Friday, December 6, 2019

तु आभाळ दिलेस........



तु आभाळ दिलेस...
झेपावण्यासाठी पंख दिलेस
मानवतेचा निनाद करण्यासाठी
हाती आत्मभानाचे शंख दिलेस

तु दिशा दिलीस
तु मती दिलीस
खचल्या आयुष्याला
तु गती दिलीस

तु दान दिलेस जगण्याचे
तु आमच्यासाठी पाणी पेटवलेस
नष्ट करण्या गुलामी तु
मानवमुक्तीचे हाकारे उठवलेस

तु एक हाताने संघर्ष
दुस-याने बुध्द दिलास
"मुकनायकास" सा-या
तु "प्रबुध्द "केलास

तु झिजलास चंदन होवून
माझ्या पिढ्यांना सुगंध
तुझ्या महापरिनिर्वाणाने रे
माझा सुर्य झाला मंद

तु पुसला जात नाहीस
माझ्या धमन्या तुला वाहती
तुझ्या सावलीत रे अनंत पिढ्या
लख्ख प्रकाशकिरण पाहती

तु माई रे वंचिताची
तु शोषितांचा रे पिता
मोकळे केलेस रे श्वास
तु आयुष्याचा दाता

तु काळाचा कालातीत ठसा
तु मानवतेचे गोंदण
आमच्या सुखासिन आयुष्याचे
तु संजीवक कोंदण

तु मानवतेचा सागर
तु ज्ञानाचा अथांग
वाहून रे सा-या पिढ्या
न फिटे तुझे पांग...

तुझ्या महापरिनिर्वाण दिनी मानवमुक्तीचे स्फुल्लिंग चेतो....
तुला भावपुर्ण वंदन..
(प्रताप)
"रचनापर्व"
6/12/2019























Sunday, December 1, 2019

ओंजळीत पडणे...

हा रस्ता,
हे सांज व्यापले धुके
कोणाच्या आठवणीने
काळीज ठोका चुके???

हे गवत,
ही कुजबुजती हवा
भारून येते संध्या
हा गंध कोणता नवा???

हे शिलालेख
ते दगडाचे तुटके शब्द
धुळीत उमटते धुसर
कुठल्या राजाचे प्रारब्ध???

हा पिंपळपार
ही रिकामी जागा
चांद उगवत्या दिशेला
का मिळत नाही धागा???

हे झडले मोरपंख
त्याचा चकाके डोळा
का दाटून येतो मनात
मयुरपंखी सोहळा???

हे हुरहुरीचे गाणे
व्याकूळ व्याकूळ संगीत
कोणाच्या आभासाने
हा अंधार होतो रंगीत???

हे संध्याकाळचे येणे
जणु मृगजळाचे पाणी
का वाटते ती चांदणी
चमकते दिनवाणी???

हा टिमटिमता काजवा
त्याचा प्रकाशी कयास
का भिडत जाते मन
अंधाराच्या भयास???

हे शब्दफुलांचेअसे
नित्य नित्य झडणे
का टळत नाही कवितेचे
तुझ्या ओंजळीत पडणे???
(प्रताप)
"रचनापर्व"
दिनांक 1/12/2019
Prataprachana.blogspot.com










Saturday, November 30, 2019

स्वप्नांशी नित्य....


स्वप्नांशी नित्य...

माझ्या भासात ,माझ्या संभ्रमात
आठवणींचा साचे पाणवठा
तुझ्या गही-या डोळ्यात उमटे
माझ्या थकल्या हाकेचा शिणवटा

मी पेरले गाईचे हंबरडे
मी धुन हवेची चितारली
गोकुळातील बासरीधुन
कवितेत माझ्या उतरली

मी सांज धुक्याचे मृगजळ
आकाशावर सांडताना
हाताशी धरले इंद्रधनू मी
तमोरंग मांडताना

मी चेतवल्या चांदण्या
चंद्रमाळ ती पेटली
झिळमिळती रेशीमगाठ
अलवार अलगद सुटली

फुलांचे गंध झिरपती
हा बहरही शित झरतो
मावळे चंद्रकोर नभी
मनात चांदवा उरतो

गारवा शिलगतो अलगद
हवा जणू स्तब्ध होते
मनीचे गीत माझे तुझ्या
असण्यावर लुब्ध होते.

मी रातमग्न पहाटे
उघडावी चांदण्याची पेटी
रातीच्या कुशित व्हाव्यात
तुझ्या स्वप्नांशी नित्य भेटी
(प्रताप)
"रचनापर्व "
दिनांक 30/11/2019
prataprachana.blogspot.com












Monday, November 11, 2019

पसाभर चांदणे


पसाभर चांदणे

ओंजळीतुन ओघळणारा चांदवा
आभाळी माळताना
रातीच्या काळ्या कवडशाला
प्रकाशाने जाळताना

धुक्याच्या सांजवाती
मनात भिजवताना
समईचे तेवणारे लावण्य
नजरेत रूजवताना

मी माळावा निशीगंध
तुझ्या गंधाचे बहर पेरावे
फुलांचे आत्मेही मग
फांदीवर झुरावे

मी चकोराला ओढ द्यावी
मी द्यावी नदीला भरती !
हृदयी ऊचंबळणारा सागर
मी शिंपावा तुजवरती

मी चांदणे रंगवावे
मी चंद्रप्रकाशास सजवावे
तुझ्या ओल्या हाकेत
सारे आभाळ भिजवावे

मी माळ व्हावा अनंत
मी अनंतातुन तुजवर सांडावे
पसाभर चांदणे घेवून
तुझ्या अंगणी मांडावे....

मी हवेला तुझी
दाखवावी पायवाट
मातीवर उमटावा तुझा
पाऊलपैंजणी थाट

मी गवताच्या अंगावर
रानफुले पसरावे
दिवेलागणी वेळी
मी गावकुस विसरावे

मी शांत एकले व्हावे
मी उधाण पेरून द्यावे
खुल्या आभाळाखाली
मनी चांदणे भरून घ्यावे.
(प्रताप)
"रचनापर्व"
दिनांक- 11/11/2019
prataprachana.blogspot.com

Saturday, November 9, 2019

मनीचा समुद्र नदीकडे वाहतो...



मनीचा समुद्र नदीकडे वाहतो....

सांजधुक्यात ओलावलेला चांद
सांजेने स्पर्श केला
सोनतमाच्या किरणासवे
चंद्र धुक्यातून आला

मी टिपुन घेतला चांदवा
सांज सोनेरी झाली
मी शोधत राही माळरानी
तुझ्या धुक्याची खोली

झिरमीर झाल्या सायंकाळी
हि हुरहुरीची हवा
भारून उडतो आभाळी
क्लांत पाखरांचा थवा

लालीमेचे धुसर पट्टे
आकाशी कोण रेखले
प्राजक्ताचे कोसळले फुल
गंध पेरते एकले

दिवेलागणीचा प्रकाश धुकेरी
संध्या हळुवार दाट होते
आठवणींच्या ओहोळाची
मग रौद्र लाट होते

चंद्र ऊभारतो मग
तुझ्या कांतीचा मनोरा
भांबावल्या मनास माझ्या
न लाभतो किनारा

मी चांदण्यात न्हातो
मी चंद्रात तुला पाहतो
माझ्या मनीचा समुद्र सारा
तुझ्या नदीकडे वाहतो
(प्रताप)
"रचनापर्व"
दिनांक...कधिही, कोणत्याही दिवशी...
( 9/11/2019)
prataprachana.blogspot.com

Tuesday, October 8, 2019

अत्तरगंधी चंद्रकोर......



सांजनभिच्या शुक्रता-या
चमकत रहा नभी
साठवून घेईल नयनी
दारात रात ऊभी

ही अत्तरगंधी चंद्रकोर
झिरमीर झिरमीर वारा
चिंब सुगंधी झाल्या
नदीत वाहत्या धारा

गवत हिरवे डोले
प्रकाश चंदेरी पाहता
ही झुळुक का धुंदावे
तुझा गंध वाहता

पुलकीत होतो माळ
का सरसर फुटून येते
कृष्णाच्या आभासात
तुझी राधा दाटून येते

धुके पसरल्या राती
हा चांद धुसर होतो
उधाणल्या चंद्रप्रकाशी
स्वतःचा विसर होतो

हे रानभारले चांदणे
असे खुलुन येते
तुझ्या निव्वळ आभासात
मन भुलुन जाते

रान जागल्या होवून
देतो आठवणींचे हाकारे
रात्रीच्या अंधारात घुमती
चकोराचे पुकारे

मनाच्या बासरीला
मग सुचते तुझे संगीत
स्फटिकाच्या चांदण्याखाली
सावळी रात्र होते रंगीत...
(प्रताप)
"रचनापर्व "
8/10/2019
हिवाळ्याच्या चाहुलीचे शब्दबन...

Wednesday, October 2, 2019

गांधी मरत नाही:मारला जातो

गांधी मरत नसतो
तरीही तो मारला जातो
ईथे 'बुध्द'ही सोयीने
पोखरणात पुरला जातो

'बुध्द' मान्य नसणारे 'किडे'
पहा त्यांचे विषारी फुत्कार
आईन्स्टाईनलाही भारलेस
असा तु भारक चमत्कार

तुला पुसणारे अशांती हातच
करत असतात तुला अजुन रंगीत
यांच्या आरोळ्या, घोषणा, समर गीते
या सा-यावर वरचढ तुझे मानवता संगीत

तुझा द्वेषच त्यांच्यात खोलवर
तुला ठसवत असतो
तुला नाकारणारा हर एक
नेमका कोणाला फसवत असतो?

बुद्धाप्रमाणे तुझ्यावरही
इथे रोज होते चढाई
महत्व प्राप्तीसाठी करावीच लागते
त्यांना तुला मारण्याची लढाई

तरी तु उद्ध्वस्त होत नाहीस
तु बुडुन जात नाहीस
मानवता खुडणा-या हाताने
तु खुडुन जात नाहीस

तु बहरत जातोस आमचे हंगाम
तु महावीर ,महामुनीचे झाड ऊगवतोस
तुला पायदळी घेवून ऊंच होणा-याचे
खोटे महात्म्य ही तगवतोस

तु मोडत नाहीस तुटतही नाहीस
तु होतही नाहीस नामशेष
मानवतेच्या कणाकणातुन
दिसतात तुझे अवशेष

तु अमिट तुझ्या आत्मबलाने
आमच्या साठी मरून गेलास
गरजेप्रमाणे धावून येतोस
गरज संपता सरून गेलास

तु कोणाचा तरी अनुनय केलास
कोणी बुध्दाचाही करतो
कदाचित याच कारणाने ते आणी तु
ईथे द्वेषपात्र ठरतो

विषपेरत्या हातांना
नकोच असते तुझी सावली
तुला टक्कर देण्यासाठी ते शोधतात
एक नित्य नवी बाहुली

तु तथागताप्रमाणेच नेमका
अनुयायात नाहीस दिसत
लाठी धरला तुझा हात असतो
कुठेतरी दिनांचे अश्रू पुसत

तु आमच्या मिठ, कपडे, शेती
आणी देशासाठीही लढलास
तुझ्या मिठाला न जागणा-यावरही
तु कधीच नाही चिडलास

स्वातंत्र्य आले त्यावेळीही
तु आग विझवत बसलास
"हे!राम" म्हणताना ही
तु खुन्यावर हसलास

तुझ्या नावाने अनेकांचे
धंदे चालतात काहींचे चालत नाहीत
नफेखोरीच्या हव्यासाने
कोणी बोलतात कोणी बोलत नाहीत

तुझ्या नावाने, आणी नावावर
अनेक पिढ्या जगत आहेत
तुझा चष्मा घेवून ऊधार
आमच्या छात्या फुगत आहेत

तुला आजही आम्ही सोयीने आणतो
सोयीनेच करत असतो तुझा खुन
तु आपला गात रहा नेमाने
मानवमुक्तीची धुन, मानवतेची धुन


ता.क.

(त्यांनी लिहून घ्यावे आत्म्यावर
'महात्मा' मरत नसतो
काजव्याच्या टिमटिमीने
सुर्य झुरत नसतो!)


आदरणीय बापुस त्यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती निमित्त 'सविनयी' व 'सत्याग्रही' भावांजली!
(प्रताप)
"रचनापर्व"
2ऑक्टोबर 2019
(प्रहर: गांधीभक्तीची सकाळ )

Sunday, September 29, 2019

रंग बरसत असेल......


रंग बरसत असेल.....

आज खुप दिवसांनी 
"इंद्रधनू" एक पाहीला
सांजेसवे बुडून गेला 
आभास नुसता राहीला

आभाळल्या क्षितीजावर 
त्याने उधळले सप्तरंग
मनात उठले अनाहूत
ओले माळरानी तरंग

तुझ्या आभासाचे इंद्रधनू 
माझ्या आकाशी पसरले
अंधार गडद होवूनही ते
लुप्त होणे विसरले

काळ्या ढगांनी पावसाच्या
हा रंग कसा उधळला
नुसत्या तुझ्या आभासाने
माझा सांजकाल उजळला...

मी रंग घेतले तुझे
आठवणी केल्या रंगीत
भुरभुरणारे थेंब तुषारती
ओल्या पावसाचे संगीत 

मी थेंबझडीत ऊभा
तुजरंगाचा वर्षाव पाहीला
मनात माझ्या ओसंडून
का पाऊस असा वाहिला 

तो अल्पावधीतच असा
तुला पेरून गेला
रिक्त पोकळ्या मनात माझ्या
तुला भरून गेला

बहुधा पुढच्या मोसमात
तो असाच अवचित दिसेल
कोसळणारा पाऊसही मग
रंग बरसत असेल..
(प्रताप)
"रचनापर्व "
माझी पावसाळली कविता....
29/9/2019
prataprachana.blogspot.come

Thursday, September 26, 2019

?



तु भ्रम की वास्तव?
धुक्याला माझा प्रश्न
पावसाच्या ओलाव्याने
का होते मन तृष्ण

तु सुगंध की सुगंधी स्वप्न?
का लहरते हवेत ही दरवळ
डोंगर माळावर पसरून
का व्याकुळते ही हिरवळ

तु संगीत की गीत ओले?
की कृष्णाची बासरी
का दाटून येते मनात
एक आर्त कळ हसरी

तु एकांतातील स्वप्न की
स्वप्न पाहण्याचा एकांत?
मौन संधेच्या बोलक्यावेळी
का मनात दाटे आकांत

तु पडलेला विसरक्षण?
की येणारी आठवण
जणू पावसाळ्याच्या शेवटी
होते त्याची अपरिहार्य  पाठवण

तु आलेला दुरावा
की मनी दाटली जवळीक?
तु सरळसाधे जगणे की
आयुष्याची आगळीक
(प्रताप)
27/9/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Friday, September 20, 2019

आठवणी धावून येतात....


निर्जीव लोखंडी कांबीला
एक वेल बिलगली होती
बहराच्या धुंदीत मग
फुले विलगली होती

अप्राप्य सागराच्या ओढीने
एक नदी तरसली होती
पावसाची सर मग
आभाळधुंद बरसली होती

जिवलगा भेटण्यासाठी
एक रस्ता आतुर होता
शकुनाचा कावळा मात्र
फितुर फिरत होता

फुलपाखरांचे पंख
आभाळ झाकत होते
पावसाचे थेंब त्यांचे
रंग राखत होते

माती भिजत होती
सृजन झेलत होती
बहर झडली आमराई
वा-यात झुलत होती

वासुदेवाची गाणी
मनास भिडत होती
एक कोकीळा सुर लावून
मुक कुढत होती

पावसाची सकाळ अशी
उगाच दाटून आली होती
तु नसल्याची आठवण अशी
आभाळ फाटून आली होती

दिवस सारे आता
असेच वाहून जातात
पावसाच्या सरी सवे
आठवणी धावून येतात
(प्रताप)
"रचनापर्व "
21/9/2019
prataprachana.blogspot.com



Thursday, September 19, 2019

चांदणे भिजव....

चांदणदिवे जळताना
मी चंद्र टांगला नभी
सोनप्रकाशी सावलीत
दिसे निशा आतुर ऊभी
विसावलेले हंबरडे मुके
घरी पोचल्या गाईचे
सुस्तावलेले मंद गंध
सडे पडल्या जाईचे
लुकलुकतात गावभर
नुकतेच पेटले दिवे
मान खुपसून पंखात
निज झाले थवे
चंद्राच्या साथीने मग
माझे सुरू होते जागणे
आठवणींच्या व्याकुळ प्रहरी
असे बावर वागणे
तु गेला तो रस्ता
मला खुणावत असतो
चंद्र ही त्याच दिशेला
मंद पेटला दिसतो
मी हाक देत नाही
मला अवगत भाषा मुकी
बोलत असतो अंधाराला
होवून चंद्रमुखी
तुलाही फुलतुटलेपण येत असेल
अशा व्याकुळ रातवेळी
पसरत असशील प्रकाशासाठी
माझ्या चांदण्यासमोर झोळी
खुडुन घे काही चांदण्या
तुझेही दिवे सजव
सा-या माझ्या चांदण्याला
नयन किनारी भिजव
(प्रताप)
20/9/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

नित्य भेटत राहील.....

आभाळ पांघरून रात्र
चंद्र वरती टांगलेला
चांदण्यांचा पसारा
नभावर सांडलेला

हळुच ढकल दरवाजा
कळ्यांना येईल जाग
मुक चंद्रही काढेल मग
सुगंधी पावलांचा माग

मी नसेन तेथे
तु रिकामा अंधार पहा
अंधारात आठवत मला
मग सुन्न ऊभी रहा

काहीच न सुचुन मग
तु घे दिर्घ श्वास
खुल्या डोळ्यानी पहा तुझा
मोडुन पडता हव्यास

तुला 'फुलतुटलेपण' येईल
रिकाम्या फांदीसम वाटेल
चालत निघ मग तु
जिकडे रस्ता फुटेल

रस्त्यावर शोध मला
तु चांदणेही ढवळून काढ
अंधारात पाहून घे
ऊभे एकले झाड

आठव तुझे बहराचे दिवस
व्यक्त कर मग पोरकी खंत
परत निघ आपल्या वाटेने
टाकत पावले संथ

थकल्याने तु झोपण्याचा
प्रयत्न करत रहा
बंद-उघड्या डोळ्यांनी
फुलला चंद्र पहा

झोप लागेल बहुधा तुला
मला मनातुन पुसल्याने
तुझ्या झोपमोडीचे मलाच पातक
मी स्वप्नात पुन्हा दिसल्याने

तगमगीने उठुन बस
आभाळ पेटून येईल
तुझ्या तगमगीत असा मी
नित्य भेटून जाईल
(प्रताप)
"रचनापर्व"
19/9/2019
prataprachana.blogspot.com

Tuesday, September 17, 2019

प्रकाश माझा वाहिला....



मी पेरले
बागेत तुझ्या तनुचे गंध
मनाला माझ्या येई
तुझा सुवासी सुगंध
मी रेखाटले आभाळी
हे मुग्ध पिवळेचांदणे
शहारते रातीला मग
माथ्याचे लाजरे गोंदणे
मी डोळ्यात माझ्या
भाव तुझा रुजवला
हा चंद्र असा कोणी
ओल्या दवात भिजवला?
मी रात जागवली
मी पहाटेला पाहीले
तुझ्या गंधाचे निशीगंध
मग दारात वाहिले
मी आजही अनावर
तुला आठवून घेतले
रात्रीच्या अंधाराला
काळजात साठवून घेतले
मी दिशा जळताना पाहीली
मी सुर्य ऊगवताना पाहीला
अंधारातील तुझ्या प्रतिक्षेला
सारा प्रकाश माझा वाहिला....
(प्रताप)
"रचनापर्व"
17/9/2019
prataprachana.blogspot.com

Tuesday, September 10, 2019

संदूक.....

संदूक....

तो संदूक ऊघड
ऊकल ती परीटघडी
आठवणींच्या गंधाने मग
पाणवतील नयनथडी....°
खोलवर श्वास घे
मी अंतरी रूजेन
प्रतिक्षारत नयनात मग
मी धुसर सजेन....°°
आठवणींच्या वेलीस मग
फुले येतील लगडून
मिळव तो मिलनगंध
फुलांशी झगडून.....°°°
एक एक वस्तू मग
तु अलगद अलवार काढ
"त्या" भूतकाळास मग
"या "वर्तमानाशी ताड...°°°°
उसवेल मग जखम
तिला मनसोक्त वाहू दे
निर्जीव पडल्या वस्तुंना
तुझी सजिवता पाहू दे...°°°°°
डोळे मिटून घे हळुच
संदूक राहू दे उघडा
सुरू होईल तुझ्यात मग
अपूर्णतेचा झगडा...°°°°°°
आळवून घे मनसोक्त
मी असणार नाही
गंधाळुन जाईल रात्र
फुल दिसणार नाही..°°°°°°°
सवयीप्रमाणे मग तु
उघडा संदुक बंद कर
अंधाराशी झगडण्यासाठी
वात दिव्याची मंद कर.....°°°°°°°°
(प्रताप)
"रचनापर्व "
दिनांक 10/9/2019
prataprachana.blogspot.com

Sunday, September 8, 2019

काहूर बनाचे सडे...



सांज उगवती वेळ
राऊळी गलबल चाले
बुडत्या सुर्यात खुपती
काळ्या अंधाराचे भाले

चकोर गोंदण माथी
डोळा चांदणीची हाक
आभाळास मग येते
तुझ्या डोळ्यांची झाक

मी चांदणे पाही
भासे नयनांचा स्पर्श
चंद्राच्या कोरीस मग
सोनप्रकाशी हर्ष

चंद्रउगवत्या वेळी
तुझ्या हाकेचे पारायण
राऊळाच्या गाभारी
हेलावे नारायण

तुझा माझा ओढा
चंद्राकडे जातो
एक चंद्र दोघांकडे
उंचावरून पाहतो

तु तेथून मी येथुन
चंद्राला घालतो साकडे
स्पर्श करण्या ऊंचावले हात
पडतात मग तोकडे

चंद्र चांदण्या खाली
तु ऊभी स्तब्ध, शांत
तुझ्याच सारखा इकडे
माझा एक मुका आकांत........

ही सांजबहराची वेळ
काहूर बनाचे सडे
चांदण्याच्या प्रकाशात
मिळती आठवणींचे धडे.....
(प्रताप)
"रचनापर्व "
(8/9/2019)
prataprachana.blogspot.com

Tuesday, September 3, 2019

ते तसे तुझे होणे.....



  • ती सारंगी धुन
  • ते मखमली गीत
  • ते व्याकुळ शब्द
  • ते समर्पी संगीत

  • तो थिरकता पाऊस
  • ते थेंब नाचणारे
  • पावसाच्या क्षणात असे
  • हुरहुर शब्द सुचणारे

  • ती हिरवळ
  • ते शिवार बहरलेले
  • तुझ्या माळरानावर
  • माझे थवे विहरलेले

  • ती रोमांची हवा
  • तो तुझा गंध
  • स्पर्शाच्या मखमलीचे
  • सैलावणारे बंध

  • ते कुजबुजीचे निनाद
  • ते मुके बोलणे
  • स्वप्नांच्या धुक्यात मग
  • तरंगी चालणे

  • ते ओळखीचे जुनेपण
  • ते अगणित नवेपण
  • नसल्या क्षणात असे
  • दाटून येणारे हवेपण

  • ते रस्त्याचे वळण
  • तेथे स्वप्नांचे सांडणे
  • अशा अवेळी मग
  • अवघडे शब्दांचे मांडणे

  • ते पिंपळबन
  • ते पाखरांचे गाणे
  • हिरव्या पावसात मग
  • कंच ओले होणे

  • ते तसे तुझे होणे
  • स्वतःस विसरून जाणे
  • हिरवळ बनून तुझ्या
  • ओल्या मातीवर पसरून जाणे

  • (प्रताप)
  • 3/9/2019
  • "रचनापर्व"
  • prataprachana.blogspot.com











Monday, September 2, 2019

प्राजक्तबन.....

तुझ्या प्रतिक्षारत डोळ्यांना
रिक्ततेची सवय करून घे
सुर्याने पाठ फिरवल्याने
आला अंधार भरून घे

मी कधी लावलेल्या पणतीची
उरली वात पेटवून घे
ऊजेडाची तिरीप अशी
अलगद डोळ्यात साठवून घे

त्या रस्त्याच्या पाऊलखुणा
मनावरती कोरून घे
न उमटणारा माझा पायरव
कल्पनेने चोरून घे

निशीगंधाचे पडले सडे
अलगद तु सावडून घे
हृदयी भरला विरहगंध
नाईलाजाने आवडून घे

उगवलाच कधी चंद्र तर
त्याच्या कडे पाहून घे
गलबलणारे चांदणे येईल
एक चांदणीत राहून घे

ओळखीचा कधी सापडलाच शब्द
माझी कविता आठवून घे
अनंतव्यापी हाक दाबून
महाकाव्य तुझे पेटवून घे

एकाकी पणाच्या सांजवेळी
प्रतिक्षेचा दिवा जाळुन घे
आलेच कधी ओठी नाव
क्षण तेवढा टाळुन दे

मनावर तुझ्या शिल्प कोरले
त्याची घडण पाहून घे
फुललेच कधी प्राजक्तबन
तर...एक फुल वाहून घे

(प्रताप)
2/9/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Sunday, September 1, 2019

मी एके मी......

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 19: मी एके मी...!

पुर्वपरिक्षेचा निकाल आल्याच्या दुस-या दिवसा पासूनच मी मुख्यपरिक्षेच्या सखोल अभ्यासाला सुरूवात केली..काहीच माहिती नव्हती..सोबत अभ्यासाला कोणीच नव्हतं..जे करायचं ते स्वतःच करायचं..फक्त एक आत्मविश्वास होता " आपण मुख्यपरिक्षेचे पेपर चांगलेच लिहू"..निव्वळ या भरवशावर मी जिव ओतून अभ्यास करत होतो.पुर्व परीक्षेच्या क्लासला शिकवायला गेल्याने ब-यापैकी नाव झाले होते. खुप मुलांचे रिझल्ट आल्याने सगळ्यांची मागणी होती मी मुख्य परीक्षा पण शिकवावी.आणी लातुरात प्रथमच कल्पनेपेक्षा जास्त निकाल आले होते त्यामुळे सर्वांचा आत्मविश्वासही वाढला होता. मी मुख्यपरिक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जाणे आणी अभ्यास करणे यात गढून गेलो होतो. आजही तो दिवस आठवतो, मी पहिल्यांदाच मुख्यपरिक्षेचे सामान्य अध्ययन हा विषय शिकवायला गेलो , वर्गात जातो तर वर्गात अनेक दिग्गज बसलेले, त्यात अनेक पोस्टहोल्डर पण होते..पण मैदान दिसले की जसे घोड्याला फुरफुरायला होते तसेच झाले..मी न दबून जाता शिकवायला सुरूवात केली..अगोदर सर्वांनी साधारणपणे प्रतिसाद द्यायला सुरूवात केली..काही सिनियर व अनुभवी मंडळी समोर असल्याने प्रश्न अथवा चर्चा करायची तरी पंचायत! पण मी ठामपणे व नाविन्यपूर्ण मुद्दे व मांडणी सह शिकवायला सुरुवात केली आणी वर्गात हळुहळु मग सिनीयर्सनी पण दाद दिली..त्यांच्या नोट्स मधे पाॅईंट्स व प्रेझेंटेशन चे मुद्दे अॅड करायला सुरूवात केली. माझा आत्मविश्वास खुप वाढला...सिनीयर्सनी लेक्चर संपल्यावर विशेषत्वाने कौतुक केले.
मी त्यांच्या मोठेपणाने भारावून गेलो आणी ही लय व दर्जा घसरणार नाही याची दक्षता घेण्याचे ठरवले.

दिवस पुरत नव्हते, प्रचंड वेगाने अचुक अभ्यास, मांडणीचे नविन मुद्दे व पद्धती, लिहिण्याची विशेष शैली व समर्पकता या धर्तीवर मी अभ्यास करत होतो..माहिती नव्हतं की माझा अभ्यास कुठल्या दिशेने जात आहे. तपासण्याचे काही साधन नव्हते. फक्त एक माहिती होतं आपण निव्वळ अॅव्हरेज लिहून येणार नाही..वाचन, नोट्स काढणे, त्याला विशीष्ठ सादरीकरण देणे, उत्तर रेखीव व भरदार होण्यासाठी त्यात माहिती व इतर कंटेंटचा ऊपयोग करणे असे चालले होते..मी अभ्यासाव्यतिरीक्त करावे असे काही नव्हते आणी असले तरी ती चंगळ परवडणारही नव्हती. मी अक्षरशः खपत होतो..रूमवर ही जाणे कमीच झाले होते..जेथे अभ्यासाला बसायचो तेथेच रात्री लोखंडी खुर्च्या एकमेकांना जोडून मी झोपायला लागलो..कारण ती इमारत एका टोकाला होती आणी त्या भागात साप असल्याने खाली झोपणे योग्य नव्हते.

एके दिवशी एकटाच अभ्यास करत बसलो होतो.अचानक संतोष गोरड सर , जे मला काॅलेजला सिनीयर होते, (सध्या तहसीलदार, तत्कालीन नायब तहसीलदार) ते मी अभ्यास करत असलेल्या ठिकाणी आले. त्यांना अरूण पोतदार यांना भेटायचे होते. कारण त्यांनी पुण्यात मिळून अभ्यास केला होता. त्यांनी विचारपूस केली..आणी मला विचारले "तु काय वाचत आहेस?" मी त्यांना सांगितले "सर, मी राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहे". त्यांनी कौतुक केलं, आस्थेने विचारपूस केली आणी मी काय वाचत आहे हे त्यांनी पाहिले. मी त्यांना माझ्या नोट्स दाखवल्या,विचारलं सर, मी योग्य अभ्यास करत आहे का? त्यावर त्यांनी सगळं पाहिलं आणी मला म्हणाले" यु आर ऑन राईट ट्रॅक!!" त्यांनी खुप शुभेच्छा दिल्या , ते गेले , पण मला एक आत्मविश्वास आला मी जे करत आहे ते योग्य आहे..त्या हुरूपाने मी अभ्यास करत राहिलो.

मुख्यपरिक्षेच्या अनुषंगाने संदिप येत रहायचा, तो सांगत रहायचा, करत रहा ! होशील पास! .तांदळे सर कधी तरी यायचे..बोलणे व्हायचे. मी टिकून होतो. मुख्यपरिक्षेचे हाॅलटिकीट आले. लगबग सुरू झाले. आयुष्यात पहिल्यांदाच औरंगाबादला जायचे होते. एकीकडे अभ्यासाचा दबाव तर दुसरीकडे तेथे कोठे राहणार? किती पैसे लागतील याचे टेन्शन..कशीतरी जुळवाजुळव झाली पण दबाव होताच कारण तेच ! उसनवारी आणी तुटपुंजे पैसे! .संदिप पण तयार झाला मुख्यपरिक्षा देतो म्हणून. मी आणी संदिप जायचे ठरले. मी अभ्यासाच्या शेवटच्या टप्प्यात होतो..अभ्यास पुर्ण झाला की नाही हे कळत नव्हते. पण तरीही एक गोष्ट होती जी टिकवून ठेवत होती..."मुख्यपरिक्षा नापास होईल असे कुठलेच कारण नाही, म्हणून आपण पास व्हायचेच, आणी त्या शिवाय आपल्याला पर्यायही नाही हा स्वतःला दिलेला शब्द "


औरंगाबादला जायच्या अगोदर गावी जावून आलो, आई वडीलांनी चांगली परिक्षा दे म्हणून सांगितले, मी एक जबाबदारीचं भान घेवून निघालो..दोन दिवस अगोदर जायचे ठरल्याप्रमाणे आम्ही औरंगाबादला गेलो. एका लाॅजवर मी आणी संदिप थांबलो. संदिप अस्वस्थ होता..मलाही दडपण आले होते. दोघेही रिव्हिजन करत होतो. एकमेकाचा आत्मविश्वास वाढवत होतो. आमचे परीक्षा केंद्र वेगवेगळे होते. पेपरच्या आदल्या रात्री झोप येत नव्हती. डोळ्यासमोर उद्याचा पेपर येत होता..परिक्षा येत होती....नुसती तगमग...आणी सरतेशेवटी ती रात्र सरली..सकाळी आम्ही निघालो आपापल्या दिशेने..... एकट्याने लढावे लागते ,आपली वाट आपणच चालावी लागते हे जाणवणार क्षण..मी निघालो..खुप दडपण, अनोळखीपण, एकटेपण यावर मात करण्याच्या धडपडीत केंद्रावर पोहचलो..तेथे चालणारी एक गंभीर लगबग पाहून मीही गंभीर झालो...कोणीही ओळखीचे नाही ठार एकटेपण...आणी मनात येणारी अस्वस्थता, घालमेल, उत्सुकता, मुख्यपरिक्षेला पोहचल्याचा आनंद, पेपर कसा येईल याचा तणाव... रिव्हिजन....विचार..काय काय सुरू होते..माहिती नाही.....बेल वाजली...मी वर्गाकडे निघालो..वर्गात पहिले पाऊल टाकले..आणी...मन भरून आलं..या टप्प्यापर्यंत येण्यासाठी झुंज दिलेला सारा काळ क्षणात मनात दाटून आला....स्वतःला आवरून मी बसलो..स्वतःला बजावलं ..स्वतःतील सर्वोत्तम द्यायची वेळ आहे भावनाशिल होवून चालणार नाही...

पेपर आला..मराठीचा पेपर...हात फुरफुरायला लागले...त्या भारावल्या क्षणात मी निबंध लिहायला घेतला.."साहित्य व समाज सुधारणा"...लिहीत गेलो..पुस्तके समाजाला कसे घडवतात..माझ्यासारखे कसे घडतात याचा अंश घेवून मी स्वैर लिहीत होतो..इंग्रजी, हिंदी, मराठी, भाषेतील साहित्य, लोकसाहित्य, अनुवादित साहित्य, समाज घडवलेल्या महान धुरीणीचे साहित्य ...मी लिहीत गेलो..पेपर सोपा गेला..परत आलो खुशीत होतो..संदिपला पण सांगितले, तु अवघड विषय निवडलास..फारच कमी पोरांनी हा विषय निवडला..पण काळजी करू नको अवघड विषय लिहिल्यास शक्यतो चांगले मार्क येतात..त्यात तु साहित्यिक भाषेत लिहीले आहेस चांगले मार्क मिळतील असे म्हणून त्याने आत्मविश्वास वाढवला..नंतर इंग्रजीचा पेपर दिला ...तो मात्र अवघड गेला टेन्शन आलं...पण त्याचा परिणाम पुढील पेपर वर होणार नाही याची काळजी घेतली. सामान्य अध्ययनचे पेपर संपले..मी सर्व पेपर सोडवत होतो..लिहीणे शिल्लक राहत नव्हते..सर्व प्रश्न अॅटेम्पट केल्याने आत्मविश्वास येत होता ..आता फक्त दोन ऐच्छिक विषयाचे पेपर होते..साधारणतः सहा दिवस परिक्षा शिल्लक होती..

आणी अचानक संदीपने सांगितले मी पुढचे पेपर देणार नाही..लातुरला परत जात आहे..धक्काच बसला..कसेतरी तगत होतो..एकमेकांना आधार देत होतो..हिम्मत ढासळू देत नव्हतो ..तर हे मधेच...मला दुहेरी टेन्शन आलं..परिक्षे बाबत एकटेपण तर आलेच होते..पण घेतलेली रूम , तीचे भाडे शेअर होत होते..आता अशा अचानक घटनेमुळे संकटंच आले होते..बोलता ही येत नव्हते...पण न बोलता ही कळेल असे जिगरी दोस्त असल्यानेच तर मी संकटांना तोंड देवू शकत होतो...संदिपने मला सांगितले, मी माझ्या मित्राला बोललो आहे, त्याचे क्वार्टर आहे तेथे तु शिफ्ट हो, सध्या त्याची पत्नी गेल्याने तो एकटाच आहे तुला व त्यालाही डिस्टर्ब होणार नाही...कारण तो सकाळी ऑफिसला निघुन जाईल तुला अभ्यास करता येईल....पण तरीही मी खुप अस्वस्थ झालो...औरंगाबाद मधे एकटेच अनोळखी ठिकाणी राहून राज्यसेवा मुख्यपरिक्षा द्यायची वेळ आली होती संदिपला शिव्या घालाव्या की त्याने परस्पर अडचण सोडवली म्हणून आभार मानावे कळत नव्हतं....तो लातुरला आला आणी मी त्याच्या मित्राकडे रहायला गेलो..एक अदृश्य हात पुन्हा मदतीला धावून आला होता...

मी माझ्यामुळे त्याच्या मित्राला काही त्रास होईल असे काही होवू नये याची काळजी घेवून तिथे अभ्यास करत होतो..आणि तो बिचाराही माझी तेवढीच काळजी घेत होता..मी अभ्यास व एकटेपणाचे दडपण काय असते याचा घेतलेला हा सर्वात भयानक अनुभव...त्या वर्षी बॅंकिंग हा विषय खुप जणांनी घेतला होता त्यापैकी मी एक तो पेपर झाला..ठिक गेला..लोकप्रशासन हा माझा दुसरा ऐच्छिक विषय होता दोनशे मार्कांच्या या पेपर साठी दोन उत्तर पत्रिका मिळायच्या शंभर शंभर मार्कांचे लोकप्रशासन व दुसरी व्यवस्थापन या विषयासाठी, हा विषय या कारणामुळे खुप कमीजण घ्यायचे..मी तो घेतला होता..पेपर चांगला सोडवले..एकंदरीत मुख्यपरिक्षा ही ठिकच्या पातळीपेक्षा खुप चांगली गेली होती..मी संदिपच्या मित्राचे आभार मानले.. एक मोठा टप्पा पुर्ण करून मी परत निघालो..

ज्या गाडीत मी होतो त्याच गाडीत मला काॅलेजला लोकप्रशासन शिकवणारे ठोंबरे सर ही भेटले, त्यांनी विचारपूस केली, पेपर पाहिले..सोपे पेपर आले होते ..व्हाल पास म्हणून शुभेच्छा दिल्या..मी आभार मानून माझ्या जागेवर बसलो..औरंगाबाद मागे पडत होतं..मी आजपावेतो या टप्प्यापर्यंत येण्यासाठी खुप खस्ता झेलल्या होत्या..रोज याच कारणाला घेवून मी दिनक्रम आखला होता. आता मुख्यपरिक्षा पार पडल्याने त्या दिनक्रमात बदल होणार होता..रोज जे करत होतो ते आता बदलावे लागणार होते..माहिती नव्हते काय होणार होते..मी ही विचाराची आणी येवू घातलेली अनिश्चितता झटकली..व निकालाच्या अनिश्चिततेत स्वप्नरंजन करू लागलो... गाडी धावत होती रात्र गडद होत चालली होती...आणी मी त्या अंधारात दुरवर दिसणा-या हर लुकलुकणा-या दिव्यात माझी प्रकाशवाट शोधत होतो.......(प्रताप)
(क्रमशः)




Saturday, August 31, 2019

....मुक्ती....?


तुलाही तगमगून यावे कधी
गुलाब सुकला  पाहून
तु हळुवार तपासावेस मग
माझे गेले शब्द  वाहून

तु शोधावीस माझी कविता
माझ्या शब्दांनी अदृश्य व्हावे
तुझ्या निःश्वासानी मग कळवळून
आर्त विरहीणी गावे

जो जो तु करावा पुकारा
गीत माझे मुके व्हावे
शोधणा-या तुझ्या नजरेत
मग धुके ओले दाटून यावे

माझी आर्जवे अव्हेरल्याने
तुझ्यात रितेपण भरून यावे
तुझ्या अवेळी धैर्याचे मग
जितेपण सरून जावे

छळावा तुला आजही
त्या ठेवल्या गुलाबाचा गंध
पौर्णिमेचा चंद्र ही भासावा
जणू जळता दिवा मंद

त्या तुझ्या जुन्या वहीला
माझ्या कवितेचा भास व्हावा
दोन ओळीत नसलेला शब्दही
मग तुजसाठी खास व्हावा

नसलेपणाची व्यथा काय असते
मग तुलाही नक्की  कळेल
माझ्या अमर्याद अंधारात जेंव्हा
तुझे ऊभे चांदणे जळेल

तु फाडशील वही, साधशील तु
हा गुलाब चुरगळून युक्ती
पण तुझ्या आत्म्यात रूजल्या
शब्दगंधापासून कशी मिळवशील मुक्ती......?

(प्रताप)
31/8/2019
"रचनापर्व"

Friday, August 30, 2019

प्राजक्त सडे...

               


झडले प्राजक्त सडे
                             गंधाची हलकी दरवळ
                             मातीच्या ओलाव्यातुन
                            अंकुरे अलगद हिरवळ

     सुर्य उगवण्या पुर्वी
     हा प्रकाश फुलून येतो
     रातीचा सखा हा असा
     तिचा तत्पर निरोप घेतो

                           रातीचाही न निघे पाय
                           न प्रभाप्रकाश दिर्घ राही
                           सूर्याच्या किरणापुर्वी प्राजक्त
                           त्यांचे धुसर मिलन पाही

    संध्याप्रकाश बनून मग पुन्हा
    तो रातीस भेटण्या येतो
    स्वतःत भरून तमगंधास तो
    रातीत मिसळून जातो

                           हर सकाळी विलगताना
                           दोघेही व्याकुळ थोडे
                           या व्याकुळ क्षणांचे साक्षी
                           हे कोसळलेले प्राजक्त सडे
(प्रताप)
31/8/2019
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com







Wednesday, August 28, 2019

आठवणींचे हाकारे....

आठवणींचे हाकारे......

पावसाच्या तुषाराचे
हे असे ओढ़ गाणे
वा-याच्या झुळकीने
भिजुन जाती पाने

साद ओली आर्त
थेंब थेंब मग कोसळे
ढगांच्या आतखोलवर
ओला पाऊस ऊसळे

ही भुरभुरणारी आठवण
आज शिंपली कोणी
हलक्या तुषारांतुन मग
रंग सांडला बेभानी

शब्दांनाही ओल फुटे
हिरव्या रंगास ओढ लागे
कोसळणा-या सरी का विणती
ओल्या आठवणींचे धागे

कानी मनी घुमती
तुझ्या मुक सादेचे पुकारे
पाऊस असा हा ओला
ऊठवी आठवणींचे हाकारे
(प्रताप)
29/8/2019
"रचनापर्व"



Saturday, August 24, 2019

भिजकी वही.....



भिजकी वही....
शब्द ही झाले ओले
वाहिल्या फुलांचे
जणु निर्माल्य जाहले

वाहून गेले शब्द ठसे
राहिल्या भाव खुणा
धुसर शाई मांडे ठळक
आपुला ॠणानुबंध जुना

तो पिंपळ ही मुका
हुरहुर नुसती वाहतो
आभाळाच्या सांजकडेतुन
एक ढग पाहतो

ती वाट अधिरतेने
का अनंताकडे चाले?
फुलांचा पडला सडा
का सुगंधातुन बोले?

झुळुक सुगंधी होवून
ओल्या वहीला स्पर्शते
निर्माल्याचा घेवून गंध
का काव्य हर्षते?

शब्दवेड्या कवितेस लागे
भिजल्या वहीचे पिसे
शब्दावर मग ऊमटून घेते
तुझे गोंदण ठसे

हृदयाच्या आत खोलवर
'तु ' पण रूजुन गेले
अमिट तुझे असणे असे
जरी शब्द भिजुन गेले...
(प्रताप)
"रचनापर्व"
25/8/2019





Saturday, August 17, 2019

ओल्या आठवणींचे झुले....




ओल्या ओल्या वाटा
मंद चंद्र भिजलेला
ओल्या पाखरांचा थवा
पंखाआड निजलेला

ओल्या ओल्या झुळुकीतुन
एक पुकारा येई
चिंब भिजल्या वाटेवर या
भास कुणाचा होई?

ओल्या ओल्या फांदीवर
पानांना येई शहारा
शिलगत्या अंधारावर या
प्रतिक्षेचा पहारा

ओल्या ओल्या रातीच्या
अंधाराआड प्रकाश दडे
आकाशातुन चंद्र पाझरे
सोनसरीचे सडे

ओल्या ओल्या क्षणात
सय दाटून येते
निशीगंधाची साद बावरी
श्वासात गोठून जाते

ओल्या ओल्या डोळ्यांना
पावसाचा येतो रंग
इंद्रायणीत तरंगे मग
एक आर्त अभंग

ओल्या ओल्या रातव्यात
असे सारे होते ओले
चंद्राला भिडतात मग
ओल्या आठवणींचे झुले.....
(प्रताप)
18/8/2019
" रचनापर्व "
















Sunday, August 11, 2019

बेभान पावसा...लक्षात ठेव...!!

(• महाराष्ट्रात आलेल्या महापुराशी भिडलेल्या सर्व झुंजारूना समर्पित•)
.
आम्ही केली तुझी आर्जवे
नांगरून ठेवली होती शेती
पावश्या करवी पुकारून तुला
रापवून ठेवली माती

हिरवे स्वप्न पाहताना
तु मात्र पेरून गेलास गाळ
शिवारासह कोलमडले घर
वाहीला रानोमाळ

घर बुडाले सारे
गुरे गेली वाहून
सुन्न झाली मती
तुझे तांडव पाहून

तु फिरलास सगळा गाव
अडगळीतही आमच्या आलास
कळसावर चढून ऊंच तु
मंदिर धुवून गेलास

तुला शाळेतही यावेसे वाटले
तु वर्गात बसलास ठाण मांडून
'ये रे,ये रे पावसा 'म्हणना-या
चिमुकल्यांशीही गेलास भांडून

नेलेस जरी तु सारे वाहून
तरी आम्ही ऊभे राहू
आमच्या झुंजीने देवू टक्कर
कोण थकते ते पाहू.

हाताला हाताचा आधार आहे
खांद्याला भिडलाय खांदा ईथे
डोळ्यात अपार घेवून आशा
गाताहोत आम्ही समर गिते

आम्ही गाळ ऊपसु
आम्ही बांधुन घेवू गावे
खोडून काढू आम्ही तुझे
मोडून पडण्याचे दावे

अशा अनंत सुल्तानी आस्मानी
आम्ही भोगल्या आहेत
तेंव्हाच "स्वराज्याच्या पताका"
महाराष्ट्रात लागल्या आहेत

आम्ही हे समर ही जिंकु
तुझ्या नजरेतही अभिमान असेल
पुढच्या मोसमात आमची माती
जेंव्हा रापुन तुझ्यासाठी हसेल...

(प्रताप वाघमारे, तहसीलदार नागपुर-● 9422642842)
●"रचनापर्व"●















Saturday, August 10, 2019

○ कवितेचे थवे...○



स्वतःच्या अस्तित्वाचे
विस्कटलेले धागे शोधण्या
प्रतिमेचे औजार घेवून
निघतो तमगर्भ खोदण्या

तमअदृश्य सावली
मी सोबतीला घेई
अभिव्यक्त होण्याची
मग दाटून येते घाई

चेतवतो मग असे
मी प्रतिकांचे दिवे
हाकारतो आर्जवाने
कवितेचे थवे

अंधार गहिरताना
मनिचा प्रकाश झुंजत राहतो
मी धागे भावनांचे
हळुवार पिंजत राहतो

मी लढतो, मी भिडतो
मी शोधत राहतो शब्द
भोवतालच्या अंधारातुन
मी टिपतो कवितेचे प्रारब्ध

अंधाराच्या काळजावर
नित्य देतो मी शब्दांचे ठसे
संपत नाही तरीही
स्वअस्तित्व शोधाचे पिसे...

●(प्रताप)
10/8/2019
"रचनापर्व "●


















Tuesday, August 6, 2019

हिमतीचा द्यावा टाका



नसतो कधी प्रकाश!
संधिप्रकाशावर भागते
अंधाराच्या काळजावर
मग एक पणती लागते.

फाटलेच कधी आभाळ तर
हिमतीचा द्यावा टाका
अपार सा-या कष्टाने
लांघावा हरण्याचा धोका

घडत नसेल नशिब
तर द्यावेत घणांचे घाव
जिद्दीने कोरावे मग आपण
त्याच्याच कपाळी नाव

येतात अनंत अडचणी
तरीही द्यावी पावलांना दिशा
मरू न द्यावे कधी मनातील
झुंजण्याची नशा

कर्तृत्वाचा कैफ न येवो
जमीनीवर सदैव रहावे
जिंकण्याच्या जल्लोषातही
हरणा-याचे दुःख पहावे

नाही पोहचत आवाज तरी
देत रहावी साद
उधळून द्यावे समर्पण
अन् रहावे निर्विवाद

होते तरीही कधी टिका
त्यास टाकाचे घाव मानावे
गाळून स्वतःतील दगडपण
स्वतः सुबक बनावे.

निर्भय होवून मानवतेचे
गित सदैव गावे
फुलून येण्या सारे
स्वतः पाऊस बनून जावे
(प्रताप)
7/8/2019
"रचनापर्व "









Monday, August 5, 2019

सडा फुलांचा उरतो..






आज पुन्हा पक्षी भिजले
सर अनाहूत आली
भिज मनाने झेप घेवूनी
चिवचिव झाली ओली..

साद भिरभिरे अनंतात
ओल्या ओल्या हाका
पंखांच्या ऊबेआड मग
अवकाश होई मुका

अंधारातून ढग वाहतो
समर्पणाची धारा
मोहरून जाते दिशा एकली
सरसरतो हा वारा

फुल ऊमलते मुक्यामुक्याने
सुगंध मातीत झरतो
सकाळ होता ऊंच भरारी
सडा फुलांचा उरतो...
(प्रताप)
6/8/2019
"रचनापर्व "

Sunday, August 4, 2019

मातीचा टाहो फुटावा...



काळ्या ढगात दडलेले
हिरवे कंच गाणे
सर बनून कोसळताना
मन उधाणून येणे...

भिजलेले रस्ते अन्
ओली ओली वाडी
झाडाच्या फांदीखाली दिसे
प्रतिक्षारत बहर घडी

थेंबाथेंबाने सारे
अवकाश चेतून गेले
हिरवे हिरवे स्वप्न अनोखे
मातीत रुतून आले

बहर मनाचा उमलून आला
गंधाळल्या पाऊस धारा
चिंब भिजल्या मातीचा
रंग हिरवा सारा..

मी थेंबगाणे ऐकत
मुका एकला ऊभा
तुझ्या -हृदयी रूजण्याचा
माझा अव्यक्त मनसुबा

बहर यावेत नात्यांना
विश्वासाचा पाऊस यावा
तुझ्या माझ्या मनाला मग
मातीचा टाहो फुटावा
(प्रताप)
5/8/19
"रचनापर्व "






Friday, August 2, 2019

पावसा.....


पावसा...

तु आलास घेवून असे
हिरवे पालवीचे गाणे
ओल्या मातीत अंकुरले
मग सृजनाचे उखाणे

पावश्याने असे आर्त
गीत रे कोणते गाईले ?
ढगांचे अंतःकरण असे
कळवळून कोसळून वाहीले

मातीचा ओला पुकारा
तुझ्या थेंबातुन झरतो
एक ओला पक्षी अवकाशी
तुला झेलत फिरतो..

ओक्याबोक्या झाडांनी
तुला अलगद धारण केले
उजाड माळरानांचे मग
क्षण हिरवे झाले...

कोसळणे तसे वाईट
पण तुझे मात्र भावते
तुला पेरण्या कवितेत
शब्दांचे भले फावते..

माझ्या खिडकीचा कोपरा
तुझ्या रिपरिपीचे गाणे
तुझ्या ओल्या सरी सोबत
मन गाव शिवारात जाणे

तुला अनंता पासून शिवार बनून
मी दर मोसमी पुकारतो
तुझ्या सरीचे दान हिरवे
ओल्या ओंजळीत स्विकारतो..

कुंद एकल्या मनातही अशा
तुझ्या बरसाव्यात सरी
जगण्याची हिरवळ फुलुन यावी
हर मलूल झाल्या ऊरी...

( प्रताप)
4/8/19
"रचनापर्व"



















Sunday, June 23, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 18: निकालाने दिलेला चकवा....!



स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 18: निकालाने दिलेला चकवा....!


         परिक्षा खुप जवळ आली होती.PSI च्या परिक्षेची तयारी करणारे सर्व मित्र पुन्हा राज्यसेवा कडे वळले. आता त्यांना खुप कमी दिवस मिळत आहेत राज्यसेवा पुर्व परिक्षा तयारी साठी याची जाणीव झाली. माझ्याकडच्या मी काढलेल्या नोट्सला घेण्याची झुंबड व्हायची ,रिव्हिजन साठी व एकत्रित सारेच मुद्दे जवळपास त्यात होते त्यामुळे सर्वांनाच फायदा व्हायचा. मी ही त्या देत असे कारण मला ही त्यात नविन काही अपडेशन करायला मिळायचे. सर्वांचा अभ्यासाचा झपाटा वाढला. पावसाळ्याची चाहूल लागल्यावर मुंग्या जशा वारूळ बनवायला भिडतात!! तसे सर्व जण अभ्यासाला भिडले होते. मीही त्यात सामील झालो. अभ्यासात, अभ्यासाच्या कालावधीत व अभ्यासाच्या दर्जात मी कुठेच मागे पडत नव्हतो. तो अक्षरशः झपाटलेला काळ होता!! एकाच 15×15 च्या खोलीत आम्ही सगळे जण अभ्यासाला बसायचो, पण रात्री सगळे गेल्यावर झोपताना कोण कुठल्या रंगाचा शर्ट घातला होता हे आठवायचा प्रयत्न केला तर तो आठवायचा सुध्दा नाही!!! कारण काय? तर अभ्यास करण्याच्या चक्कर मधे तेवढीही उसंत व सैलपणा घेतलेला नसायचा. भारून जाणे काय असते जर कोणी सांगत असेल तर मला तोच काळ आठवतो आजही!!!! अभ्यासाच्या ठिकाणी कोण येत आहे, कोण येवून गेले? काही लक्ष नाही. एके सायंकाळी रूम बाहेर निघताना दाराच्या जवळच्या लोखंडी खुर्चीवर डझनभर केळी असलेली एक पिशवी ठेवलेली दिसली..प्रत्येकाला वाटले आमच्या पैकी कोणी आणुन ठेवली असेल..!! रात्री रूमवर गेल्यास भावाने सांगितले वडील येवून गेले होते..! आणी जाताना सांगुन गेले होते. "जपून अभ्यास करायला सांग त्याला , जास्त ताण घेवू नको म्हणावं! " मला हुरहुर लागली! रात्री आपोआप डोळ्यात पाणी आलं..रात्रभर विचार..डोळ्या समोर पावसात गळणारं घर..आई वडीलांचा चेहरा.. अभ्यासाच्या विषयातील मुद्दे, नोट्सच्या कोप-यात वेगळ्या शाईने लिहिलेले चालू घडामोडीचे मुद्दे... रूम वरील ओढाताण..सगळंच दाटून येत होतं..स्वप्न झोपू देत नव्हतं.........!!!!



          शेवटच्या टप्प्यात अक्षरशः अभ्यासा व्यतिरिक्त काहीच केलं नाही. माझी रूम जवळच असल्याने मी रात्री सर्वात शेवटी निघत असायचो..पण शेवटी शेवटी असं वाटायचं की फक्त 5 तासासाठी रूमवर कशाला जात बसू? मग मी कधी कधी तेथेच थांबू लागलो. तिन लोखंडी खुर्च्या जोडायच्या आणी मिळेल तेवढी झोप घेवून, सकाळी सगळे येण्या अगोदर तेथेच तयार होवून बसून जायचे...हिमायत भाई पहाटेच हाॅटेल सुरू करायचे..थोडासा चहा घेतला की मग दुपार पर्यंत दगडाची मुर्ती बनून जायचो. सर्वांचा अभ्यास खुप चांगला झाला होता. दररोज अपडेशन, डिस्कशन, रिव्हिजन, व्ह्यल्यु अॅडिशन...बस्स..जणु रणधुमाळीच...अभ्यासात एवढी हातघाई आणी चढाओढ की..जणु अभ्यास केला तरच जिव वाचणार आहे..परिक्षेचा दिवस येइतो अक्षरशः सारे मुखोद्गत झाले होते..

         सरते शेवटी 30 मे आला..मिळालेल्या हाॅल टिकीटला कितीतरी वेळा पाहून ठेवले होते. सगळे जण एकत्र भेटलो..परस्परांना शुभेच्छा दिल्या. चुका करायच्या नाहीत, येते ते चुकायचे नाही, जे येत नसेल त्यालाही सहजासहजी सोडायचे नाही, रोल नंबर व उत्तरांचे गोल काळे करताना त्यांचा क्रम, हे दोन्ही चुकवायचे नाहीत.एकापेक्षा अधिक काळे बाॅलपेन घेतले का? ते व्यवस्थित रूळवलेले आहेत का? इत्यादी लहानात लहान तपशील एकमेकांना विचारून, आम्ही निघालो. मी जाताना कुठलेही दडपण येणार नाही याची काळजी घेत होतो..परिक्षा केंद्रावर पोहचल्यावर पाहीले, भरपूर गर्दी, गर्दीत ओळखीचे चेहरे..कोणी सिनीयर्स, कोणी नवखे.. कोणी घाबरलेला,कोणी उत्साहात, कोणाच्या पोटात गोळा उठत आहे..कोणी मित्रमैत्रिणीना बोलत आहे...मी एका कोप-यात ऊभा होतो...स्वतःला शांत ठेवत..बजावत स्वतःला "आपल्याला एकही चुक परवडणार नाही..." वडीलांचे शब्द आठवत होते.." घडी गेली की पिढी जाते" मी ही परीक्षेची घडी आयुष्यातून जाऊ द्यायची नाही हा निग्रह करून वर्गात गेलो...

       पेपर मिळाला..प्रत्येक गोष्ट अचुक ठरवल्याप्रमाणे घडत होती..प्रश्नाची गुंतागुंत भुलभुलैया तयार नाही करू शकली.. थेट ऊत्तरापर्यंत पोहचू शकत होतो. केलेला अभ्यास, मित्रांचे योगदान कामी येत होते..जसजसे प्रश्न सुटत होते,तसतसा आत्मविश्वास येत होता. प्रथम टप्प्यात आलेले दडपण निघून गेले होते.....वेळे अगोदरच येणारे प्रश्न सोडवून संपले होते ..ऊरलेल्या वेळात न येणा-या प्रश्नाना सोडवण्यासाठी प्रयत्न केला..त्यातील भरपूर प्रश्न बरोबर आल्याचा विश्वास वाटत होता. वेळ संपली..पेपर समाधानकारकरित्या सुटला होता..पण वाटते तसे काही नसते..जो पर्यंत आन्सर की शी ताडून पाहत नाही तो पर्यंत काहीच सांगता येत नसते हे माहित असल्याने त्वरीत अभ्यासाच्या ठिकाणी पोहचलो..एकेकजण जमले...अगोदर एकमेकाचा चेहरा पाहून घेऊन ,पेपर कसा गेला? हे विचारून सगळे जण उत्तरे शोधायला बसलो.( त्या काळी MPSC आन्सर की देत नसे) 200 पैकी बहुतेक प्रश्नाची उत्तरे(192) शोधली. अत्यंत अवघड प्रश्नाची उत्तरे पण आमच्याकडे होती. उरलेले प्रश्नाची उत्तरे इकडे तिकडे फोन करून घेतली. अत्यंत अभिमान तेंव्हा वाटला जेंव्हा पुण्यात पण दोन प्रश्नाची उत्तरे सापडत नाहीत असे तिकडून सांगितले गेले, त्यावर त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही सांगितले. ( ते माझ्या नोट्स मधे होते)खरंच असा ग्रुप होणे नाही!!!

       सर्व सोडवलेले प्रश्न तपासून घेतले. आम्ही सगळेच सेफ झोन मधे होतो!! मला खुप आनंद झाला.माझा रिझल्ट पॉझिटीव्ह येईल याचा अंदाज आल्याने मी लगेच मुख्य परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी जुळवाजुळव करायला सुरूवात केली. संदिप म्हणाला "अबे! मरशील ना, एक तर दिवस थांब!" मी ऐकूनही माझे काम सुरूच ठेवले.मुख्य परिक्षा माझ्या टाईप साठी अत्यंत योग्य होती. दिर्घोत्तरी स्वरूपाची!! मला माझी स्ट्रेंथ माहीत होती. मी कितीही अवघड पेपर आला तरी उत्कृष्ट लिहू शकतो हा आत्मविश्वास मला होता. मी नुकतीच M.A. ची परीक्षा दिली असल्याने लोकप्रशासन हा एक विषय जवळपास तयार होता पण त्याला MPSC च्या पध्दतीने तयार करायचे होते. जनरल स्टडीज, ईंग्रजी, मराठी व बॅकिग हा दुसरा ऑप्शनल निवडून मी तयारी करायला बसलो.
पुर्व परिक्षा झाल्यानंतर तांदळे सर, अतुल पाटील यांच्या रजा संपल्या ते जाॅईन झाले. अरूण भैया बाहेरगावी निघून गेले. राहिलो मी आणी संदिप!! संदिपचा खरा इंटरेस्ट ऑब्जेक्टीव्ह टाईप परिक्षेत होता. दिर्घोत्तरी प्रश्नाच्या परिक्षेला मला मर्यादा येतात हे तो स्वतः कबुल करायचा. आणी ते होते ही खरेच! कारण 200 पैकी पुर्व परिक्षेला 192 बिट असणारा तो एकटाच होता!! मी परिक्षा झाल्यानंतर एकदा घरी जाऊन आलो. आईवडील व दोन्ही भाऊ यांना माझे पेपर चांगले गेल्याचा खुप आनंद झाला होता. माझा पुर्व परिक्षेचा रिझल्ट येणारच या बाबत त्यांना माझ्या एवढाच आत्मविश्वास होता. मी जवळपास एकट्यानेच अभ्यास करत होतो. मुख्य परिक्षा कशी असते. कसे पेपर सोडवायचे असतात या बाबत निव्वळ कोरी पाटी!! पण शाहू काॅलेज व दयानंद काॅलेज मधे कला शाखेत शिकायला मिळाले होते!! मी अत्यंत कल्पकतेने मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागलो. पुर्व परिक्षेचा निकाल कधी लागेल याचा विचार असायचा सतत मनात. एक महिन्याने एम ए चा निकाल लागला युनिव्हर्सिटीच्या गुणवत्ता यादी मधे यायला फक्त 3 मार्क कमी पडले. पण हे मार्क्स काही कमी नव्हते. आता प्रचलीत पध्दतीने ऑफिसीयली काॅलेज शिकणे संपले होते!!

          दरम्यानच्या काळात कधी कधी दोन तीन दिवस सेंटर कडे कोणीही यायचे नाही. मग मी तरीही बसायचो एकटाच ....अभ्यास करत .दरम्यानच्या काळात मला मुख्य परिक्षा साठी सोहम सोबतच ज्ञानप्रबोधिनी या क्लासेस वर संचालक सुधिर पोतदार सरांनी शिकवण्यासाठी बोलावले. तेथेही तयारी करणा-यांची संख्या खुप चांगली होती. विशेष म्हणजे तेथे धन्वंतकुमार माळी सर ( नंतर Dy.Ceo), महेश वरुडकर सर (माझ्या सोबतच कक्ष अधिकारी) ज्योती चव्हाण मॅडम( नायब तहसीलदार), भांबरे सर , प्रकाश कुलकर्णी सर या सर्वांचा संच तेथे भेटला. पण तेथे मी शिकवायला जात असल्याने एकत्रित अभ्यास करायला मिळाला नाही कधी! तसेही आमचा ग्रुप वेगळ्यानेच अभ्यास करत होता. व तिकडे ते अभ्यास करत असत. तेथे शिकवताना जाणवले की, मुख्य परिक्षा बाबत आपल्याला नैसर्गिक समज तर आहेच पण विषय मांडण्याचीही विशेष शैली आहे. कारण शिकवत असताना या सिनीयर मंडळीकडून कधी निगेटिव्ह फिडबॅक तर आला नाहीच. उलट त्यांनी प्रचंड कौतुकच केले.शिकवत असताना काही सिनीयर्सनी त्यांच्या मटेरिअल मधे व्ह्यल्यु अॅडिशन होत आहे हे स्पष्टपणे सांगितले. आत्मविश्वास होताच ! तो वाढला.( कदाचित मी असा एकमेव असेन, ज्याने स्वतः पुर्व परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवले, ती झाल्यावर मुख्य परिक्षा देत असतानाच इतरांना शिकवायची संधी मिळाली, आणी मुलाखतीची तयारी करताना ही इतरांना मुलाखती बाबत शिकवायला मिळाले...!! इतर सर्वजण सिलेक्शन झाल्यावर अथवा परिक्षेचा तो विशीष्ठ टप्पा पुर्ण झाल्यावर त्या अगोदरचा टप्पा इतरांना शिकवतात पण मी ज्या टप्प्याची तयारी करत होतो त्याच काळात तो द्यायच्या अगोदरच इतरांनाही शिकवत होतो) नंतरच्या काळात ज्ञानप्रबोधिनी लातुर मधे गेस्ट लेक्चरर म्हणून रंजन कोळंबे सर, राहूल माकणीकर सर (सध्या DCP नागपुर पोलीस -ज्यांनी महाराष्ट्रात STI मधे रेकाॅर्ड मार्क्स घेवून सिलेक्शन मिळवले, सबंध महाराष्ट्रात ज्यांचा नावलौकिक त्यांच्या अभ्यासामुळे व शिकवण्यामुळे होता व नंतर त्यांचेही आमच्या सेम बॅचमधेच Dysp म्हणून सिलेक्शन झाले.) यजुवेंद्र महाजन सर इत्यादी दिग्गजांशी तेथे संबंध आला. मी शिकवलेल्या विषयात तेथील मुलांची झालेली तयारी पाहून माकणीकर सरांनी केलेले कौतुक तर प्रचंड आत्मविश्वास देवून गेले..

        मी एकट्याने शिकत होतो, शिकवायला जाण्याने माझी मेन्सची दशा व दिशा योग्य आहे याचा अंदाज आल्याने मी तयारी वेगाने करत होतो. दिवसभर सोबत बसेल असे कोणी नव्हते. संदिप, तांदळे सर , अरूण भैया येत रहायचे अधुन मधुन .मी तेथेच अभ्यासाला बसायचो. पोलीस बाॅइजची एक बॅच आली. अरूण भैयाही मग रेग्युलर येवू लागले, कारण त्यांनाच ती बॅच चालवायची जबाबदारी होती. तेथे मला भारतीय राज्यघटना शिकवण्याची संधी मिळाली. एकदा भर रंगात येवून शिकवत होतो. अचानक नांगरे पाटील सर वर्गाच्या दारात ऊभे!!. थोडेसे टेन्शन आले पण मी शिकवण्याची गती व पद्धत बदलली नाही. सर साधारणतः2 मिनीटे थांबून , पाहून ,जाताना सर स्माईल करून गेले! ते निघून गेल्यावर मला जाणवले की अक्षरशः सर होते !

        पुर्व परिक्षा होवून खुप काळ लोटला होता..निकाल लागण्याची चिन्हे दिसत नव्हती. एक तर खुप गॅप नंतर, 2003 ची म्हणून 2005 मधे हातात आलेली जाहिरात ! पहिल्या वर्षी पुर्व परिक्षा तर दुस-या वर्षी मुख्य परिक्षा होणार आहे हे माहित नव्हते!!! अस्वस्थता दाटून येत होती. निकाल कधी लागेल याची खात्री नव्हती. दरम्यानच्या काळात PSI पुर्व परिक्षेचा निकाल लागला!! आख्खा ग्रुप पास झाला!! अर्थात मी ही!! पण मला वेध लागले होते ते राज्यसेवा पुर्व परिक्षा निकालाचे, सर्वजण PSI मुख्य परिक्षेचा अभ्यास करू लागले . इंग्लिशच्या तयारी साठी प्रा. लखादिवे सर मार्गदर्शक म्हणून लाभले. त्यांनी अत्यंत तळमळीने आम्हाला शिकवले. दरम्यानच्या काळात मी माझ्या स्तरावर मुख्य परिक्षेचा अभ्यास करत होतो.वडील अधून मधून निकाल कधी आहे म्हणून विचारायचे. त्यांना PSI चा निकाल आला आहे हे सांगितले. पण ते विचारायचे राज्यसेवे बाबत!!

          दरम्यानच्या काळात बरिश्ता हाॅटेलवर सगळेजण जमा होत होते.मी ज्यांना शिकवायचो, ज्यांना मला भेटायला यायचे आहे ते तिकडे यायचे. मग आम्ही अभ्यास, तयारी यावर बोलत असू..दरम्यानच्या काळात संदिपचा पुर्वाश्रमीचा( पण आमचा सगळ्यांचाच !!) मित्र, कायम धडपड्या, अत्यंत उत्साही व दोस्तीच्या व्याखेत चपखल बसणारा मित्र राजेंद्र ढाकणे शालेय पोषण आहार अधिक्षक म्हणुन सिलेक्ट झाला होता. त्याला अगोदर पासून ओळखत असल्याने खुप आनंद झाला. संदिप ही खुष होता. पण तो हलकेच एक मर्मभेदी प्रश्न विचारायचा,"कधी होइल यार आपले सिलेक्शन?"..मी त्याला आधार द्यायचो तो मला मानसिक आधार द्यायचा!!

           गज्या अनायसे सुट्टीला लातुरला आला होता, तो एम बी ए करून एका कंपनीत पुण्यात जाॅब करत होता. सचिन आडाणे पण होताच . एके सकाळी ते दोघेही बरिश्ता कडे आले. आमची चर्चा सुरू होती. शाळा काॅलेजचे मित्र असल्याने जरा जास्त आत्मीयतेने चर्चा सुरू होती. लवकर काही तरी सिलेक्शन झाले पाहिजे या बाबतच बोलत होतो तेवढ्यात बातमी आली आज पुर्व परिक्षेचा निकाल लागू शकतो!! एकदम धाकधूक वाढली! सगळे जमा व्हायला लागले! त्या काळात निकाल कलेक्टर ऑफिस मध्ये फॅक्स ने यायचा. पण MPSC ने नुकतीच वेबसाईट सुरू केली होती. सगळे जमा झाल्यावर वातावरणात एकदम टेन्स वाढून गेला. सगळे जण बसून बोलत तर होतो पण कधी चार वाजतील आणी कधी निकाल येईल याचीच वाट बघणे सुरू होते!! सरते शेवटी आम्ही सगळेच जण कलेक्टर ऑफिसला निघालो. तेथे पोहचल्यावर पाहीले खुपजण जमा झाले होते. दोन तीन वेळा आत जाऊन विचारणा केली. निकाल लावला जाईल म्हणून सांगितले, मन कशातच लागत नव्हते. सरतेशेवटी निकालाची प्रत भिंतीवर लावण्यात आली. खुप गर्दी होती..गर्दीतुन काही जण पास झाल्याचा निकाल लागल्याच्या खुशीत ओरडत तर काही जण पांढरा पडलेला, नाराज झालेला चेहरा घेवून बाजूला निघत होते. आम्ही ही गर्दीत घुसलो. आम्ही निकाल पहायला सुरूवात केली. अरूण पोतदार पास! , संदिप जाधव पास! तांदळे सर नापास!! माझाही नंबर काही केल्या मला सापडला नाही! लातुर सेंटर वरून एकुण 107 मुले पास झाली होती. काही तरी गल्लत होत असेल म्हणून मी पुन्हा पुन्हा माझा नंबर पाहीला. माझा चेहरा पाहून तो पर्यंत बाकीच्यांनी ओळखले..गज्या ने मला बाजुला घेतले. आम्ही काहीही न बोलता परत निघालो.परत येत असताना क्लासेस वरील मुले भेटली. विचारलं काय झाले ? मी सांगितले माझा नंबर नाही या यादीत म्हणून. थोडंसं पुढे आल्यावर मागून आवाज येत होता" असं होवूच शकत नाही, वाघमारे सर, प्रकाश कुलकर्णी सर यांचा अभ्यास खुप चांगला आहे पण तरीही त्यांचा रिझल्ट गेला यावर विश्वास बसत नाही " मी काहीच न बोलता परत आलो. सगळे जण जमा झाले होते. यशापयशाची चर्चा, समीक्षा , काहींना निकाल गेल्याचं दुःख,तर काहींना निकाल आल्याचा आनंद..! गेलेले आलेल्यांच्या आनंदात मनातुन सहभागी होवू शकत नाहीत आणी मित्रांचे निकाल गेले म्हणून ज्यांचे निकाल आले ते मनातुन आनंद व्यक्त करत नाहीत. यशापयशाचा फरक जाणवतो लगेच!! एक दिर्घ दरी असते...लांघताही येत नाही टाळताही येत नाही!!!

          मला प्रचंड दुःख झालं होतं. मी मनातुन अक्षरशः मोडून पडलो होतो, काय चुकलं, काय कमी पडलं, आपण तर सगळंच केलं होतं..तरीही निकाल निगेटिव्ह???? मनात प्रश्नाचं वादळ आलं होतं. काही बोलताच येत नव्हतं. परत येतो तो मोठा भाऊ राहूल भैय्या आणी वडील आलेले..लगेच त्यांनी ताडलं..मोठ्या भावाने विचारले..तुझा तर खुप अभ्यास झाला होता...पण जाऊ दे पुन्हा तयारी करू! असे तो म्हणाला. वडील म्हणाले PSI चा निकाल आलाच आहे तर त्याची तयारी कर तो पर्यंत पाहू राज्यसेवा देता येईलच !! मी मात्र मनातल्या मनात कुढत ऊभा होतो. माझ्या डोळ्यासमोर घर..येणारे एकटेपण, अभ्यास हे सगळं तरळत होतं . आता मी काय करणार होतो???? ते खुप वेळ बोलले. आणी मला समजवून निघून गेले. माझा मूड व चेहरा पाहून संदिप पण समजवत होता, बाकी सगळे जण समजावत होते..सरतेशेवटी या परिस्थितीत सर्वांनी तोडगा काढला आपण सगळे जेवायला जाऊ. थोडंसं वातावरण बदलेल..पुढचा विचार करता येईल. मला बिलकुल ईच्छा नव्हती. मी नकार दिला..सगळे जण माझ्यावर चिडले एवढे टेन्शन कशाला घेतो म्हणून, पण माझं आक्रंदनारं मन मी ऊघड करू शकत नव्हतो, हे सगळं सुरू असताना गजा शांत होता! तो काही तरी विचार करत होता. तो अचानक बोलला " किती जण पास आहेत लातुर सेंटर वरून?" कोणीतरी सांगितले 107! त्यावर तो म्हणाला ," लावलेल्या फॅक्स प्रिंट मधे 107 नंबर होते!! , म्हणजे जर ऊभ्या लाईन 14 होत्या तर आडव्या लाईन मधे 8 नंबर पाहिजे होते कारण शेवटच्या आडव्या लाईन मधे फक्त 3 नंबर होते!! म्हणजे 13×8= 104 + शेवटच्या आडव्या 14 व्या रांगेतील 3 मिळून 107 होतील, पण मी पाहिल्या त्यावेळी आडवी लाईन ही 8 ऐवजी फक्त 7 नंबरची होती. प्रत्येक आडव्या लाईन मधला शेवटचा नंबर अर्थात शेवटचा अख्खा ऊभा रो गायब आहे!!!!!" माझा श्वासच अडकला! मीही कॅल्क्युलेशन करून पाहीले तर गजाचे बरोबर होते!!


          मला एकदम तगमग झाली. सगळे बसले असल्याने मी एकटा पुन्हा कलेक्टर ऑफिसला जाऊन पाहीले गजाचे बरोबर होते! कोणाला विचारायला जावे तर ऑफिस बंद झाले होते. MPSC ऑफिस ही बंद झाले होते. मी यादी पुन्हा पाहिली माझ्या अगोदर चा नंबर व माझ्या नंतरचा नंबर याच्या दरम्यान लावलेल्या यादी प्रमाणे 647 नंबरचा चा गॅप होता , नेमका त्या 647 पैकी ज्याचाही नंबर आला असता तो रो च नव्हता व तो ही गजाने सांगितल्या प्रमाणेच!! अर्थात त्या शेवटच्या गायब रो मधे या 647 पैकी कोणीही असु शकत होते !! मी सुध्दा!! मी धावतच परत आलो. मी सगळ्यांना सांगितले. माझी एक्साइटमेंट नंतरही नकारात्मक निघाल्यास मला जास्तच धक्का बसेल याची संभाव्यता गृहीत धरून मला सर्वांनी एकदम शांतपणे प्रतिसाद दिला. एमपीएससी रिझल्ट वेबसाईटवर टाकणार आहे त्यावेळी पाहू सध्या सोबत चल म्हणून मला सर्वांनी अक्षरशः बळजबरी गाडीवर बसवले. मी आता खुपच तणावात आलो होतो. एमपीएससी माझ्या सोबत चकवा-चकवीचा खेळ करत होती. मी कुठल्याही तिरावर नव्हतो. अधांतरीच लटकत होतो!!!

         सगळे जण जेवण करत होते. मी खुप परेशान होतो. तोंडदेखल्या पध्दतीने हां हुं करून बोलत होतो. सगळे जण लातुर शहराबाहेर आले होते. त्यांचे जेवण होईतो मला धिर धरवत नव्हता! मी फक्त पाणी प्यायलो होतो. मला झालेल्या पराभवातुन बाहेर पडण्यासाठी एक अंधुकसा प्रकाश किरण दिसत होता. ना मोबाईल होता त्या काळात ना काही सुविधा! ऊठून परत यावे म्हटले तर कोणा सोबतच तरी यावे लागणार! मी 7.45 पर्यंत कशी तरी वाट पाहीली!! सरतेशेवटी मी जातो कसाही तुम्ही बसा म्हणून मी निघणार तो सचिन म्हणाला चल ! आपण जाऊ!! खरंतर त्याला माझी तगमग पाहवत नव्हती!! परत येताना तो गाडी चालवत चालवत मला समजावत होता, " आला तर आला रिझल्ट, नाही आला तर टेन्शन घेवू नको! पाहता येईल!"


           माझे लक्ष सगळे इंटरनेट कॅफेवर कधी पोहचतो या वरच होते! आम्ही पोहचलो! सुदैवाने बरिश्ताच्या काॅम्पलेक्स मधेच इंटरनेट कॅफे होते.गडबडीत मी आणी सचिन पोहचलो! मी भरभर टाईप करून MPSC ची साईट सर्च केली. हळूहळू ती उघडत होती..मी दिर्घ श्वास घेत होतो..मेन पेज आले. त्यावर रिझल्ट वर क्लिक करून दिले. रिझल्ट पेज स्पीड प्रमाणे ओपन होत होते..पहिली आडवी लाईन, दुसरी,तिसरी...(गजाने लक्षात आणुन दिलेला गायब रो ईथे स्पष्ट दिसत होता)..हळूहळू मला अपेक्षित असलेली लाईन व रो ओपन झाला!! आणी...माझा नकळत पाणावल्या डोळ्यातून मला माझा नंबर तेथे ठेवल्या सारखा दिसला!!

         कित्ती मोठा दिर्घ वळसा!!! जे अपेक्षित, जे सापडायचं ते एवढ्या मिनतवारीने व एवढ्या नाट्यमयतेने?!!!
(अशा प्रसंगामुळेच तर माझी ही कथा मला दिर्घ स्मरणीय आहे) मी आरोळी ठोकली नाही, मी हर्ष व्यक्त करण्याच्या स्थित यायलाही मला थोडा वेळ लागला. सचिन हसत होता..तु पास होणार हे वाटंतच होतं..तु नापास झाल्याचा विश्वास बसत नव्हता असे म्हणाला. मी बाहेर येवून PCO वरून गावात मामाच्या घरी फोन करून आईवडीलासाठी पास झाल्याचा निरोप दिला. रूमवर जाऊन भैय्याला सांगितले. त्यालाही खुप आनंद झाला. मी ऊभा होतो. सचिन म्हणाला आता काय? मी खुप खुष होतो. मी म्हटले तु जा माझ्यामुळे तुला जेवणही नाही भेटले, त्यावर तो गंमतीने म्हणाला "अरे चल आता पुन्हा सगळ्यांना जेवायला भाग पाडू".... मी सगळ्या मित्रांना ही बातमी द्यावी म्हणून निघालो..सचिन टु व्हीलर चालवत खुशीत बोलत होता...मी मात्र मुक होवून अपयश व यश यात किती मोठा फरक असतो याची तुलना करत होतो. काही तासापुर्वीची स्थिती व आत्ताची स्थिती यातील बदलाची याची अनुभूती घेत होतो. कदाचित MPSC भविष्यात आपल्याला चकमा देवू शकत नाही म्हणून तिने आत्ता असा चकवा दिला असावा असा विचार डोक्यात येत होता...गाडीवर मला लागणा-या हवेने
मला गावच्या माळरानावरच्या हवेची आठवण करून दिली होती....मी तेथे त्यावेळी फेकलेल्या स्वप्न बिजांनी अडचणीचा पाषाण भेदून ..मुळ धरले होते..बिज अंकुरायला सुरूवात झाली होती..मला वृक्ष होण्याचा ध्यास पुकारत होता......(क्रमशः)

Thursday, June 20, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 17: स्वतःला आकार देताना...


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 17:  स्वतःला आकार देताना...


    जाहिरात आली!! लगबग सुरू झाली होती, खुप बाबी करायच्या होत्या. सगळ्यात पहिल्यांदा पब्लिकेशन कडे गेलो. चापेकर सरांना सांगितले, "सर! आता काम शक्य नाही. मला तयारी करायची आहे " सरांनी कुठलाही किंतु परंतू न ठेवता शुभेच्छा दिल्या, तयारी कर म्हणाले. मागे हटू नको आता, हे ही सांगितलं. पण शेळके सर नाराज झाले.त्यांनी इतर
दुस-याकडे भावना व्यक्त केली की, "कशाला हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला आहे हा! एवढे सोपे असते तर मी कशाला पब्लिकेशन काढले असते!" मला वाईट नाही वाटले, उलट स्फुरण चढले. जिद्द जागी झाली. तयारी करताना अपयश येणार नाही याचा चंग बांधला.

       खुप कामे करायची होती! दुष्काळी कालखंडात जशी पाखरे दूरदेशी ऊडून जातात तशी आमच्या ग्रुप ची अवस्था झाली होती. सगळे विखुरले होते..पण आता एकत्र येण्याची लगबग सुरू होणार होती.कारण सगळे पिचले होते, त्रासले होते ,आता एकत्र येवून तयारी करणे हा एकमेव मार्ग शिल्लक होता आमच्या समोर .पण अभ्यासाला बसायचे कोठे? कशी तयारीची सुरूवात करायची? कोणकोण बसणार? काही सुचत नव्हते. तांदळे सर, अरूण भैय्या आणी मी तिन दिशेला तिन टोक ..पण आता ती एकत्र सांधने, या शिवाय पर्याय नव्हता. आम्ही तिघे भेटलो. काय करायचं आता? या वर गहन चर्चा झाली.पण मार्ग सुचत नव्हता..... पण तुमच्या स्वप्नात जिव असेल, त्यात चैतन्य असेल, आणी तुम्ही हॄदयाच्या तळापासुन तुमच्या स्वप्नांची आराधना करत असाल, आणि ते वास्तवात आणण्यासाठी मरेतो मेहनत करण्यास सिध्द असाल तर ...नियती स्वतः दोन पावले समोर येवून बंद दरवाजे सताड ऊघडत असते.....!! आणी एक किमयागार तुम्हाला मार्गस्थ होण्यास मदत करत असतो!!!( द अल्केमीस्ट पुस्तक खरं आहे!!!!)


         मा. विश्वास नांगरे पाटील सर!!!! एक महत्वाचं नाव!! (सरांना आज माहिती ही नसेल त्यांच्या एका पुढाकाराने तेथे धडपडणा-या आयुष्याला आधार मिळाला, फक्त त्याची एक झलक त्यांना 2018 साली सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच
ISO:9000 झालेले वळसंग पोलीस स्टेशन, त्याचे उद्घाटन करताना आमच्या पैकीच एका जिगरबाज ठाणेदारांनी त्यांना सन्मानपुर्वक करून दिली! त्या सहका-याचा संदर्भ येईलच) सर नुकतेच लातुरला पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांना पोलीस कल्याणनिधीतुन पोलीस पाल्यासाठी स्पर्धापरिक्षा, पोलीस भरती अनुषंगाने भरीव काही करायचे होते. त्यांनी तसा मनोदय व्यक्त केला. अरूणभैय्याचे वडील पोलीस उपनिरीक्षक होते. अरूण भैय्या सरांना भेटले व त्यांनी सरांना विनंती केली. पोलीस पाल्यांना शिकवण्यासाठीची इच्छा दर्शवून त्यांनी ती जबाबदारी मिळवली. व त्यासाठी त्या पोलीस पाल्यांना शिकवणा-यांना पुर्वतयारी करण्यासाठी व पोलीस पाल्यासाठी पुस्तके लागतील व त्यांना बसण्यासाठी एक रूम व शिकवण्यासाठी हाॅल लागेल हे ही नमुद केले. सरांनी त्वरीत प्रतिसाद देत आवश्यक ती सारी पुस्तके ऊपलब्ध करून दिलीच पण त्या सोबतच एस पी ऑफिसच्या प्रांगणातच ऊपलब्ध एक रूम ग्रंथालय व अभ्यासिकेसाठी तर मुख्य इमारतीत तळ मजल्यावर शिकण्यासाठी हाॅल ऊपलब्ध करून दिला. अत्यंत महत्वाची अडचण अशी अनाहूत दुर झाली...

       मला हुरूप मावत नव्हता. आम्ही एस पी ऑफिस मधे अभ्यासाला बसणार होतो. लातूर मधे अभ्यासीका नावाचा प्रकार नव्हता, त्या काळात अशी सुविधा मिळणे म्हणजे अप्रूपच!! आम्ही सगळे अर्थात मी, अरूण भैय्या, तांदळे सर, रोहिणी पोतदार( API) (अरूण पोतदार यांची बहीण जी ग्रुप मधे सगळ्यात अगोदर PSI पदी सिलेक्ट झाली) असे सगळेजण बसणार होतोआणी या ग्रुप मधे नंतर जाॅईन झाला संदिप जाधव (ASST. DESK OFFICER). बसण्याची व्यवस्था झाली होती. अभ्यासाला पुस्तके होती. आता फक्त अभ्यास करणे महत्त्वाचे होते.मी सर्व इतर बाबी सोडून अभ्यास करू पाहत होतो.आता कसलाही वेळ वाया घालायचा नाही असे ठरवून मी एक एक दिवस पाहत वेळापत्रक बनवले.सर्व अभ्यासक्रम व्यवस्थित पाहून आपल्याला काय येतं काय येत नाही, याचे सखोल विश्लेषण केले. मागील प्रश्नपत्रिकेत पाहून कुठल्या विषयावर/ टाॅपिकवर किती व कसे प्रश्न विचारले आहेत याचा वस्तुनिष्ठ अंदाज घेतला. सगळ्या जुन्या नोट्स संदर्भास घेवून अत्यंत सचोटीने पहिल्या विषयापासुन नव्याने अभ्यासाला सुरूवात केली. तत्पुर्वी आम्ही सर्वांनी एकत्र बसून गहन चर्चा केली. त्यात अत्यंत तळमळीने ठरवले की खुप अभ्यास करायचा. आता कुठलीच कसर ठेवायची नाही. पुन्हा पुन्हा संधी येणे नाही. मला तर दुसरा चान्स घेणे परवडणारच नव्हते. मैदान दिसल्यावर जणू घोडा फुरफुरतो तशी अवस्था झाली होती. मी कुठल्याही अमिषाला, अडथळ्याला बळी पडायचे नाही, काहीही झाले तरी अभ्यासापासुन दुर जायचे नाही असे ठाम ठरवून टाकले, सामुहिक प्रतिबध्दता तर होतीच पण स्वतःशी इतकी घट्ट खुणगाठ बांधली होती की नशीबाने जरी ठरवले असते की मला तयारी करू द्यायची नाही तर मी नशीबालाच बदलायचे असे ठरवून सिध्द झालो होतो....

         रोज सकाळी 6.00 वा उठायचे. एसपी ऑफिसच्या लाएब्रेरीत जायचे.उपाशी पोटी अभ्यास होत नाही म्हणतात पण ते उपाशी पोटंच अभ्यासात जाज्वल्य आणायचे! दरम्यानच्या काळात जाहीरात आल्यास वडील येवून गेले होते.अभ्यास कर, कुठल्याही स्वरूपात वेळ वाया घालवू नको म्हणून सांगुन गेले. वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी सांगितले की गावाकडून टिफीन पाठवतो, त्या प्रमाणे ते गावाकडचा मिलिंद नावाचा मित्र ( गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करायचा), नितीन ( मामाचा मुलगा जो त्या काळात वेगळ्या गॅरेजवर काम करायचा पण नंतर एम एस डब्ल्यू करून तो आता जाॅब करतो) अथवा गावाकडून कोणी येत असेल तर त्याच्या जवळ पाठवायचे.तो टिफीन येणा-यावर अवलंबून असायचा. व शक्यतो तो कधी नितीन सोबत राजीव गांधी चौक(रूम व एस पी ऑफिस पासून साधारणतः 3 कि.मी. दुर ) तर कधी मिलिंद सोबत शाम नगर येथे यायचा. शाम नगर मधे आला तर तो लवकर भेटायचा. पण राजीव गांधी चौकात आला तर मात्र जायचा प्रश्न. मग दुपार उलटून गेली तर तो तसाच रहायचा कधी तरी भुकेची तिव्र जाणीव झाली तर मग कधी मित्राच्या गाडीवर, कधी सायकल तर कधी संदिप सोबत जाऊन आणी पर्याय नसल्यास चालत जाऊन तो आणला जायचा. दोन वेळचा डबा असायचा तोच दुपारी तोच रात्री. पण कुठलीच तक्रार नव्हती. असेल तर खा नाहीतर तसेच बसायचो..काही फरक पडत नव्हता. अभ्यासाचा एवढा ध्यास लागला होता की भुकेचे चोचले परवडत नव्हते.
        आधाराला हिमायत भाई चे छोटेखानी हाॅटेल सुरू झाले होते एस पी ऑफिस च्या कोप-यावर ..."कॅफे बरिश्ता"!!!!
( नजीकच्या भविष्यात ते एमपीएससी चे मुख्य केंद्रबिंदू झाले. लातूर मधील त्या काळात एमपीएससी करणारे जवळपास सर्वजणच तेथे भेटायला, चर्चेला यायचे...ते हाॅटेल अनेक सिलेक्शन आणी अनेक स्ट्रगल चे साक्षीदार आहे...हा पाॅईंट स्पर्धा परिक्षा क्षेत्रातील महत्वाचा साक्षीदार आहे, तेथे आजही आमच्या मित्र परिवारातील विविध पदावर कार्यरत सर्व मित्र परिवार एकत्र भेटतो.. पण या हाॅटेलची ही स्थिती सुरूवात होते ती आमच्या ग्रुप पासून...बहुतेक मीच ती सुरूवात केली) जास्त भुक अनावर झाली तर हिमायत भाई कडे जाऊन चहा घ्यायचा..पुन्हा येवून बसायचे.. हिमायत भाई वेळ प्रसंगी ऊधार द्यायचे...आम्ही अभ्यासाचे ठिकाण सोडत नव्हतो, सकाळी 6 ते रात्री 12 अहोरात्र फक्त अभ्यास..! कोणाचे काय झाले..कोणाच्या घरी लग्न आहे, कार्यक्रम आहे, नविन मुव्ही आली, लातुरला कोणी सेलिब्रेटि येत आहे, सण आहे, मित्रांची पार्टी आहे कश्या कश्याचा मला फरक पडत नव्हता( आणी तो सुदैवाने सिलेक्शन होईतो पडलाही नाही! आणी तो न पडल्याने काही बिघडलेही नाही!!!)

    सुदैवाने आमचा ग्रुप अभ्यासाबद्दल फक्त गंभीरच नव्हता तर त्या सोबतच यात कठोर मेहनत करण्याची उर्मी पण होती, त्या सोबतच येथील प्रत्येक जण कुठल्याना कुठल्या विषयात विशेष कौशल्य बाळगून होता...सर्व जण अभ्यासाला असे भिडले होते..जणू उद्याच परिक्षा आहे. दररोज अभ्यास, नियमित गटचर्चा, सामुहिक वेळापत्रक, वैयक्तीक पाठपुरावा ..आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत..काही लपवाछपवी नाही..सर्व जण परस्परांना पुढे चालण्यास मदत करण्यास तत्पर.. चुकत असल्यास खडसावणे.. अभ्यासात कसूर झाल्यास जाणीव करून देणे की खुप दिवसानंतर जाहिरात आली आहे, महाराष्ट्रभर खुप मुलं अभ्यास करत आहेत...त्यामुळे स्वंयशिस्ती सोबतच सामुहिक शिस्त पण होती...हे सारे जण वेळोवेळी मदतीला सहकार्याला सोबत नसते तर...कदाचित काळाच्या रेट्यात मी पण अनामिक कथा बनून गेलो असतो...अनंत वेळा ठरवूनही आम्ही एकमेकाचे उतराई नाही होवू शकत....

        दररोज सोबतचे सहकारी नवनवीन पुस्तके वाचायला घ्यायचे..मला माहीत होते एवढी पुस्तके आपण घेवू शकत नाही त्या साठी मी सर्व ऊपलब्ध पुस्तकांचा संदर्भ घेवून झपाटल्याप्रमाणे माझ्या नोट्स काढायला सुरूवात केली..दरम्यानच्या काळात PSI/STI/ASST. ची पण जाहिरात आली..8मे 2005 ला ही पुर्व परिक्षा, 30 मे 2005 ला राज्यसेवा पुर्व परिक्षा अशा तारखा होत्या...ग्रुपमध्ये थोडी चलबिचल सुरू झाली. अगोदर 8 मे ची तयारी करू असा मानस व्यक्त केला गेला..मी त्यात सामील व्हायचे नाही असे ठरवले..मला राज्यसेवाच करायची होती मी त्या प्रस्तावास नकार दिला व तुम्ही करा हवे तर मी राज्यसेवाच करणार असे सांगितले.त्यावर प्रतिक्रिया पण आल्या, अगोदर PSI ची तयारी करू, राज्यसेवा खुप अवघड आहे तुलनेने, किमान एक तरी सिलेक्शन घेवू मग पुढची तयारी करता येईल... पण मी ठाम होतो...राज्यसेवा म्हणजे राज्यसेवाच !! पण तरी अनुभव येईल म्हणून मला सर्वांनी सल्ला दिला फाॅर्म भर. मी तो सल्ला महत्वाचा आहे हे समजून फार्म भरला. पण मी वेगळ्याने राज्यसेवा दुय्यम ठेवून त्याचा अभ्यास करणार नव्हतो.
काहीच पुर्वानुभव नसताना थेट राज्यसेवा, म्हणजे हे जरा खुपच अती होत आहे अशी माझ्या काही स्नेहयांची धारणा झाली होती...पण पर्याय नव्हता मी आता माझेही ऐकणार नव्हतो...कारण अंधारात स्वतःला झोकून देणे...स्वतःच्या स्वप्नांची तीव्रता अनुभवणे..आणी ती वास्तवात आणण्यासाठी स्वतःला शेवटच्या क्षणापर्यंत कसोटीला लावणे...माझी मानसिक तयारी झाली होती..संधी चालून आली होती...द्विधा मनस्थिती करून मला ती गमवायची नव्हती..

      दररोज आम्ही सगळे मिळून दिवसभर आपापला अभ्यास करायचो..सायंकाळी मला वगळता सर्वजण PSI च्या विषयाचे डिस्कशन करायला बसायचे..मी आपापला राज्यसेवेचा अभ्यास करत असायचो..दिवसेंदिवस अभ्यासाला खुप धार येत होती...मी न डगमगता चर्चेत सहभागी होत होतो, चर्चेत टिकतही होतो, आणि प्रचंड आत्मविश्वास त्यातुन मिळत असल्याने पुन्हा विषयांना अभ्यासण्यासाठी भिडत होतो...सगळेजण प्रचंड अभ्यास करत होतो..एकमेकांना मदत करत होतो..सगळेजण मला सिनीयर होते. मी पण माझी सिन्सिअरीटी जाणार नाही याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो..तिन महिने प्रचंड अभ्यासात कधी गेले कळले नाहीत..जवळपास सर्व विषयाच्या नोट्स तयार झाल्या होत्या..एम ए सेकंड ईअरची परिक्षा पण आली..एम ए चा अभ्यास ही सोबत सुरू केला. कारण मुख्य परिक्षेला 2 ऑप्शनल घ्यावे लागायचे...त्यातील एक विषय आत्ताच हातावेगळा होइल या दृष्टीने मी ती ही परिक्षा दिली...पेपर खुपच चांगले गेले..

    PSI ची पुर्व परिक्षा जवळ आली होती. सर्वजण खुप अभ्यास करत होते. मी राज्यसेवेची तयारी करत होतो... अभ्यास एवढा वाढला की, जवळपास सगळे विषय वाचून, समजून घेवून, नोट्स काढून, पाठांतर संपत आले होते..तो पर्यंत बाहेर सर्वांना अभ्यासाची पातळी समजली होती. त्यामुळे सोहम क्लासेस वर MPSC चे विषय शिकवण्यासाठी बोलावणे आले. सर्व मित्रांनी जायला सांगितले, त्याचा फायदा म्हणजे आत्मविश्वास वाढला पण त्या सोबतच जो मोबदला मिळायचा त्यातुन मासिके, झेराॅक्स, स्टेशनरी याचा थोडाफार खर्च भागणार होता..शिकवताना जाणवत रहायचे अभ्यास खुप चांगला झाला आहे फक्त तो टिकवून ठेवावा लागणार होता. आणी मी शिकवत होतो तर मला पास होणे अनिवार्य होते कारण लोकांना शिकवून मी नापास होणे हे परवडणारे नव्हते, सतत मनात एक सजगता होती..मी माझा अभ्यास अधिक सजगतेने करू लागलो...

         8 मे ची PSI पुर्वपरीक्षा आली. आम्ही सर्व जण परिक्षेला गेलो. मी ही गेलो, सिरीयसली पेपर सोडवला.. सगळेजण त्वरित परत आलो..आन्सर की काढली, आणि किती उत्तरे बरोबर आले ते तपासले. सगळेजण 150 पैकी 130+ !! मी 128 इतरापेक्षा कमी पण पास होण्यासाठी आवश्यक कटआॅफ च्या भरपुर पुढे!! आम्ही सगळेजण पास होणार याचा आत्मविश्वास आला , मला तर खुप आत्मविश्वास मिळाला होता कारण मी या परिक्षेचा नेमकेपणाने अभ्यास केला नव्हता मी राज्यसेवाकेंद्री अभ्यास केला होता पण तरीही मी ही परिक्षा अत्यंत गांभीर्याने दिली होती..(त्या गंभीरपणा सोबत घडलेली एक अतीशय गंमतीशीर बाब ,जी आजही आम्हा सगळ्यांना खळखळून हसायला भाग पाडते ती म्हणजे मला ग्रुपमध्ये एकट्यालाच गणितात पडलेले 20 पैकी 20 मार्क्स !! आमच्या ग्रुपमध्ये मला वगळता सर्वांचे गणित खुपच स्ट्रांग होते. आणी तांदळे सरांचे तर खुपच. तसे ते ही म्हणायचे, आणी त्यांना त्याचा खुप अभिमानही होता अर्थात आम्हा सगळ्यांना त्याचा आदर ही होता. मी दहावीला गणितात अगदी काठावर 52 मार्क्स घेवून पास झालेला त्यामुळे अधून मधून ग्रुपमध्ये माझी गणीतावरून टिंगल व्हायची..पण नंतर सगळे उलट झाले सगळ्या एक्सपर्टची मजा मी घेत असायचो अधून मधून आणी... संदिप विशेषतः तांदळे सरांची)

            गंमतीचा भाग वगळला तर या परिक्षेचा एक फायदा झाला. यामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षेला सामोरे जाण्याचा माझा आत्मविश्वास दुणावला. वडील आले त्यांनी परिक्षा कशी गेली विचारले, मी त्यांना पेपर चांगला गेला आहे हे सांगितल्यावर त्यांना खुप आनंद झाला. पुढच्या परिक्षेचा खुप चांगला अभ्यास करायला सांगुन ते गेले. दोन्ही भाऊ खुप सपोर्ट करत होते. मित्र सोबत राहून अभ्यास करत होते. संदिप जरा जास्त खुल्या मनाने वागायचा. एखादे नविन पुस्तक त्याने आणले तर त्याला माहीत असायचे की मला ते वाचण्याची जास्त इच्छा आहे. मी आपला अभ्यास करत असताना मुद्दाम ते पुस्तक जोरात समोर टाकायचा.आणि जोरात ओरडून म्हणायचा " ए! लवकर वाचून घेवून नोट्स काढून ठेव रे ! तु नोट्स काढ मी वाचेन नंतर निवांत" तो काळजी घ्यायचा की, इतर कोणाला सहज कळणार नाही की मला पुस्तक वाचायचे आहे पण मी ते आणू शकत नाही, आणी मला ही जाणवणार नाही की त्याला माझी अवस्था पाहून वाईट वाटत असते ! असा जिवलग आणी मन जपणारा मित्र भेटला हे नशीबच!! एखादा सण असताना स्वतः घरी जेवायला गेल्यावर स्वतःच्या आईला सांगून आग्रहाने माझ्यासाठी डबा घेवून येवून हक्काने , पण सहज आणले असा आव आणत "जेव ! बे! आईनेच पाठवला आहे डबा तुझ्यासाठी " असे म्हणत लहान भावाप्रमाणे जपणारा!!! स्वतःच्या दुःखद प्रसंगी हक्काने आवाज देणारा...
या सगळ्या दिलदार मित्रांच्या हातांनी मला कधीच मागे सुटू दिले नाही. आणी त्याची जाण ठेवत मीही त्या सर्वांचा आजही तेवढाच आदर करतो.

        परिक्षा जवळ येत चालली होती..झोप उडाली होती , रिव्हिजन सुरू होते, आमच्यातले काही जण घरीच बसून अभ्यास करू लागले. कधी कधी मला एकट्यालाच दिवस दिवस बसावे लागायचे, एकटा असताना स्वाभाविकपणे मलाही भिती वाटायची, कसे होईल आपले? हा प्रश्न छळत असायचा, मी स्वतःला धिर द्यायचो. मी कोसळू शकणा-या दरडीला भक्कमपणे पाठ लावण्याचा प्रयत्न करत होतो जणू. एका आत्मविश्वासाच्या व कष्टाच्या बळावर मी शिखर ही न दिसणा-या पहाडास अंगावर घेवू पाहत होतो. मला शिखर गाठायचे होते. मी पहाडाखाली दडपला जाणार नव्हतो...मी भिडणार होतो! (क्रमशः)

Friday, June 14, 2019

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 16: आभाळ चकाकले...

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 16: आभाळ चकाकले...


"काय नाव तुझं?" अंबेजोगाई या गावातील एका उच्चभ्रू वस्तीत पुस्तके विकताना एका सज्जन व्यक्तीने विचारले. मी त्यांना नाव सांगितले. त्यावर त्यांनी सांगितले, अरे! कशाला आयुष्य वाया घालत आहेस. अभ्यास कर, इतका वेळ पाहतो आहे काॅलनीत, तु सकाळ पासून फिरत आहेस. पुस्तके विकत आहेस.याने आयुष्य चालणार नाही. "कितवीला आहेस?" मी सांगितले " एम ए सेकंड इयर ची परीक्षा देणार आहे " "अरे मग काही चांगले कर ना! सेट नेट दे! एम पी एस सी कर!" गेल्या वर्षभरात मी किमान हजार घरे फिरलो असेन, पण मला पर्सनल होवून कोणी बोलले नव्हते. मी सकाळ पासून फिरत होतो. एक अस्वस्थता दाटून येत होती..मन लागत नव्हतं..आणी त्यात हे असे विचारणे..जखमांचे टाके ऊसवायला लागले..मी त्यांना सांगितले "सर ! एमपीएससी करणार आहे, पण जाहिरात येत नाहीय! मी दररोज वाचत असतो!" मी माझ्या बॅगेतून नोट्सचा गठ्ठा काढला त्यांना दाखवला. त्यांनी पाहीला. पाठ थोपटली..म्हणाले ग्रेट! पण हे सगळं करून तुला नाही जमणार! तु जास्त दिवस हे नको करू. "शर्यतीच्या घोड्यानी टांगा ओढणं बरं वाटत नाही!" काळजात कळ आली..डोळे भरून आले..मी मुका झालो...त्यांनी ओळखलं...प्यायला पाणी दिलं...आस्थेनं चौकशी केली..मार्क्स विचारले..मी त्यांना सांगितले..खुष झाले..म्हणाले " मी पण एमपीएससी साठी प्रयत्न केले. पण नाही झाले सिलेक्शन! पण त्या अभ्यासावर मी विस्तार अधिकारी झालो. एमपीएससी आयुष्य वाया जाऊ देत नाही. तु चांगला मुलगा वाटलास म्हणुन सांगितले. जास्त दिवस हे काम करू नको " मी त्यांचे आभार मानले...त्यांनी शुभेच्छा दिल्या.."तुझ्या सारख्या मुलांचा संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरावा " असे म्हटले.त्यांच्या बोलण्याने , सल्ल्याने काळजात हुरूप मावत नव्हता...गेल्या वर्षभरात मी एमए, एमपीएससीचे वाचन आणि पुस्तके विक्री या शिवाय काही केले नव्हते...त्यांच्या विचारपुस करण्याने मला हुरूप आला...बरे वाटले....एक चांगल्या सदिच्छा मिळाल्या होत्या...मी खुशीत लाॅजवर आलो ...किशोरला सांगितले " भाऊ , आता हे पब्लिकेशन सोडावे म्हणतो ! जे व्हायचे ते होवो...अभ्यास करतो" किशोर पण वैतागला होता पण त्याने मला समजावले...सध्या थांब काही दिवस करू...मग पाहू...तुला अभ्यास करायचा तर कर काही लागले तर पाहू आपण ..! मी वाटल्यास मदत करतो.....( मदतीचे हात पुढे यायला लागले....असे अनंत हात माझी वाट पाहत होते....नियती संकेत देत होती...!! फक्त ती परीक्षे अगोदर माझी सत्वपरीक्षा पाहत होती......) गमावण्यासारखे माझ्याकडे काहीच नव्हते...अंधार दिसला की झोकून द्यायचे त्यात, एवढे मात्र ठाम शिकलो होतो!!!

लातुरला रूमवर परत आलो...मोठा भाऊ पण कळवळुन सांगायचा बस कर ! अभ्यासावर लक्ष दे! पण त्यालाही माहित होतं. हवेत अभ्यास करायला सांगु शकत नव्हता तो! पण त्याला माझ्या एम ए च्या अभ्यासाची कल्पना होती..एकदम थरार अभ्यास होता. वर्गात अभ्यासात एक नाव होतं माझं ..पुस्तक विकायचा आठवडा झाला की मी काॅलेजला जायचो..वर्गात शक्यतो कोणी नादी लागायचे नाही कारण चाललेला टाॅपिक अगोदरच मला ब-यापैकी माहिती असायचा..वर्गात माझा प्रतिसाद पाहून भिंगे सर खुष असायचे ...म्हणायचे...खुप चांगली समज आहे तुला विषयाची...नॅक ची टिम काॅलेजला आली...सरांनी 2 कमिटीचे काम माझ्याकडे दिले...ते संपवून मी इतरांना मदत केली...आमच्या सेक्शनचे चांगले नाव झाले...सर चांगलाच जिव लावायचे...अर्थात आजही त्यांचा तेवढाच जिव आहे.

एक अस्वस्थता मनात दाटली होती...खुप दिवस झाले MPSC ने जाहिराती टाकली नव्हती..त्या काळात वेबसाईट वगैरे काही नव्हती..तांदळे सर काॅलेज मधे असताना तेथे अभ्यास करायचे..तेथे त्यांचे सहकारी अतुल पाटील ऊर्फ बप्पा! ( अत्यंत दिलदार व दिलखुलास मित्र..सगळे जण त्यांच्यावर कोट्या करणार...तरीही अत्यंत दिलखुलासपणे पहाडी हास्य करत ते स्वीकारणारा...अगदी लहान वयापासूनच घराची जबाबदारी खांद्यावर घेऊन लॅब टेक्निशीयन या पदावर काम करणारा...MPSC ने शेवटच्या अॅटेम्प्टलाही सिलेक्शन न दिलेला हा मित्र) अशोक मोहाळे (परभणी वरून आलेले, व त्याच शासकीय पाॅलिटेक्नीक काॅलेज मधे क्लार्क पदावर कार्यरत,ऊत्तम क्रिकेटर व अभ्यासू आणी अत्यंत सहकार्याची भावना असणारे मित्र ) हे ही तयारी करायला लागले होते. वेळ मिळेल तेंव्हा मी पाॅल्टेक्नीक काॅलेजला जायचो. तेथे अभ्यासा बदल चर्चा व्हायच्या. इतर ठिकाणी काय सुरू आहे, महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहेत या बाबत माहिती मिळायची. एक मात्र होते.असा एकही दिवस येत नव्हता ज्या दिवशी मी MPSC विसरलो असेन....हे सगळे जण चर्चा करायचे. तेथेही काही लोक त्यांना सहकार्य करायचे तर काहीजण टिकाटिप्पणी! रसायनशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आर्य मॅडम होत्या. त्या खुप प्रोत्साहन द्यायच्या. अधून मधून धुसर झालेल्या स्वप्नाला चकाकी मिळायची. मी Mpsc च्या आसपास राहण्याचा
प्रयत्न करायचो.


मी पुन्हा काॅलेज कडे वळलो होतो...सोबतचे मित्रमैत्रिणी गॅदरींग आणी इतर तत्सम कामात गुरफटले होते..काॅलेजने छोटेखानी ट्रिप काढली होती..मुड नव्हता,गेलो नाही... अशा छानछोकीच्या गोष्टी काही आकर्षीत करू शकत नव्हत्या मनाला..त्या पेक्षा मला कविता लिहिण्याचा असलेला छंद तगवत असायचा...ललित लिहायचो...वाचायचो.. त्यातील अगतिकता अनुभवायचो...पुन्हा वाटायचं..काही तरी करायला हवं आपण आयुष्यात ...भरीव...रेखीव..आखीव....!!!


इके (पाटील) भेटला ..एमपीएससी बद्दल बोलला...अतुल कुलकर्णी पण भेटला तोही बोलला..माळी सरांचे नाव ऐकून होतो..भेटलो नव्हतो..पण त्यांचे व भांबरे सर यांचे सातत्य ऐकत होतो..एके दिवशी मुक्रम भैय्या भेटले..."भाई कब आएगी रे अॅड?" म्हणून अस्वस्थ करून गेले..एक धुकं साचलं होतं..काॅलेजचे मित्रमैत्रिणी भेटायचे ..डिएड पुर्ण होवून ते
नोक-यांना लागले होते..मी चालत रस्त्याने फिरत असताना एखादी टुव्हिलर जवळ थांबायची.. त्यावरील शिक्षकमित्र हाक देवून थांबायचा...आस्थेने विचारायचा...थोडावेळ सोबत बोलायचा...फरक जाणवत असायचा दोघात....जिवाभावाचं बोलताबोलता काहीजण शिव्याही घालायचे...किती चांगली संधी घालवली मी डिएडची म्हणून झापायचे... काही जण रस्त्याच्या दुस-या बाजुने जात असतील तर हात दाखवायचे..थांबायचे...झाडाझडती घ्यायचे...चल निघतो भेटू म्हणून
निघून जायचे...मणामणाचे ओझे देवून...मी रिक्त मनाच्या पोकळीत स्वतःला काही आधार भेटेल म्हणून धुंडाळा घेत रहायचो ..चालत रहायचो...

गजा, जयपाल व इतर काही जण पुण्याला एमबीए ला गेले होते..अधून मधून ते यायचे...चर्चा व्हायची...बॅच मधले मुलं काही ना काही करत होते..गावाकडे जाण्या सारखं काही नव्हतं..कुढत फिरत होतो..पण.. .मळभ दाटून आलं की पाऊस पडतो...अंधार दाटून आला की पहाट होतेच...

मी एके सकाळी नित्यनेमाने आपापले काम उरकून बाहेर निघत होतो..डिसेंबरचा महीना होता..रूमवरील कामे संपली होती...मोठा भाऊ होता...तेवढ्यात रूमवर बातमी धडकली...एमपीएससी च्या राज्यसेवेची जाहिरात मुंबईत लागली होती काल...श्वास एकदम अडकला...अफवा असेल वाटले...गडबडीत धडपडत पेपर आणण्यासाठी निघालो..पाय-या उतरून खाली उतरलो..आणी एकदम लक्षात आले..बाजुला राहणा-या होके सरांकडे पेपर येतो...ते शाळेत गेले होते...गडबडीत त्यांचा पेपर उचलला...उघडला...पाहीले...आणी हर्षवायु झाल्यासारखे मी आरोळी ठोकली...आणी रूम मधे येवून जोरजोरात नाचू लागलो...भैय्याला कळत नव्हते काय झालं..."पागल झालास का? काय झालं ?" म्हणून त्यानं विचारलं...(कदाचीत अतिशयोक्ती वाटेल पण आजही जसंच्या तसं डोळ्यासमोर येतो तो क्षण!) मी ओरडंतंच त्याला सांगितलं "एमपीएससीची ॲड आली अॅड!!, हे घे पेपर बघ!" मी त्याच्याकडे पेपर फेकला...त्याने नीट पाहीले..तो ही खुष झाला..पण माझा उत्साह आवरता आवरत नाही पाहून त्याने एक वाक्य म्हटलं..." अरे फक्त जाहिरात आली आहे, सिलेक्शन नाही झाले..एवढे नाचतोस कशाला...पण कैफ चढला होता मला जणू....त्यातच माझा आत्मविश्वास होता की उत्साह, की नियती माझ्या तोंडून वदवून घेत होती...मी उत्तरलो..." होईल रे ,सिलेक्शन तर होईलच..ते झाल्याशिवाय मी मला सोडणार नाही तु बघ! ह्या अॅटेम्पटला मी सिलेक्ट होवून दाखवणारच!"

इतके दिवस एका काल्पनिक परिस्थितीत संघर्ष सुरू होता..आता प्रत्यक्ष युध्दभुमीवर येण्याची वेळ झाली होती. मी निघालो होतो...सुकर परिणामांची कल्पना करत....जिंकण्यासाठी !! (क्रमशः)











राधेस बोल लागे....

चंद्रफुलाच्या छायेमधला एक उसासा घेऊन आलो चांदचकोरी कथा बिलोरी हृदयी तुझ्या मी लिहून आलो किती कवडसे वितळून झाले तुझ्या हातच्या तळव्यारेघा  कि...