Wednesday, January 22, 2020

काहीच नव्हते.......आर्त....

शब्दांच्या आत्म्यावर मी
लिहावे एखादे अजोड काव्य
आणी दर जोडाक्षरात
पेरावे अनाम गीत श्राव्य

श्वासांनी पेरावीत शब्दे
त्याला गंध आत्म्याचा यावा
तुझ्या तगमगीने करावा
मग माझ्या कवितेचा 'धावा'

मी तुला वगळून लिहावे
तरीही तुला तुझाच भास व्हावा
माझ्या कवितेचा बाज आता
असाच 'खास' व्हावा!

शब्दांना तुझा स्पर्शही नसावा
तरी तु 'अहिल्या' व्हावे
नुसत्या या शब्द आभासाने
तुझे 'शिळापण' जावे..

कवितेच्या गाभा-यासाठी
तु तुलाच घडवून घ्यावे
या शब्द बहरासाठी तु तुझे बहर
पायदळी तुझ्याच तुडवून घ्यावे...

माझ्या शब्दधुक्याच्या ओढीने
तु लगबगून यावे
धुक्यात विरता चाफा पाहून
तु अखंड तगमगून जावे

तु दान मागावे तुझे......
माझ्या शब्दांनी तुला नाकारावे
दुर गेल्या माझ्या शब्दांना
तु आत्म्यातुन पुकारावे.....

दर शब्दाचा तु लावावा
मग नव्याने पुन्हा अर्थ
काहीच नव्हते तुझ्या धुक्याचे
या कवितेसम आर्त......

शब्दांना आता मी
आभाळी रुजवत आहे
माझ्या वाटणीच्या चांदण्यांने
सारे अवकाश सजवत आहे.

तुला मनाई नाही!!!!
तु या शब्द चांदण्यात फिरत रहा
तुझ्यासाठी नसल्या या उजेडी
एकलीच झुरत रहा.....!
(प्रताप)
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com
23/1/2020




































No comments:

Post a Comment

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...