Sunday, October 14, 2018

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 9: मला स्वप्नाने झपाटले...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 9: मला स्वप्नाने झपाटले...


             बारावीचं व्हेकेशन सुरू झालं. अशावेळी काॅलेज मधे फक्त 12 वी चेच विद्यार्थी येत जात असत.त्यामुळे एक शांतता असायची..विद्यार्थी कमी असल्याने व इतर धावपळ नसल्याने प्राध्यापकवृंद जास्त वेळ द्यायचे.. सरांच्या ओळखी दृढ व्हायच्या सरांना विद्यार्थ्यांची परिस्थिती कळून यायची. ते मग अशा विद्यार्थ्यांना जरा जास्तच आस्थेने शिकवायचे. व सतत परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते या बाबत भान ठेवायला अभिप्रेरीत करायचे. कारण आम्हाला शिकवणारे जवळपास सर्वच प्राध्यापक स्वतःच अत्यंत बिकट परिस्थितीतुन आलेले होते.त्यांना परिस्थितीची जाण होती आणी त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकून रहायचे हे सतत ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते सांगत रहायचे. काही सर तर स्टाफरूम मधे बोलवून अडचणी विचारायचे. मी धडपड
करणा-यापैकी आहे हे त्यांना माहीत असल्याने त्यांना आस्था असायची. त्यामुळे हुरूप यायचा , वाटायचं सर एवढे समजवून सांगतात तर आपण मेहनत घेतली पाहिजे...काही असेच चांगले मित्र मैत्रिणी धडपडताना पाहिले की लढण्याची जिद्द वाढायची. बहुतांश मित्र मैत्रिणीना बारावीत खुप अभ्यास करून डि एड ला जायचे होते. मी मात्र एकटाच असा होतो की मला डि एड करायचे नव्हते.पण अभ्यास करायचा होता. मी तो करताना ठरवले होते की फक्त काॅलेजच्या विषयाचा नाही तर सामान्य ज्ञानाचाही अभ्यास करायचा. थोडेफार मार्क्स कमी पडले तरी चालतील (अर्थात हा दृष्टीकोन मी घरी कळू दिला नाही, कारण माझ्या नात्यातील व गावातील खुप जणांनी वडिलांना सल्ला दिला होता की 'जर लवकर डि एड झाले तर घरची अडचण दुर होईल. मग पुढे शिकून तो काही का करेना !' आणी वडील पण दोन तिन वेळा सहज हा विषय बोलून गेले होते) पण मी ठरवले होते की मी डि एड वगैरे करणार नाही. कारण मला माहित होतं. "गड सर करायचा असेल तर सगळे दोर कापावे लागतात!" मी खरंच खुप धुमसत होतो...मला आता परिस्थिती म्हणून नाही तर " स्वंयसिध्दीच्या गरजे पोटी " MPSC करायची होती .पण जरी ठरलं असलं तरी परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. कारण अकरावीच्या नंतर सुट्ट्या नसल्याने मला कोठे कामासाठी जाता आले नाही..अख्खं वर्ष वंचनेचे चटके बसणार होते...नुसती परिक्षाच नव्हती तर सत्वपरीक्षा वाट पाहत होती. आणी मी ही आता सज्ज झालो होतो...

         बारावी सुरू झाली , फार वेगाने अभ्यासक्रम शिकवला जात होता. ऊर्वरित वेळेत विविध परिक्षा घेवून मुल्यमापन केले जात होते. जेथे उणीवा होत्या ते पुन्हा शिकवले जात होते. सकाळी सहा वाजता गावाकडून निघून मी रात्री नऊ , साडे नऊ ला घरी जात होतो. दिवसभर काॅलेजच्या अभ्यासिकेत बसून वाचन चालायचे. इतर काही करण्यासारखे नव्हते. अभ्यासिकेत इतर पुस्तकाचे वाचन सुरू रहायचे. मित्रासोबत चर्चा व्हायच्या. पण या मुळे मी पुस्तकी किडा होणार नाही याचीही काळजी घेत होतो. घरी ऊशीरा गेल्यावर घरचे विचारायचे ऊशीर का झाला? मी उत्तर द्यायचो की अभ्यास करत बसलो होतो. गुपचूप असेल ते जेवायचे आणी मग दुस-या दिवशी पुन्हा तेच...
गरीबीची लाज वाटण्या इतपतही उसंत मी ठेवली नाही स्वतःला...पण खुप तीव्रतेने जाणवायचे, आणी आजही आठवते, पुर्ण वर्षभर माझ्याकडे काॅलेजचा युनिफॉर्म सोडला तर फक्त एक जास्तीचे शर्ट होते !!!. युनिफॉर्मला सुट्टी असलेल्या दिवशी मी तो शर्ट वापरायचो...वर्षाच्या शेवटी शेवटी तो खुप विरळ झाला होता. भिती वाटायची की तो फाटला तर काय??? पण सुदैवाने त्याने वर्षभर साथ दिली. त्या शर्टाची आजही आठवण येत राहते....

            काॅलेज मधे तसा मी ब-यापैकी सर्वांना माहित होतो. सिनीयर्स ही नावानिशी ओळखायचे. प्राध्यापक, शिपाई मंडळी यांच्यात ही माझी चांगली ओळख होती. आणी भरपूर मित्र परिवार होता. मला सातत्याने या सर्वांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठबळ मिळायचे. मीही माझ्या सारख्या फाटक्या परिस्थितीच्या मित्रांना धिराचं बोलायचो. शिकत होतो , टिकत होतो. गरीबी आता उणीव वाटत नव्हती, आता ती हवी होती कारण मला तिलाच भिडायचे होते. तीच माझी संपत्ती बनत चालली होती. या महाविद्यालयांने मला सगळ्यात जास्त काय शिकवले ? तर स्वाभिमान व आत्मभान!!आणी गरीबी मुळे लज्जित न होता तीला संपवण्यासाठी प्रयत्नवादी रहायचे...सोबतच्या मित्रांनीही कधी कोणालाच ती जाणवेल असे वर्तन केले नाही. ते आमच्या पिढीचं अनमोल शहाणपण होतं. म्हणून त्या काळातील सर्व मित्र मैत्रिणी या आयुष्यभराचे साथी झाले आहेत. आजही आम्ही संपर्कात आहोत.

      अधुन मधुन वडील अचानक काॅलेज मधे यायचे , आणी मी काय करतो आहे ते पहायचे. पण मी कधीच काही वावगं करत नसल्याने ते समाधानाने परत जायचे. हे बारावीचे वर्ष एवढे अनमोल आहे आयुष्यात की काॅलेज ची आठवण आली की हेच वर्ष डोळ्यांसमोर येतं. सर्व मुले भारावलेले.. एकमेकांशी अतूट भावनेने वागणारे.. एकमेकाला आधार देत आयुष्याचा प्रत्येक भाव तन्मयतेने जगणारे असे सगळे...आजही आम्ही बहुतांश जण परस्परांच्या संपर्कात आहोत..पण काहीजणांचा संपर्क झाला नाही. आयुष्याचे ही हरवलेली पाने भेटत नसल्याने हुरहुर दाटून येते...


        हे बारावीचे वर्ष मला खुप काही शिकवत होते. अभ्यास, आयुष्य, मैत्री, गुरुजनांचा आदर, सामाजिक दृष्टिकोन, कौटुंबिक समस्या, आर्थिक मर्यादा व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न. आता मला परिस्थिती भितीदायक न वाटता आव्हानात्मक वाटायला लागली. ती जेवढा दबाव टाकायची तेवढी जास्त उसळी आत मधून यायला लागली. मी मन लावून अभ्यास करत होतो. दहावी सारखं हे वर्ष मला गमवायचं नव्हते. मी जास्तीत जास्त वेळ अभ्यासिकेत घालवत होतो. पण सगळा वेळ निव्वळ 12 वी ला न देता मी MPSC ची उपलब्ध पुस्तके पण वाचत होतो. ते वाचताना मला काय सिलॅबस असतो, काय विचारले जाते, अभ्यास कसा करायचा असतो, परिक्षा कशी असते या बद्दल काहीही माहित नव्हते. पण मी अभ्यास करत होतो. कोणाला विचारावे असे कोणी नव्हतेही आसपास...आणी त्या वेळी मी MPSC बद्दल कोणाला विचारणे म्हणजे स्वतःचे हसू करून घेण्यासारखे होते .वर्ष झपाट्याने सरत होते.


              वर्गात भरपूर मुले होती जे लातुरच्या आसपासच्या खेड्यातून रोज यायचे. चर्चा व्हायच्या. सिनीयर्स किंवा वर्गातील मुले विविध चळवळी, आंदोलने यावर बोलायचे. आणी त्यात सक्रिय होण्याचा प्रयत्न करायचे. मी मात्र राजकीय दृष्ट्या कसलीही सक्रियता ठेवली नव्हती. विद्यार्थ्याच्या उद्बोधनासाठी काॅलेज विविध कार्यक्रम आयोजित करायचे. अशा कार्यक्रमांना हजर रहावे लागायचे. अशा उपस्थितीमुळे खुप काही शिकायला मिळायचे.

        बारावीची परिक्षा जवळ आली. मी ब-यापैकी अभ्यास केला होता. त्या सोबतच मी इतर ही सामान्य ज्ञानाचा अभ्यास केला होता. माझ्या वर्गमित्रांनीही खुप अभ्यास केला होता. आम्ही सगळ्यांनी परिक्षा दिली. मीही खुप चांगल्या पद्धतीने पेपर लिहीले. ते लिहिताना सामान्य ज्ञानाचा जो काही विस्कळीत अभ्यास केला होता त्याचाही वापर केला. मार्क्स किती पडतात या पेक्षा विश्लेषणात्मक लिहले आहे याचे जास्त समाधान होते. परिक्षा झाली. मोठा भाऊ ही सुट्टीला आला. आता तो परत जाणार नव्हता.कारण त्याचे नवोदयचे शिक्षण पुर्ण झाले होते. आणी लहान भाऊ दहावीला जाणार होता. आगामी वर्षात खर्च वाढणार होता. याची जाणीव आम्हा सर्वांना होती. अकरावीच्या सुट्ट्यात काम न केल्याने ही अडचणी वाढल्या होत्या. त्यामुळे सुट्ट्या लागल्या बरोबर आम्ही तिघे भाऊ कंपनीत कामाला निघालो.फरक एवढाच होता की लहान भाऊ ऑफसेट मधे तर मी व मोठा भाऊ नव्याने स्थापित बायोफर्टिलायझरच्या कंपनीत कामाला जात होतो. मला या कंपनीत बाॅयलर चालवावा लागला. हे अत्यंत धोकादायक काम होतं. पण पर्याय नव्हता. मी ते शिकून घेतलं. माझ्या सोबत मोठा भाऊ पण ते काम करायचा पण नंतर त्याला तेथुन दुस-या युनिट मधे काम करावं लागलं. मला हे बाॅयलर चालवताना खुप वाईट वाटायचं पण मी करू तरी काय शकत होतो? अजून माझा दिवस उगवायचा होता....

         सर्व सुट्ट्याभर आमचा एकच दिनक्रम..सकाळी 6ला उठायचे आणी 7वाजता कंपनीत..रात्री 7वा. सुट्टी झाली की घरी...बस्स! आयुष्य एवढे अनुभव देत होतं की, कधी सुट्ट्यात मौज करण्याचा पुसट विचारही मनात येत नव्हता.. आम्ही सकाळी सोबत घेऊन गेलेला डबा दुपारी खायचो. तो कधी कधी खराब झालेला असायचा.पण पर्याय नव्हता. पुर्ण सुट्ट्या आम्ही गुमान काम केले. ना कुठल्या कार्यक्रमाला, ना लग्नाला, ना इतर ठिकाणी जायला भेटायचे . पण त्याचे वाईट वाटण्याचे काही कारण नव्हते...गावातल्याही कुठल्या कार्यक्रमात आमचा सहभाग अथवा उपस्थिती रहायची नाही. कधितरी मित्र गावाकडे भेटायला यायचे..सगळं पहायचे..माझ्याकडे लपवण्या सारखंही काही नसल्याने मीही आहे तसा त्यांना भेटायचो. ते आधाराचं बोलायचे. आणी परत निघायचे.मन पुन्हा भरून यायचं..वाटायचं काय हे दिवस आहेत? कधी बदलेल हे सगळं? पण काळ आपल्याच गतीनं चालत असतो. त्याला लवकर संपवता येत नाही की लांबवता येत नाही..त्याचे भोग भोगायचेच असतात. ही सुट्टीही अशीच कामात गेली..

        कंपनीतून चालत परत येताना आम्ही नि:शब्द असायचो. ते 3 कि.मी. चे अंतर फक्त आत्मसंवाद चालायचा. फक्त एक बाब होती ज्या माळरानावर मी स्वप्नबिज पेरले होते ते रस्ताभर सोबत करायचं आणी मुक्याने ओरडून ओरडून सांगायचं...विसरू नकोस तुझ्या स्वप्नांनी अजून ऊगवायला सुरूवात केली नाही. आणी मग आत्मसंवाद जास्त बोलका व्हायचा. अशा प्रत्येक संध्याकाळी मी स्वप्नांना अंगाखांद्यावर घेवून प्रवास करायचो. संध्याकाळ भारलेली असायची. जिवात कोलाहल असायचा. आत्मउन्नतीचा ध्यास हीच खरी संपत्ती आहे. हे मनावर ठसायचे. मी रंगीत संध्याकाळ सांजावताना पाहत असायचो...आणी गावच्या माळरानावरून दिसणा-या लातुरच्या दिव्याच्या ठिपक्यात मला माझे स्वप्न प्रकाशमान होताना दिसायचे...

       बारावीचा निकाल लागला. चांगले मार्क मिळाले. आणी ठरलेल्या पध्दतीने घरी सल्ले द्यायला अनेक हितचिंतक येवून गेले. बहुतांश लोकांनी डि एड करण्याचा सल्ला दिला. पण माझ्या मनात एमपीएससी करण्याचा मनसुबा दृढ झाला होता. मी मला कुठेच गुंतवणार नव्हतो. सर्वांनी परिस्थितीचा विचार करून डिएड चा सल्ला दिला होता. पण मला परिस्थितीला शरण जायचे नव्हते. मला तिच्यावर मात करण्यासाठी झगडायचे होते. मला आता मीही थांबवणार नव्हतो...सरते शेवटी मी डिएड न करण्याचा निर्णय घेतला, वर्गातल्या सर्व हुशार मुलांनी चांगले मार्क्स घेतले व ते डिएडला गेले. मी मात्र कुठल्या उत्साहाने पुढील तिन वर्ष काढणार होतो काय माहीत? एक अनिश्चिततेची पोकळी होती. मी चालायला सुरूवात केली होती. सर्व हुशार मित्र डिएडला गेल्याने थोडीशी पोकळी वाटत होती...पण ती पोकळी मी स्वप्नानी भरून टाकली होती. एक अवघड दिशेने मी पाऊल टाकले होते. ज्या निर्धाराने मी घरच्या लोकांना डिएड करणार नाही म्हणून सांगीतले होते तो निर्धार मी कोठून आणला होता मलाच आज आश्चर्य वाटते. कशाच्या भरवशावर मी हा डाव मांडला होता माहित नव्हते. कसा, कधी मी एमपीएससी पास होणार होतो याची सुतराम कल्पना नव्हती पण एक मात्र नक्की माहित होते ... मी एमपीएससी पास होणारच होतो....!!!!! मला स्वप्नांनी अक्षरशः झपाटले होते.....!!!!!!! (क्रमशः)

-प्रताप -

1 comment:

  1. Ded न करण्याचा त्यावेळी घेतलेला निर्णय खूप धाडसी होता. आज मला हे वाचताना माझे12 वि नंतर चे दिवस आठवतात दुसऱ्यांच्या सल्ल्याने किंबहुना माझ्या स्वतःच्या त्यावेळेच्या अल्प ज्ञानाने मी ded गेलो व जो माझा track होता त्यावरून असा घसरलो की आजवर परत येऊ शकलो नाही.तुमचा जीवनप्रवास वाचताना मी माझ्या भूतकाळात डोकावून जेव्हा बघतो तर एक प्रकर्षांने जाणवत मी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी परिस्तिथी समोर घाबरलो.निर्णय क्षमता आयुष्यात खूप महत्त्वाची असते ती वेळ-काळ यासाठी कधी थांबत नाही ये आयुष्याने आजतागायत दिलेली खूप मोठी शिकवण आहे मला तर....

    ReplyDelete

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...