Sunday, February 28, 2021

आणावी तुझी खुशाली....

माझे शब्दांचे सुर
मनात दाटे बासरी
रविकिरण उगवतीचे
रेंगाळती तुझ्या ओसरी

या फुलांचे गंध
तिकडे तुझ्या दुरदेशी
तुझ्या काफिल्यांच्या
प्रतिक्षेत उभ्या गाववेशी

भिंतीना सुचून जाते
तुझ्या आठवांचे शिल्प
शब्दांचे प्रहर येती
अवतरण्या काव्यकल्प

खिडकीला फुटते नजर
दुरदेशी ती भिरभिरे
नदीस उजवून देती
गर्भपाताळी झरे

हीच नदी तिकडे
सांगावा घेवून येते
दुःख कुणाचे ओले
सागर दिशेस जाते?

फुलल्या बागांचे उसासे
नदीस देती हाका
प्रवास सागरकुशीचा
चाले नदीचा मुका

चांद उगवे राती
अवकाशी रात जळते
दुःख केवड्याचे
बागेस खरेच कळते?

चांदणनक्षिचे पाणी
गवतावर अलगद सांडे
दवबिंदूच्या हृदयातून मी
मन कुणाचे मांडे?

अलवार मंद होती
नयनांच्या जळत्या मशाली 
सकाळच्या प्रहरी थव्याने
आणावी तुझी खुशाली....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
28/2/2021

Saturday, February 27, 2021

भाषाअंती समाजाच्या मरणकळा...

भाषाअंती समाजाच्या मरणकळा.....

आद्यकवी मुकुंदराज यांच्या 'विवेकसिंधू' याला मराठी भाषेतील पहीला ग्रंथ म्हटले जाते. लिखीत स्वरूपात उपलब्ध मराठी भाषेचा हा जरी पुरावा असला तरी बोली स्वरूपात मराठीचे अस्तित्व यापेक्षाही पुरातन...!! प्राकृत या स्वरूपातून अलीकडील इंग्राजळलेल्या अवस्थे पर्यंत आपल्या मराठीचा प्रवास! कोणती भाषा बोलावी?कोणत्या भाषेला प्राधान्य असावे हा वादाचा विषय आहे. पण एकाच वाक्यात सांगायचे तर " भाषा आई असते". नवजात अर्भकाला आई गर्भातुन बाहेर आल्यास जसे जगवते,तगवते तशीच भाषा आपल्याला या जगाशी जोडत असते व त्या जगात टिकवत असते. भारत हा एक भाषासमृध्द देश आहे. अनंत भाषा असणारा हा देश प्रत्येक भाषेचा तेवढाच गोडवा,तेवढेच माधुर्य!! जवळपास तिन दशकाचा अभ्यास करून भारतात पहिल्यांदा सुव्यवस्थित भाषिक सर्व्हे करून जाॅर्ज ग्रेअर्सन या व्यक्तीने 1928 मधे भारतीय भाषेची वैविध्यता निदर्शनास आणून दिली.तद्नंतर अलिकडेच हा प्रयत्न होवून भाषावीद् गणेश देवी यांनी तब्बल शतकानंतर 2010 मधे हा प्रयत्न केला... तब्बल 10 वर्ष भाषेसाठी स्थानीक सर्वेक्षण करून त्यांनी भारतात सध्या एकुण 780 भाषा असल्याचे नमूद करून, अभ्यासाअंती त्यांनी दिलेले भारतातील प्रादेशीक,बोली व मातृभाषेबाबत त्यांचे निष्कर्ष वेदनादायी आहेत...इथे दररोज एक बोलीभाषा नष्ट होते आहे अशी अवस्था आली आहे."एक बोली मरणे म्हणजे एक संस्कृती मरणे होय, एक भाषा मरणे म्हणजे हज्जारो वर्षाचा मृत्यू होणे होय" असे नमूद करून येत्या 50 वर्षात भारतातील साधारणतः 40 भाषा नष्ट होतील असा शास्त्रीय निष्कर्ष काढला आहे. त्यांनी विविध प्रकारचे 90 खंड प्रकाशित केले आहेत.
विविध भाषा या कुठल्या एका विशिष्ट भाषेतुन उगम पावल्या आहेत हा जरी प्रचलित सिध्दांत असला तरी भाषा ही जनमानसातुन, जमिनीतुन समाजात येते, ती समाजात स्थिरावते, निघालेल्या काफिल्या सोबत ती कधी लोककथा,कधी लोकगीत, कधी म्हणी, कधी वाक्प्रचार, कधी व्यवहार भाषा, कधी झानभाषा तर कधी इतर काही रूपात समाजात प्रवाही होते, स्थिरावते, विकासाला भिडते..आणी मग कालांतराने जगरहाटीच्या व्यवहारासाठी, अंधानुकरणातुन,स्वभाषा ही निम्नदर्जाची आहे या न्युनगंडातुन तर कुठली तरी एक विशिष्ट भाषा श्रेष्ठ आहे या गैरधारणेतुन किंवा राजाश्रय न मिळाल्याने आपली भाषा( जी आपल्या आई नंतर आपल्याला जगात तगवते) तीचा आपण अनादर करतो,आपली बोलीभाषा बोलल्याने आपली पार्श्वभुमी लोकात उघडी पडेल या न्युनगंडातुन आपण आपल्या भाषेला अलगद नष्ट होण्यासाठी सोडून देतो...आणी मग अगोदर लिपी नसणा-या पण प्रचंड समृद्ध असणा-या बोली लुप्त होतात आणी मग लिपी असणा-या भाषा हळुहळु क्षिण होत नष्ट होतात...
मुळात हा गैरसमज नष्ट होणे गरजेचे आहे की, अमुकतमुकच भाषा श्रेष्ठ आहे. कारण या धारणेतुनच मग स्वभाषांचे दमन होते.कुठलीच भाषा अशुध्द,कमी दर्जाची नसते, सर्व भाषा या हज्जारो वर्षाच्या जिवनाचे संचित असतात. त्या नष्ट होणे म्हणजे त्या-त्या समुदायाच्या हज्जारो वर्षाच्या जगण्यातुन त्यांना मिळालेले सुज्ञपण,ज्ञान,शहाणपण, नितीतत्वे जे ते सहज आपणास त्या-त्या बोलीभाषेतून,मातृभाषेतून मिळू शकतात तीच कडी आपण सोडून देण्याचे पातक करतो,
आणी आपल्या पुर्वजांशी कृतघ्नता दर्शवतो...
राहता राहीला मराठी भाषेचा प्रश्न...ही एक अत्यंत संपन्न,गोडवादायी,ज्ञानवादी,व्यवहारवादी, समाजमन घडवणारी, नितीतत्व देणारी, भक्तीभावाची व अनेक शतकाचा संपन्न प्रवाह असणारी अक्षर व अमिट भाषा आहे. थोर संतविभुती पासून आज लिहण्याचा अल्पसा प्रयत्न करणा-या माझ्यासारख्या अनंताना प्रभावित व मंत्रमुग्ध करणारी ही भाषा आहे. मात्र निव्वळ सातत्याने भावनीक बोलून, इंग्रजीला शिव्याशाप देवून, राजकीय अस्मितेचा बिंदू बनवून,शासन राजाश्रय देत नाही वगैरे आगपाखड करून ही भाषा टिकणार नाही तर तीच्या अंगभुत जाज्वल्याने ती आमच्या मनामनात प्रवाही होणे गरजेचे आहे, तीचा आदर करत ती नित्यव्यवहारात, शिक्षणात, समाजमाध्यमात व साहित्यात ती प्रभावीपणे वापरणे गरजेचे आहे...अन्यथा अभिजात असणा-या या माऊलीचा आम्ही क्षय केल्याशिवाय राहणार नाही...इंग्रजी भाषेचा पुरस्कार करणा-या आम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की," स्वातंत्र्यपुर्व कालखंडात भारतीय प्रांतात पंडीत जेंव्हा इंग्रजी भाषेचा आग्रह धरत होते तेंव्हा थाॅमस मनरो व एल्फिस्टन सारखे इंग्रज मातृभाषेतुन ज्ञान याचा आग्रह धरत होते.." आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने समाजमाध्यमावर मराठी पोस्ट करून आपली जबाबदारी न संपवता आपल्या सर्व पुर्वजांच्या मुखवाणीतुन झिरपलेला हा अमृतधारेचा झरा आपल्यामुळे आटणार नाही याची प्रतिज्ञा व अंमल आपण करू, विविध ज्ञान घेवून आपल्या दाराखिडक्यात येवून उभ्या इतरही भाषा या सर्वांचा आदर करणे हे आपले पिढिजात संस्कारच दाखवेल...! न लाजता आपल्या बोली व प्रमाण भाषेचा आणी विश्वसंपर्काच्या भाषांचा आदर करा! वापर करा!! हे पिढीजात शहाणपणाचे प्रवाह जिवंत ठेवा!!! "मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.."
प्रताप वाघमारे,
तहसीलदार (महसूल)
विभागीय आयुक्त कार्यालय,
नागपूर

Thursday, February 25, 2021

मुसाफिरी मृगजळ...

ही हवेची सलगी
हा स्पर्श वा-याचा
मी घेई माग तुझ्या 
अवकाशी ता-याचा

दुर रेतीबनात काफिले
दिशा ध्रुवतारी 
अनंत कंपने मनात
छेडते एकतारी..

रेतीला फुटते कहाणी
वाळवंट होते जागी
खुरटे झुडप बेफुली
गंध हवेला मागी

आकाशगंगेचा विस्तार
जोवर नजर जाई
संथ जाहल्या काफिल्याला
मरूद्यानाची रेतघाई

एक मुसाफिर गातो
आर्जवी धुनीचे सुक्त
रेतीचा आत्मा होई
मृगजळातुन मुक्त

थकल्या अवलियांच्या
मझारीचे सपाट रस्ते
संदलाची धुप सुगंधी
काफिल्यावर हसते

मुसाफिर शोधत फिरतो
युगाच्या पाऊल खुणा
रेतीस संदर्भ लागे
तुझ्या पावलांचा प्राचिन जुना

वाळवंट अबोल होते
हर काफिल्याचे जाणे
कोण आळवत असते
हर फेरीत ते मिलनगाणे?

रेती भुरभुर उडते
हवा दुरून येते
ओंजळ कुणाची वाळवंट
अलगद भरून येते

मी मुसाफिराचे शब्द
कवितेत माझ्या घेतो
मग बेफुली त्या झुडपाला
तुझा तनूगंध येतो.....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
25/2/2021

Wednesday, February 24, 2021

नजरभुल....


होते कधी नजरभुल
दृष्टीला पडतो फेरा
झुळुकीच्या आतखोलवर
दडला असतो वारा

द्यावेत शिंपले सारे
ओतुन नदीच्या काठी
एकांताच्या सांजवेळी 
द्याव्यात मनाला भेटी

उगा कशाला स्वतःला
सावलीने बावरून घ्यावे?
सैलावल्या पिंपळाच्या 
पानांना आवरून घ्यावे

बहरांना मुक्त करून
पानगळीचे ॠतु पहावे
दुःख बनून नदीचे
सागरतळी वहावे

पसरल्या पदरांना
चांदण्याचे दान द्यावे
चंद्राला नकळत नभी
अवसेचे भान द्यावे

स्वतःच्या चांगुलपणाची
उतरून दृष्ट घ्यावी
मागत्या नजरांना
तिट ही उधार द्यावी

मनात उजळून घ्यावेत
मग अंतरीचे दिवे
जुन्याच त्या आभासांना
भासून जावे नवे

अलवार परतून यावे
दुर देश सोडून
तुटल्या फुलांना द्यावे
निर्माल्याशी जोडून 

आकांताचा अर्थ मग
द्यावा हवेत पसरून
हाकेच्या पुका-यांना
जावे सरळ विसरून

मनाच्या कवाडावरली
खोडून द्यावी नक्षी
मुक्त करावा कसोशीने 
मनात जपला पक्षी....
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
24/2/2021

 

Tuesday, February 23, 2021

मिलनघडीचा शकुन

सौदे किती करावे
आठवणीच्या सवे?
झाड मुक स्विकारे
हुरहुरीचे थवे

किती सहज ही हवा
आल्या पावली निघते
रोज उगवत्या चंद्राला
कोण उसासून बघते?

दिवेलागणी वेळी 
ही कसली रातलागणी?
खिडकीस कशास करावी
चंद्रोदयाची मागणी?

परक्या आभाळाला 
देवून आपला अवकाश
झिरपत्या चांदण्याला 
उचलून घ्यावे सावकाश

ती हसती जादू सांडे
वेल फुलांनी भरते
एकट माळरानावर 
मन कुणाचे फिरते?

नाजुकशा हालचालीचा
दिवा ओसरी पेटे
वातीचा आत्मा जळता
प्रकाश साजरा थाटे

भरून गेली सांज 
रित्या रातीत सरते
चंद्राच्या थेट मागे
रातीचे काळीज झरते

दाराच्या कवाडांना
उंबरठ्याची बाधा
माळरानाच्या बासरीत 
विहरते माजघरातील राधा

मनाचा मनाशी 
संवाद अबोली चाले
एकट संध्यासमयी
दुःख बोलके झाले

रोज सांज येते
जाते रात थकून
दारी साळुंक्याचा थवा 
हो मिलनघडीचा शकुन...
(pr@t@p)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
23/2/2021

Wednesday, February 17, 2021

चांदण काया.....

डोळ्यात दाटती डोळे 
कसले हे मधूर सुर?
वाळवंटाच्या अंतःकरणाला
ये मधुमालती पुर

चंद्रबुडीच्या वेळा
पहावा तुटता तारा
तनूगंधाने भारलेला
स्पर्शुन घ्यावा वारा

ओल दाटले दवबिंदू 
गवताला बिलगुन जाती
पहाट रिती होताना
मंद जाहल्या वाती

चंद्र कुशीला असता 
आभाळ का पेटते?
का रातीचे काजळक्षण
रेखावे नयनी वाटते?

डोळ्यास बिलगून पापणी
वाट कुणाची पाही
आर्त भूपाळीच्या शब्दातुन
कोणाचे दुःख वाही?

मंद जाहले चांदणे
दुर तळ्यात बुडते
पहाटेच्या ओल प्रहरी
मन दवबिंदूवर जडते

ओस दाटल्या ओठांनी
अजान आर्त द्यावी
मी टिपून घ्यावी अलगद
चिंब जाहली ओवी

गोंदणफुलाच्या ताटव्यात
हे कसले फुलती बहर 
घट्ट धरून ठेवावेत
हे चंद्रबुडीचे प्रहर

भुईला नभाने 
सकाळ प्रहरी पहावे
दुःख चकोराचे नदीवर
अलगद मंद वाहावे

शब्दांना सुचावी माझ्या 
नभाची किरणमाया
मी ओढून घ्यावी आत्म्यावर
तुझी चांदण काया....
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com

Monday, February 15, 2021

मृगजळांचे पाझर....

हे रानफुलांचे गंध
अस्तित्व तुझे ओझर
ओंजळीत या साचती
मृगजळांचे पाझर

जाणा-या झुळकीने
आत खोल काय पेरले?
बंद जाहल्या पापण्यांनी
आभास कुणाचे हेरले?

प्रतिमेस कसली घाई
कोणाचे रूप ठसले?
शहारणा-या आरशाचे
काळीज कोण पुसले?

पडवीत चंद्र सांडला
भुई चांदणे झाली
आभाळात मग कसली
बहर पेरणी झाली?

हृदयास माझ्या लगडती
आसुस हाकेची फुले
तेच ताटवे शोधी
जे नजर तुला मी केले

आठवणींच्या भिंतीवर
मी रेखाटे आसुस नक्षी
सुस्का-याच्या बनात विहरती
आस दाटले पक्षी

मृगजळी मुहुर्तावर
काफीले चालत येती
मी चंद्र पाहतो उत्सुक
उन्नत झाल्या माथी

ती पडशाळा नोंदवून घेते
पारव्याची नि:शब्दी झेप
परतवून लावताना तुझ्या 
आठवणींची हर खेप

मुक आभाळाखाली
होई पायवाटही धुसर
त्या झाडालाही पडला
तुझ्या पायरवाचा विसर...

वाट, झाड,चांदणे
सा-यांना तुझी आस
नसेल येणे शक्य
पाठव किमान भास..
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
15/2/2021

Saturday, February 13, 2021

आभासाची पाने....



दुःखाहून उत्कट
असे काही असते
झोंबत्या शिशीराला
पान गळत हसते

तुटव्याचा भावबंध
फांद्यात वारा हरवे
गळल्या पानांचे
मन हळवे बरवे

मुठीतच राहे
पाखरांचा चारा
झेपावले पंख
खुणावतो वारा

ओक्याबोक्या फांद्या
झाड एकाकी एकले
पदरात घेई बहराचे
चुकले माकले

शिखराच्या अंतरंगी
पायव्याची आस
शिरावळाच्या मनाला
थंडाव्याचा भास

सारे काही मुक
मनी कोण बोले?
एकाकी अश्रुंना
प्रतिक्षेची फुले

रान सारे सुने
बहराचे वाण
मी वाहतो ओंजळी
तु वाहिलेली आण

नजरेला राही
तुझ्या दिसण्याची आस
मिटल्या पापण्यांना चुंबे
तुझा ओला भास

शब्दांच्या पल्याड 
माझ्या संकेताची भाषा
कविता शोधे तुला 
जाती वाटा दुरदेशा

हलकेच गाते रान
बहराचे गाणे
शिशिराच्या फांदिला
आभासाची पाने....
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
13/2/2021
 


Monday, February 8, 2021

शब्दांची पुनव होते....



खुलते चंद्रसखे तुझ्या 
स्पर्शाचे चांदणे मखमली
चंद्रास जाहला मोह
तो झरतो सांजभुली

दाटल्या अंधारास बिलगे
का काहूरी पणती?
आतुर माथा विसरे
श्वासांची आर्त गिणती

विरघळून होते लुप्त
जाणिवेची सावली
ओढ तुझ्या मनाची
मनात माझ्या धावली

तरंग उमटून संध्या
अशी व्याकुळ-व्याकुळ 
फांदीवर उमलून येई
सांजबावरा बकुळ

तुझ्यात जिव शोधी
माझ्या मनाची खुण
अंतरंगात उमडून येते
वेणूची गोकुळी धुन

निघून गेल्या पावलांचे
हे धुसर होते ठसे
दंग जाहल्या दिशांचे
परतवावे पुकारे कसे?

अधांतरी हवेत फिरते
मिलनाची दंतकथा
चंद्र नित्य नोंदवी
चांदण्याची विरहव्यथा

कवडशातुन स्पर्शे चंद्र
खिडकीचे तावदान
ओंजळीत तुझ्या ओसंडे
स्वप्नांचे मखमली दान

शिखरमाथ्यावरून घुमतो
पुका-याचा हळवा मंद्र
तुझ्या आभासी प्रकाशात
व्याकुळ होतो चंद्र 

शब्दांची पुनव होते
अवकाशी रात जळते
निजल्या चंद्रास स्वप्नात
चकोराची प्रित कळते..
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
8/2/2021


















Saturday, February 6, 2021

मनाची मुकभाषा....

ही बेकफन पाने
हा बेदर्दी शिशिर
यावेस तु या क्षणी
कशास हा उशीर?

दुरदेशी चांद उगवे
बेनकाब होती तारका
स्वप्नास आभास होई
निव्वळ तुज सारखा

वा-याने झाड हाले
पानांना होई शिक्षा
ओंजळीत माझ्या पडे
शुष्क पर्णाची भिक्षा

सिध्दार्थ निघे अनवाणी
पिंपळ पान पसरे
मुद्रेत त्याच्या लोपे
दुःख मनाचे हसरे

शोधता आत्म्याचे कोने
त्यास दुराव्याचे सुतक
मनास बिलगे माझ्या तुझे...
असण्याचे घोर मिथक

मनाच्या हाकांचे प्रदिर्घ
सुर उमटती गहीरे
मन नसावे कोणाचे
असे ठार बहिरे!

ही हवा कुणाचा निरोप
अलवार होवून आली?
चंद्र भासतो रेशीम
झाले चांदणेही मखमली!

ॠतु अनामिक फुलतो
शिशिरासही ये बहर
गळल्या पानावर विसावे
मिलनघडीचा प्रहर

दुर दिव्याची माळ
चमकुन होते मंद
गळल्या पानासही येई
बहराचा नवसुगंध

आभास इतका सुंदर!
हो वास्तवाची अभिलाषा
तुझ्या मनात रूजावी
माझ्या मनाची मुकभाषा
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
6/2/2021

















Wednesday, February 3, 2021

शब्दांच्या फुलवाती....


                                                                            
ओठावर माझ्या सजती
तुझ्या गझलांचे भार
मी लोटून देतो अलगद
तुझ्या पापण्यांचे दार

प्राचीन साठले पाणी
सागरास मौन साधते
लाटांचे काळीज हळवे
नयनास का? बाधते

मी हंबरवेळी लिहतो
हंगाम दाटले गाणे
शिशीर झाडून नेतो
बकुळ फुलांचे पाने

झांजर सांज उतरे
खोल मनात माझ्या
रात उचलून घेते
स्पर्शांच्या जखमा ताज्या

मनात माझ्या वाहती
दुव्यांच्या आर्जवी धारा
ओंजळीत सजतो माझ्या
नभात तुटता तारा

रानफुलांचे रंग
गझलेस माझ्या मिळती
अर्थ तुला का सा-या
मतल्यांचे सहज कळती?

मनात कोणती ओवी
करूण होऊन पाझरते?
मी जपतो स्पर्श तुझे
जे झाले ओझरते

झाडाची गुढछाया
चांद दुर एकला उभा
झोपाळल्या स्वप्नांना तुझ्या
नयनस्पर्शाची मुभा

ता-यात हरवला रस्ता
हे कसले दिशाहीन चालणे
मुक तुझ्या आर्जवाशी
मी मुक्याने बोलणे

मिटव डोळे, दे हाक!
स्वप्न दाटल्या राती
तुझ्या दिव्यात सजतील
माझ्या शब्दांच्या फुलवाती
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
3/2/2021







































Monday, February 1, 2021

तुझा आभासी गंध....

एकट माळरानावर 
अभंग एकला पडला
जिव जणू की त्याचा
त्या रस्त्यावर जडला

शब्द जणू भंडारा
हवेस पिवळी कांती
तुझ्या श्वासाच्या गंधात
मी ढवळून घेई शांती

हा उरूस कसला चाले
हे कसले संदल जळते?
चाहूल तुझी अनवाणी 
अलगद मनास मिळते

दुर एकली सांज
तळव्यात चांद उगवे
सांजस्पर्शी सुर्यास्त
दुःख दाटते भगवे

हा तमफुलता बहर
नजर तुला मी केला
राधेच्या अंगाखांद्यावर 
कोणाचा सजतो शेला?

नजर अशी अंधारात
आभास तूझे चिणते
रात एकट भारी
आठवणही शिणते

दुर पेटता दिवा
वारा तिकडे वाहतो
उडता चकोर व्याकुळ 
खिडकीस तुझ्या पाहतो

श्वासांचे तळ गाठत मी
तुझा माग घ्यावा
असे रुजावे अंतरी 
जणू तुझा भाग व्हावा

दगडाला फुल यावे
मातीस ओल सुटावी
हृदयाची हाक ओली
ओठास तुझ्या फुटावी

रात अंधारास भेटावी
दिवे व्हावेत मंद
श्वासास बिलगुन यावा
तुझा आभासी गंध......
(प्रताप)
"रचनापर्व"
www.prataprachana.blogspot.com
1/2/2021

राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...