Friday, September 20, 2019

आठवणी धावून येतात....


निर्जीव लोखंडी कांबीला
एक वेल बिलगली होती
बहराच्या धुंदीत मग
फुले विलगली होती

अप्राप्य सागराच्या ओढीने
एक नदी तरसली होती
पावसाची सर मग
आभाळधुंद बरसली होती

जिवलगा भेटण्यासाठी
एक रस्ता आतुर होता
शकुनाचा कावळा मात्र
फितुर फिरत होता

फुलपाखरांचे पंख
आभाळ झाकत होते
पावसाचे थेंब त्यांचे
रंग राखत होते

माती भिजत होती
सृजन झेलत होती
बहर झडली आमराई
वा-यात झुलत होती

वासुदेवाची गाणी
मनास भिडत होती
एक कोकीळा सुर लावून
मुक कुढत होती

पावसाची सकाळ अशी
उगाच दाटून आली होती
तु नसल्याची आठवण अशी
आभाळ फाटून आली होती

दिवस सारे आता
असेच वाहून जातात
पावसाच्या सरी सवे
आठवणी धावून येतात
(प्रताप)
"रचनापर्व "
21/9/2019
prataprachana.blogspot.com



No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...