Sunday, February 24, 2019

बदली....एक अपरिहार्य अनासक्ति!!!

बदली....एक अपरिहार्य अनासक्ति!!!


प्रशासकीय सेवा....
बदली तिचा अपरिहार्य....भाग...
पण
पुर्वी अचानक वाट्याला आलेले एक क्षेत्र....
जेथे एक दीर्घ कालखंड सतत वेळ,घाम, व अहोरात्र सेवा देवून,
वेळ प्रसंगी स्वतःच्या घरचे सर्व कर्तव्य दुय्यम माणून,
कुठलेही पुर्वसंबंध नसणा-या जनतेशी व मातीशी स्वतःला जोडून...त्यांचे सुखदुःख स्वकुटुंबापेक्षाही प्राथम्याने मानून,
वेळ प्रसंगी सायंकाळी 4.00 वाजता करत असलेल्या सकाळच्या जेवणाचा पहिला घास बाजुला सारत आलेल्या कागदावर सही करून, प्रसंगी जेवणाचा डबा बहुतांश वेळा न उघडताच घरी परत नेवून...
भिरभिरत्या डोळ्यांनी व घाबरत्या पावलांनी कार्यालयात आलेल्यांना समोर बसवून...
कितीही गडबड असली...मिटींगला जायला उशिर होवून तिथे बोलणे ऐकायला मिळेल हे माहित असूनही त्याला शांतपणे ऐकून घेवून , व त्याला आश्वस्त करून...
कामाचे अनंत ढिगारे सदैव ऊपसताना...घरून आलेले फोन सदैव कापत वरिष्ठांचा व तालुक्यातील प्रत्येकाचा फोन घेवून....आणी घरी गेल्यास आपण कुटुंबासाठी काहीच वेळ देत नाही यावर क्षणीक चरफडून....घरी अपेक्षेने वाट पाहणा-या घरातील सदस्यांच्या विझल्या अपेक्षा गोंजारण्याचा अयशस्वी प्रयत्न करून...
अनेक पार्श्वभूमीतुन व संस्कारातुन आलेल्या कर्मचारी यांना सोबत घेवून..
स्वतःच्या कार्यशैलीत त्यांना बसवून....
गावाकडून आईवडीलांचा आलाच कधी फोन तर अर्ध्या तासात करतो म्हणून दिवसभर तर कधी दोन दोन दिवस तो करायला फुरसत न मिळून...
आपल्या हातून झालेच कधी कोणाचे काम तर त्यांच्या चेह-यावरील समाधानातच आपले समाधान मानून...
आणी क्षुल्लक कारणावरूनही नाराज होणा-याची मर्जी सांभाळून...
एक निरंतर कार्ययज्ञ मांडला जातो...अनेक वैयक्तिक समिधांची त्यात होळी होते..
वैचारीक द्वंद्व येते, कार्यात्मक संघर्ष होतो...काही चांगल्या तर काही वाईट लोकांशी संपर्क येतो...कधी कौतुक कधी टीका झेलावी लागते..तर कधी गाॅसिपींग.....
कार्यभाग नाही साधला कोणाचा तर त्यांनी या पुर्वी त्यांची अनेक कामे झाली आहेत हे सोयीस्करपणे विसरून केलेली टीका,आरोप आणी तक्रारींना तोंड द्यावे लागते..
कधी जुळते....तर कधी विस्कटते घडी...पुन्हापुन्हा ती सांधत...चालता चालता...एक घट्ट नाळ व नाते जुळून जाते त्या क्षेत्रातील मातीशी व जनतेशी....
काही जिवाभावाचे लोक भेटतात...तर काही जिव खाणारे....काही जण -हदयात स्थान देतात..तर काही तटस्थता...
जिव रमत जातो आणी रूळत जातो...नियोजन व्हायला लागते...आज, आत्ता,ताबडतोब...लगेच अशा जीवघेण्या अपेक्षांची पुर्ती करत...स्वतःच्या संस्कारांने, तळमळीने वेगवेगळी कामे काढली जातात...दिवस झपाट्याने सरतात,
कार्यालयीन कामकाजाचा वेळ आपोआप वाढत जातो..तो प्रसंगानुरूप मध्यरात्रीपर्यंत वाढतो...आणी झोपण्या अगोदर ऊद्याचे नियोजन झोप ऊडवायला लागते...काही कामे दृष्टीक्षेपात यायला लागतात...हळूहळू समजायला लागते....आणी अचानक...बदली येते...सगळं विस्कटते..अनेक धारणा,अनेक नियोजन बाधित होतात....गेले काही दिवस जेथे आपण नित्य काम केले...तेथे अचानक आपण अतिरीक्त ठरतो.....
असेच अचानक येवून पुर्वी लावलेले सामान...ऊचलताना...हुरहुर वाटायला लागते...शिल्लक राहिलेली कामे व ते घेवून आलेले लोक डोळ्यासमोर येतात...रोज सोबत काम करताना ज्यांच्याशी स्नेह निर्माण झाला तो अडखळायला भाग पाडतो.... ....कोणाचे पाणावले डोळे तर कोणाच्या सुटकेचे निश्वास सगळे सोबतच....

घर, माणसे,गावे,शहरे मागे पडत जातात...कोण कुठले आपण स्वतःच्या जगाशी अपरीचित होत...त्याच्यापासून तुटत...नविन ओळख निर्माण करण्यासाठी निघतो.....

पुन्हा एवढे कधी गुंतायचे नाही असे खोटे खोटे ठरवत जडावलेले पावले निघतात.....पुढील प्रवासाला.....आणी निम्म्या रात्री आपले आप्त सोडून सत्याच्या शोधात निघालेल्या बुध्दाच्या मनातील व कैकयीच्या हट्टासाठी वनवासाला निघालेल्या रामासोबत निघालेल्या लक्षमणाची होणारी घालमेल घेरून टाकते पुढील ठिकाणी सामान लावेपर्यंत.....आणी आपल्या आतील माणूसपणावर मात करत आपण ऐकत राहतो एक आवाज...."अनासक्त हो!!!!

( माझा प्रशासन नामा.........)
प्रताप वाघमारे.
तहसीलदार.
9422642842




1 comment:

  1. एक कर्तव्यद्क्ष माणूस... माणसाची... अशीच वाटचाल असते.
    फार उत्तम ...
    यावर मला असे वाटते .

    मी
    सृष्टीतील प्राण्यापैकी
    एक घटक ...
    हवा जशी यावी ...
    तसे कुठतरी अनपेक्षित पडावे ...
    स्थिर व्हावे ...
    नी ...
    पुन्हा अनपेक्षितपणे प्रवास ...मनुष्य अस्तित्वाचे काय हेच जीवन ...?

    ReplyDelete

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...