Monday, February 24, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 21: मुलाखत....(1)


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 21: मुलाखत....(1)

मुलाखतीची तयारी!! एक खेड्यातून आलेला, जिल्हा परिषद शाळेत शिकलेला अत्यंत विवंचना असुनही अधिकारी बनण्याचं माझं स्वप्न! अक्षरशः मलाच माझी किव यायची काय करणार होतो मी जर या टप्प्यावर आलो नसतो, मुख्यपरिक्षा नापास झालो असतो तर....खाडकन डोळे उघडले! ट्रॅव्हल्स पुण्याकडे धावत होती.मी एकटक अंधाराकडे पाहत माझी कथा आठवत होतो..गावाकडे आई वडील अर्ध पडक्या घरात आहेत, दोन्ही भाऊ लातुरच्या मध्यभागी पण जुन्या वाॅशिंग सेंटरचा भाग असलेल्या माती पत्र्याच्या खोलीत झोपले आहेत.सकाळी आलेला डब्बाच त्यांनी रात्री खाल्ला असेल..एका लहान परिघात जगणारे माझे कुटुंब आणी त्यात माझ्या मनाला हे विशाल होण्यासाठीचे लागलेले डोहाळे...कुठलाच शिधा नसताना अनंत अवकाशाकडे चालत निघावे..आणी मी परतेलच खजिन्यासह हा विश्वास घेवून माझ्या घरच्यांनी निर्धास्त रहावे...कशी जिद्द पेटणार नाही, कसे बाहू फुरफुरणार नाहीत, का मस्तक टक्कर द्यायला सज्ज होणार नाही? पुण्याला निघायच्या अगोदर स्वतःकडील साठवून ठेवलेला पैसा सोबत होता त्यासह अगोदर गावी जाऊन आई वडिलांना भेटलो होतो.खुप दिवसानंतर घरी बसुन आम्ही सगळे बोललो होतो..अंतःकरणात खुप काही पण एकमेकाला आधार मिळेल अशा शब्दांची पेरण करत वडील बोलत होते..त्यांना कोठून विश्वास होता माहित नाही? अक्षरशः अन्नान्न दशा पण ते बोलायचे मात्र जिगरीचे!! बाबा! या वेळी सलेक्शन होईल असाच इंटरव्ह्यु द्यायचा, आपलं सलेक्शन तर होणारं!! पण नाहीच झालं तर घाबरायचं नाही, नाराज व्हायचं नाही, हिमतीनं करत रहायचा अभ्यास! बंडाळ काय आपल्या जन्माची आहे , काढू कसे तर दिवस!! माझ्या मनात विश्वास आहे तुम्ही होणारच!!! अर्थात स्वतःच्या मुलांना अहोजाहो करत बोलण्याची त्यांची संस्कार शैली!! ते जेंव्हा आत्मविश्वास द्यायचे , टक्कर द्यायचे बोलायचे तेंव्हा भाकरी थापत थापत आई बोलायची, बस करा आता ! जेउ द्या लेकराला अगोदर!! तीला हे एवढं मोठ्ठं स्वप्न खरं तर वाटायचं पण तीला विश्वासयुक्त भिती असायची, आणी तिला अजब वाटायचं एवढासा हा पोरगा काय करायला निघाला आहे, तिला कळायचं मी खुप डोक्यात घेवून हे सगळं करत आहे,पण तिला भितीही वाटत रहायची ह्याला नाही झेपलं तर....ती या भितीनं विषय बदलण्याचा प्रयत्न करायची,तब्येत खुप खराब झाली म्हणून डोळ्यात आलेलं पाणी पुसायची..मी वडीलांचा आग्रही आत्मविश्वास आणी आईचा दबका आशावाद यातुन मार्ग काढायचो...
रात्रीच्या अंधारात लख्ख भुतकाळ आठवत होता..तो पाऊस,तो चिखल,एकवेळचं जेवण, पुस्तक वह्या भेटत नाहीत म्हणून कुढणं, आपल्या सारख्याच फाटक्या मित्रांत आशावादी बोलणं, त्यांनाही सोबत अभ्यास करा म्हणनं...किती बदल,किती धाडंस...पण एक विश्वास होता काही होवो हे सिध्द करून दाखवायचंच!!! मन पेट घेत होतं..खिशातली छोटी डायरी काढून मुलाखतीचे मुद्दे आठवत बसलो..पहाटे पुणे आलं ...मित्र घ्यायला आला गळ्यात पडला,गहिवरून बोलला आलास भावा!चल आज माॅल मधे जायचंय आपल्याला. सगळ्यात वेगळा ड्रेस आपल्या डोक्यात आहे..तु बघत रहा..तो बडबड करत होता मी हसत होतो...कित्ती लोकांना माझ्या ध्यासानं वेडावलं होतं......

आयुष्यात पहिल्यांदा माॅल मधे गेलो..चांगले दोन ड्रेस, आणी आठवणीनं न भेटलेला शुज आणी इतर साहित्य घेतलं..दिवसभर इंटरव्ह्युची तयारी यावर बडबडत तिथल्या मित्रासोबत फिरलो...आणी लगेच रात्री परत निघालो...हे सगळं लातुरात ही करता आलं असतं पण पुण्यात मित्र आठवण करत असल्याने व त्यांचा उत्साह टाळता न येण्याजोगा असल्याने जावं लागलं...शेवटी ते हिंमत देत होते म्हणून तर मी इथपर्यंत पोहचलो होतो...आणी ते ही माझ्या वेडातुन हिंमत बांधून घेत होते स्वतःची......

परत आलो, जोमाने तयारीला लागलो, आम्ही सगळे मिळून तयारी करत होतो.एकमेकांना एकमेकांच्या उणीवा दाखवून देत होतो,त्या कशा दुरूस्त करता येतील त्याही सांगत होतो.ना कुठला क्लास ना कुठले मार्गदर्शन तरीही एका सुरात,लयीत तयारी सुरू होती,आत्मविश्वास म्हणायचा तर काळजात किंचीतही थरकाप नाही सरळ आभाळाला भिडण्याची तयारीच जणु...स्वतःच्या,घरच्यांच्या,मित्रांच्या आणी आम्हाला पाहून MPSC करायला सुरूवात केलेल्या नविन मुलामुलींच्या किती अपेक्षा होत्या...आमच्यावर..मनात कायम एक दिवा पेटलेला असायचा..ध्यासाचा नंदादीप जणु! मुलाखतीचा दिवस जवळ येत होता. ठरले की चार दिवस अगोदरच औरंगाबादला जायचे,तेथे रूळायला मदत होईल.. शेड्युल मिळाले...माझा इंटरव्ह्यु अगदी सुरूवातीच्या काळात होता,नंतर दिनेश झांपले, आणी शेवटी शेवटी विजय कबाडे.
माझा इंटरव्ह्यु होता तरी सगळेजण निघायचे ठरले..(आधार देणे काय असते ते येथून समजत होते) पण निव्वळ एक रात्री राहता येईल एवढीच माझी तयारी होती..माफक पैसे होते.मी बोलणार कसा? (पण न सांगता ओळखणार नाहीत ते मित्र कसले? आणी तेही कळलंय त्यांना हे न दाखवता!!! ) विजयराव यांनी डिक्लेअर केले"आपले औरंगाबादला घर आहे तेथे कोणीच राहत नाही आपण सगळे तेथेच थांबू" नियती की नियत? कदाचित त्याही पलीकडचे विशाल -हदय माझ्या मित्राकडे होते..तरीही संदिप अगदी शिव्या घालत गुपचूप विचारणार'पैसे लागणार आहेत का बे?" , तांदळेसर बाजुला घेवून बोलणार"प्रतापराव अडचण असेल तर सांगा बरं!" इंद्रजित न सांगता मदतीला हजर, गज्या तर काहीच संबंध नसताना MPSC चा माझ्या सोबत केस एवढे काप, असा थांब तसे बस.....हे सांगणार...मदतीच्या किती हाताची मोजदाद करावी?
जे मुलंमली परिस्थिती गरीब आहे हे कारण देतात त्यांना एकच सांगणे...तुम्ही फक्त निघा...थांबू नका..नियती अनेक रूपे घेवून सज्ज असते मदतीला...घाबरू नका परिस्थिती वाईट असल्यावरच ती चांगली करण्याची संधी आपल्याला मिळते...!!

घरी जाऊन आई वडिलांना भेटलो, भावांचा निरोप घेवून औरंगाबादला निघालो..मुख्य परिक्षेलाच ईथे आलो त्या नंतर आत्ताच..विजुच्या घरी पोहचलो..मुलाखतीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली होती..फक्त एकदाच सुभेदार गेस्टहाऊसला जाऊन मुलाखतीचे ठिकाण पाहून घेतले..मुलाखती देवून परत येणा-या मुलामुलींना पाहीले..काय काय विचारत आहेत म्हणून बाहेरच्या मुलामुलींचा घोळका त्यांना घेरत होता,ज्यांची मुलाखत चांगली झाली ते सांगायचे त्रोटक,ज्यांची मुलाखत चांगली झाली नाही ते गुपचुप निघून जायचे.त्यांच्या चेह-यावरील भाव स्पर्धेची क्रूरता अधोरेखित करत होते..मी सावध झालो..तडक परत येवून अभ्यासाला लागलो..कारण आतुन आवाज येत होता..हा अॅटेम्प्ट गमावणे आपल्याला परवडणारच नाही, दुस-याचा इंटरव्ह्यु कसा का जात असेल पण आपला चांगलाच झाला पाहिजे...थोडे दडपण जाणवायला लागले..प्रश्नाच्या लिंक पुन्हा पुन्हा तपासून घेवू लागलो...मनात सतत कोणते प्रश्न विचारतील?काय उत्तर द्यायचे याची उजळणी सुरू असायची दोन दिवस झाले...उद्या मुलाखत होती...मित्रांनी लवकर झोपायला सांगीतले ...खाली अंथरुण टाकून सारेच झोपलो होतो..लाईट बंद झाला आणी मला झोप काही केल्या येईना...सगळे झोपले होते..मी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो..झोप पार उडाली होती..डोळ्यासमोर उद्याची मुलाखत..घर, गाव,आईवडील, भाऊ, मित्र, त्यांचे अपेक्षायुक्त चेहरे...विचारले जावू शकणारे प्रश्न सगळा गोंधळ सुरू झाला...मला काय चालले आहे समजत नव्हते...फक्त एक माहिती होतं..माझ्या आयुष्यातला उद्याचा खुप महत्त्वाचा दिवस होता..मला तो जिंकायचा होता..मला खरंच हे सारं गमावणं परवडणार नव्हतं...जर मुलाखत चांगली नाही झाली तर मी काय करेन....??? उत्तरच सापडेना...मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो..सारे विचार सारून उद्या हे विचारले तर असे उत्तर द्यायचे..ते विचारले तर तसे....मी अक्षरशः आयुष्यभराचा झगडा झगडत होतो जणू....कधी तरी रात्री तिन वाजता वगैरे झोप लागली ..सकाळी लवकर उठलो..थोडा थकवा जाणवला..पण भावनांचा बहर रात्रीच विरून गेला होता...त्यामुळे मी माझ्या मुळ भुमीकेत परत आलो...मी खुणगाठ बांधूनच उठलो...आणी डिक्लेअर करून टाकले..ग्रुप मधला माझाच इंटरव्ह्यु पहिला आहे...तो भारी देणार...सर्वांनी साथ दिली चिअरअप केले...मी तयार होवून निघालो...ठरवले ढासळायचे नाही...

सुभेदार गेस्टहाऊसला पोहचलो..वारंवार सर्व बाबी तपासून घेतल्या असल्याने आत्मविश्वास होताच,सोबत सारेच मित्र होते...पाहीले सेंटरवर मीच वेगळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे...स्वतःचे वेगळेपण एक नवा आत्मविश्वास देवून गेले..आत जाण्याची वेळ आली, सर्व मित्रांनी शुभेच्छा दिल्या...मी एक दीर्घ श्वास घेतला आणि निघालो..आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचे चिज करण्याचा हा दिवस होता. गेट मधे शिपाई काकांनी अडवले..विचारले.. सांगीतले..इंटरव्ह्यु आहे..कौतुक भरल्या नजरेने त्यांनी आत सोडले...(माझ्या बॅच मधला सर्वात लहान वयाचा मीच आहे..बहुधा ते लहानपण त्यांना नवलाचे वाटले) आत गेलो, कागदपत्रे तपासून घेत होते. बिए झाल्यावर पदवीदान समारंभ व्हायच्या अगोदरच मेन्सचा फाॅर्म भरला होता त्यावेळी डिग्री भेटली नव्हती पण मुलाखती अगोदर ती सादर करण्यास सांगितले ती दिल्यास परवानगी मिळाली मी हाॅल मधे बसलो..हाल मधे सिनियर मुले दिसत होते....मी निरखु लागलो..सगळे नविनच होते मला...पहिल्यांदाच सगळे पाहत होतो...एक सिनियरने विचारले" कितवा अॅटेम्प्ट?" मी, "पहिलाच" सांगीतले. त्यावर ते म्हणाले "मित्रा ! माझी ही चौथी मुलाखत, ट्रायल म्हणून दे या वेळची मुलाखत!" मी शांतपणे सांगीतले " हज्जार वेळा ट्रायल झालीय, ही फायनलच असणार"
ते हसले म्हणाले "भारी काॅन्फिडन्स आहे राव तुझा!, असाच ठेव मुलाखत होईपर्यंत " शुभशकून...हुरूप...आणी तरीही सावधान अवस्था! मी धन्यवाद म्हटले...माझ्या नावाचा पुकारा झाला....मला वरच्या मजल्यावर मुलाखत कक्षाबाहेर वेटिंगला बसायचे होते...आतल्या उमेदवाराची मुलाखत संपेपर्यंत....!! मी पाय-या चढताना स्वतःलाच सांगु लागलो...चांगलीच होणार आपली मुलाखत, फक्त शांत राहून द्यायची....पण आत खळबळ सुरू झाली होती...(प्रताप)
(क्रमशः)
..

No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...