भाग 17: स्वतःला आकार देताना...
जाहिरात आली!! लगबग सुरू झाली होती, खुप बाबी करायच्या होत्या. सगळ्यात पहिल्यांदा पब्लिकेशन कडे गेलो. चापेकर सरांना सांगितले, "सर! आता काम शक्य नाही. मला तयारी करायची आहे " सरांनी कुठलाही किंतु परंतू न ठेवता शुभेच्छा दिल्या, तयारी कर म्हणाले. मागे हटू नको आता, हे ही सांगितलं. पण शेळके सर नाराज झाले.त्यांनी इतर
दुस-याकडे भावना व्यक्त केली की, "कशाला हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला आहे हा! एवढे सोपे असते तर मी कशाला पब्लिकेशन काढले असते!" मला वाईट नाही वाटले, उलट स्फुरण चढले. जिद्द जागी झाली. तयारी करताना अपयश येणार नाही याचा चंग बांधला.
खुप कामे करायची होती! दुष्काळी कालखंडात जशी पाखरे दूरदेशी ऊडून जातात तशी आमच्या ग्रुप ची अवस्था झाली होती. सगळे विखुरले होते..पण आता एकत्र येण्याची लगबग सुरू होणार होती.कारण सगळे पिचले होते, त्रासले होते ,आता एकत्र येवून तयारी करणे हा एकमेव मार्ग शिल्लक होता आमच्या समोर .पण अभ्यासाला बसायचे कोठे? कशी तयारीची सुरूवात करायची? कोणकोण बसणार? काही सुचत नव्हते. तांदळे सर, अरूण भैय्या आणी मी तिन दिशेला तिन टोक ..पण आता ती एकत्र सांधने, या शिवाय पर्याय नव्हता. आम्ही तिघे भेटलो. काय करायचं आता? या वर गहन चर्चा झाली.पण मार्ग सुचत नव्हता..... पण तुमच्या स्वप्नात जिव असेल, त्यात चैतन्य असेल, आणी तुम्ही हॄदयाच्या तळापासुन तुमच्या स्वप्नांची आराधना करत असाल, आणि ते वास्तवात आणण्यासाठी मरेतो मेहनत करण्यास सिध्द असाल तर ...नियती स्वतः दोन पावले समोर येवून बंद दरवाजे सताड ऊघडत असते.....!! आणी एक किमयागार तुम्हाला मार्गस्थ होण्यास मदत करत असतो!!!( द अल्केमीस्ट पुस्तक खरं आहे!!!!)
मा. विश्वास नांगरे पाटील सर!!!! एक महत्वाचं नाव!! (सरांना आज माहिती ही नसेल त्यांच्या एका पुढाकाराने तेथे धडपडणा-या आयुष्याला आधार मिळाला, फक्त त्याची एक झलक त्यांना 2018 साली सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच
ISO:9000 झालेले वळसंग पोलीस स्टेशन, त्याचे उद्घाटन करताना आमच्या पैकीच एका जिगरबाज ठाणेदारांनी त्यांना सन्मानपुर्वक करून दिली! त्या सहका-याचा संदर्भ येईलच) सर नुकतेच लातुरला पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांना पोलीस कल्याणनिधीतुन पोलीस पाल्यासाठी स्पर्धापरिक्षा, पोलीस भरती अनुषंगाने भरीव काही करायचे होते. त्यांनी तसा मनोदय व्यक्त केला. अरूणभैय्याचे वडील पोलीस उपनिरीक्षक होते. अरूण भैय्या सरांना भेटले व त्यांनी सरांना विनंती केली. पोलीस पाल्यांना शिकवण्यासाठीची इच्छा दर्शवून त्यांनी ती जबाबदारी मिळवली. व त्यासाठी त्या पोलीस पाल्यांना शिकवणा-यांना पुर्वतयारी करण्यासाठी व पोलीस पाल्यासाठी पुस्तके लागतील व त्यांना बसण्यासाठी एक रूम व शिकवण्यासाठी हाॅल लागेल हे ही नमुद केले. सरांनी त्वरीत प्रतिसाद देत आवश्यक ती सारी पुस्तके ऊपलब्ध करून दिलीच पण त्या सोबतच एस पी ऑफिसच्या प्रांगणातच ऊपलब्ध एक रूम ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी तर मुख्य इमारतीत तळ मजल्यावर शिकण्यासाठी हाॅल ऊपलब्ध करून दिला. अत्यंत महत्वाची अडचण अशी अनाहूत दुर झाली...
मला हुरूप मावत नव्हता. आम्ही एस पी ऑफिस मधे अभ्यासाला बसणार होतो. लातूर मधे अभ्यासीका नावाचा प्रकार नव्हता, त्या काळात अशी सुविधा मिळणे म्हणजे अप्रूपच!! आम्ही सगळे अर्थात मी, अरूण भैय्या, तांदळे सर, रोहिणी पोतदार( API) (अरूण पोतदार यांची बहीण जी ग्रुप मधे सगळ्यात अगोदर PSI पदी सिलेक्ट झाली) असे सगळेजण बसणार होतोआणी या ग्रुप मधे नंतर जाॅईन झाला संदिप जाधव (ASST. DESK OFFICER). बसण्याची व्यवस्था झाली होती. अभ्यासाला पुस्तके होती. आता फक्त अभ्यास करणे महत्त्वाचे होते.मी सर्व इतर बाबी सोडून अभ्यास करू पाहत होतो.आता कसलाही वेळ वाया घालायचा नाही असे ठरवून मी एक एक दिवस पाहत वेळापत्रक बनवले.सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून आपल्याला काय येतं काय येत नाही, याचे सखोल विश्लेषण केले. मागील प्रश्नपत्रिकेत पाहून कुठल्या विषयावर/ टाॅपिकवर किती व कसे प्रश्न विचारले आहेत याचा वस्तुनिष्ठ अंदाज घेतला. सगळ्या जुन्या नोट्स संदर्भास घेवून अत्यंत सचोटीने पहिल्या विषयापासुन नव्याने अभ्यासाला सुरूवात केली. तत्पुर्वी आम्ही सर्वांनी एकत्र बसून गहन चर्चा केली. त्यात अत्यंत तळमळीने ठरवले की खुप अभ्यास करायचा. आता कुठलीच कसर ठेवायची नाही. पुन्हा पुन्हा संधी येणे नाही. मला तर दुसरा चान्स घेणे परवडणारच नव्हते. मैदान दिसल्यावर जणू घोडा फुरफुरतो तशी अवस्था झाली होती. मी कुठल्याही अमिषाला, अडथळ्याला बळी पडायचे नाही, काहीही झाले तरी अभ्यासापासुन दुर जायचे नाही असे ठाम ठरवून टाकले, सामुहिक प्रतिबध्दता तर होतीच पण स्वतःशी इतकी घट्ट खुणगाठ बांधली होती की नशीबाने जरी ठरवले असते की मला तयारी करू द्यायची नाही तर मी नशीबालाच बदलायचे असे ठरवून सिध्द झालो होतो....
रोज सकाळी 6.00 वा उठायचे. एसपी ऑफिसच्या लाएब्रेरीत जायचे.उपाशी पोटी अभ्यास होत नाही म्हणतात पण ते उपाशी पोटंच अभ्यासात जाज्वल्य आणायचे! दरम्यानच्या काळात जाहीरात आल्यास वडील येवून गेले होते.अभ्यास कर, कुठल्याही स्वरूपात वेळ वाया घालवू नको म्हणून सांगुन गेले. वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सांगितले की गावाकडून टिफीन पाठवतो, त्या प्रमाणे ते गावाकडचा मिलिंद नावाचा मित्र ( गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करायचा), नितीन ( मामाचा मुलगा जो त्या काळात वेगळ्या गॅरेजवर काम करायचा पण नंतर एम एस डब्ल्यू करून तो आता जाॅब करतो) अथवा गावाकडून कोणी येत असेल तर त्याच्या जवळ पाठवायचे.तो टिफीन येणा-यावर अवलंबून असायचा. व शक्यतो तो कधी नितीन सोबत राजीव गांधी चौक(रूम व एस पी ऑफिस पासून साधारणतः 3 कि.मी. दुर ) तर कधी मिलिंद सोबत शाम नगर येथे यायचा. शाम नगर मधे आला तर तो लवकर भेटायचा. पण राजीव गांधी चौकात आला तर मात्र जायचा प्रश्न. मग दुपार उलटून गेली तर तो तसाच रहायचा कधी तरी भुकेची तिव्र जाणीव झाली तर मग कधी मित्राच्या गाडीवर, कधी सायकल तर कधी संदिप सोबत जाऊन आणी पर्याय नसल्यास चालत जाऊन तो आणला जायचा. दोन वेळचा डबा असायचा तोच दुपारी तोच रात्री. पण कुठलीच तक्रार नव्हती. असेल तर खा नाहीतर तसेच बसायचो..काही फरक पडत नव्हता. अभ्यासाचा एवढा ध्यास लागला होता की भुकेचे चोचले परवडत नव्हते.
आधाराला हिमायत भाई चे छोटेखानी हाॅटेल सुरू झाले होते एस पी ऑफिस च्या कोप-यावर ..."कॅफे बरिश्ता"!!!!
( नजीकच्या भविष्यात ते एमपीएससी चे मुख्य केंद्रबिंदू झाले. लातूर मधील त्या काळात एमपीएससी करणारे जवळपास सर्वजणच तेथे भेटायला, चर्चेला यायचे...ते हाॅटेल अनेक सिलेक्शन आणी अनेक स्ट्रगल चे साक्षीदार आहे...हा पाॅईंट स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील महत्वाचा साक्षीदार आहे, तेथे आजही आमच्या मित्र परिवारातील विविध पदावर कार्यरत सर्व मित्र परिवार एकत्र भेटतो.. पण या हाॅटेलची ही स्थिती सुरूवात होते ती आमच्या ग्रुप पासून...बहुतेक मीच ती सुरूवात केली) जास्त भुक अनावर झाली तर हिमायत भाई कडे जाऊन चहा घ्यायचा..पुन्हा येवून बसायचे.. हिमायत भाई वेळ प्रसंगी ऊधार द्यायचे...आम्ही अभ्यासाचे ठिकाण सोडत नव्हतो, सकाळी 6 ते रात्री 12 अहोरात्र फक्त अभ्यास..! कोणाचे काय झाले..कोणाच्या घरी लग्न आहे, कार्यक्रम आहे, नविन मुव्ही आली, लातुरला कोणी सेलिब्रेटि येत आहे, सण आहे, मित्रांची पार्टी आहे कश्या कश्याचा मला फरक पडत नव्हता( आणी तो सुदैवाने सिलेक्शन होईतो पडलाही नाही! आणी तो न पडल्याने काही बिघडलेही नाही!!!)
सुदैवाने आमचा ग्रुप अभ्यासाबद्दल फक्त गंभीरच नव्हता तर त्या सोबतच यात कठोर मेहनत करण्याची उर्मी पण होती, त्या सोबतच येथील प्रत्येक जण कुठल्याना कुठल्या विषयात विशेष कौशल्य बाळगून होता...सर्व जण अभ्यासाला असे भिडले होते..जणू उद्याच परिक्षा आहे. दररोज अभ्यास, नियमित गटचर्चा, सामुहिक वेळापत्रक, वैयक्तीक पाठपुरावा ..आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत..काही लपवाछपवी नाही..सर्व जण परस्परांना पुढे चालण्यास मदत करण्यास तत्पर.. चुकत असल्यास खडसावणे.. अभ्यासात कसूर झाल्यास जाणीव करून देणे की खुप दिवसानंतर जाहिरात आली आहे, महाराष्ट्रभर खुप मुलं अभ्यास करत आहेत...त्यामुळे स्वंयशिस्ती सोबतच सामुहिक शिस्त पण होती...हे सारे जण वेळोवेळी मदतीला सहकार्याला सोबत नसते तर...कदाचित काळाच्या रेट्यात मी पण अनामिक कथा बनून गेलो असतो...अनंत वेळा ठरवूनही आम्ही एकमेकाचे उतराई नाही होवू शकत....
दररोज सोबतचे सहकारी नवनवीन पुस्तके वाचायला घ्यायचे..मला माहीत होते एवढी पुस्तके आपण घेवू शकत नाही त्या साठी मी सर्व ऊपलब्ध पुस्तकांचा संदर्भ घेवून झपाटल्याप्रमाणे माझ्या नोट्स काढायला सुरूवात केली..दरम्यानच्या काळात PSI/STI/ASST. ची पण जाहिरात आली..8मे 2005 ला ही पुर्व परिक्षा, 30 मे 2005 ला राज्यसेवा पुर्व परिक्षा अशा तारखा होत्या...ग्रुपमध्ये थोडी चलबिचल सुरू झाली. अगोदर 8 मे ची तयारी करू असा मानस व्यक्त केला गेला..मी त्यात सामील व्हायचे नाही असे ठरवले..मला राज्यसेवाच करायची होती मी त्या प्रस्तावास नकार दिला व तुम्ही करा हवे तर मी राज्यसेवाच करणार असे सांगितले.त्यावर प्रतिक्रिया पण आल्या, अगोदर PSI ची तयारी करू, राज्यसेवा खुप अवघड आहे तुलनेने, किमान एक तरी सिलेक्शन घेवू मग पुढची तयारी करता येईल... पण मी ठाम होतो...राज्यसेवा म्हणजे राज्यसेवाच !! पण तरी अनुभव येईल म्हणून मला सर्वांनी सल्ला दिला फाॅर्म भर. मी तो सल्ला महत्वाचा आहे हे समजून फार्म भरला. पण मी वेगळ्याने राज्यसेवा दुय्यम ठेवून त्याचा अभ्यास करणार नव्हतो.
काहीच पुर्वानुभव नसताना थेट राज्यसेवा, म्हणजे हे जरा खुपच अती होत आहे अशी माझ्या काही स्नेहयांची धारणा झाली होती...पण पर्याय नव्हता मी आता माझेही ऐकणार नव्हतो...कारण अंधारात स्वतःला झोकून देणे...स्वतःच्या स्वप्नांची तीव्रता अनुभवणे..आणी ती वास्तवात आणण्यासाठी स्वतःला शेवटच्या क्षणापर्यंत कसोटीला लावणे...माझी मानसिक तयारी झाली होती..संधी चालून आली होती...द्विधा मनस्थिती करून मला ती गमवायची नव्हती..
दररोज आम्ही सगळे मिळून दिवसभर आपापला अभ्यास करायचो..सायंकाळी मला वगळता सर्वजण PSI च्या विषयाचे डिस्कशन करायला बसायचे..मी आपापला राज्यसेवेचा अभ्यास करत असायचो..दिवसेंदिवस अभ्यासाला खुप धार येत होती...मी न डगमगता चर्चेत सहभागी होत होतो, चर्चेत टिकतही होतो, आणि प्रचंड आत्मविश्वास त्यातुन मिळत असल्याने पुन्हा विषयांना अभ्यासण्यासाठी भिडत होतो...सगळेजण प्रचंड अभ्यास करत होतो..एकमेकांना मदत करत होतो..सगळेजण मला सिनीयर होते. मी पण माझी सिन्सिअरीटी जाणार नाही याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो..तिन महिने प्रचंड अभ्यासात कधी गेले कळले नाहीत..जवळपास सर्व विषयाच्या नोट्स तयार झाल्या होत्या..एम ए सेकंड ईअरची परिक्षा पण आली..एम ए चा अभ्यास ही सोबत सुरू केला. कारण मुख्य परिक्षेला 2 ऑप्शनल घ्यावे लागायचे...त्यातील एक विषय आत्ताच हातावेगळा होइल या दृष्टीने मी ती ही परिक्षा दिली...पेपर खुपच चांगले गेले..
PSI ची पुर्व परिक्षा जवळ आली होती. सर्वजण खुप अभ्यास करत होते. मी राज्यसेवेची तयारी करत होतो... अभ्यास एवढा वाढला की, जवळपास सगळे विषय वाचून, समजून घेवून, नोट्स काढून, पाठांतर संपत आले होते..तो पर्यंत बाहेर सर्वांना अभ्यासाची पातळी समजली होती. त्यामुळे सोहम क्लासेस वर MPSC चे विषय शिकवण्यासाठी बोलावणे आले. सर्व मित्रांनी जायला सांगितले, त्याचा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढला पण त्या सोबतच जो मोबदला मिळायचा त्यातुन मासिके, झेराॅक्स, स्टेशनरी याचा थोडाफार खर्च भागणार होता..शिकवताना जाणवत रहायचे अभ्यास खुप चांगला झाला आहे फक्त तो टिकवून ठेवावा लागणार होता. आणी मी शिकवत होतो तर मला पास होणे अनिवार्य होते कारण लोकांना शिकवून मी नापास होणे हे परवडणारे नव्हते, सतत मनात एक सजगता होती..मी माझा अभ्यास अधिक सजगतेने करू लागलो...
8 मे ची PSI पुर्वपरीक्षा आली. आम्ही सर्व जण परिक्षेला गेलो. मी ही गेलो, सिरीयसली पेपर सोडवला.. सगळेजण त्वरित परत आलो..आन्सर की काढली, आणि किती उत्तरे बरोबर आले ते तपासले. सगळेजण 150 पैकी 130+ !! मी 128 इतरापेक्षा कमी पण पास होण्यासाठी आवश्यक कटआॅफ च्या भरपुर पुढे!! आम्ही सगळेजण पास होणार याचा आत्मविश्वास आला , मला तर खुप आत्मविश्वास मिळाला होता कारण मी या परिक्षेचा नेमकेपणाने अभ्यास केला नव्हता मी राज्यसेवाकेंद्री अभ्यास केला होता पण तरीही मी ही परिक्षा अत्यंत गांभीर्याने दिली होती..(त्या गंभीरपणा सोबत घडलेली एक अतीशय गंमतीशीर बाब ,जी आजही आम्हा सगळ्यांना खळखळून हसायला भाग पाडते ती म्हणजे मला ग्रुपमध्ये एकट्यालाच गणितात पडलेले 20 पैकी 20 मार्क्स !! आमच्या ग्रुपमध्ये मला वगळता सर्वांचे गणित खुपच स्ट्रांग होते. आणी तांदळे सरांचे तर खुपच. तसे ते ही म्हणायचे, आणी त्यांना त्याचा खुप अभिमानही होता अर्थात आम्हा सगळ्यांना त्याचा आदर ही होता. मी दहावीला गणितात अगदी काठावर 52 मार्क्स घेवून पास झालेला त्यामुळे अधून मधून ग्रुपमध्ये माझी गणीतावरून टिंगल व्हायची..पण नंतर सगळे उलट झाले सगळ्या एक्सपर्टची मजा मी घेत असायचो अधून मधून आणी... संदिप विशेषतः तांदळे सरांची)
गंमतीचा भाग वगळला तर या परिक्षेचा एक फायदा झाला. यामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षेला सामोरे जाण्याचा माझा आत्मविश्वास दुणावला. वडील आले त्यांनी परिक्षा कशी गेली विचारले, मी त्यांना पेपर चांगला गेला आहे हे सांगितल्यावर त्यांना खुप आनंद झाला. पुढच्या परिक्षेचा खुप चांगला अभ्यास करायला सांगुन ते गेले. दोन्ही भाऊ खुप सपोर्ट करत होते. मित्र सोबत राहून अभ्यास करत होते. संदिप जरा जास्त खुल्या मनाने वागायचा. एखादे नविन पुस्तक त्याने आणले तर त्याला माहीत असायचे की मला ते वाचण्याची जास्त इच्छा आहे. मी आपला अभ्यास करत असताना मुद्दाम ते पुस्तक जोरात समोर टाकायचा.आणि जोरात ओरडून म्हणायचा " ए! लवकर वाचून घेवून नोट्स काढून ठेव रे ! तु नोट्स काढ मी वाचेन नंतर निवांत" तो काळजी घ्यायचा की, इतर कोणाला सहज कळणार नाही की मला पुस्तक वाचायचे आहे पण मी ते आणू शकत नाही, आणी मला ही जाणवणार नाही की त्याला माझी अवस्था पाहून वाईट वाटत असते ! असा जिवलग आणी मन जपणारा मित्र भेटला हे नशीबच!! एखादा सण असताना स्वतः घरी जेवायला गेल्यावर स्वतःच्या आईला सांगून आग्रहाने माझ्यासाठी डबा घेवून येवून हक्काने , पण सहज आणले असा आव आणत "जेव ! बे! आईनेच पाठवला आहे डबा तुझ्यासाठी " असे म्हणत लहान भावाप्रमाणे जपणारा!!! स्वतःच्या दुःखद प्रसंगी हक्काने आवाज देणारा...
या सगळ्या दिलदार मित्रांच्या हातांनी मला कधीच मागे सुटू दिले नाही. आणी त्याची जाण ठेवत मीही त्या सर्वांचा आजही तेवढाच आदर करतो.
परिक्षा जवळ येत चालली होती..झोप उडाली होती , रिव्हिजन सुरू होते, आमच्यातले काही जण घरीच बसून अभ्यास करू लागले. कधी कधी मला एकट्यालाच दिवस दिवस बसावे लागायचे, एकटा असताना स्वाभाविकपणे मलाही भिती वाटायची, कसे होईल आपले? हा प्रश्न छळत असायचा, मी स्वतःला धिर द्यायचो. मी कोसळू शकणा-या दरडीला भक्कमपणे पाठ लावण्याचा प्रयत्न करत होतो जणू. एका आत्मविश्वासाच्या व कष्टाच्या बळावर मी शिखर ही न दिसणा-या पहाडास अंगावर घेवू पाहत होतो. मला शिखर गाठायचे होते. मी पहाडाखाली दडपला जाणार नव्हतो...मी भिडणार होतो! (क्रमशः)

No comments:
Post a Comment