेल्या फॅक्स प्रिंट मधे 107 नंबर होते!! , म्हणजे जर ऊभ्या लाईन 14 होत्या तर आडव्या लाईन मधे 8 नंबर पाहिजे होते कारण शेवटच्या आडव्या लाईन मधे फक्त 3 नंबर होते!! म्हणजे 13×8= 104 + शेवटच्या आडव्या 14 व्या रांगेतील 3 मिळून 107 होतील, पण मी पाहिल्या त्यावेळी आडवी लाईन ही 8 ऐवजी फक्त 7 नंबरची होती. प्रत्येक आडव्या लाईन मधला शेवटचा नंबर अर्थात शेवटचा अख्खा ऊभा रो गायब आहे!!!!!" माझा श्वासच अडकला! मीही कॅल्क्युलेशन करून पाहीले तर गजाचे बरोबर होते!!


          मला एकदम तगमग झाली. सगळे बसले असल्याने मी एकटा पुन्हा कलेक्टर ऑफिसला जाऊन पाहीले गजाचे बरोबर होते! कोणाला विचारायला जावे तर ऑफिस बंद झाले होते. MPSC ऑफिस ही बंद झाले होते. मी यादी पुन्हा पाहिली माझ्या अगोदर चा नंबर व माझ्या नंतरचा नंबर याच्या दरम्यान लावलेल्या यादी प्रमाणे 647 नंबरचा चा गॅप होता , नेमका त्या 647 पैकी ज्याचाही नंबर आला असता तो रो च नव्हता व तो ही गजाने सांगितल्या प्रमाणेच!! अर्थात त्या शेवटच्या गायब रो मधे या 647 पैकी कोणीही असु शकत होते !! मी सुध्दा!! मी धावतच परत आलो. मी सगळ्यांना सांगितले. माझी एक्साइटमेंट नंतरही नकारात्मक निघाल्यास मला जास्तच धक्का बसेल याची संभाव्यता गृहीत धरून मला सर्वांनी एकदम शांतपणे प्रतिसाद दिला. एमपीएससी रिझल्ट वेबसाईटवर टाकणार आहे त्यावेळी पाहू सध्या सोबत चल म्हणून मला सर्वांनी अक्षरशः बळजबरी गाडीवर बसवले. मी आता खुपच तणावात आलो होतो. एमपीएससी माझ्या सोबत चकवा-चकवीचा खेळ करत होती. मी कुठल्याही तिरावर नव्हतो. अधांतरीच लटकत होतो!!!

         सगळे जण जेवण करत होते. मी खुप परेशान होतो. तोंडदेखल्या पध्दतीने हां हुं करून बोलत होतो. सगळे जण लातुर शहराबाहेर आले होते. त्यांचे जेवण होईतो मला धिर धरवत नव्हता! मी फक्त पाणी प्यायलो होतो. मला झालेल्या पराभवातुन बाहेर पडण्यासाठी एक अंधुकसा प्रकाश किरण दिसत होता. ना मोबाईल होता त्या काळात ना काही सुविधा! ऊठून परत यावे म्हटले तर कोणा सोबतच तरी यावे लागणार! मी 7.45 पर्यंत कशी तरी वाट पाहीली!! सरतेशेवटी मी जातो कसाही तुम्ही बसा म्हणून मी निघणार तो सचिन म्हणाला चल ! आपण जाऊ!! खरंतर त्याला माझी तगमग पाहवत नव्हती!! परत येताना तो गाडी चालवत चालवत मला समजावत होता, " आला तर आला रिझल्ट, नाही आला तर टेन्शन घेवू नको! पाहता येईल!"


           माझे लक्ष सगळे इंटरनेट कॅफेवर कधी पोहचतो या वरच होते! आम्ही पोहचलो! सुदैवाने बरिश्ताच्या काॅम्पलेक्स मधेच इंटरनेट कॅफे होते.गडबडीत मी आणी सचिन पोहचलो! मी भरभर टाईप करून MPSC ची साईट सर्च केली. हळूहळू ती उघडत होती..मी दिर्घ श्वास घेत होतो..मेन पेज आले. त्यावर रिझल्ट वर क्लिक करून दिले. रिझल्ट पेज स्पीड प्रमाणे ओपन होत होते..पहिली आडवी लाईन, दुसरी,तिसरी...(गजाने लक्षात आणुन दिलेला गायब रो ईथे स्पष्ट दिसत होता)..हळूहळू मला अपेक्षित असलेली लाईन व रो ओपन झाला!! आणी...माझा नकळत पाणावल्या डोळ्यातून मला माझा नंबर तेथे ठेवल्या सारखा दिसला!!

         कित्ती मोठा दिर्घ वळसा!!! जे अपेक्षित, जे सापडायचं ते एवढ्या मिनतवारीने व एवढ्या नाट्यमयतेने?!!!
(अशा प्रसंगामुळेच तर माझी ही कथा मला दिर्घ स्मरणीय आहे) मी आरोळी ठोकली नाही, मी हर्ष व्यक्त करण्याच्या स्थित यायलाही मला थोडा वेळ लागला. सचिन हसत होता..तु पास होणार हे वाटंतच होतं..तु नापास झाल्याचा विश्वास बसत नव्हता असे म्हणाला. मी बाहेर येवून PCO वरून गावात मामाच्या घरी फोन करून आईवडीलासाठी पास झाल्याचा निरोप दिला. रूमवर जाऊन भैय्याला सांगितले. त्यालाही खुप आनंद झाला. मी ऊभा होतो. सचिन म्हणाला आता काय? मी खुप खुष होतो. मी म्हटले तु जा माझ्यामुळे तुला जेवणही नाही भेटले, त्यावर तो गंमतीने म्हणाला "अरे चल आता पुन्हा सगळ्यांना जेवायला भाग पाडू".... मी सगळ्या मित्रांना ही बातमी द्यावी म्हणून निघालो..सचिन टु व्हीलर चालवत खुशीत बोलत होता...मी मात्र मुक होवून अपयश व यश यात किती मोठा फरक असतो याची तुलना करत होतो. काही तासापुर्वीची स्थिती व आत्ताची स्थिती यातील बदलाची याची अनुभूती घेत होतो. कदाचित MPSC भविष्यात आपल्याला चकमा देवू शकत नाही म्हणून तिने आत्ता असा चकवा दिला असावा असा विचार डोक्यात येत होता...गाडीवर मला लागणा-या हवेने
मला गावच्या माळरानावरच्या हवेची आठवण करून दिली होती....मी तेथे त्यावेळी फेकलेल्या स्वप्न बिजांनी अडचणीचा पाषाण भेदून ..मुळ धरले होते..बिज अंकुरायला सुरूवात झाली होती..मला वृक्ष होण्याचा ध्यास पुकारत होता......(क्रमशः)

Thursday, June 20, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 17: स्वतःला आकार देताना...


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 17:  स्वतःला आकार देताना...


    जाहिरात आली!! लगबग सुरू झाली होती, खुप बाबी करायच्या होत्या. सगळ्यात पहिल्यांदा पब्लिकेशन कडे गेलो. चापेकर सरांना सांगितले, "सर! आता काम शक्य नाही. मला तयारी करायची आहे " सरांनी कुठलाही किंतु परंतू न ठेवता शुभेच्छा दिल्या, तयारी कर म्हणाले. मागे हटू नको आता, हे ही सांगितलं. पण शेळके सर नाराज झाले.त्यांनी इतर
दुस-याकडे भावना व्यक्त केली की, "कशाला हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला आहे हा! एवढे सोपे असते तर मी कशाला पब्लिकेशन काढले असते!" मला वाईट नाही वाटले, उलट स्फुरण चढले. जिद्द जागी झाली. तयारी करताना अपयश येणार नाही याचा चंग बांधला.

       खुप कामे करायची होती! दुष्काळी कालखंडात जशी पाखरे दूरदेशी ऊडून जातात तशी आमच्या ग्रुप ची अवस्था झाली होती. सगळे विखुरले होते..पण आता एकत्र येण्याची लगबग सुरू होणार होती.कारण सगळे पिचले होते, त्रासले होते ,आता एकत्र येवून तयारी करणे हा एकमेव मार्ग शिल्लक होता आमच्या समोर .पण अभ्यासाला बसायचे कोठे? कशी तयारीची सुरूवात करायची? कोणकोण बसणार? काही सुचत नव्हते. तांदळे सर, अरूण भैय्या आणी मी तिन दिशेला तिन टोक ..पण आता ती एकत्र सांधने, या शिवाय पर्याय नव्हता. आम्ही तिघे भेटलो. काय करायचं आता? या वर गहन चर्चा झाली.पण मार्ग सुचत नव्हता..... पण तुमच्या स्वप्नात जिव असेल, त्यात चैतन्य असेल, आणी तुम्ही हॄदयाच्या तळापासुन तुमच्या स्वप्नांची आराधना करत असाल, आणि ते वास्तवात आणण्यासाठी मरेतो मेहनत करण्यास सिध्द असाल तर ...नियती स्वतः दोन पावले समोर येवून बंद दरवाजे सताड ऊघडत असते.....!! आणी एक किमयागार तुम्हाला मार्गस्थ होण्यास मदत करत असतो!!!( द अल्केमीस्ट पुस्तक खरं आहे!!!!)


         मा. विश्वास नांगरे पाटील सर!!!! एक महत्वाचं नाव!! (सरांना आज माहिती ही नसेल त्यांच्या एका पुढाकाराने तेथे धडपडणा-या आयुष्याला आधार मिळाला, फक्त त्याची एक झलक त्यांना 2018 साली सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच
ISO:9000 झालेले वळसंग पोलीस स्टेशन, त्याचे उद्घाटन करताना आमच्या पैकीच एका जिगरबाज ठाणेदारांनी त्यांना सन्मानपुर्वक करून दिली! त्या सहका-याचा संदर्भ येईलच) सर नुकतेच लातुरला पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांना पोलीस कल्याणनिधीतुन पोलीस पाल्यासाठी स्पर्धापरिक्षा, पोलीस भरती अनुषंगाने भरीव काही करायचे होते. त्यांनी तसा मनोदय व्यक्त केला. अरूणभैय्याचे वडील पोलीस उपनिरीक्षक होते. अरूण भैय्या सरांना भेटले व त्यांनी सरांना विनंती केली. पोलीस पाल्यांना शिकवण्यासाठीची इच्छा दर्शवून त्यांनी ती जबाबदारी मिळवली. व त्यासाठी त्या पोलीस पाल्यांना शिकवणा-यांना पुर्वतयारी करण्यासाठी व पोलीस पाल्यासाठी पुस्तके लागतील व त्यांना बसण्यासाठी एक रूम व शिकवण्यासाठी हाॅल लागेल हे ही नमुद केले. सरांनी त्वरीत प्रतिसाद देत आवश्यक ती सारी पुस्तके ऊपलब्ध करून दिलीच पण त्या सोबतच एस पी ऑफिसच्या प्रांगणातच ऊपलब्ध एक रूम ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी तर मुख्य इमारतीत तळ मजल्यावर शिकण्यासाठी हाॅल ऊपलब्ध करून दिला. अत्यंत महत्वाची अडचण अशी अनाहूत दुर झाली...

       मला हुरूप मावत नव्हता. आम्ही एस पी ऑफिस मधे अभ्यासाला बसणार होतो. लातूर मधे अभ्यासीका नावाचा प्रकार नव्हता, त्या काळात अशी सुविधा मिळणे म्हणजे अप्रूपच!! आम्ही सगळे अर्थात मी, अरूण भैय्या, तांदळे सर, रोहिणी पोतदार( API) (अरूण पोतदार यांची बहीण जी ग्रुप मधे सगळ्यात अगोदर PSI पदी सिलेक्ट झाली) असे सगळेजण बसणार होतोआणी या ग्रुप मधे नंतर जाॅईन झाला संदिप जाधव (ASST. DESK OFFICER). बसण्याची व्यवस्था झाली होती. अभ्यासाला पुस्तके होती. आता फक्त अभ्यास करणे महत्त्वाचे होते.मी सर्व इतर बाबी सोडून अभ्यास करू पाहत होतो.आता कसलाही वेळ वाया घालायचा नाही असे ठरवून मी एक एक दिवस पाहत वेळापत्रक बनवले.सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून आपल्याला काय येतं काय येत नाही, याचे सखोल विश्लेषण केले. मागील प्रश्नपत्रिकेत पाहून कुठल्या विषयावर/ टाॅपिकवर किती व कसे प्रश्न विचारले आहेत याचा वस्तुनिष्ठ अंदाज घेतला. सगळ्या जुन्या नोट्स संदर्भास घेवून अत्यंत सचोटीने पहिल्या विषयापासुन नव्याने अभ्यासाला सुरूवात केली. तत्पुर्वी आम्ही सर्वांनी एकत्र बसून गहन चर्चा केली. त्यात अत्यंत तळमळीने ठरवले की खुप अभ्यास करायचा. आता कुठलीच कसर ठेवायची नाही. पुन्हा पुन्हा संधी येणे नाही. मला तर दुसरा चान्स घेणे परवडणारच नव्हते. मैदान दिसल्यावर जणू घोडा फुरफुरतो तशी अवस्था झाली होती. मी कुठल्याही अमिषाला, अडथळ्याला बळी पडायचे नाही, काहीही झाले तरी अभ्यासापासुन दुर जायचे नाही असे ठाम ठरवून टाकले, सामुहिक प्रतिबध्दता तर होतीच पण स्वतःशी इतकी घट्ट खुणगाठ बांधली होती की नशीबाने जरी ठरवले असते की मला तयारी करू द्यायची नाही तर मी नशीबालाच बदलायचे असे ठरवून सिध्द झालो होतो....

         रोज सकाळी 6.00 वा उठायचे. एसपी ऑफिसच्या लाएब्रेरीत जायचे.उपाशी पोटी अभ्यास होत नाही म्हणतात पण ते उपाशी पोटंच अभ्यासात जाज्वल्य आणायचे! दरम्यानच्या काळात जाहीरात आल्यास वडील येवून गेले होते.अभ्यास कर, कुठल्याही स्वरूपात वेळ वाया घालवू नको म्हणून सांगुन गेले. वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सांगितले की गावाकडून टिफीन पाठवतो, त्या प्रमाणे ते गावाकडचा मिलिंद नावाचा मित्र ( गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करायचा), नितीन ( मामाचा मुलगा जो त्या काळात वेगळ्या गॅरेजवर काम करायचा पण नंतर एम एस डब्ल्यू करून तो आता जाॅब करतो) अथवा गावाकडून कोणी येत असेल तर त्याच्या जवळ पाठवायचे.तो टिफीन येणा-यावर अवलंबून असायचा. व शक्यतो तो कधी नितीन सोबत राजीव गांधी चौक(रूम व एस पी ऑफिस पासून साधारणतः 3 कि.मी. दुर ) तर कधी मिलिंद सोबत शाम नगर येथे यायचा. शाम नगर मधे आला तर तो लवकर भेटायचा. पण राजीव गांधी चौकात आला तर मात्र जायचा प्रश्न. मग दुपार उलटून गेली तर तो तसाच रहायचा कधी तरी भुकेची तिव्र जाणीव झाली तर मग कधी मित्राच्या गाडीवर, कधी सायकल तर कधी संदिप सोबत जाऊन आणी पर्याय नसल्यास चालत जाऊन तो आणला जायचा. दोन वेळचा डबा असायचा तोच दुपारी तोच रात्री. पण कुठलीच तक्रार नव्हती. असेल तर खा नाहीतर तसेच बसायचो..काही फरक पडत नव्हता. अभ्यासाचा एवढा ध्यास लागला होता की भुकेचे चोचले परवडत नव्हते.
        आधाराला हिमायत भाई चे छोटेखानी हाॅटेल सुरू झाले होते एस पी ऑफिस च्या कोप-यावर ..."कॅफे बरिश्ता"!!!!
( नजीकच्या भविष्यात ते एमपीएससी चे मुख्य केंद्रबिंदू झाले. लातूर मधील त्या काळात एमपीएससी करणारे जवळपास सर्वजणच तेथे भेटायला, चर्चेला यायचे...ते हाॅटेल अनेक सिलेक्शन आणी अनेक स्ट्रगल चे साक्षीदार आहे...हा पाॅईंट स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील महत्वाचा साक्षीदार आहे, तेथे आजही आमच्या मित्र परिवारातील विविध पदावर कार्यरत सर्व मित्र परिवार एकत्र भेटतो.. पण या हाॅटेलची ही स्थिती सुरूवात होते ती आमच्या ग्रुप पासून...बहुतेक मीच ती सुरूवात केली) जास्त भुक अनावर झाली तर हिमायत भाई कडे जाऊन चहा घ्यायचा..पुन्हा येवून बसायचे.. हिमायत भाई वेळ प्रसंगी ऊधार द्यायचे...आम्ही अभ्यासाचे ठिकाण सोडत नव्हतो, सकाळी 6 ते रात्री 12 अहोरात्र फक्त अभ्यास..! कोणाचे काय झाले..कोणाच्या घरी लग्न आहे, कार्यक्रम आहे, नविन मुव्ही आली, लातुरला कोणी सेलिब्रेटि येत आहे, सण आहे, मित्रांची पार्टी आहे कश्या कश्याचा मला फरक पडत नव्हता( आणी तो सुदैवाने सिलेक्शन होईतो पडलाही नाही! आणी तो न पडल्याने काही बिघडलेही नाही!!!)

    सुदैवाने आमचा ग्रुप अभ्यासाबद्दल फक्त गंभीरच नव्हता तर त्या सोबतच यात कठोर मेहनत करण्याची उर्मी पण होती, त्या सोबतच येथील प्रत्येक जण कुठल्याना कुठल्या विषयात विशेष कौशल्य बाळगून होता...सर्व जण अभ्यासाला असे भिडले होते..जणू उद्याच परिक्षा आहे. दररोज अभ्यास, नियमित गटचर्चा, सामुहिक वेळापत्रक, वैयक्तीक पाठपुरावा ..आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत..काही लपवाछपवी नाही..सर्व जण परस्परांना पुढे चालण्यास मदत करण्यास तत्पर.. चुकत असल्यास खडसावणे.. अभ्यासात कसूर झाल्यास जाणीव करून देणे की खुप दिवसानंतर जाहिरात आली आहे, महाराष्ट्रभर खुप मुलं अभ्यास करत आहेत...त्यामुळे स्वंयशिस्ती सोबतच सामुहिक शिस्त पण होती...हे सारे जण वेळोवेळी मदतीला सहकार्याला सोबत नसते तर...कदाचित काळाच्या रेट्यात मी पण अनामिक कथा बनून गेलो असतो...अनंत वेळा ठरवूनही आम्ही एकमेकाचे उतराई नाही होवू शकत....

        दररोज सोबतचे सहकारी नवनवीन पुस्तके वाचायला घ्यायचे..मला माहीत होते एवढी पुस्तके आपण घेवू शकत नाही त्या साठी मी सर्व ऊपलब्ध पुस्तकांचा संदर्भ घेवून झपाटल्याप्रमाणे माझ्या नोट्स काढायला सुरूवात केली..दरम्यानच्या काळात PSI/STI/ASST. ची पण जाहिरात आली..8मे 2005 ला ही पुर्व परिक्षा, 30 मे 2005 ला राज्यसेवा पुर्व परिक्षा अशा तारखा होत्या...ग्रुपमध्ये थोडी चलबिचल सुरू झाली. अगोदर 8 मे ची तयारी करू असा मानस व्यक्त केला गेला..मी त्यात सामील व्हायचे नाही असे ठरवले..मला राज्यसेवाच करायची होती मी त्या प्रस्तावास नकार दिला व तुम्ही करा हवे तर मी राज्यसेवाच करणार असे सांगितले.त्यावर प्रतिक्रिया पण आल्या, अगोदर PSI ची तयारी करू, राज्यसेवा खुप अवघड आहे तुलनेने, किमान एक तरी सिलेक्शन घेवू मग पुढची तयारी करता येईल... पण मी ठाम होतो...राज्यसेवा म्हणजे राज्यसेवाच !! पण तरी अनुभव येईल म्हणून मला सर्वांनी सल्ला दिला फाॅर्म भर. मी तो सल्ला महत्वाचा आहे हे समजून फार्म भरला. पण मी वेगळ्याने राज्यसेवा दुय्यम ठेवून त्याचा अभ्यास करणार नव्हतो.
काहीच पुर्वानुभव नसताना थेट राज्यसेवा, म्हणजे हे जरा खुपच अती होत आहे अशी माझ्या काही स्नेहयांची धारणा झाली होती...पण पर्याय नव्हता मी आता माझेही ऐकणार नव्हतो...कारण अंधारात स्वतःला झोकून देणे...स्वतःच्या स्वप्नांची तीव्रता अनुभवणे..आणी ती वास्तवात आणण्यासाठी स्वतःला शेवटच्या क्षणापर्यंत कसोटीला लावणे...माझी मानसिक तयारी झाली होती..संधी चालून आली होती...द्विधा मनस्थिती करून मला ती गमवायची नव्हती..

      दररोज आम्ही सगळे मिळून दिवसभर आपापला अभ्यास करायचो..सायंकाळी मला वगळता सर्वजण PSI च्या विषयाचे डिस्कशन करायला बसायचे..मी आपापला राज्यसेवेचा अभ्यास करत असायचो..दिवसेंदिवस अभ्यासाला खुप धार येत होती...मी न डगमगता चर्चेत सहभागी होत होतो, चर्चेत टिकतही होतो, आणि प्रचंड आत्मविश्वास त्यातुन मिळत असल्याने पुन्हा विषयांना अभ्यासण्यासाठी भिडत होतो...सगळेजण प्रचंड अभ्यास करत होतो..एकमेकांना मदत करत होतो..सगळेजण मला सिनीयर होते. मी पण माझी सिन्सिअरीटी जाणार नाही याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो..तिन महिने प्रचंड अभ्यासात कधी गेले कळले नाहीत..जवळपास सर्व विषयाच्या नोट्स तयार झाल्या होत्या..एम ए सेकंड ईअरची परिक्षा पण आली..एम ए चा अभ्यास ही सोबत सुरू केला. कारण मुख्य परिक्षेला 2 ऑप्शनल घ्यावे लागायचे...त्यातील एक विषय आत्ताच हातावेगळा होइल या दृष्टीने मी ती ही परिक्षा दिली...पेपर खुपच चांगले गेले..

    PSI ची पुर्व परिक्षा जवळ आली होती. सर्वजण खुप अभ्यास करत होते. मी राज्यसेवेची तयारी करत होतो... अभ्यास एवढा वाढला की, जवळपास सगळे विषय वाचून, समजून घेवून, नोट्स काढून, पाठांतर संपत आले होते..तो पर्यंत बाहेर सर्वांना अभ्यासाची पातळी समजली होती. त्यामुळे सोहम क्लासेस वर MPSC चे विषय शिकवण्यासाठी बोलावणे आले. सर्व मित्रांनी जायला सांगितले, त्याचा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढला पण त्या सोबतच जो मोबदला मिळायचा त्यातुन मासिके, झेराॅक्स, स्टेशनरी याचा थोडाफार खर्च भागणार होता..शिकवताना जाणवत रहायचे अभ्यास खुप चांगला झाला आहे फक्त तो टिकवून ठेवावा लागणार होता. आणी मी शिकवत होतो तर मला पास होणे अनिवार्य होते कारण लोकांना शिकवून मी नापास होणे हे परवडणारे नव्हते, सतत मनात एक सजगता होती..मी माझा अभ्यास अधिक सजगतेने करू लागलो...

         8 मे ची PSI पुर्वपरीक्षा आली. आम्ही सर्व जण परिक्षेला गेलो. मी ही गेलो, सिरीयसली पेपर सोडवला.. सगळेजण त्वरित परत आलो..आन्सर की काढली, आणि किती उत्तरे बरोबर आले ते तपासले. सगळेजण 150 पैकी 130+ !! मी 128 इतरापेक्षा कमी पण पास होण्यासाठी आवश्यक कटआॅफ च्या भरपुर पुढे!! आम्ही सगळेजण पास होणार याचा आत्मविश्वास आला , मला तर खुप आत्मविश्वास मिळाला होता कारण मी या परिक्षेचा नेमकेपणाने अभ्यास केला नव्हता मी राज्यसेवाकेंद्री अभ्यास केला होता पण तरीही मी ही परिक्षा अत्यंत गांभीर्याने दिली होती..(त्या गंभीरपणा सोबत घडलेली एक अतीशय गंमतीशीर बाब ,जी आजही आम्हा सगळ्यांना खळखळून हसायला भाग पाडते ती म्हणजे मला ग्रुपमध्ये एकट्यालाच गणितात पडलेले 20 पैकी 20 मार्क्स !! आमच्या ग्रुपमध्ये मला वगळता सर्वांचे गणित खुपच स्ट्रांग होते. आणी तांदळे सरांचे तर खुपच. तसे ते ही म्हणायचे, आणी त्यांना त्याचा खुप अभिमानही होता अर्थात आम्हा सगळ्यांना त्याचा आदर ही होता. मी दहावीला गणितात अगदी काठावर 52 मार्क्स घेवून पास झालेला त्यामुळे अधून मधून ग्रुपमध्ये माझी गणीतावरून टिंगल व्हायची..पण नंतर सगळे उलट झाले सगळ्या एक्सपर्टची मजा मी घेत असायचो अधून मधून आणी... संदिप विशेषतः तांदळे सरांची)

            गंमतीचा भाग वगळला तर या परिक्षेचा एक फायदा झाला. यामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षेला सामोरे जाण्याचा माझा आत्मविश्वास दुणावला. वडील आले त्यांनी परिक्षा कशी गेली विचारले, मी त्यांना पेपर चांगला गेला आहे हे सांगितल्यावर त्यांना खुप आनंद झाला. पुढच्या परिक्षेचा खुप चांगला अभ्यास करायला सांगुन ते गेले. दोन्ही भाऊ खुप सपोर्ट करत होते. मित्र सोबत राहून अभ्यास करत होते. संदिप जरा जास्त खुल्या मनाने वागायचा. एखादे नविन पुस्तक त्याने आणले तर त्याला माहीत असायचे की मला ते वाचण्याची जास्त इच्छा आहे. मी आपला अभ्यास करत असताना मुद्दाम ते पुस्तक जोरात समोर टाकायचा.आणि जोरात ओरडून म्हणायचा " ए! लवकर वाचून घेवून नोट्स काढून ठेव रे ! तु नोट्स काढ मी वाचेन नंतर निवांत" तो काळजी घ्यायचा की, इतर कोणाला सहज कळणार नाही की मला पुस्तक वाचायचे आहे पण मी ते आणू शकत नाही, आणी मला ही जाणवणार नाही की त्याला माझी अवस्था पाहून वाईट वाटत असते ! असा जिवलग आणी मन जपणारा मित्र भेटला हे नशीबच!! एखादा सण असताना स्वतः घरी जेवायला गेल्यावर स्वतःच्या आईला सांगून आग्रहाने माझ्यासाठी डबा घेवून येवून हक्काने , पण सहज आणले असा आव आणत "जेव ! बे! आईनेच पाठवला आहे डबा तुझ्यासाठी " असे म्हणत लहान भावाप्रमाणे जपणारा!!! स्वतःच्या दुःखद प्रसंगी हक्काने आवाज देणारा...
या सगळ्या दिलदार मित्रांच्या हातांनी मला कधीच मागे सुटू दिले नाही. आणी त्याची जाण ठेवत मीही त्या सर्वांचा आजही तेवढाच आदर करतो.

        परिक्षा जवळ येत चालली होती..झोप उडाली होती , रिव्हिजन सुरू होते, आमच्यातले काही जण घरीच बसून अभ्यास करू लागले. कधी कधी मला एकट्यालाच दिवस दिवस बसावे लागायचे, एकटा असताना स्वाभाविकपणे मलाही भिती वाटायची, कसे होईल आपले? हा प्रश्न छळत असायचा, मी स्वतःला धिर द्यायचो. मी कोसळू शकणा-या दरडीला भक्कमपणे पाठ लावण्याचा प्रयत्न करत होतो जणू. एका आत्मविश्वासाच्या व कष्टाच्या बळावर मी शिखर ही न दिसणा-या पहाडास अंगावर घेवू पाहत होतो. मला शिखर गाठायचे होते. मी पहाडाखाली दडपला जाणार नव्हतो...मी भिडणार होतो! (क्रमशः)

Friday, June 14, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 16: आभाळ चकाकले...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 16: आभाळ चकाकले...


"काय नाव तुझं?" अंबेजोगाई या गावातील एका उच्चभ्रू वस्तीत पुस्तके विकताना एका सज्जन व्यक्तीने विचारले. मी त्यांना नाव सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले, अरे! कशाला आयुष्य वाया घालत आहेस. अभ्यास कर, इतका वेळ पाहतो आहे काॅलनीत, तु सकाळ पासून फिरत आहेस. पुस्तके विकत आहेस.याने आयुष्य चालणार नाही. "कितवीला आहेस?" मी सांगितले " एम ए सेकंड इयर ची परीक्षा देणार आहे " "अरे मग काही चांगले कर ना! सेट नेट दे! एम पी एस सी कर!" गेल्या वर्षभरात मी किमान हजार घरे फिरलो असेन, पण मला पर्सनल होवून कोणी बोलले नव्हते. मी सकाळ पासून फिरत होतो. एक अस्वस्थता दाटून येत होती..मन लागत नव्हतं..आणी त्यात हे असे विचारणे..जखमांचे टाके ऊसवायला लागले..मी त्यांना सांगितले "सर ! एमपीएससी करणार आहे, पण जाहिरात येत नाहीय! मी दररोज वाचत असतो!" मी माझ्या बॅगेतून नोट्सचा गठ्ठा काढला त्यांना दाखवला. त्यांनी पाहीला. पाठ थोपटली..म्हणाले ग्रेट! पण हे सगळं करून तुला नाही जमणार! तु जास्त दिवस हे नको करू. "शर्यतीच्या घोड्यानी टांगा ओढणं बरं वाटत नाही!" काळजात कळ आली..डोळे भरून आले..मी मुका झालो...त्यांनी ओळखलं...प्यायला पाणी दिलं...आस्थेनं चौकशी केली..मार्क्स विचारले..मी त्यांना सांगितले..खुष झाले..म्हणाले " मी पण एमपीएससी साठी प्रयत्न केले. पण नाही झाले सिलेक्शन! पण त्या अभ्यासावर मी विस्तार अधिकारी झालो. एमपीएससी आयुष्य वाया जाऊ देत नाही. तु चांगला मुलगा वाटलास म्हणुन सांगितले. जास्त दिवस हे काम करू नको " मी त्यांचे आभार मानले...त्यांनी शुभेच्छा दिल्या.."तुझ्या सारख्या मुलांचा संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरावा " असे म्हटले.त्यांच्या बोलण्याने , सल्ल्याने काळजात हुरूप मावत नव्हता...गेल्या वर्षभरात मी एमए, एमपीएससीचे वाचन आणि पुस्तके विक्री या शिवाय काही केले नव्हते...त्यांच्या विचारपुस करण्याने मला हुरूप आला...बरे वाटले....एक चांगल्या सदिच्छा मिळाल्या होत्या...मी खुशीत लाॅजवर आलो ...किशोरला सांगितले " भाऊ , आता हे पब्लिकेशन सोडावे म्हणतो ! जे व्हायचे ते होवो...अभ्यास करतो" किशोर पण वैतागला होता पण त्याने मला समजावले...सध्या थांब काही दिवस करू...मग पाहू...तुला अभ्यास करायचा तर कर काही लागले तर पाहू आपण ..! मी वाटल्यास मदत करतो.....( मदतीचे हात पुढे यायला लागले....असे अनंत हात माझी वाट पाहत होते....नियती संकेत देत होती...!! फक्त ती परीक्षे अगोदर माझी सत्वपरीक्षा पाहत होती......) गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते...अंधार दिसला की झोकून द्यायचे त्यात, एवढे मात्र ठाम शिकलो होतो!!!

लातुरला रूमवर परत आलो...मोठा भाऊ पण कळवळुन सांगायचा बस कर ! अभ्यासावर लक्ष दे! पण त्यालाही माहित होतं. हवेत अभ्यास करायला सांगु शकत नव्हता तो! पण त्याला माझ्या एम ए च्या अभ्यासाची कल्पना होती..एकदम थरार अभ्यास होता. वर्गात अभ्यासात एक नाव होतं माझं ..पुस्तक विकायचा आठवडा झाला की मी काॅलेजला जायचो..वर्गात शक्यतो कोणी नादी लागायचे नाही कारण चाललेला टाॅपिक अगोदरच मला ब-यापैकी माहिती असायचा..वर्गात माझा प्रतिसाद पाहून भिंगे सर खुष असायचे ...म्हणायचे...खुप चांगली समज आहे तुला विषयाची...नॅक ची टिम काॅलेजला आली...सरांनी 2 कमिटीचे काम माझ्याकडे दिले...ते संपवून मी इतरांना मदत केली...आमच्या सेक्शनचे चांगले नाव झाले...सर चांगलाच जिव लावायचे...अर्थात आजही त्यांचा तेवढाच जिव आहे.

एक अस्वस्थता मनात दाटली होती...खुप दिवस झाले MPSC ने जाहिराती टाकली नव्हती..त्या काळात वेबसाईट वगैरे काही नव्हती..तांदळे सर काॅलेज मधे असताना तेथे अभ्यास करायचे..तेथे त्यांचे सहकारी अतुल पाटील ऊर्फ बप्पा! ( अत्यंत दिलदार व दिलखुलास मित्र..सगळे जण त्यांच्यावर कोट्या करणार...तरीही अत्यंत दिलखुलासपणे पहाडी हास्य करत ते स्वीकारणारा...अगदी लहान वयापासूनच घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन लॅब टेक्निशीयन या पदावर काम करणारा...MPSC ने शेवटच्या अॅटेम्प्टलाही सिलेक्शन न दिलेला हा मित्र) अशोक मोहाळे (परभणी वरून आलेले, व त्याच शासकीय पाॅलिटेक्नीक काॅलेज मधे क्लार्क पदावर कार्यरत,ऊत्तम क्रिकेटर व अभ्यासू आणी अत्यंत सहकार्याची भावना असणारे मित्र ) हे ही तयारी करायला लागले होते. वेळ मिळेल तेंव्हा मी पाॅल्टेक्नीक काॅलेजला जायचो. तेथे अभ्यासा बदल चर्चा व्हायच्या. इतर ठिकाणी काय सुरू आहे, महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहेत या बाबत माहिती मिळायची. एक मात्र होते.असा एकही दिवस येत नव्हता ज्या दिवशी मी MPSC विसरलो असेन....हे सगळे जण चर्चा करायचे. तेथेही काही लोक त्यांना सहकार्य करायचे तर काहीजण टिकाटिप्पणी! रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आर्य मॅडम होत्या. त्या खुप प्रोत्साहन द्यायच्या. अधून मधून धुसर झालेल्या स्वप्नाला चकाकी मिळायची. मी Mpsc च्या आसपास राहण्याचा
प्रयत्न करायचो.


मी पुन्हा काॅलेज कडे वळलो होतो...सोबतचे मित्रमैत्रिणी गॅदरींग आणी इतर तत्सम कामात गुरफटले होते..काॅलेजने छोटेखानी ट्रिप काढली होती..मुड नव्हता,गेलो नाही... अशा छानछोकीच्या गोष्टी काही आकर्षीत करू शकत नव्हत्या मनाला..त्या पेक्षा मला कविता लिहिण्याचा असलेला छंद तगवत असायचा...ललित लिहायचो...वाचायचो.. त्यातील अगतिकता अनुभवायचो...पुन्हा वाटायचं..काही तरी करायला हवं आपण आयुष्यात ...भरीव...रेखीव..आखीव....!!!


इके (पाटील) भेटला ..एमपीएससी बद्दल बोलला...अतुल कुलकर्णी पण भेटला तोही बोलला..माळी सरांचे नाव ऐकून होतो..भेटलो नव्हतो..पण त्यांचे व भांबरे सर यांचे सातत्य ऐकत होतो..एके दिवशी मुक्रम भैय्या भेटले..."भाई कब आएगी रे अॅड?" म्हणून अस्वस्थ करून गेले..एक धुकं साचलं होतं..काॅलेजचे मित्रमैत्रिणी भेटायचे ..डिएड पुर्ण होवून ते
नोक-यांना लागले होते..मी चालत रस्त्याने फिरत असताना एखादी टुव्हिलर जवळ थांबायची.. त्यावरील शिक्षकमित्र हाक देवून थांबायचा...आस्थेने विचारायचा...थोडावेळ सोबत बोलायचा...फरक जाणवत असायचा दोघात....जिवाभावाचं बोलताबोलता काहीजण शिव्याही घालायचे...किती चांगली संधी घालवली मी डिएडची म्हणून झापायचे... काही जण रस्त्याच्या दुस-या बाजुने जात असतील तर हात दाखवायचे..थांबायचे...झाडाझडती घ्यायचे...चल निघतो भेटू म्हणून
निघून जायचे...मणामणाचे ओझे देवून...मी रिक्त मनाच्या पोकळीत स्वतःला काही आधार भेटेल म्हणून धुंडाळा घेत रहायचो ..चालत रहायचो...

गजा, जयपाल व इतर काही जण पुण्याला एमबीए ला गेले होते..अधून मधून ते यायचे...चर्चा व्हायची...बॅच मधले मुलं काही ना काही करत होते..गावाकडे जाण्या सारखं काही नव्हतं..कुढत फिरत होतो..पण.. .मळभ दाटून आलं की पाऊस पडतो...अंधार दाटून आला की पहाट होतेच...

मी एके सकाळी नित्यनेमाने आपापले काम उरकून बाहेर निघत होतो..डिसेंबरचा महीना होता..रूमवरील कामे संपली होती...मोठा भाऊ होता...तेवढ्यात रूमवर बातमी धडकली...एमपीएससी च्या राज्यसेवेची जाहिरात मुंबईत लागली होती काल...श्वास एकदम अडकला...अफवा असेल वाटले...गडबडीत धडपडत पेपर आणण्यासाठी निघालो..पाय-या उतरून खाली उतरलो..आणी एकदम लक्षात आले..बाजुला राहणा-या होके सरांकडे पेपर येतो...ते शाळेत गेले होते...गडबडीत त्यांचा पेपर उचलला...उघडला...पाहीले...आणी हर्षवायु झाल्यासारखे मी आरोळी ठोकली...आणी रूम मधे येवून जोरजोरात नाचू लागलो...भैय्याला कळत नव्हते काय झालं..."पागल झालास का? काय झालं ?" म्हणून त्यानं विचारलं...(कदाचीत अतिशयोक्ती वाटेल पण आजही जसंच्या तसं डोळ्यासमोर येतो तो क्षण!) मी ओरडंतंच त्याला सांगितलं "एमपीएससीची ॲड आली अॅड!!, हे घे पेपर बघ!" मी त्याच्याकडे पेपर फेकला...त्याने नीट पाहीले..तो ही खुष झाला..पण माझा उत्साह आवरता आवरत नाही पाहून त्याने एक वाक्य म्हटलं..." अरे फक्त जाहिरात आली आहे, सिलेक्शन नाही झाले..एवढे नाचतोस कशाला...पण कैफ चढला होता मला जणू....त्यातच माझा आत्मविश्वास होता की उत्साह, की नियती माझ्या तोंडून वदवून घेत होती...मी उत्तरलो..." होईल रे ,सिलेक्शन तर होईलच..ते झाल्याशिवाय मी मला सोडणार नाही तु बघ! ह्या अॅटेम्पटला मी सिलेक्ट होवून दाखवणारच!"

इतके दिवस एका काल्पनिक परिस्थितीत संघर्ष सुरू होता..आता प्रत्यक्ष युध्दभुमीवर येण्याची वेळ झाली होती. मी निघालो होतो...सुकर परिणामांची कल्पना करत....जिंकण्यासाठी !! (क्रमशः)











राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...