स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 18: निकालाने दिलेला चकवा....!
परिक्षा खुप जवळ आली होती.PSI च्या परिक्षेची तयारी करणारे सर्व मित्र पुन्हा राज्यसेवा कडे वळले. आता त्यांना खुप कमी दिवस मिळत आहेत राज्यसेवा पुर्व परिक्षा तयारी साठी याची जाणीव झाली. माझ्याकडच्या मी काढलेल्या नोट्सला घेण्याची झुंबड व्हायची ,रिव्हिजन साठी व एकत्रित सारेच मुद्दे जवळपास त्यात होते त्यामुळे सर्वांनाच फायदा व्हायचा. मी ही त्या देत असे कारण मला ही त्यात नविन काही अपडेशन करायला मिळायचे. सर्वांचा अभ्यासाचा झपाटा वाढला. पावसाळ्याची चाहूल लागल्यावर मुंग्या जशा वारूळ बनवायला भिडतात!! तसे सर्व जण अभ्यासाला भिडले होते. मीही त्यात सामील झालो. अभ्यासात, अभ्यासाच्या कालावधीत व अभ्यासाच्या दर्जात मी कुठेच मागे पडत नव्हतो. तो अक्षरशः झपाटलेला काळ होता!! एकाच 15×15 च्या खोलीत आम्ही सगळे जण अभ्यासाला बसायचो, पण रात्री सगळे गेल्यावर झोपताना कोण कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता हे आठवायचा प्रयत्न केला तर तो आठवायचा सुध्दा नाही!!! कारण काय? तर अभ्यास करण्याच्या चक्कर मधे तेवढीही उसंत व सैलपणा घेतलेला नसायचा. भारून जाणे काय असते जर कोणी सांगत असेल तर मला तोच काळ आठवतो आजही!!!! अभ्यासाच्या ठिकाणी कोण येत आहे, कोण येवून गेले? काही लक्ष नाही. एके सायंकाळी रूम बाहेर निघताना दाराच्या जवळच्या लोखंडी खुर्चीवर डझनभर केळी असलेली एक पिशवी ठेवलेली दिसली..प्रत्येकाला वाटले आमच्या पैकी कोणी आणुन ठेवली असेल..!! रात्री रूमवर गेल्यास भावाने सांगितले वडील येवून गेले होते..! आणी जाताना सांगुन गेले होते. "जपून अभ्यास करायला सांग त्याला , जास्त ताण घेवू नको म्हणावं! " मला हुरहुर लागली! रात्री आपोआप डोळ्यात पाणी आलं..रात्रभर विचार..डोळ्या समोर पावसात गळणारं घर..आई वडीलांचा चेहरा.. अभ्यासाच्या विषयातील मुद्दे, नोट्सच्या कोप-यात वेगळ्या शाईने लिहिलेले चालू घडामोडीचे मुद्दे... रूम वरील ओढाताण..सगळंच दाटून येत होतं..स्वप्न झोपू देत नव्हतं.........!!!!
शेवटच्या टप्प्यात अक्षरशः अभ्यासा व्यतिरिक्त काहीच केलं नाही. माझी रूम जवळच असल्याने मी रात्री सर्वात शेवटी निघत असायचो..पण शेवटी शेवटी असं वाटायचं की फक्त 5 तासासाठी रूमवर कशाला जात बसू? मग मी कधी कधी तेथेच थांबू लागलो. तिन लोखंडी खुर्च्या जोडायच्या आणी मिळेल तेवढी झोप घेवून, सकाळी सगळे येण्या अगोदर तेथेच तयार होवून बसून जायचे...हिमायत भाई पहाटेच हाॅटेल सुरू करायचे..थोडासा चहा घेतला की मग दुपार पर्यंत दगडाची मुर्ती बनून जायचो. सर्वांचा अभ्यास खुप चांगला झाला होता. दररोज अपडेशन, डिस्कशन, रिव्हिजन, व्ह्यल्यु अॅडिशन...बस्स..जणु रणधुमाळीच...अभ्यासात एवढी हातघाई आणी चढाओढ की..जणु अभ्यास केला तरच जिव वाचणार आहे..परिक्षेचा दिवस येइतो अक्षरशः सारे मुखोद्गत झाले होते..
सरते शेवटी 30 मे आला..मिळालेल्या हाॅल टिकीटला कितीतरी वेळा पाहून ठेवले होते. सगळे जण एकत्र भेटलो..परस्परांना शुभेच्छा दिल्या. चुका करायच्या नाहीत, येते ते चुकायचे नाही, जे येत नसेल त्यालाही सहजासहजी सोडायचे नाही, रोल नंबर व उत्तरांचे गोल काळे करताना त्यांचा क्रम, हे दोन्ही चुकवायचे नाहीत.एकापेक्षा अधिक काळे बाॅलपेन घेतले का? ते व्यवस्थित रूळवलेले आहेत का? इत्यादी लहानात लहान तपशील एकमेकांना विचारून, आम्ही निघालो. मी जाताना कुठलेही दडपण येणार नाही याची काळजी घेत होतो..परिक्षा केंद्रावर पोहचल्यावर पाहीले, भरपूर गर्दी, गर्दीत ओळखीचे चेहरे..कोणी सिनीयर्स, कोणी नवखे.. कोणी घाबरलेला,कोणी उत्साहात, कोणाच्या पोटात गोळा उठत आहे..कोणी मित्रमैत्रिणीना बोलत आहे...मी एका कोप-यात ऊभा होतो...स्वतःला शांत ठेवत..बजावत स्वतःला "आपल्याला एकही चुक परवडणार नाही..." वडीलांचे शब्द आठवत होते.." घडी गेली की पिढी जाते" मी ही परीक्षेची घडी आयुष्यातून जाऊ द्यायची नाही हा निग्रह करून वर्गात गेलो...
पेपर मिळाला..प्रत्येक गोष्ट अचुक ठरवल्याप्रमाणे घडत होती..प्रश्नाची गुंतागुंत भुलभुलैया तयार नाही करू शकली.. थेट ऊत्तरापर्यंत पोहचू शकत होतो. केलेला अभ्यास, मित्रांचे योगदान कामी येत होते..जसजसे प्रश्न सुटत होते,तसतसा आत्मविश्वास येत होता. प्रथम टप्प्यात आलेले दडपण निघून गेले होते.....वेळे अगोदरच येणारे प्रश्न सोडवून संपले होते ..ऊरलेल्या वेळात न येणा-या प्रश्नाना सोडवण्यासाठी प्रयत्न केला..त्यातील भरपूर प्रश्न बरोबर आल्याचा विश्वास वाटत होता. वेळ संपली..पेपर समाधानकारकरित्या सुटला होता..पण वाटते तसे काही नसते..जो पर्यंत आन्सर की शी ताडून पाहत नाही तो पर्यंत काहीच सांगता येत नसते हे माहित असल्याने त्वरीत अभ्यासाच्या ठिकाणी पोहचलो..एकेकजण जमले...अगोदर एकमेकाचा चेहरा पाहून घेऊन ,पेपर कसा गेला? हे विचारून सगळे जण उत्तरे शोधायला बसलो.( त्या काळी MPSC आन्सर की देत नसे) 200 पैकी बहुतेक प्रश्नाची उत्तरे(192) शोधली. अत्यंत अवघड प्रश्नाची उत्तरे पण आमच्याकडे होती. उरलेले प्रश्नाची उत्तरे इकडे तिकडे फोन करून घेतली. अत्यंत अभिमान तेंव्हा वाटला जेंव्हा पुण्यात पण दोन प्रश्नाची उत्तरे सापडत नाहीत असे तिकडून सांगितले गेले, त्यावर त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही सांगितले. ( ते माझ्या नोट्स मधे होते)खरंच असा ग्रुप होणे नाही!!!
सर्व सोडवलेले प्रश्न तपासून घेतले. आम्ही सगळेच सेफ झोन मधे होतो!! मला खुप आनंद झाला.माझा रिझल्ट पॉझिटीव्ह येईल याचा अंदाज आल्याने मी लगेच मुख्य परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी जुळवाजुळव करायला सुरूवात केली. संदिप म्हणाला "अबे! मरशील ना, एक तर दिवस थांब!" मी ऐकूनही माझे काम सुरूच ठेवले.मुख्य परिक्षा माझ्या टाईप साठी अत्यंत योग्य होती. दिर्घोत्तरी स्वरूपाची!! मला माझी स्ट्रेंथ माहीत होती. मी कितीही अवघड पेपर आला तरी उत्कृष्ट लिहू शकतो हा आत्मविश्वास मला होता. मी नुकतीच M.A. ची परीक्षा दिली असल्याने लोकप्रशासन हा एक विषय जवळपास तयार होता पण त्याला MPSC च्या पध्दतीने तयार करायचे होते. जनरल स्टडीज, ईंग्रजी, मराठी व बॅकिग हा दुसरा ऑप्शनल निवडून मी तयारी करायला बसलो.
पुर्व परिक्षा झाल्यानंतर तांदळे सर, अतुल पाटील यांच्या रजा संपल्या ते जाॅईन झाले. अरूण भैया बाहेरगावी निघून गेले. राहिलो मी आणी संदिप!! संदिपचा खरा इंटरेस्ट ऑब्जेक्टीव्ह टाईप परिक्षेत होता. दिर्घोत्तरी प्रश्नाच्या परिक्षेला मला मर्यादा येतात हे तो स्वतः कबुल करायचा. आणी ते होते ही खरेच! कारण 200 पैकी पुर्व परिक्षेला 192 बिट असणारा तो एकटाच होता!! मी परिक्षा झाल्यानंतर एकदा घरी जाऊन आलो. आईवडील व दोन्ही भाऊ यांना माझे पेपर चांगले गेल्याचा खुप आनंद झाला होता. माझा पुर्व परिक्षेचा रिझल्ट येणारच या बाबत त्यांना माझ्या एवढाच आत्मविश्वास होता. मी जवळपास एकट्यानेच अभ्यास करत होतो. मुख्य परिक्षा कशी असते. कसे पेपर सोडवायचे असतात या बाबत निव्वळ कोरी पाटी!! पण शाहू काॅलेज व दयानंद काॅलेज मधे कला शाखेत शिकायला मिळाले होते!! मी अत्यंत कल्पकतेने मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागलो. पुर्व परिक्षेचा निकाल कधी लागेल याचा विचार असायचा सतत मनात. एक महिन्याने एम ए चा निकाल लागला युनिव्हर्सिटीच्या गुणवत्ता यादी मधे यायला फक्त 3 मार्क कमी पडले. पण हे मार्क्स काही कमी नव्हते. आता प्रचलीत पध्दतीने ऑफिसीयली काॅलेज शिकणे संपले होते!!
दरम्यानच्या काळात कधी कधी दोन तीन दिवस सेंटर कडे कोणीही यायचे नाही. मग मी तरीही बसायचो एकटाच ....अभ्यास करत .दरम्यानच्या काळात मला मुख्य परिक्षा साठी सोहम सोबतच ज्ञानप्रबोधिनी या क्लासेस वर संचालक सुधिर पोतदार सरांनी शिकवण्यासाठी बोलावले. तेथेही तयारी करणा-यांची संख्या खुप चांगली होती. विशेष म्हणजे तेथे धन्वंतकुमार माळी सर ( नंतर Dy.Ceo), महेश वरुडकर सर (माझ्या सोबतच कक्ष अधिकारी) ज्योती चव्हाण मॅडम( नायब तहसीलदार), भांबरे सर , प्रकाश कुलकर्णी सर या सर्वांचा संच तेथे भेटला. पण तेथे मी शिकवायला जात असल्याने एकत्रित अभ्यास करायला मिळाला नाही कधी! तसेही आमचा ग्रुप वेगळ्यानेच अभ्यास करत होता. व तिकडे ते अभ्यास करत असत. तेथे शिकवताना जाणवले की, मुख्य परिक्षा बाबत आपल्याला नैसर्गिक समज तर आहेच पण विषय मांडण्याचीही विशेष शैली आहे. कारण शिकवत असताना या सिनीयर मंडळीकडून कधी निगेटिव्ह फिडबॅक तर आला नाहीच. उलट त्यांनी प्रचंड कौतुकच केले.शिकवत असताना काही सिनीयर्सनी त्यांच्या मटेरिअल मधे व्ह्यल्यु अॅडिशन होत आहे हे स्पष्टपणे सांगितले. आत्मविश्वास होताच ! तो वाढला.( कदाचित मी असा एकमेव असेन, ज्याने स्वतः पुर्व परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवले, ती झाल्यावर मुख्य परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवायची संधी मिळाली, आणी मुलाखतीची तयारी करताना ही इतरांना मुलाखती बाबत शिकवायला मिळाले...!! इतर सर्वजण सिलेक्शन झाल्यावर अथवा परिक्षेचा तो विशीष्ठ टप्पा पुर्ण झाल्यावर त्या अगोदरचा टप्पा इतरांना शिकवतात पण मी ज्या टप्प्याची तयारी करत होतो त्याच काळात तो द्यायच्या अगोदरच इतरांनाही शिकवत होतो) नंतरच्या काळात ज्ञानप्रबोधिनी लातुर मधे गेस्ट लेक्चरर म्हणून रंजन कोळंबे सर, राहूल माकणीकर सर (सध्या DCP नागपुर पोलीस -ज्यांनी महाराष्ट्रात STI मधे रेकाॅर्ड मार्क्स घेवून सिलेक्शन मिळवले, सबंध महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक त्यांच्या अभ्यासामुळे व शिकवण्यामुळे होता व नंतर त्यांचेही आमच्या सेम बॅचमधेच Dysp म्हणून सिलेक्शन झाले.) यजुवेंद्र महाजन सर इत्यादी दिग्गजांशी तेथे संबंध आला. मी शिकवलेल्या विषयात तेथील मुलांची झालेली तयारी पाहून माकणीकर सरांनी केलेले कौतुक तर प्रचंड आत्मविश्वास देवून गेले..
मी एकट्याने शिकत होतो, शिकवायला जाण्याने माझी मेन्सची दशा व दिशा योग्य आहे याचा अंदाज आल्याने मी तयारी वेगाने करत होतो. दिवसभर सोबत बसेल असे कोणी नव्हते. संदिप, तांदळे सर , अरूण भैया येत रहायचे अधुन मधुन .मी तेथेच अभ्यासाला बसायचो. पोलीस बाॅइजची एक बॅच आली. अरूण भैयाही मग रेग्युलर येवू लागले, कारण त्यांनाच ती बॅच चालवायची जबाबदारी होती. तेथे मला भारतीय राज्यघटना शिकवण्याची संधी मिळाली. एकदा भर रंगात येवून शिकवत होतो. अचानक नांगरे पाटील सर वर्गाच्या दारात ऊभे!!. थोडेसे टेन्शन आले पण मी शिकवण्याची गती व पद्धत बदलली नाही. सर साधारणतः2 मिनीटे थांबून , पाहून ,जाताना सर स्माईल करून गेले! ते निघून गेल्यावर मला जाणवले की अक्षरशः सर होते !
पुर्व परिक्षा होवून खुप काळ लोटला होता..निकाल लागण्याची चिन्हे दिसत नव्हती. एक तर खुप गॅप नंतर, 2003 ची म्हणून 2005 मधे हातात आलेली जाहिरात ! पहिल्या वर्षी पुर्व परिक्षा तर दुस-या वर्षी मुख्य परिक्षा होणार आहे हे माहित नव्हते!!! अस्वस्थता दाटून येत होती. निकाल कधी लागेल याची खात्री नव्हती. दरम्यानच्या काळात PSI पुर्व परिक्षेचा निकाल लागला!! आख्खा ग्रुप पास झाला!! अर्थात मी ही!! पण मला वेध लागले होते ते राज्यसेवा पुर्व परिक्षा निकालाचे, सर्वजण PSI मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागले . इंग्लिशच्या तयारी साठी प्रा. लखादिवे सर मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी अत्यंत तळमळीने आम्हाला शिकवले. दरम्यानच्या काळात मी माझ्या स्तरावर मुख्य परिक्षेचा अभ्यास करत होतो.वडील अधून मधून निकाल कधी आहे म्हणून विचारायचे. त्यांना PSI चा निकाल आला आहे हे सांगितले. पण ते विचारायचे राज्यसेवे बाबत!!
दरम्यानच्या काळात बरिश्ता हाॅटेलवर सगळेजण जमा होत होते.मी ज्यांना शिकवायचो, ज्यांना मला भेटायला यायचे आहे ते तिकडे यायचे. मग आम्ही अभ्यास, तयारी यावर बोलत असू..दरम्यानच्या काळात संदिपचा पुर्वाश्रमीचा( पण आमचा सगळ्यांचाच !!) मित्र, कायम धडपड्या, अत्यंत उत्साही व दोस्तीच्या व्याखेत चपखल बसणारा मित्र राजेंद्र ढाकणे शालेय पोषण आहार अधिक्षक म्हणुन सिलेक्ट झाला होता. त्याला अगोदर पासून ओळखत असल्याने खुप आनंद झाला. संदिप ही खुष होता. पण तो हलकेच एक मर्मभेदी प्रश्न विचारायचा,"कधी होइल यार आपले सिलेक्शन?"..मी त्याला आधार द्यायचो तो मला मानसिक आधार द्यायचा!!
गज्या अनायसे सुट्टीला लातुरला आला होता, तो एम बी ए करून एका कंपनीत पुण्यात जाॅब करत होता. सचिन आडाणे पण होताच . एके सकाळी ते दोघेही बरिश्ता कडे आले. आमची चर्चा सुरू होती. शाळा काॅलेजचे मित्र असल्याने जरा जास्त आत्मीयतेने चर्चा सुरू होती. लवकर काही तरी सिलेक्शन झाले पाहिजे या बाबतच बोलत होतो तेवढ्यात बातमी आली आज पुर्व परिक्षेचा निकाल लागू शकतो!! एकदम धाकधूक वाढली! सगळे जमा व्हायला लागले! त्या काळात निकाल कलेक्टर ऑफिस मध्ये फॅक्स ने यायचा. पण MPSC ने नुकतीच वेबसाईट सुरू केली होती. सगळे जमा झाल्यावर वातावरणात एकदम टेन्स वाढून गेला. सगळे जण बसून बोलत तर होतो पण कधी चार वाजतील आणी कधी निकाल येईल याचीच वाट बघणे सुरू होते!! सरते शेवटी आम्ही सगळेच जण कलेक्टर ऑफिसला निघालो. तेथे पोहचल्यावर पाहीले खुपजण जमा झाले होते. दोन तीन वेळा आत जाऊन विचारणा केली. निकाल लावला जाईल म्हणून सांगितले, मन कशातच लागत नव्हते. सरतेशेवटी निकालाची प्रत भिंतीवर लावण्यात आली. खुप गर्दी होती..गर्दीतुन काही जण पास झाल्याचा निकाल लागल्याच्या खुशीत ओरडत तर काही जण पांढरा पडलेला, नाराज झालेला चेहरा घेवून बाजूला निघत होते. आम्ही ही गर्दीत घुसलो. आम्ही निकाल पहायला सुरूवात केली. अरूण पोतदार पास! , संदिप जाधव पास! तांदळे सर नापास!! माझाही नंबर काही केल्या मला सापडला नाही! लातुर सेंटर वरून एकुण 107 मुले पास झाली होती. काही तरी गल्लत होत असेल म्हणून मी पुन्हा पुन्हा माझा नंबर पाहीला. माझा चेहरा पाहून तो पर्यंत बाकीच्यांनी ओळखले..गज्या ने मला बाजुला घेतले. आम्ही काहीही न बोलता परत निघालो.परत येत असताना क्लासेस वरील मुले भेटली. विचारलं काय झाले ? मी सांगितले माझा नंबर नाही या यादीत म्हणून. थोडंसं पुढे आल्यावर मागून आवाज येत होता" असं होवूच शकत नाही, वाघमारे सर, प्रकाश कुलकर्णी सर यांचा अभ्यास खुप चांगला आहे पण तरीही त्यांचा रिझल्ट गेला यावर विश्वास बसत नाही " मी काहीच न बोलता परत आलो. सगळे जण जमा झाले होते. यशापयशाची चर्चा, समीक्षा , काहींना निकाल गेल्याचं दुःख,तर काहींना निकाल आल्याचा आनंद..! गेलेले आलेल्यांच्या आनंदात मनातुन सहभागी होवू शकत नाहीत आणी मित्रांचे निकाल गेले म्हणून ज्यांचे निकाल आले ते मनातुन आनंद व्यक्त करत नाहीत. यशापयशाचा फरक जाणवतो लगेच!! एक दिर्घ दरी असते...लांघताही येत नाही टाळताही येत नाही!!!
मला प्रचंड दुःख झालं होतं. मी मनातुन अक्षरशः मोडून पडलो होतो, काय चुकलं, काय कमी पडलं, आपण तर सगळंच केलं होतं..तरीही निकाल निगेटिव्ह???? मनात प्रश्नाचं वादळ आलं होतं. काही बोलताच येत नव्हतं. परत येतो तो मोठा भाऊ राहूल भैय्या आणी वडील आलेले..लगेच त्यांनी ताडलं..मोठ्या भावाने विचारले..तुझा तर खुप अभ्यास झाला होता...पण जाऊ दे पुन्हा तयारी करू! असे तो म्हणाला. वडील म्हणाले PSI चा निकाल आलाच आहे तर त्याची तयारी कर तो पर्यंत पाहू राज्यसेवा देता येईलच !! मी मात्र मनातल्या मनात कुढत ऊभा होतो. माझ्या डोळ्यासमोर घर..येणारे एकटेपण, अभ्यास हे सगळं तरळत होतं . आता मी काय करणार होतो???? ते खुप वेळ बोलले. आणी मला समजवून निघून गेले. माझा मूड व चेहरा पाहून संदिप पण समजवत होता, बाकी सगळे जण समजावत होते..सरतेशेवटी या परिस्थितीत सर्वांनी तोडगा काढला आपण सगळे जेवायला जाऊ. थोडंसं वातावरण बदलेल..पुढचा विचार करता येईल. मला बिलकुल ईच्छा नव्हती. मी नकार दिला..सगळे जण माझ्यावर चिडले एवढे टेन्शन कशाला घेतो म्हणून, पण माझं आक्रंदनारं मन मी ऊघड करू शकत नव्हतो, हे सगळं सुरू असताना गजा शांत होता! तो काही तरी विचार करत होता. तो अचानक बोलला " किती जण पास आहेत लातुर सेंटर वरून?" कोणीतरी सांगितले 107! त्यावर तो म्हणाला ," लावलेल्या फॅक्स प्रिंट मधे 107 नंबर होते!! , म्हणजे जर ऊभ्या लाईन 14 होत्या तर आडव्या लाईन मधे 8 नंबर पाहिजे होते कारण शेवटच्या आडव्या लाईन मधे फक्त 3 नंबर होते!! म्हणजे 13×8= 104 + शेवटच्या आडव्या 14 व्या रांगेतील 3 मिळून 107 होतील, पण मी पाहिल्या त्यावेळी आडवी लाईन ही 8 ऐवजी फक्त 7 नंबरची होती. प्रत्येक आडव्या लाईन मधला शेवटचा नंबर अर्थात शेवटचा अख्खा ऊभा रो गायब आहे!!!!!" माझा श्वासच अडकला! मीही कॅल्क्युलेशन करून पाहीले तर गजाचे बरोबर होते!!
मला एकदम तगमग झाली. सगळे बसले असल्याने मी एकटा पुन्हा कलेक्टर ऑफिसला जाऊन पाहीले गजाचे बरोबर होते! कोणाला विचारायला जावे तर ऑफिस बंद झाले होते. MPSC ऑफिस ही बंद झाले होते. मी यादी पुन्हा पाहिली माझ्या अगोदर चा नंबर व माझ्या नंतरचा नंबर याच्या दरम्यान लावलेल्या यादी प्रमाणे 647 नंबरचा चा गॅप होता , नेमका त्या 647 पैकी ज्याचाही नंबर आला असता तो रो च नव्हता व तो ही गजाने सांगितल्या प्रमाणेच!! अर्थात त्या शेवटच्या गायब रो मधे या 647 पैकी कोणीही असु शकत होते !! मी सुध्दा!! मी धावतच परत आलो. मी सगळ्यांना सांगितले. माझी एक्साइटमेंट नंतरही नकारात्मक निघाल्यास मला जास्तच धक्का बसेल याची संभाव्यता गृहीत धरून मला सर्वांनी एकदम शांतपणे प्रतिसाद दिला. एमपीएससी रिझल्ट वेबसाईटवर टाकणार आहे त्यावेळी पाहू सध्या सोबत चल म्हणून मला सर्वांनी अक्षरशः बळजबरी गाडीवर बसवले. मी आता खुपच तणावात आलो होतो. एमपीएससी माझ्या सोबत चकवा-चकवीचा खेळ करत होती. मी कुठल्याही तिरावर नव्हतो. अधांतरीच लटकत होतो!!!
सगळे जण जेवण करत होते. मी खुप परेशान होतो. तोंडदेखल्या पध्दतीने हां हुं करून बोलत होतो. सगळे जण लातुर शहराबाहेर आले होते. त्यांचे जेवण होईतो मला धिर धरवत नव्हता! मी फक्त पाणी प्यायलो होतो. मला झालेल्या पराभवातुन बाहेर पडण्यासाठी एक अंधुकसा प्रकाश किरण दिसत होता. ना मोबाईल होता त्या काळात ना काही सुविधा! ऊठून परत यावे म्हटले तर कोणा सोबतच तरी यावे लागणार! मी 7.45 पर्यंत कशी तरी वाट पाहीली!! सरतेशेवटी मी जातो कसाही तुम्ही बसा म्हणून मी निघणार तो सचिन म्हणाला चल ! आपण जाऊ!! खरंतर त्याला माझी तगमग पाहवत नव्हती!! परत येताना तो गाडी चालवत चालवत मला समजावत होता, " आला तर आला रिझल्ट, नाही आला तर टेन्शन घेवू नको! पाहता येईल!"
माझे लक्ष सगळे इंटरनेट कॅफेवर कधी पोहचतो या वरच होते! आम्ही पोहचलो! सुदैवाने बरिश्ताच्या काॅम्पलेक्स मधेच इंटरनेट कॅफे होते.गडबडीत मी आणी सचिन पोहचलो! मी भरभर टाईप करून MPSC ची साईट सर्च केली. हळूहळू ती उघडत होती..मी दिर्घ श्वास घेत होतो..मेन पेज आले. त्यावर रिझल्ट वर क्लिक करून दिले. रिझल्ट पेज स्पीड प्रमाणे ओपन होत होते..पहिली आडवी लाईन, दुसरी,तिसरी...(गजाने लक्षात आणुन दिलेला गायब रो ईथे स्पष्ट दिसत होता)..हळूहळू मला अपेक्षित असलेली लाईन व रो ओपन झाला!! आणी...माझा नकळत पाणावल्या डोळ्यातून मला माझा नंबर तेथे ठेवल्या सारखा दिसला!!
कित्ती मोठा दिर्घ वळसा!!! जे अपेक्षित, जे सापडायचं ते एवढ्या मिनतवारीने व एवढ्या नाट्यमयतेने?!!!
(अशा प्रसंगामुळेच तर माझी ही कथा मला दिर्घ स्मरणीय आहे) मी आरोळी ठोकली नाही, मी हर्ष व्यक्त करण्याच्या स्थित यायलाही मला थोडा वेळ लागला. सचिन हसत होता..तु पास होणार हे वाटंतच होतं..तु नापास झाल्याचा विश्वास बसत नव्हता असे म्हणाला. मी बाहेर येवून PCO वरून गावात मामाच्या घरी फोन करून आईवडीलासाठी पास झाल्याचा निरोप दिला. रूमवर जाऊन भैय्याला सांगितले. त्यालाही खुप आनंद झाला. मी ऊभा होतो. सचिन म्हणाला आता काय? मी खुप खुष होतो. मी म्हटले तु जा माझ्यामुळे तुला जेवणही नाही भेटले, त्यावर तो गंमतीने म्हणाला "अरे चल आता पुन्हा सगळ्यांना जेवायला भाग पाडू".... मी सगळ्या मित्रांना ही बातमी द्यावी म्हणून निघालो..सचिन टु व्हीलर चालवत खुशीत बोलत होता...मी मात्र मुक होवून अपयश व यश यात किती मोठा फरक असतो याची तुलना करत होतो. काही तासापुर्वीची स्थिती व आत्ताची स्थिती यातील बदलाची याची अनुभूती घेत होतो. कदाचित MPSC भविष्यात आपल्याला चकमा देवू शकत नाही म्हणून तिने आत्ता असा चकवा दिला असावा असा विचार डोक्यात येत होता...गाडीवर मला लागणा-या हवेने
मला गावच्या माळरानावरच्या हवेची आठवण करून दिली होती....मी तेथे त्यावेळी फेकलेल्या स्वप्न बिजांनी अडचणीचा पाषाण भेदून ..मुळ धरले होते..बिज अंकुरायला सुरूवात झाली होती..मला वृक्ष होण्याचा ध्यास पुकारत होता......(क्रमशः)