स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 23: झाले मोकळे आकाश.......!!!
मुलाखत होवून गेली होती,नविन पुर्व परिक्षा आली होती तिची तयारी सुरू होती, अभ्यास वेगात सुरू होता,पण मन सतत लागलेलं असायचं ते मुलाखतीचा निकाल कधि लागेल. अभ्यासाची जुनीच पध्दत होती,सर्वांनी मिळून अभ्यास करायचा, तांदळे सर, अतुल पाटील,संदिप जाधव,अरूण पोतदार,अशोक मोहाळे,संजय औताडे सगळे जण एकत्र अभ्यासाला बसायचो,चर्चेसाठी मग दिनेश झांपले सर, विजय कबाडे हे येत असायचे..मी विजय आणी तांदळे सर शिकवायला जायचो. क्लास मधे शिकवताना अनेकजण मन लावून शिकायचे,विविध पार्श्वभूमीचे, परिस्थितीचे मुलं अभ्यास करायचे...सर्वांचा विश्वास होता आम्ही सिलेक्ट होणार! कारण तसे होणे हे त्यांना झुंजण्याचे बळ देणार होते..त्यांनी आमच्यावर लावलेल्या अपेक्षा पुर्त होणे ही त्यांचे मनोबल टिकवणार होते. खुप दबाव यायचा कसा लागेल निकाल,काय होईल, कोणती पोस्ट मिळेल की पुन्हा सारे मुळातुन करावे लागेल? दररोजचा दिवस जड जायचा,मन लागायचे नाही, सारे होते सोबत म्हणून दिवस रेटायचे बळ होते...राजेंद्र यायचा बोलून जायचा...लागेल बे! वाट बघ! सांगायचा...क्लास मधील मुले, आम्हाला फाॅलो करणारे विद्यार्थी, घरचे लोक सगळे सगळे अपेक्षा ठेवून होते....
दरम्यानच्या काळात मोठा भाऊ काही तरी धडपड करत होता, तो कलाक्षेत्रातील असल्याने त्याला स्पर्धा परिक्षा वगैरेत मन लागायचे नाही तरीही त्याला बळजबरीने क्लासला बसायला सांगायचो..तो बसायचा पण रूम वर आल्यावर तेच पेंटींग, स्कल्पचर,आर्टिस्टीक क्रिएशन यातच तो रमायचा..सतत त्याच्या डोक्यात असायचे की याच क्षेत्रात त्याला करिअर करायचे आहे. माझ्या घरच्यांना वाटायचं की त्यांनेही माझ्या सारखा अभ्यास करावा.कारण चौथी बोर्डातली त्याची कामगिरी व नवोदयच्या परिक्षेत त्याने जिल्ह्यात सिध्द केलेली त्याची गुणवत्ता, त्यामुळे त्यावेळी त्याचा गावात जिल्हा स्तरीय अधिका-या मार्फत झालेला सत्कार, 12 पर्यंत नवोदय विद्यालयात झालेले शिक्षण यामुळे घरच्यांना(अर्थात मलाही)वाटायचे हा हुशार आहे यांना पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा. खरंतर ही कुटुंबाची गरज होती जी त्याच्या इच्छेवर थोपवली जात होती.तो मला म्हणायचा' मला आर्ट क्षेत्रात करिअर करायचे आहे,मलाही वाटायचं पण पर्याय नव्हता...तो निमूट क्लास मधे येवून बसायचा.त्याचे त्याच क्षेत्रातील मित्र त्याला भेटायचे..या छंदासाठी त्यांना बिए नंतर एटिडी या कोर्सला अॅडमीशन घेतले होते. व ती पदविका मिळवली होती.कंपनीत काम करणे,पेजर ऑफिसमधे काम करणे, कला क्षेत्रातील दुकानावर सहाय्यक म्हणून काम करणे,गणेशोत्सव व इतर प्रसंगी डिझाईनचे मखर बनवून विकणे,त्यातुन त्याने आपला संघर्ष आणी आवड जतन करून ठेवली होती. असेच एके दिवशी त्याचा मित्र शरद पुणे आला त्याने सांगितले "राहूल,केंद्रीय विद्यालयाच्या आर्ट टिचर च्या जागा निघाल्या आहेत, खुप कमी जागा आहेत आमच्या कॅटेगरीला जागा नाहीत, मी फार्म घेतला आहे तु भर" त्याने तो फार्म दिला,भैय्याने घेतला, पाहिले , दोनच जागा आहेत, तरी किमान आर्ट टिचर च्या जागा आहेत हीच त्याच्यासाठी अभिप्रेरणा होती...त्याने तो फार्म भरला..कसा अभ्यास करायचा याचे डिस्कशन व्हायचे,कशाचा अभ्यास करायचा हे त्याला माहीत होते,MPSC च्या क्लास मधे बसून त्याला ब-यापैकी जनरल स्टडीज माहिती होते. सिरीयस होवून त्याने अभ्यास केला...त्याची परिक्षा मुंबईला होती.मित्रांकडून उसने घेवून,काही त्याचे काही माझे असे पैसे जमा करून तो परीक्षेला गेला...परिक्षा झाली...
आमची दुसरी पुर्व परिक्षा झाली...आता फक्त प्रतिक्षा..मुलाखत दिलेल्या निकालाची,झालेल्या पुर्व परीक्षेच्या निकालाची, सोबतच राहुल भैय्याने दिलेल्या दिलेल्या परीक्षेची ..हा काळ कसा होता वर्णनच करू शकत नाही..दरम्यानच्या काळात PSI परीक्षेचा निकाल आला लातुर मधून खुप चांगले निकाल आले,जेथे शिकवत होतो तिथल्या क्लासचे निकाल तर आलेच पण आमच्या ग्रूप मधून रोहिणी पोतदार(अरूण पोतदार यांची बहीण) ही प्रथम प्रयत्नातच PSI झाली. लातुरभर आनंद पसरला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यासाठी मनोबल वाढेल अशी पहिली भरिव घटना!! खुप चांगले लक्षण असलेली ही घटना होती. दरम्यानच्या काळात राहूल माकणीकर सर(मुळचे लातुरकर, सध्या DCP नागपूर तत्कालीन STI परीक्षेतील महाराष्ट्राची दंतकथा, पुणे ज्ञान प्रबोधिनीत व सबंध महाराष्ट्रात ज्यांनी कित्यकांना शिकवले होते,शिकवत होते), यजुवेंद्र महाजन सर(दिपस्तंभ क्लासेस), रंजन कोळंबे सर असे किती तरी दिग्गज लातुर मधे शिकवायला यायचे. मुलांना शिकवायचे.तेथील मुलांची तयारी पाहून खुश व्हायचे. कोण शिकवतात तुम्हाला म्हणून लातुरात शिकवणा-या आम्हा सर्वांचे कौतुक करायचे. प्रचंड आत्मविश्वास वाढला, कधी कधी अशा दिग्गजांचे व आमचे हाफ हाफ डे सेशन व्हायचे, मी,राजेंद्र ढाकणे,तांदळे सर, विजय कबाडे, अरूण पोतदार असे सारे शिकवायला जायचो, त्याच काळात प्रकाश कुलकर्णी सर( सध्या सहाय्यक आयुक्त विक्रीकर ज्यांनी 2002 च्या अॅटेम्प्ट ला डेप्युटी कलेक्टर रॅकचे मार्क्स घेवूनही त्या जाहिरातीत निव्वळ 78 च पोस्ट असल्याने DY SLR हे सिलेक्शन मिळवले होते), धन्वंतकुमार माळी सर(DY CEO सध्या बिड जिल्हा परिषद- वारंवार अपयश येवूनही,सात्याने प्रयत्न करून ज्यांनी महाराष्ट्रात तिसरे येण्याचा बहुमान मिळवला,व ज्यांची शाळा पहायला जिल्हा स्तरीय अधिकारीही उत्सुक असायचे असे आदर्श शिक्षक), त्यांचे मित्र भांबरे सर(जि.प. शिक्षक), महेश वरूडकर सर ( सध्या अवर सचिव), जुना सहकारी अतुल कुलकर्णी (सध्या कक्ष अधिकारी), सुधीर पोतदार सर( ज्ञान प्रबोधिनी लातुर चे संचालक), दयानंद सोमवंशी सर( सोहम क्लासेस चे संचालक), विद्याधर कांदे सर ( फिनिक्स अॅकेडेमीचे संचालक) व ईतर असे सारे जण शिकवत होतो. अख्खं लातुर जिव तोडून शिकत होतं आम्हीही जिव तोडून शिकवत होतो( आमच्या मुळे असा माझा तरी बिल्कुल दावा नाही मुलामुलींच्या स्वतःच्या प्रयत्नानेच पण त्याकाळात व नंतर लातुर मधून खुप सारे सिलेक्शन झाले त्यात थोडेफार योगदान मीही देवू शकलो हे अत्यंत समाधान.)
त्या दरम्यान राहूल भैय्याचा निकाल आला, तो मुलाखतीला पात्र झाला होता. खुप आनंद झाला एवढ्या कमी जागा असतानाही तो पास झाला होता.त्याचा इंटरव्ह्यु दिल्लीला होता.त्याच्या इंटरव्ह्युची खुप चांगली तयारी करून घेतली.त्यानेही ती खुप मन लावून केली. सा-या त्याच्या मित्रांनाही आनंद झाला होता. त्याची खुप चांगली तयारी झाल्याने तो दिल्लीला जाऊन मुलाखत देवून आला. त्याची मुलाखत चांगली झाली. त्याने केलेली तयारी, त्याच्या सोबत झालेली चर्चा या सर्वांच्या आधारेच मुलाखत झाली. काही प्रश्न चर्चेतलेच आले, अचानक आम्ही दोघेही मुलाखत स्तरापर्यंत पोहचलो होतो. घरात तर खुपच आनंदाचे वातावरण होते. पण ते व्यक्त करण्याची एक मर्यादा होती, कारण तो काय, मी काय आम्हा दोघांचेही फायनल निकाल लागलेले नव्हते,घरच्यांना आशा होत्या पण अव्यक्त! कारण निकाल नकारात्मक लागला तर?? खुप मोठा अपेक्षाभंग झाला असता. आमच्या निकालाच्या कल्पनेने आई वडील ही थोडेसे चिंतायुक्त होते पण तसे ते दाखवायचे नाहीत. काय करणार त्यांना आमचा अभ्यास, तयारी याची चर्चा करण्यासाठी कोणी नसायचे, आणी जे करू शकतील अशा लोकांकडून त्यांना तशी संधी मिळायची नाही. गरीबांची स्वप्नेही दबकी असतात....निमूट पहायची..वास्तवात आली तर डंकाच!!! पण नाही आली तर दबके दुःख....आणी उपहास...इज्जतीला जपणारे माझे आईवडील कोणी उपहास करू शकणार नाहीत एवढ्याच मर्यादेत व्यक्त व्हायचे..त्यांना खात्री होती काही तरी नक्कीच चांगले होईल पण ते व्यक्त करू शकत नव्हते...तसेच आमचेही!! पण तरीही हे माझे माझ्या मर्यादे विरूध्द पुकारलेले बंड होते..जे मला जिंकायचेच होते..मी करणार नव्हतो...जिथे कल्पनाही होवू शकत नव्हती अशा ठिकाणी मी स्वप्न पाहीले होते...आणी निव्वळ ते पाहून मी थांबलो नव्हतो तर जिवाच्या आकांताने, जवळपास काहीच सामुग्री नसण्याची अवस्था असतानाही मी या टप्प्यावर आलो होतो...मी हरणार नव्हतो. मी सुरूवातच जिंकण्यासाठी व मर्यादा लांघण्यासाठी केली होती...मुळात राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची हे ठरवणेच मुळात एक मर्यादा तोडणे होते....आणी मी तर आता एवढ्या दुर आलो होतो...आता थांबणे नव्हतेच!!!
दरम्यानच्या काळात निलराज बनसोडे(जलसंपदा विभाग),आलोक चिंचोलकर( तलाठी), किशोर गवळी, हे पण कालेजचे क्लासमेट व अत्यंत जिवाभावाचे मित्र अभ्यासाला बसू लागले, काही मित्रांचे लहान भाऊ, काॅलेजचे सिनीयर, ज्युनिअर, गावातले मित्र हे ही क्लासला येवू लागले, त्यांना शिकवत होतो, योगदान देण्याचा प्रयत्न सुरू होता. एक काळ होता की सा-या लातुरला वाटायचे हा मूर्खपणा आहे की लातुर मधे राहून MPSC करणे..पण आता तेथेच खुपजण अभ्यास करू लागले, दरम्यानच्या काळात लातुर SP ऑफिसची लायब्रेरी व स्टडीरूम बंद झाल्याने आम्ही लातुरच्या नगरपरिषदेच्या वाचनालयात ही (टाउन हाॅल) अभ्यास करून दुसरी पुर्व परिक्षा दिली होती.
लातुरात चिकनगुनियाची साथ आली होती, ग्रामीण भागात त्याने थैमान घातले होते. त्यात आईला त्या आजाराने ग्रासले. ती खुप आजारी पडली, त्या आजारात व्यक्तीला सांध्याचा त्रास होतो,धड उठता बसताही येत नाही ती झोपून रहायची,वडील घरकाम करायचे, तीला दवाखान्यात नेवून आणले पण तरीही ती आजारीच होती. पहायला गेलो..घर पडके असेल तरी चालते पण माणसे पडलेली नसावीत..पण आई आजारी होती.घरी थांबायला लागु नये आम्हालाही ती लगेच जायला सांगायची, वडील ही थांबू देत नव्हते. खुप निराशा येवू लागली.निकाल नाही, कसं होणार याची कायम टांगती तलवार..मी आणि मोठा भाऊ दोघेही खुप परेशान होतो...कसा तरी स्वयंपाक करायचा, खायचा, अभ्यास..पुर्व परिक्षा होवून गेल्याने क्लासेस ही नाहीत...काहीतरी खटाटोप करावी म्हटले तर अभ्यास सुटेल वाटायचे..खिशात गेल्या 7 दिवसापासुन फक्त तिन रूपये शिल्लक होते..वावड्या उठत होत्या निकाल लागणार आहे, लवकरच लागेल...रूम बदलली..फक्त ठिकाण..पण तशीच पत्र्याची.. अगोदरच्या पेक्षा स्वस्त...जेथे पोटासाठी आलेले परराज्यातील मजूर मुलेही आमच्यापेक्षा चांगल्या रूममधे राहत त्या गल्लीत...आणी तिचेही चार महिन्याचे भाडे थकलेले...
एके दिवशी असाच बरिश्तावर गेलो, त्या दिवशीही निकाल लागेल अशी चर्चा होती..रहिमभाई हाॅटेलवर होते..काही असो पण कोणाला उधार मिळो की न मिळो हिमायतभाई व रहिमभाई मला हमखास उधार द्यायचे..कदाचित माझ्याकडे भेटायला येणारे एक तर खुप जण होते. त्यामुळे त्यांचे हाॅटेल खुप चालायचे..आणी आम्ही सारे चर्चेसाठी व व्हिजीटर्सला भेटायलाही तेथेच बोलवायचो त्यामुळे पुर्ण लातुरात बरिश्ता खुप फेमस झाले होते. आणी या दोन्ही भावांना माझी परिस्थिती व स्थिती दोन्ही माहिती होती.त्यामुळे ते मला खुप प्रेमाने, आदराने व अभिमानाने वागवायचे..मीही झालेली उधारी मी अत्यंत नियमीत द्यायचो.मुलं भेटायला यायचे, मित्र भेटायला यायचे त्यामुळे MPSC करायचीय का? बरिश्तावर जा! असा सल्ला नविन लोकांना मिळायचा.माझा अभ्यास आणी बरिश्ता जवळपास एकदाच सुरूवात झाली... होती.. .गेलो..बसलो..एकटाच होतो..खुपवेळ एकटाच बसलो.सगळेजण येणार होते... वाट पाहत होतो..तेवढ्यात काॅलेजचा एक जुना क्लासमेट खुप दिवसानंतर भेटला, एका संस्थेवर शिक्षक होता, सोबत गावातले प्रतिष्ठित लोक होते. SP office मधे काम असल्याने तो तेथे आला होता, त्याने विचारपूस केली, सोबतच्या लोकांशी ओळख करून दिली..आणि सोबतच त्यांना सांगीतले " हा खुप हुशार पण मुर्ख ठरलेला माझा जिगरी दोस्त ! त्याचवेळी 12 वी झाल्यास याला म्हटले होते डी एड कर पण केले नाही. MPSC करत बसला, आज बघ मी, शेतात बोअर केला, चांगले उत्पन्न होते, नोकरी आहे. तु ही सेटल झाला असतास आत्तापर्यंत, ते MPSC करायला ईथुन होत नाही बाबा,ते आपलं काम असत नाही, आपण खेड्यातले लोक आहोत, हातानं खराबा करून घेतलास" तो खुप तळमळीने बोलत होता त्याला फक्त आपला मित्र गरीब कुटुंबातला आहे, डी एड ला नंबर लागत असुनही गेला नाही, आणी आता बेकार बसला आहे याचे वाईट वाटत होते. तो खुप वेळ बोलला..आणी आत निघून गेला.सोबतचे 2/3 जण तिथेच बाजुला बसुन राहिले.त्यांनाही माझी किव येत होती. ते अधुन मधुन माझ्याकडे पाहत होते...त्याची तळमळ पाहून मी त्याला काही बोललो नव्हतो..
थोड्या वेळाने सारे मित्र जमा झाले...विजय, दिनेश,राजेंद्र, संदिप तर तांदळे सर, अतुल पाटील,अशोक मोहाळे हे सगळे जण आपल्या काॅलेजला गेले होते. आज नक्कीच निकाल लागणार आहे यावर चर्चा सुरू होती, राजेंद्र फोन करून तिकडे पुण्यात कोणाला तरी बोलला...आणी म्हणाला..निकाल आहे बे आज तुमचा!! अचानक वातावरणात टेन्शन वाढले..विजय ने पण कन्फर्म केले..खात्री पटली आज निकाल आहे...वातावरण खुप तणावपूर्ण झाले होते..मी सगळ्यात असून नसल्या सारखा झालो होतो..प्रत्यकाची अवस्था तणावाची होती. संजय औताडे पण आले..याच चर्चा दर 10 मिनिटाला बघा रे, कन्फर्म करा! लागेल यार आज निकाल, काय होतंय माहिती नाही ! लागला पाहिजे रे, सिलेक्शन व्हायला पाहिजे नाही तर काही खरं नाही!!! वातावरण एकदम गरम, सुन्न, अस्थिर....तगमग तगमग नुसती...वेड्यासारखी चुळबुळ...परेशान...दबाव वाढलेला..निकाल मुंबईत लागणार, सुट्टीचा दिवस, कलेक्टर ऑफिसला फॅक्स येईल पण वर्किंग डे उजडे पर्यंत काही खरे नाही...कसा समजेल तो लागला तर..?? चिंता निव्वळ चिंता..कोणीतरी तो सांगेल म्हणून सतत इकडे तिकडे संपर्क सुरू..आणी अचानक ...
सुधिर पोतदार सरांचा फोन आला..निकाल लागला!!!! धस्स!!
अरे विचारा कोणाकोणाचे सिलेक्शन झाले?
सध्या लागला एवढीच माहीती मिळाली आहे, प्रबोधिनीत विचारत आहे..
जिव कासाविस होत होता
थोड्यावेळाने समजले
........राहुल माकणीकर -Dysp
..........महेश वरूडकर- DO
आमचा निकाल काही समजेना...राजेंद्रने त्याच्या मुंबईच्या कुठल्या तरी मित्रांला फोन लावला.....".जा..कुठलीही लोकल पकड..तु जवळच राहतोस.. MPSC ऑफिसमधे जाऊन ही नावे यादीत पहा...निघ लवकर...."
त्याचा मित्र निघाला....इकडे आम्ही राजाला दरम्यानच्या काळात अक्षरशः भंडावून सोडले..बघ रे पोहचला का? इतका वेळ लागतो का?....पोहचला असेल ना...काय माणुस आहे यार...राजा परेशान...तो मग आमचा भडिमार पाहून..इकडे तिकडे..जात होता..बोलत होता...आम्ही भांबावून दमून गेलो..इतक्यांदा विचारले होते त्याला की....आता काही का येईना रिझल्ट शांत रहा म्हणून संदिप ओरडला...येईल रे सगळंयाचा निकाल अभ्यास काही कमी होता का आपला....(अरे भाऊ तु सोड ते! मित्र पोहचला का बघ राजाचा...) शेवटी थकून बसलो...राजू बाजुला गेला होता...तो खाली मान घालून आला...(संदिप उगीच त्याला ग्यानी म्हणत नाही) चेहरा गंभीर...माझ्या काळजात धस्स!! विजय परेशान ...
यार ! तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी नाहीत! क्षणात आभाळ फाटले...सुन्न.....काळीजच हलले....
आणी थोडं थांबून ओरडत म्हणाला," पण सगळे यादीत आहात बे तुम्ही........."
अर्थ लागायला क्षणभर उशिर लागला...
आणी अचानक उलगडा झाला..आपले सिलेक्शन झाले!!!!!! आपण यादीत आहोत
कल्लोळ, जल्लोष, गळाभेटी...अश्रु..हसू...सिलेक्शन झालेले परिक्षा न दिलेले...सारेच एकरूप..सारेच चिंब........
आनंद गगनात मावत नव्हता...दुःख होतेच हवे ते मिळाले नाही पण आवडीचे डिपार्टमेंटची पोस्ट मिळाली हेच समाधान....
धावत PCO कडे गेलो..गावात बाजुच्या मामाच्या घरात फोन होता..त्यावर काॅल केला..
मामाच्या मुलाने फोन उचलला
हॅलो, नितीन
अरे पिताजीला बोलंव...
थांबा बोलवतो...फोन प्रतिक्षेत, काॅइन संपला, दुसरा टाकला....मागे गोंधळ, जल्लोष सुरू होता...दुसरा काॅइन डयुरेशन संपला...टेन्शन शेवटचा काॅइन टाकला...आणी लगेच आवाज आला.."हॅलो! बोला बाबा काय म्हणता?"
आवाज कापतोय, गळा भरून आलाय," पिताजी! निकाल लागला"
तिकडून," काय मिळाले?"(किती आत्मविश्वास! कित्ती आस! काय म्हणायचं या जिगर ला?)
"नायब तहसीलदार!"
शाब्बास! बेटा,घरी या! आईला सांगतो!..गळा दाटलेला आवाज, आणी इकडे गालावर कोसळणारे अश्रु!!
(त्याच धुंदीत STD वाल्या कडून मी चौथा काॅइन घेतला आणि अजुन एक काॅल केला...तो काॅल एवढाच महत्वाचा होता...! ना त्यांनी पैसे मागितले ना मला द्यायचे भान..मागे थांबलेल्या मित्राने ते दिले)
तो पर्यंत रहिमभाईने शिवाजी चौकातुन बुके आणले होते! आयुष्यातला पहिला सन्मान!
पाॅलिटेक्नीक काॅलेज मधून मिठाईसह मित्र आले..दोन्ही भाऊ आले...नि:शब्द गळाभेट ..अंतरीचा उमाळा संयमी शांत..
सर्वांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ओल्या डोळ्यांनी शुभेच्छा दिल्या...तेवढ्या गडबडीतही..माझ्या आत गेलेल्या शिक्षक मित्रांसोबत आलेल्या लोकांना मी मिठाई दिली...त्यांना धक्का बसला होता..मी त्यांना माझ्या मित्राला निरोप द्यायची विनंती केली...आणी निघालो....ज्या चिखलाने मला दान दिले होते फुलण्याचे.. ज्या पडक्या घरात मी पडझड न होणारे स्वप्न उभारले होते..ज्या गावात माझ्या स्वप्नासाठी माझ्या आईवडीलांची परवड झाली होती, अनंत स्वप्ने जिथे त्यांनी जपली होती...पावसाळ्यात जे घर सतत पाणी चिखलात असायचं त्या घरातल्या या मोसमाच्या चिखलाला आलिंगन द्यायला मी निघालो...सोबत मित्रांचा लोंढा...त्यांना कोण आनंद मला जेवढा..त्याही पेक्षा जास्त त्यांना.सगळे दोस्तवेडे......!!
ते माझ्या आईवडीलांचा आनंद पहायला माझ्या अगोदर तयार!!
गावात पोहचलो....आई ताडकन उठून चुल पेटवत होती...ती खरंतर नि:शब्द झाली होती..वडील 10 वेळा रस्ता तपासत होते
गल्लीत वळलो...घरासमोर गर्दीच गर्दी...पावसाच्या पाण्याने वेढणारे घर गावच्या लोकांनी वेढले होते...दारात ओल्या जागेवर.. एक चटई टाकलेली होती...मी अभ्यास करतो म्हणून कधी तरी घेतलेली..एक जुनी लोखंडी खुर्ची ठेवली होती..
घर डोळ्यातल्या पाण्याने ओले दिसत होते...मी आईवडीलांच्या चिखल लागल्या पायावर डोकं टेकवत होतो...कोरडा..ठाम हात ओले डोळे पुसत पाठीवर पडत होता...आजारातुन नुकतीच बरी झालेली आई माझ्या चेह-यावरून हात फिरवत होती, कानशिलावर बोटे मोडून दृष्ट काढत होती...मी ओल्या डोळ्यांने हसता चिखल पाहत होतो....कित्येक पदर डोळ्याला लागत होते...किती तरी ओल्या नजरा हा नजारा पाहत होत्या...माझं फुललं माळरान माझी वाट पाहत होतं...... (प्रताप)
(क्रमशः)
No comments:
Post a Comment