Sunday, August 11, 2019

बेभान पावसा...लक्षात ठेव...!!

(• महाराष्ट्रात आलेल्या महापुराशी भिडलेल्या सर्व झुंजारूना समर्पित•)
.
आम्ही केली तुझी आर्जवे
नांगरून ठेवली होती शेती
पावश्या करवी पुकारून तुला
रापवून ठेवली माती

हिरवे स्वप्न पाहताना
तु मात्र पेरून गेलास गाळ
शिवारासह कोलमडले घर
वाहीला रानोमाळ

घर बुडाले सारे
गुरे गेली वाहून
सुन्न झाली मती
तुझे तांडव पाहून

तु फिरलास सगळा गाव
अडगळीतही आमच्या आलास
कळसावर चढून ऊंच तु
मंदिर धुवून गेलास

तुला शाळेतही यावेसे वाटले
तु वर्गात बसलास ठाण मांडून
'ये रे,ये रे पावसा 'म्हणना-या
चिमुकल्यांशीही गेलास भांडून

नेलेस जरी तु सारे वाहून
तरी आम्ही ऊभे राहू
आमच्या झुंजीने देवू टक्कर
कोण थकते ते पाहू.

हाताला हाताचा आधार आहे
खांद्याला भिडलाय खांदा ईथे
डोळ्यात अपार घेवून आशा
गाताहोत आम्ही समर गिते

आम्ही गाळ ऊपसु
आम्ही बांधुन घेवू गावे
खोडून काढू आम्ही तुझे
मोडून पडण्याचे दावे

अशा अनंत सुल्तानी आस्मानी
आम्ही भोगल्या आहेत
तेंव्हाच "स्वराज्याच्या पताका"
महाराष्ट्रात लागल्या आहेत

आम्ही हे समर ही जिंकु
तुझ्या नजरेतही अभिमान असेल
पुढच्या मोसमात आमची माती
जेंव्हा रापुन तुझ्यासाठी हसेल...

(प्रताप वाघमारे, तहसीलदार नागपुर-● 9422642842)
●"रचनापर्व"●















1 comment:

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...