Monday, June 29, 2020

चंदेरी धुके होते.....



या अंधारवाटाना कोण
असे सुने मन देते
फकिराच्या सारंगीला
अजब धुन देते

या काजळछटेचा अंधार
सुबक कोण रेखला
अंधारास बिलगे रातराणीचा
वेल बहरून एकला

ही कसली आलापधुन
ही कसली अभिलाषा
मुक्या मनास भारे तुझ्या
मुक्या मनाची भाषा

डोंगरकड्याच्या कपारी
चांद किरणानी भिजलेल्या
तुझ्या काजळी बटा
फुलगंधानी सजलेल्या

झाडाच्या अंतःकरणाला
फुटते बहराची वाणी
तुझ्या मनोहर बिंबाने
निर्मळ होते पाणी

चांद बुडून जातो
अंधार काळाभिन्न
उमटत असते वाटेवर
तूझे बावर पदचिन्ह

मी धाव वासरी घेई
तूझा ठाव मिळत नाही
हसत्या माळरानाला माझी
तगमग कळत नाही

नित्य पेटवतो अंधारात
तुझ्या प्रतिक्षेचे दिवे
मी निघतो माळरानाकडे
तेंव्हा परतत असतात थवे....

गाव निजेला जातो
माळ मुके होते
तुझ्या आठवणीचे मग
चंदेरी धुके होते.....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
29/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com















Sunday, June 28, 2020

गीत अमर व्हावे......


या सुन्या आभाळाला
पावसाचा रंग द्यावा
काहिलीच्या मृदेला
तुषाराचा संग द्यावा

व्हावे ओथंब थेंब
गाव तुझे पाहण्या
आतुर पाऊस व्हावे
कोसळून वाहण्या

खिडकीच्या तावदानाला
थेंब होऊन बिलगावे
तुझ्या पाउल आभासाने
वात होवून शिलगावे

वेलीला स्पर्श करावा
फुलांना ओंजारावे
तुझ्या आभासाला
मुक नयनाने गोंजारावे

रित्या मनाचा गाभारा
तुझ्या आठवणीने भरावा
अभंगाचा आर्त नाद
हृदयात खोल झरावा

मी तुजे गाव व्हावे
सारे शिवार बनून यावे
तुझ्या पायवाटेला धुंडाळत
काजवे शिणून जावे

ढग काळे सरून सारे
आभाळ रंगीत व्हावे
तुझ्या स्मितांचे
नादमधुर संगीत व्हावे

मी शोधत रहावे तुला
जणू गाव दाटून यावा
माझ्या मनातला मुक आवाज
तुझ्या कंठात साठून यावा

मी ढगांच्या काळजावर
रंग सारे पेरून द्यावे
तुझ्या बंद नयनांनी ते
गुपीत हेरून घ्यावे

तुझ्या मनातही कधी माझ्या
आठवांचे समर व्हावे
तु नाव लिहावे माझे;
माझे गीत अमर व्हावे...
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
28/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com




Saturday, June 27, 2020

व्याकुळ चांदणे साक्षी....


माझ्या शब्दांना शहारे
तु कविता वाचताना
मातीच्या हृदयास भासे
जसे पाऊस नाचताना

कवितेच्या शब्दात उमलते
तुझ्या नजरेचे फुल
कवितेस पडते मग
तुझी काळीज भूल

नजर भाव टिपून घेते
शब्द राहती मागे
मी उकलत राहतो मुक
तुझे अस्तित्व धागे

तु प्रतिमेत लुप्त
कविता शब्दात चाचपडे
माझ्या कवितेला तु दिले
प्रतिक्षेचे धडे

मी शब्दागणिक शोधे
तुझी गोंदण नक्षी
ठेवत रातीच्या आत्म्याला
व्याकुळ  चांदणे साक्षी

तुझ्या नजरेच्या रानभुलीचा
कंच हिरवा बहर
शब्दाच्या काळजाला फुटे
समर्पणाचा स्वर

मी शब्द पेरत जातो
त्यास बिलगे तुझा छंद
कवितेच्या आत्म्याला येई
मग तुझा मंद सुगंध..
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
27/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com






Saturday, June 20, 2020

चांद डोळे मिटताना.....



झांजरल्या सांजेस
हरखुन जाती लोक
प्रकाशाच्या आत्म्याला
अंधाराचा शोक
                         आठवणीच्या फुलामागुन
                 चंद्र येतो उगवून
                   मी ही घेतो माझ्या
                        अंधार पळांना सजवून
मी चांद रोशन होतो
मन संदल होवून जळते
आळवणीच्या आर्ततेने
पायवाट पण वळते
                             जळत्या संदलाची महेक
                    आभाळ धुंद होते
                                तुझ्या रेशमी अंमलाखाली
                 रात मंद होते
मी ऐकत असतो तुझ्या
आठवणीची गाणी
मनात फुटते खळ्ळकण
गुलाब अत्तरदाणी
                         बटा व्यापत राहती
                         चांदणकांती चेहरा
                          मी उलगडत राहतो
                               त्या सुंदर स्वर्णमोहरा...
माझे हात दुव्याचे होती
तुझ्या अस्तित्वास बोलताना
ये निशीगंधी महेक हातांना
ओंजळ खोलताना
                              मी रात जागवत असतो
                               तुझ्या अस्तित्वाचा जोगी
                                  आणाभाकाच्या कळसावर
                           आसक्ती असते जागी
तु अंतरी असुनही
तुझीच उणीव भासे
का लागते चंद्रसाक्षीने
मनास तुझे पिसे...?
                                मी पाहतो रातराणीचे
                                    फुल फांदिवरून गळताना
                               वाटे पुन्हा तुज पहावे
                            तु नव्याने कळताना
दिसतो एक आशिषी तारा
उधाणुन तुटताना
व्याकुळ होते रात
चांद निजेने डोळे मिटताना...
♡pr@t@p♡
" रचनापर्व "
20/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com







Thursday, June 18, 2020

आभासाने बहरले फुल....


त्या बाभळी, त्या बोरी
ती फोफावणारी शेती
तो चिखल, ते पाणी
ती आसुस झालेली माती

ते पाखर थवे, ते आभाळ
ते पसरले पंख ,ती झेप
शेताच्या पायवटेवरील
ती बैलगाडीची घुंगर खेप

ते हाकारे,ती गोफण
ते जपले जाणारे बहर हिरवे
घराच्या आड्यावर मऊशार
घरटे विणणारे पारवे

सारेच तुला आठवतात
ते रस्ते, ती पाऊलवाट
तु असतानाचा तो
फुलबहराचा गंधित थाट

ये निघुन तुझे बहर ईथे
फुलण्यासाठी आतुर
दाटून येत्या सांजेला
अंधार ही हो फितुर

तो वितळणारा चांद
ते बावर होते चांदणे
ते श्वासाच्या आभासाने
मोहरून उठणारे गोंदणे

ती आर्त सायंकाळ
ती घुमती पाखरशिळ
हात आतुर उलगडण्या
बटास पडला पिळ...

हे आठवणीचे साखरदाणे
ही गोडव्याची पेरणी
या सांजेस तुझा सहवास
ती लागावी सत्कारणी....

तुझ्या गेल्या पावलांना
पडावी माझ्या वाटेची भुल
तुझ्या निव्वळ आभासाने पहा
फांदिवर बहरून आले फुल
♡pr@t@p♡
" रचनापर्व "
19/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com 

व्याकुळ झाल्या नभास.....


अवकाशाच्या मनात
हळव्या छटा घडल्या
ओला झाला रस्ता
काळीजसरी पडल्या

हे पाखरपंखी मन
चिंब ओले झाले
पावसाचे उधाण अबोल
विझत्या सांजेस बोले

फुलापानांचे सडे
रस्त्यावर कोसळून गेले
ढगांचे काळीज मातीच्या
हृदयात मिसळुन गेले

हे ओले नाते भारते
रातीच्या अंधारवेळा
मी माळत राहतो मनात
तुझ्या अस्तित्वाच्या माळा

मी रात जागल्या होतो
पाउस दिवा पेटतो
अनोळख्या पायवाटेला मग
ओला रस्ता भेटतो

सारेच ओघळताना
थेंब सडा नाचतो
ऊधाणफुटला पाऊस
मनात माझ्या साचतो

काही थेंब तु ही घे
बहरून येईल अंग
मातीच्या काळजाला
लगडेल हिरवा रंग

हा नसतो नुसता पाऊस
तो असतो काळीजगाणे
त्याच्या साध्या स्पर्शाने
बहरून येती पाने

मी चालत निघतो दुर
पाऊस मनावर झेलत
मुक मनास ढगांचे
काळीज असते बोलत

मी तुझे अत्तर शोधत
ओलांडतो अगणित सरी
तुझ्या ढगाचे पाऊस
येती दाटून माझ्या उरी

मी चिंब ओला होतो
तुझ्या स्पर्शाचा आभास
मी पाऊस ऊधार देतो
तुझ्या व्याकुळ झाल्या नभास......!
♡pr@t@p♡
" रचनापर्व "
18/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com

















Monday, June 15, 2020

मातीच्या हृदयात भरते....


सखे! तुझा पाऊस!
सारेच कंच ओले
ढगाचे मन बावरे
मातीस मुक बोले

कोसळत्या थेंबासवे
वाहून जाते माती
उगवून येती हिरवी
घट्ट ओली नाती

सर अनाहुत येते
सजते हिरवे रान
नदीच्या काळजाला
ये गुलाबी उधाण

मी तुझा पाऊस
मनात सजवत राहतो
मातीच्या हृदयावर
हिरवाई रूजवत राहतो

तु पाऊस शिवारी पडता
अन् अंगणी नाचणारा
माझ्या मनाचा ओथंब
बंद नयनाने वाचणारा

गरजते आभाळ कधी
कधी वाहतो उधाण वारा
वाटून घेवू आपल्या
अलगद झरती धारा

ओल हृदयास फुटते
तु थेंब मनात रूजलेला
तु नित्यनियमीत पाउस
माझ्या खिडकीत सजलेला

तुझ्या पावसाचे सोहळे
आभाळ सारे झरते
थेंबाचे असलेपण
मातीच्या हृदयात भरते..
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
15/6/2020
BLOG#prataprachana.blogspot.com












Thursday, June 11, 2020

पैंजणाचा नादभैरवी....


तुझ्या आभासी स्वप्नांची
जागत्या रातीस साद यावी
स्वतःत हरवल्या अस्तित्वाची
अशी गहरी याद यावी

या स्वप्नांच्या हृदयाला
ही कसली डागणी
मी मुकपणे पुरी करावी
तुझ्या वेदनेची मागणी

तु ढवळून अंतरंग
तुलाच शोधून घ्यावे
आत्म्याचे खोल अस्तर
सापडेतो खोदून घ्यावे

तु आणि तुच
दुसरे कोण राहील
नदीचे पाणी हरयुगी
सागरओढीने वाहिल

तु नसल्या घटीकेत
मी अनाथ रातीशी बोलतो
तु दिल्या जखमांचे
पट नित्य खोलतो

वेठीस धरला वसंत आता
फुलणे विसरून गेला
अवकाशाच्या काळजातुन
चांद घसरून गेला

अंधार गलबलून येतो
रात कसली चाहूल टिपते
पैंजणांचा नादभैरवी
मन बावरे जपते

पण नदीने सोडले पात्र म्हणून
शेत सोडता येत नाही
कोणाची नसली साथ म्हणून
वाट मोडता येत नाही
♡pr@t@p♡
"रचनापर्व "
11/6/2020
BLOG# prataprachana.blogspot.com


Wednesday, June 10, 2020

पाऊस पडून जाईल...


या ढगांना आत्मा द्यावा
की हवेस द्यावा रंग
अवकाशाची रिक्तता
का सांजेत होई दंग

तु नसल्या पावसाचे
हे कसले थेंब पडती
काजळाच्या तिटेतुन
मी रात चोरतो चढती

तु गेल्या बहराच्या जखमा
अजून हिरव्या ओल्या
गंधाळल्या फुलझडीने
भरून गेल्या खोल्या

ही परकी आग कसली
मनात जाते धुमसून
परसातला निशीगंध
रडतो का हमसून?

नाहीच कोणी आपले
म्हणून पायवाट थांबत नाही
आहे कुट्ट काळी म्हणून रातीचे
आयुष्य लांबत नाही

थवे गेले उडून म्हणून
झाड रडत नाही
करते आकांत माती म्हणून
पाऊस पडत नाही

थोडे ढग इकडेही पाठव
पाऊस पडून जाईल
थेंबाच्या स्पर्शातुन तोकडी
भेट आपली घडून येईल
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
10/06/2020
BLOG#prataprachana.blogspot.com



Sunday, June 7, 2020

शब्दांना 'बरकत'आहे...


सुचेल एखादी 'नायाब गझल'
प्रतिक्षेस काय हरकत आहे?
तु नाहीस .....तरीही इथे
माझ्या शब्दांना 'बरकत'आहे !

तु नसल्याने खिडकीत
दिवे लागत नाहीत
माझे शब्दही मग तुला
कविता मागत नाहीत

दिव्याऐवजी मी शब्द पेटवतो
देत स्वतःस उजेडाचे दान
बहरून येते कंचहिरवे
मग एकट माळरान

माझ्या शब्दांचे 'मुसाफिर'येतात
आतुर होतात तुझे दिवे
फकिराच्या झोळीतुन ओघळतात
मग खैरातीचे 'दुवे'

बहि-या मनास का द्यावी
मी गहि-या आर्जवाची आण?
मुकशब्द ही टिपायला
लागती आर्त उत्सुक कान

म्हणतात तुटण्यापुर्वी ताराही
अवकाशात बांधतो एक 'समा'
मी तुटल्याता-यांचे अवशेष करतो
कवितेत अलगद जमा

कधी लागलेच तुझ्या शहरास कोळिष्टके
तर मला ऋतु पेरावे लागतील...
आणलेत काही बहर मी ..जाणुन
तुझ्या कळ्या गंध उधार मागतील...
♡Pr@t@p♡
"रचनापर्व"
(गझलेचे काही शब्द...)
7 जुन 2020
BLOG# prataprachana.blogspot.com





Saturday, June 6, 2020

मुकशब्दास वाचणारा....


खिडकीच्या तावदानावर ओघळे
थेंबांची व्याकुळ....नक्षी
या ओथंबप्रहरास मी...
आणी माझे शुन्यभाव साक्षी

तेही मुके..मीही अबोल...
दोघेही साचतो स्तब्ध..
अव्यक्त कवितेचे जणु
ओथंबलेले प्रारब्ध

अंधार पावसात साचे
थेंबाचा देह निळा 
तिमीरवैरागी मनास लागे
सांजबावरा लळा..

या ओल्या पाऊसवेळा
मनास पाझर फुटतो
कोसळणा-या थेंबासाठी
मातीचा जिव तुटतो..

निर्जीव काचावर उमटते
तुझी सांजरंगी छाया
ओथंब कवितेस माझ्या
मिळते ओली शब्द काया

मी थेंबाना ठेवून साक्षी
झंकारतो तुझे गीत 
हरशब्दातुन वाहती
हाका ओल्या अगणीत..

अंधार गडद होतो
थेंब निजुन जाती..
दिवेलागणी वेळी 
मग हिरमुसतात वाती..

मी अंधारात पाउस पाहतो
खिडकीखाली साचणारा..
मी आठवतो तो कटाक्ष 
माझ्या मुकशब्दास वाचणारा.....
♡pr@t@p♡
☆06/06/2020☆
"रचनापर्व"
BLOG# prataprachana.blogspot.com

Friday, June 5, 2020

न्याहाळत्या नभाचा .....


जन्मांतराचे धागे
युगा-युगाची बांधणी
नात्याच्या अवकाशातील
जणू ध्रुव चांदणी

हे अंतरीचे नाते
जणू उमलता फुलोरा
माझ्या नभावर उगवता
तु चंद्र हळवा बिलोरा

तु चांदण्याच्या प्रकाशात
लहरते व्याकुळ सुक्त
तु दाटल्या मनाचे
आभाळ निळे मुक्त

तु पाखराच्या चोचीतली
आर्त हळवी साद
तु हृदयात झंकारला
समर्पणाचा नाद

तुझ्या छायेच्या मेहंदीत
चंद्र जावा मंद रंगत
तुझ्या पदरास लाभो
पुनवचांदण्याची संगत

मुकशब्दाने चालवा
एक दिर्घ संवाद
मिटून जावेत रातीसम
दुराव्याचे प्रवाद

तुझ्या अथांग मनाचा
मी थांग घ्यावा
तु न्याहाळत्या नभाचा
मी चांद व्हावा
♡Pr@t@p♡
"रचना"
6/5/2020
BLOG#prataprachana.blogspot.com

Thursday, June 4, 2020

....अलगद विझत होते


कळ्यांचे ॠतु जेंव्हा
फुलण्या आतुर होते
हंगाम अत्तराचे
बहुधा फितुर होते

ओंजळी आड जेंव्हा
दिव्यांचे किरण निजले होते
पाऊसढगाचे काजळ
अवकाशी सजले होते

मुक्या गिताची काळीजवेल
जेंव्हा ऊंच चढत होती
अंधारभरली पायवाट
माळरान सोडत होती

काजव्याची टिमटिम
जेंव्हा रात सजवत होती
कोरड्या किना-यास स्पर्शुन
नदी भिजवत होती

निज दाटले पक्षी
जेंव्हा पंख मिटत होते
फुलझडी सवे वेलीचे
काळीज तुटत होते

झोपेचे फुलपाखरू जेंव्हा
अवकाशी उडत होते
पंखाच्या त्याच्या अलगद
रंग झडत होते

रातसखीचा चेहरा
डोळ्यात साचत होता
मोर एकला रानी
मुक नाचत होता

काळ्या काळोखाच्या आड
आत्म्यांचे सौदे घडून गेले
झडले मोरपंख हवेस बिलगुन
रानोमाळ उडून गेले

दवबिंदूचे ओलस्पर्श जेंव्हा
गवतात रूजत होते
मी पाहिल्या चंद्राचे चांदपण
अलगद विझत होते.
♡Pr@t@p♡
4/6/2020
"रचनापर्व"
BLOG#prataprachana.blogspot.com

Wednesday, June 3, 2020

ओली तरंगभुल....


ढग आले
सरी आल्या
भिजल्या गायी
घरी आल्या

ही ओली तरंगभुल
भरून गेला अवकाश
व्यापते मनाला
सांजवेळ सावकाश

सगळे भिजले
ओल सजले
मातीच्या गर्त कुशीत
अलगद हळवे थेंब निजले

वैराण माळावर रूजते
अंगाई ओली ओली
मी मोजुन घेतो अलगद
मृदगंधांची खोली

हे अत्तराचे थेंब
कोण केला शिडकावा?
या ओल्याक्षणी का दाटतो
मातीत तृष्ण धावा

प्राषुण सारे थेंब
ही कसली पोकळी?
दाटल्या ढगातुन का
झरे सर ही मोकळी

हे नभाचे बन
तु ही पाहून घे
नेत्र नभाच्या सरीतुन
धो धो वाहून घे

असा पाउस येतोच दाटून
एक कळ झुळुक बनते
कोसळणा-या थेंबाचे
ओले वस्त्र बनते

अशा सांजओल्यावेळी
झुरती फुलांचे आत्मे
झडत्या थेंब बहराचे
रेखीत मनावर महात्म्य!
(♡pr@t@p♡)
"रचनापर्व"
3/6/2020
BLOG# prataprachana.blogspot.com




Monday, June 1, 2020

पहिल्या पावसाचा सुवास....


सांजेच्या कवेत
हे शब्दांचे मंथन
मनाच्या अंतरी दाटे
आठवांचे चिंतन

तुझ्या पायरवाने सजतो
माझ्या प्रतिमेचा भाल
हे युगाचे गित अंतरी
निनादे चिरकाल

ही प्रकाश विलयी सांज
सांडते अंगणओसरी
अव्हेर नसे ओठांना
बिलगे प्रतिक्षारत बासरी

हे अतर्क्य सुर
मनी आठवणींचे दिपन
प्रदिप्त सांजवेळी लागे
तनुगंधाचे लिपन

बेसुमार प्रलय चाले
वास्तव पुसट होते
अंधारातल्या पायवाटेशी
डोळ्यांची घसट होते

माळरानावर मी उभा
हा कसला बंदिवास?
अवचीत येत्या झुळुकीस
पहिल्या पावसाचा सुवास...

बहुधा निघालेत इकडेच
हळुवार पावसाचे ढग
पाहुयात किती धरेल
ही विरह घटिका तग.....

(♡pr@t@p♡)
"रचनापर्व"
01/06/2020
BLOG# prataprachana.blogspot.com





Saturday, May 30, 2020

मुकुटातुन गळले मोरपीस.....


अंधार तळातुन येती
शब्द चांदणअस्तरी
कवितेच्या आत्म्याला ये
सुवास तुझा कस्तुरी

हे गडद अंधारी रस्ते
होई फिक्कट सावली
तुटत्या ता-याच्या गतीने
झुळुक का धावली?

ही कसली आवर्तने
हे कसले सुर?
वैशाखाच्या चांदण्याला
येई शब्दऊधाणी पुर

दिशाहीन भावनांना
निशीगंधी आत्मा मिळे
राधेच्या पावलात साचते
सुगंधी कृष्णनिळे तळे

ही कोरड कसली साचे?
तळे पावलाशी असताना
सुर दाटून येतो कुठला
बासरी नसताना

हे असले कसले संगीत
सारेच भारून जाते!
वावटळीचे साध्वीपण
वा-याला सारून येते

जगरहाटीची पुनव चकाकी
रानोमाळ सांडत असते
माझ्या ओल्या शब्दांशी
कविता भांडत असते

मी शब्द सांधून घेतो
भाव हरवत जातो
मुकुटातुन गळले मोरपीस
आत्म्यावर गिरवत राहतो.....
(♡pr@t@p♡)
30/05/2020
" रचनापर्व"
BLOG# prataprachana.blogspot.com

Friday, May 29, 2020

कवितेच्या राखेआड......


ही झुळुकीची ओंजळ
उफान थव्याला आले
सांजसावळ्या घटीकेचे
मन गुलाबी झाले

ही वैशाखी रिक्तता
सांज भरून येते
सांजसयीचा पदर
रात धरून येते

ओकाबोका डोंगर
अंधार धुक्यात बुडतो
झडल्या पंखाचा आत्मा
मुक मनात रडतो

चोचीत साठले दाणे
खोप्यात निपचीप निजती
डोळ्याच्या पापणीआड
स्वप्न चंदेरी सजती

झाड स्तब्ध होते
स्पर्शित नाही वारा
सुकल्या माळावर झिरपती
आठवणीच्या धारा

पैंजणांचा नाद उतरतो
माती मोहरून हसते
वैशाखाच्या चांदणबनात
सावली चमकत असते

वैशाख वणव्याने पेटे
मनी शब्दांची मशाल
कवितेच्या राखेआड निजती
आर्त भाव खुशाल......
♡Pr@t@p♡
29/5/20
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com 

Thursday, May 28, 2020

वैशाखीसांज.....

या सांजेच्या काळजाला
का वाचा फुटत नाही
वा-याच्या कवेतून अलवार
का झुळूक सुटत नाही

हे वैशाखाचे बन विखुरले
गुलमोहर अलगद झडले
एकल साळुंक्याला अनाहूत
स्वप्न सहवासी पडले

हा काळीजवारा स्तब्ध
अवकाश रंगात भिजलेला
बागडणा-या थव्यांचा
मनात देह रूजलेला

हे सावल्यांचे फसवे स्पर्श
पावलात तापली माती
वैशाखाच्या घटिका मुक
आषाढी अभंग गाती

आकाश धवल निळे आणी
पिवळ्या साजात सजलेले
ओठांच्या शुष्कतेस भेदत
ये गीत दवात भिजलेले

गायी गेल्या गोठ्यात
रान मोकळे सारे
माळरानावर उरती दोघे...
माळ आणी...प्रतिक्षारत वारे

या वैशाखीसांजेस
शब्द फुटत नाही
गुलमोहराला फुलण्याचा
मोह सुटत नाही
(प्रताप)
28/5/2020
"रचनापर्व"
फोटो#नेटवरून साभार#


Wednesday, April 29, 2020

सांजभुल.......


फांदीवर टेकला सुर्य
म्लान होत विझतो
सांजेच्या गर्भात हळवा
अंधार मुक थिजतो

ढगांची दग्धभुमी
किरणांची विझती काया
अंधारलाटा पसरती
धरणीवर काळी माया

हलकीच हुल वावटळीची
हवा अवखळ वाहते
दुरल्या वळणावर झाड
स्पर्शाची वाट पाहते

सुर्य विझत जातो
शिलगवत रातीचे दिवे
आकाश कवेत घेते
परतते पाखर थवे

गित सांजेचे बहरे
रातराणीच्या तनावर
तुझ्या गंधाचे ठसे उमटती
कवितेच्या पानावर

शिळ घुमते आभाळ
अलगद होते हंबर
रातीच्या हृदयावर लटके
शब्दचांदणी झुंबर

मी पेरत जातो शब्द
अंधार विझून जातो
शब्दांच्या कुशीत बहरून
चंद्र सजून येतो...

अंधाराच्या श्वासावर
अलगद उमलते शब्दफुल
माझ्या कवितेस पडते
नित्य तुझी... सांजभुल..
(Pr@t@p)
"रचनापर्व"
29/4/2020
prataprachana.blogspot.com





































Monday, April 27, 2020

पाऊलखुणा....

सांजेच्या सावलीत
स्वप्ने जोजवलेली
नभाच्या हनुवटीवर
चंद्रकोर सजलेली

आसुस मनाचे गाणे
धमण्यात सा-या घुमते
आत्म्याचे हिरवे फुलबन
बहरात कुठल्या रमते

हे बहराचे पर्व
सुगंध मनास भारी
नित्य घडते सांजवेळी
आठव बावरी वारी

निजदाटली रात
दिव्यात तेवत राही
प्रकाशाचे रूदन
सागरपृष्ठावर वाही

ओलदाटल्या वेळी
सांजेचे मुक्त होणे
सांजक्षितीजावर चकाके
धम्मक पिवळे सोने

अंधाराची विण उसवते
आठवणींचे धागे
बंद डोळ्यात साचे
एक स्वप्न जागे

ओल्या रेतीवर दिशाहीन
उमटतात पाऊल खुणा
एकांत समयी दाटे
ॠणानुबंध जुना

हाक कुठुन ही ओली
किरणात दिसून येते
अंधूक पाऊलनक्षी
लाट पुसून जाते.....
♡pr@t@p♡
"रचनापर्व"
27/4/2020
prataprachana.blogspot.com












Sunday, April 26, 2020

सांजवेळचे बकुळगाणे.....

क्षितीज विझत्या वेळी
उमटती भावबंधी तरंग
पाण्याच्या श्वासाला
मग बाधतो चांदणरंग

पेटत्या पाण्याचे असे
होवून जाई तिर्थ
सांजवेळचे बकुळगाणे
भिजून होते सार्थ

लहरीच्या आत उमलते
एक दिर्घ पोकळी
किना-याला झोंबत असते
ओल्या लाटांची साखळी

तुषारांतुन बहरून येते
मृगाचे कस्तुरी मन
डोलणा-या अवकाशी
लवंडे चांदण बन

सांज साधते अवखळ
माझ्या शब्दांशी मेळ
बुडून होते ओली
तुझ्या आठवणींची वेळ

शब्दाच्या हृदयाची मग
मी पेटवून देई मशाल
तुझ्या परिस स्पर्शाने
साधा टिंबही होतो विशाल

भाव असा कोणता
पाण्याच्या अधिर वक्षावर पडतो?
माझ्या कवितेला असा नित्य
प्रवास भिजका घडतो....!!!
♡Pr@t@p♡
"रचनापर्व"
26/4/2020
prataprachana.blogspot.com



Saturday, April 25, 2020

तमात बुडतो गाव....

हा वसंत सारा तारण
शब्द फुलण्यासाठी
कळ्यांचे सुगंधी नि:श्वास
फांदिवर खुलण्यासाठी

तुझे अत्तर दिशात
आसमानी गंध भिनतो
वारा स्तब्ध मुका अनाहुत
अलवार उधाण बनतो

फुलांना जाग सांजवेळी
पाण्याला तहान लागे
दारात अडकल्या पदराचे
हसती उत्सूक धागे

तगमगीच्या सायंकाळी
निळे चांदणे बहरते
मनाच्या गाभा-यात
फुलपाखरू विहरते

इशा-याची हुल उठते
होई मनाची धावा धाव
निघत नाही पाउल तोवर
तमात बुडतो गाव..

पावलांचा हिरमोड
वाट बुडून जाते
अंधाराच्या सावली आड
वेल झडून जाते

मग सांजकाहुरी हवा
दिव्यात जळत राहते
एक जळती वात आसुसुन
चंद्र पाहत राहते....

चंद्र पतंगा बनतो
घेई वातीवर झडप
पुन्हा सारे गाव होते
अंधारात गडप.......!
(प्रताप)
25/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Friday, April 24, 2020

मखमली शब्द गोंदण


मैफिली सुन्या
तु नभी वसंत पेरावा
कवितेला स्पर्शावे तु
शब्दास रोमांच घेरावा

तुझ्या घडणावळीची अक्षरे
काव्य बांधत न्यावे
उसवत्या मनाच्या धाग्यांनी
मखमलीतुन सांधत यावे

लिहावी तुझ्या आत्म्यावर
कविता अमीट अमर
झेलून घ्यावेत हृदयी
सारे भावहिंदोळी समर

गायहंबरी भाव
ओळीतुन दाटून यावा
शब्दांच्या काळजाला
पान्हा फुटून यावा

पाषाणानेही कोरून घ्यावे
मखमली शब्दांचे गोंदण
गंध यावा कवितेला
जसे लेपले चंदन

खिडकीच्या तावदानातुन
बहरावी शब्दफुलाची फांदी
चकोराच्या पंखाने द्यावी
आर्त आठवणींची नांदी

चांदण्याच्या रंगाने
मी लिहीत जावे गाणे
चैत्राच्या हृदयाला लगडो
वसंत कोवळी पाने.....
(प्रताप)
24/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Tuesday, April 21, 2020

का पेटतो सांजवेळी.....



प्राजक्त बनाच्या मनावर
रूतती आठवणीच्या टाचा
झाकल्या ओंजळीस सुगंधी
फुटून येई वाचा

डोळ्यात अगणीत प्रतिक्षा
काहूराचे बहर सांडले
हिरव्याकंच फांदिवर
हृदय जणू हे मांडले

रस्त्याच्या कडेवर
ही कसली छाया
का आतुरतो रातवा
पेरत चांदण्यावर माया

हे फुलबनाचे काफीले
हे आठवणींचे भास
बहराच्या आभासानेही
फुलांना ये सुवास

टेकडाच्या माथ्यावर
हवा गित गाते
स्पर्शून मनाचा गाभारा
का तुझ्या दिशेस वाहते?

हे आभाळ चैत्राचे
सारे खुले अवकाश
चांदव्याला सोनेरी रंग
चढतो सावकाश

उष्णमातीत अनवाणी पावले
कसली रेखतात रांगोळी
का पेटतो अवघा अवकाश
मुक, शांत, सांजवेळी?

(प्रताप)
"रचनापर्व "
21/4/2020
prataprachana.blogspot.com











Sunday, April 19, 2020

पेटे वैशाखाचे रान.....


मनाच्या माळावर पडे
शब्दांचे देवधान
कवितेच्या पळसाने पेटे
वैशाखाचे रान

फुलांची झडती
लागे कवितेची रास
माझ्या श्वासाला
ओंजारतो बासरीचा भास

पेटत्या शब्दांना दे
तुझ्या स्पर्शाची फुंकर
शब्दाना लगडो माझ्या
तुझे पैंजणी झंकार

अंधार झोंबतो
मनी रंगाची उल्का
निनादतो पायरव
दुर वाटेवर हलका

शब्दापार कविता
आभाळाला भिडते
व्याकुळ अभंग
तार वेणूशी जुडते

ओघळतो कृष्ण
राधा ओंजळ पसरे
सावडून घेई मी
गोकुळ हसरे

काळीजझोंबी सुर
आकाशी झरतो
शब्दापार कवितेचा
मी हंगाम धरतो
(प्रताप)
19/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Thursday, April 16, 2020

फुलवातीचे बन.....


देऊळगिते,अजान
आणी अभंगाचे सुर
मनाच्या नदीला
सागरओढी पुर

फुलवातीचे बन
उजेडीगंध फुलतो
पायरवाचा रूनझुन नाद
मनात का खुलतो?

निर्माल्याचे गाणे
मनात दाटून येते
आभाळाच्या गर्ततेतुन
सांज फुटुन येते

हळदरंगी चांदणे
अंधार होई'हिरवा'
मेहंदी गंधाच्या हातचा
उडून येई पारवा

तगमगीच्या भिंतीवर
साचते एक अंधारवेळ
फुलपाखरी पंखाना
न लागे रंगीत मेळ

दिवा मनाचा जळतो
अंधाराला बिलगुन
वात उसवते एकटी
प्रकाशातुन विलगून

हुरहुरीच्या सायंकाळी
कोणाचे पैंजण वाजते?
उत्सुक,अनावर पाउलवाट
मोहरून का लाजते?
(प्रताप )
16 एप्रिल, 2020
"रचनापर्व "
prataprachana.blogspot.com



Wednesday, April 15, 2020

अंधारयुगाचे लटकन.....


अंधारयुगाचे लटकन...
-------------------------
मनातल्या ओघळफुलांनी
मी चितारे शिल्प
अंतरीच्या खोल दिव्याला
उसंत नसते अल्प

सांज आभाळी,बावर वेळी
दिपकलिका नमते
तमगंधी अवकाश कडेवर
किलबील सारी जमते

अवकाशी तगमग घेवून
अंधार प्रसवे संध्या
बहरून येती आठवफुलांच्या
गहि-या रंगीत फांद्या

फुले आभाळी फुलून येती
चांदणे पायदळी सांडते
अंधाराचे काळीज घेवून
सांज प्रकाश मांडते

अंतरीचा दिवा तेवतो
बंद डोळ्यात प्रकाश दाटे
ओळखीच्या पाउलवाटी
कोण पसरले काटे?

मनाचे गहिवर खोल
सांज दाटते चटकन
तेवत राही काळजावर
अंधार युगाचे लटकन..

चांदण्याचे अंबर वेडे
हर सांजेत डळमळे
भरून येते माळरानावर
एक हसरे तळे.......
(प्रताप)
"रचनापर्व"
15/4/2020
prataprachana.blogspot.com

Monday, April 13, 2020

आभाळ ऊंची नायका...!!


आभाळ ऊंची नायका!
तु तळपता प्रज्ञासुर्य!
वंचित दुबळ्या मनाचे
तु अफाट झुंजार धैर्य..

तमात पिचल्या पिढ्यांचे
तु तममुक्तीचे पर्व
तु आमची सुरूवात
तुच आमचे सर्व..!

तु 'मानवमुक्तीचे सुक्त'
आमच्या आत्म्यावर कोरलेले
उगवू आम्ही उद्याचे सुर्य
तु धमन्यात पेरलेले..

तुझ्या प्रकाशी पावलांनी
झोपडीचे महाल झाले
थोतांड धर्ममार्तंडाचे
जगणे बवाल झाले...

तु शोधून दिला बुध्द
तु दिलेस संविधान
भारताच्या आत्म्याला तु
दिलेस समता-भान

तुला अर्पून सारे माझे
समर्पणाची आस मिटत नाही
माझ्या कवितेलाही समर्पक
शब्द फुटत नाही!

तरीही ही शब्दफुले
मी तुला मनातुन वाहतो
हे शब्दधनही तुझेच देणे!
ॠणात तुझ्या राहतो..
(प्रताप)
14/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

मानवमुक्तीच्या दात्यास ही शब्द वंदना!
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटीकोटी अभिवादन!
महामानवाने दिलेले संविधान व दिलेला मार्ग अनुसरत सर्व चालो!
मानवमुक्तीच्या लढ्यास बळ मिळो!

Saturday, April 11, 2020

पाखरपंखी तगमग..


गर्द सायंकाळी
अंधाराची लगबग
मनात साचे गर्तखोल
पाखरपंखी तगमग

सांजपावली पैंजण
मनात इवले बिज
ओढ मनाला लागे
झरून जाई निज

सांजसाचला माळ
बहरते बासरी धुन
पाखरांची ललकारी
वाटे ओळखीची खुण

तु नकोस पेरू तम
ऊजेडाची लागे आस
मोहरल्या चांदण्याला
मग स्पर्शाचा सुवास

मी गीत तुझे आभाळी
अलगद देतो पेरून
शिल्प मनाचे माझ्या
तुझ्या आत्म्यावर कोरून

आस भरली सायंकाळ
माळरानी फिरते
बासरीच्या ओढीने
राधा एकली झुरते!

दाटून येतो शाम
व्याकुळ होती गाई
सांज व्यापन्या कसली
रातीस होते घाई?
(प्रताप)
11/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Friday, April 10, 2020

प्रेमाचे प्राचिनत्व.....


रात प्राचीन प्रेमिका
चांद नभीचा साजण
चांदण्याच्या आत्म्यावर
हळू उमटते गोंदण..

डोंगराच्या माथ्यावर
चांद सारा सांडतो
रातीच्या प्राक्तनाशी
अंधार उगा भांडतो

आत्म्याच्या चोचीने
चकोर हळवे बोलतो
पिंपळवृक्ष सोनेरी
पट मनाचे खोलतो

मी मुका उभ्याने
घेवून हृदय पात्र
रेखत राहतो अंधारी
उजेडाचे चित्र

सुन्या माळावर अवघे
चांदणे झिरपत वाहते
चित्र जाते ओसरून
कविता शिल्लक राहते

मी शब्दाच्या आत्म्यात
शोधतो पावन क्षण
पहाटेच्या उजेडात
बहरते अंधाराचे बन

हा अंधार हा चंद्र
युगाचा लपंडाव
लागत नाही यांच्या
प्रितीचा प्राचीन ठाव...
(प्रताप)
11/4/2020
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com

Thursday, April 9, 2020

चांदण्याची शब्दघडण....


चांदण कळ्या आड
झिरपते अवकाश
रातराणीचा ॠतु
पेरी गंध सावकाश

या कल्लोळ घटीकेत
वारा अबोल मंद
चांदआत्मी रातीस
लागे आठवणीचा छंद

निद्रेच्या मनाला
डोळ्यांची बांधणी
पुकारत्या वाटेला
उजाळते चांदणी

दिव्याचे उमलणे
वातीचे झोत
चांदवा शोधे
आत्म्याचा पोत

हे विराणीचे सुर
ही पेटती आकाशगंगा
आर्त खोलवर चाले
पुका-याचा दंगा

आभाळाचे पट
चांदण्याचे थवे
रातीच्या काळजावर
उतरे गीत नित्य नवे

मी शब्दांची घडण
चांदण्याने रेखी
प्रकाशते मोहरून
काव्य सखी
(प्रताप)
10/4/2020
"रचनापर्व"
prarataprachana.blogspot.com






Monday, April 6, 2020

आमच्या पथदिव्यांनो.....!!

 .....पथदिव्यांनो!!!!

'शाल्व'आणी 'पिंपळ'
छायेत एकाच युगात
प्रदिप्त झालेल्या
पथदिव्यांनो!
तुमचा प्रकाश अव्हेरून
आता येथील झुंडी
अंधारप्रवासी झाल्यात.....!

आणि
थोतांडाला
त्यागून तुम्ही मिळवलेले
'कैवल्य ज्ञान' आणी 'बुध्दत्व'
अव्हेरून तमासक्त नशेत
त्या भरकटत
असतात..भाविक बनून!

तेंव्हा हे
शाक्यमुनी!
आत्मप्रज्जवलीत
होण्यासाठी तुझे
'अत्त दिप भवं'
व महाविरांच्या
'अंहिसा परमो धर्म' चा
वाटसरू बनणेच इष्ट ठरेल!

आताच्या रोगट वसंतातही
इतरांचे फुलोरे बेभानतेने
लुबाडणा-यांना
उमजेल कधीतरी
नक्कीच !
भरला वसंत असतानाही
त्याला त्यागून
तुमची वंदनीय पावले
शाश्वत सत्याकडे निघाली होती....

(प्रताप)
6/4/2020
महावीर जयंतीपर्वाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
(#महावीरजीना ज्ञानप्राप्ती शाल्व तर गौतम बुध्दास बुद्धत्व पिंपळवृक्षा खाली प्राप्त झाले होते, दोघेही समकालीन होते)











Wednesday, April 1, 2020

सावटाचा वसंत.......

हा सावटांचा वसंत
बहर वाटत नाही
पानगळीचे भय मनातुन
किंचीत सुटत नाही

आले अंकुर 'अस्पर्शी'
चैत्र उदास वाटे
स्पर्शाचे पंख मखमली
त्याला मृत्यूचे काटे

या हंगामात असा
'अस्पर्शी' मोहोर कसला?
कोकिळेचा आवाज दबका
जणू हुंदका फसला

माणसे, बहर,मोहोर
सारेच झाले बंदी
तरी सजवते कोवळीक
हरखुन ही फांदी?

होईल कदाचित मुक्त
हे वसंताचे दान
आणी मुक्त होईलही
कदाचित गुलमोहराचे रान
(प्रताप)
1/4/2020
#कोरोनाची अस्पर्शी कविता#

Saturday, March 21, 2020

शब्दांचे कोरेन्टाईन.....

माझ्या शब्दांनाही मी
आता नाईलाजाने
'कोरेन्टाईन' केलंय
आणी लावलाय कवितेवर
माझ्या निग्रहाचा 'कर्फ्यु'

जागतीक कविता
दिनानिमीत्त
संभाव्य कवितांची
गर्दी टाळण्यासाठी
मी जपलेही आहे
विलगीकरण माझे.....

भरल्या शहरातील या
सुन्या रस्त्यावर
गळताहेत एकेक पाने
आणी मी आत रोखून
धरलाय फुलो-याचा हंगाम
तुझ्या साथीची साखळी
तुटण्याची वाट पाहत...

(प्रताप)   21/3/2020
# कोरोना   जागतिक कविता दिन#


Sunday, March 1, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 24 : उपसंहार - ○अंतिम भाग○




स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस
भाग 24 : उपसंहार - ○अंतिम भाग○


माझं सिलेक्शन झालं...ज्या क्षणाला मला समजलं..मी कांहीतरी झालो आहे..त्या क्षणा अगोदर मी कोणी नव्हतो...तो क्षण आला..(.मी दुनिया चक्क बदलताना पाहिली....) आणी मी खुप काही होतो...आयुष्यात यशस्वी होणं म्हणजे काय? असा क्षण कमावणं..ज्या क्षणाला आपली दुनिया बदलते....तो क्षण आला..जगण्याचे संदर्भ बदलले...ज्या रस्त्यावर माझे आईवडील रोज वावरायचे.. तेथे नमस्कार वाढले....गावगाड्यातल्या वडीलधा-यांच्या पायाला लागण्याचे
भाग्य मिळाले...म्हाता-या कोता-यांनी गोंजारले...आप्तमित्रांनी नवाजले....मनातले वादळ स्थिरावले...वडीलाच्या पायाला भिंगरी आली होती..आजुबाजुच्या खेड्यात चर्चा होती...शाबासकी मिळत होती...दबके स्वप्न खुलले होते...आनंद पसरला होता...मागच्या पिढ्यात कोणीच नव्हते ती सुरूवात करण्याचे भाग्य मला मिळाले होते...माझे स्वप्न आम्ही सारेच मिळुन जगत होतो...त्यामुळे त्याच्या पुर्तिचा आनंद सगळ्यांनाच होता..... मी शांत शांत झालो होतो....जेंव्हा पासून MPSC करायची डोक्यात आले होते त्या क्षणापासून आत आलेली अस्वस्थता मी आतील तगमग व सर्वांच्या सहकार्याने नियंत्रीत पध्दतीने धसास लावली होती...ज्या परिस्थितीत मी शिकणे हेच दिव्य होते तेथे मी अधिकारी होवू शकलो होतो...काय वेगळं केलं होतं मी...? एक स्वप्न पाहण्याचं धाडंस आणि ते वास्तवात येण्यासाठी अखंड व अपार मेहनत.... व कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी एकनिष्ठता व सातत्य....आयुष्यात या गोष्टी असतील तर नियती मदतीचे हात आपोआप पाठवते पण ती इमानदारीची ग्राहकता पण स्वतःत असायला हवी.....एका भिंतीवर लिहिलेलं.. व शाळेत जाता येतं वाचलेलं " अत्त दिप भवं" अनुभवायला मिळणे भाग्यच!!!!

नियती किती सुंदर असते...ती सतावते...किंमत कळवते..तुम्हाला संघर्षरत करते...ती सत्व तपासते...आणी तुम्ही तिच्या हर प्रंसंगात तगून राहिलात की ती तुमच्या पदरात दान टाकते...भरून देते ओंजळ...माझा मोठ्या भावाची अवस्था मी पाहत होतो...लहानपणी त्याच्या सत्कारावेळी मलाही त्याच्या सारखाच ड्रेस होता पण त्याच्या सारखे यश मला मिळाले नव्हते...मला तो लपवण्याची इच्छा दाटून आली होती...तशीच त्याची अवस्था..तो ही त्याच्या निकालाची वाट पाहत होता...अस्वस्थ होता...जरी तो मोठा भाऊ असला तरी तो माझा खुप चांगला मित्र होता..मी त्याची मानसिकता जाणत होतो...मी त्याला आधाराचं बोलायचो..अभ्यास कर होईल काही तरी नाहीतर नव्याने अभ्यास करता येईल....पण ज्याचं त्यालाच कळतं!!! सकाळपासून तो खुप अस्वस्थ होता...त्याचा मित्र आला..त्याने त्याला विचारले..10 रूपये आहेत का तुझ्याकडे? त्याने त्याला ते दिले व त्याचा मित्र रूमवरच बसून राहिला हा तडक बाहेर पडला...15 ते 20 मिनिटाने तो परत आला...आणी दारातूनच म्हणाला, "मला वाटलंच होतं! मला एवढं अस्वस्थ वाटतंय म्हणजे काही तरी होणार आहे " मी म्हटलं " काय? " तो म्हणाला " कॅफेवर गेलो होतो..निकाल लागला...मी पास झालो आहे........... प्रचंड खुशी.....प्रचंड उलथापालथ.....पुन्हा डंका!!!!!!!! अपार समाधान...एकाच महिन्यात दोन सिलेक्शन!!! आनंदाला पारावार नाही..!!!

एक काळ होता,अन्नान्न दशा, तुटपुंजी साधनं..(नव्हे वंचनाच), कुठलीही सुविधा नाही, लोक शून्यातून विश्व घडतात...पण काही जणाकडे शुन्य ही नसते...ती अवस्था भोगून..विश्व तर नाही पण सन्मानजन्य पद मिळवू शकलो..आणी वंचनेच्या आमच्या विश्वाला,अस्तित्वाला निश्चित आकार देवू शकलो...धड झोपडंही नसणा-या घरात, जेथे "वाघमारे तुमचे पोरं वाया गेले" इथपासून "अशी पोरं मिळाले भाग्यवान आहात" इथपर्यंत स्थिती आणू शकलो..हेच मोठं कर्तृत्व! आई वडिलांच्या डोळ्यात स्वतःबद्दल अभिमान पाहतो..तिच आयुष्याची सर्वात मोठी कमाई! आणी जी आयुष्य पध्दती त्यांना मिळाली होती तिच्यात बदल होवून त्यांना सामाजिक सन्मान मिळतो हेच त्यांनी घडवले याची उतराई!!!

मी आजही ते दिवस,तो संघर्ष विसरत नाही, किंबहुना तो मला विसरायचही नाही, कारण कोणी आपला खजिना असाच सोडून देईल का? माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची संपत्ती काय? सिलेक्शन??? नाही!!! हे संघर्षाचे दिवस हीच माझी संपत्ती...हे नसते तर मी नसतो....ती वंचनेची परिस्थिती..ती नसती तर मी संघर्ष करायला शिकलो नसतो...ती वाईट परिस्थिती....जी वाईट होती म्हणूनच मी ती बदलू शकलो....ते निंदक ..ते होते म्हणून आत ज्वाला चेतत राहिली...ते मित्र ...ते होते म्हणून आयुष्याचा अर्थ कळाला...ते आईवडील ज्यांनी संस्कार दिले...स्वप्न पाहण्याचे धाडंस दिलं... आणी माझी कथा बनली...आजही माळरान मला खुणावतं...माझ्याशी बोलतं...खोल मनात ते मी जपून ठेवलंय...ते उजाड असतं...म्हणूनच ते मला फुलून येण्यासाठी...सुचवत राहतं...मी हे काहीच विसरत नाही. मित्र विचारतात तुला आजही ते सारं लख्ख आठवतं! आश्चर्य आहे...मित्रांनो जे काळजावर कोरलं आहे ते कसे विसरणार....???

ही कथा मी का लिहावी?(नायब तहसीलदार या पदावर निवडले जाणे म्हणजे फार काही मिळवले का? स्वतःचे महात्म्य मला सांगायचे आहे का?, मला आत्मगौरव,आत्मप्रौढी हवीय का?,मला लोकांनी खुप चांगलं म्हणावं असं काही वाटतं का? मला सहानुभुती पाहीजे का? मला माझ्या परिस्थितीचं भांडवल करायचं आहे का? मला कोणी आदर्श समजावं असं वाटतं का? याचं उत्तर आहे 'नाही') मला ही सांगावी वाटली कारण यातुन एखाद्याचं दबक्या भावनेनं पाहिलेलं स्वप्न एकाकी मरून न जाता त्याला जिंकेपर्यंत लढण्याचं बळ मिळावं, त्याने/तिने वंचनेच्या अवस्थेला शरण न जाता त्या वंचनेलाच आपली ताकद बनवावं, असेलच घरात चिखल तर त्यानेही फुलून यावं..माझ्या इश्वरतुल्य मित्रासारखे काही हात पुढे यावेत, झपाटलेल्या मनाला यशाचं दान मिळावं, नाहीच कोणाला जमले जग बदलने तर किमान त्यानं आपलं जग स्वतःच्या हिंमतीने उभारावं...कोणी लाजून कोमेजून न जाता उमलून फुलून यावं, मोठमोठ्या शहरात स्पर्धा परिक्षा अथवा शिक्षणाचं वातावरण आहे पण आपली ऐपत नाही म्हणुन कोणी लढणं न सोडता..स्वतःच्या आसपासच एक आश्वासक शहर उभारावं..व त्यातुन अंधारात दबलेल्या अनेक झोपड्यांना प्रकाशाचं दान द्यावं...माफक घ्यावं...भरभरून द्यावं... आईवडीलांच्या डोळ्यांतील स्व्प्नांना वास्तवात आणावं...नसतीलच स्वप्न तिथे तर त्यांच्या डोळ्यांना स्वप्न द्यावं...हर एका झुंजाराने निकराने झुंजावं...आणी वाटलंच कधी एकटं तर त्याला माझ्या कथेनं सावरावं......अशा अनंत कथांना...माझ्या कथेनं आलिंगन द्यावं.....एकमेकांना भारावं....आव्हानांना भिडत....काळाच्या काळजावर नाव आपलं कोरावं.......

(" मी कोठे आहे यावरून माझे मुल्यांकन करू नका, मी कोठून आलो ते पहा माझ्या स्थानाचं मुल्य समजेल" - इति कार्व्हर....
धन्यवाद कार्व्हर !! तु मला कायम जिवंत ठेवतोस.....सा-यांना ठेव!!!)
(पुर्ण)

●~प्रताप गोरख वाघमारे~●
"रचनापर्व"
prataprachana.blogspot.com











Thursday, February 27, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 23: झाले मोकळे आकाश.......!!!


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 23: झाले मोकळे आकाश.......!!!

                मुलाखत होवून गेली होती,नविन पुर्व परिक्षा आली होती तिची तयारी सुरू होती, अभ्यास वेगात सुरू होता,पण मन सतत लागलेलं असायचं ते मुलाखतीचा निकाल कधि लागेल. अभ्यासाची जुनीच पध्दत होती,सर्वांनी मिळून अभ्यास करायचा, तांदळे सर, अतुल पाटील,संदिप जाधव,अरूण पोतदार,अशोक मोहाळे,संजय औताडे सगळे जण एकत्र अभ्यासाला बसायचो,चर्चेसाठी मग दिनेश झांपले सर, विजय कबाडे हे येत असायचे..मी विजय आणी तांदळे सर शिकवायला जायचो. क्लास मधे शिकवताना अनेकजण मन लावून शिकायचे,विविध पार्श्वभूमीचे, परिस्थितीचे मुलं अभ्यास करायचे...सर्वांचा विश्वास होता आम्ही सिलेक्ट होणार! कारण तसे होणे हे त्यांना झुंजण्याचे बळ देणार होते..त्यांनी आमच्यावर लावलेल्या अपेक्षा पुर्त होणे ही त्यांचे मनोबल टिकवणार होते. खुप दबाव यायचा कसा लागेल निकाल,काय होईल, कोणती पोस्ट मिळेल की पुन्हा सारे मुळातुन करावे लागेल? दररोजचा दिवस जड जायचा,मन लागायचे नाही, सारे होते सोबत म्हणून दिवस रेटायचे बळ होते...राजेंद्र यायचा बोलून जायचा...लागेल बे! वाट बघ! सांगायचा...क्लास मधील मुले, आम्हाला फाॅलो करणारे विद्यार्थी, घरचे लोक सगळे सगळे अपेक्षा ठेवून होते....

              दरम्यानच्या काळात मोठा भाऊ काही तरी धडपड करत होता, तो कलाक्षेत्रातील असल्याने त्याला स्पर्धा परिक्षा वगैरेत मन लागायचे नाही तरीही त्याला बळजबरीने क्लासला बसायला सांगायचो..तो बसायचा पण रूम वर आल्यावर तेच पेंटींग, स्कल्पचर,आर्टिस्टीक क्रिएशन यातच तो रमायचा..सतत त्याच्या डोक्यात असायचे की याच क्षेत्रात त्याला करिअर करायचे आहे. माझ्या घरच्यांना वाटायचं की त्यांनेही माझ्या सारखा अभ्यास करावा.कारण चौथी बोर्डातली त्याची कामगिरी व नवोदयच्या परिक्षेत त्याने जिल्ह्यात सिध्द केलेली त्याची गुणवत्ता, त्यामुळे त्यावेळी त्याचा गावात जिल्हा स्तरीय अधिका-या मार्फत झालेला सत्कार, 12 पर्यंत नवोदय विद्यालयात झालेले शिक्षण यामुळे घरच्यांना(अर्थात मलाही)वाटायचे हा हुशार आहे यांना पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा. खरंतर ही कुटुंबाची गरज होती जी त्याच्या इच्छेवर थोपवली जात होती.तो मला म्हणायचा' मला आर्ट क्षेत्रात करिअर करायचे आहे,मलाही वाटायचं पण पर्याय नव्हता...तो निमूट क्लास मधे येवून बसायचा.त्याचे त्याच क्षेत्रातील मित्र त्याला भेटायचे..या छंदासाठी त्यांना बिए नंतर एटिडी या कोर्सला अॅडमीशन घेतले होते. व ती पदविका मिळवली होती.कंपनीत काम करणे,पेजर ऑफिसमधे काम करणे, कला क्षेत्रातील दुकानावर सहाय्यक म्हणून काम करणे,गणेशोत्सव व इतर प्रसंगी डिझाईनचे मखर बनवून विकणे,त्यातुन त्याने आपला संघर्ष आणी आवड जतन करून ठेवली होती. असेच एके दिवशी त्याचा मित्र शरद पुणे आला त्याने सांगितले "राहूल,केंद्रीय विद्यालयाच्या आर्ट टिचर च्या जागा निघाल्या आहेत, खुप कमी जागा आहेत आमच्या कॅटेगरीला जागा नाहीत, मी फार्म घेतला आहे तु भर" त्याने तो फार्म दिला,भैय्याने घेतला, पाहिले , दोनच जागा आहेत, तरी किमान आर्ट टिचर च्या जागा आहेत हीच त्याच्यासाठी अभिप्रेरणा होती...त्याने तो फार्म भरला..कसा अभ्यास करायचा याचे डिस्कशन व्हायचे,कशाचा अभ्यास करायचा हे त्याला माहीत होते,MPSC च्या क्लास मधे बसून त्याला ब-यापैकी जनरल स्टडीज माहिती होते. सिरीयस होवून त्याने अभ्यास केला...त्याची परिक्षा मुंबईला होती.मित्रांकडून उसने घेवून,काही त्याचे काही माझे असे पैसे जमा करून तो परीक्षेला गेला...परिक्षा झाली...

             आमची दुसरी पुर्व परिक्षा झाली...आता फक्त प्रतिक्षा..मुलाखत दिलेल्या निकालाची,झालेल्या पुर्व परीक्षेच्या निकालाची, सोबतच राहुल भैय्याने दिलेल्या दिलेल्या परीक्षेची ..हा काळ कसा होता वर्णनच करू शकत नाही..दरम्यानच्या काळात PSI परीक्षेचा निकाल आला लातुर मधून खुप चांगले निकाल आले,जेथे शिकवत होतो तिथल्या क्लासचे निकाल तर आलेच पण आमच्या ग्रूप मधून रोहिणी पोतदार(अरूण पोतदार यांची बहीण) ही प्रथम प्रयत्नातच PSI झाली. लातुरभर आनंद पसरला. स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यासाठी मनोबल वाढेल अशी पहिली भरिव घटना!! खुप चांगले लक्षण असलेली ही घटना होती. दरम्यानच्या काळात राहूल माकणीकर सर(मुळचे लातुरकर, सध्या DCP नागपूर तत्कालीन STI परीक्षेतील महाराष्ट्राची दंतकथा, पुणे ज्ञान प्रबोधिनीत व सबंध महाराष्ट्रात ज्यांनी कित्यकांना शिकवले होते,शिकवत होते), यजुवेंद्र महाजन सर(दिपस्तंभ क्लासेस), रंजन कोळंबे सर असे किती तरी दिग्गज लातुर मधे शिकवायला यायचे. मुलांना शिकवायचे.तेथील मुलांची तयारी पाहून खुश व्हायचे. कोण शिकवतात तुम्हाला म्हणून लातुरात शिकवणा-या आम्हा सर्वांचे कौतुक करायचे. प्रचंड आत्मविश्वास वाढला, कधी कधी अशा दिग्गजांचे व आमचे हाफ हाफ डे सेशन व्हायचे, मी,राजेंद्र ढाकणे,तांदळे सर, विजय कबाडे, अरूण पोतदार असे सारे शिकवायला जायचो, त्याच काळात प्रकाश कुलकर्णी सर( सध्या सहाय्यक आयुक्त विक्रीकर ज्यांनी 2002 च्या अॅटेम्प्ट ला डेप्युटी कलेक्टर रॅकचे मार्क्स घेवूनही त्या जाहिरातीत निव्वळ 78 च पोस्ट असल्याने DY SLR हे सिलेक्शन मिळवले होते), धन्वंतकुमार माळी सर(DY CEO सध्या बिड जिल्हा परिषद- वारंवार अपयश येवूनही,सात्याने प्रयत्न करून ज्यांनी महाराष्ट्रात तिसरे येण्याचा बहुमान मिळवला,व ज्यांची शाळा पहायला जिल्हा स्तरीय अधिकारीही उत्सुक असायचे असे आदर्श शिक्षक), त्यांचे मित्र भांबरे सर(जि.प. शिक्षक), महेश वरूडकर सर ( सध्या अवर सचिव), जुना सहकारी अतुल कुलकर्णी (सध्या कक्ष अधिकारी), सुधीर पोतदार सर( ज्ञान प्रबोधिनी लातुर चे संचालक), दयानंद सोमवंशी सर( सोहम क्लासेस चे संचालक), विद्याधर कांदे सर ( फिनिक्स अॅकेडेमीचे संचालक) व ईतर असे सारे जण शिकवत होतो. अख्खं लातुर जिव तोडून शिकत होतं आम्हीही जिव तोडून शिकवत होतो( आमच्या मुळे असा माझा तरी बिल्कुल दावा नाही मुलामुलींच्या स्वतःच्या प्रयत्नानेच पण त्याकाळात व नंतर लातुर मधून खुप सारे सिलेक्शन झाले त्यात थोडेफार योगदान मीही देवू शकलो हे अत्यंत समाधान.)

                त्या दरम्यान राहूल भैय्याचा निकाल आला, तो मुलाखतीला पात्र झाला होता. खुप आनंद झाला एवढ्या कमी जागा असतानाही तो पास झाला होता.त्याचा इंटरव्ह्यु दिल्लीला होता.त्याच्या इंटरव्ह्युची खुप चांगली तयारी करून घेतली.त्यानेही ती खुप मन लावून केली. सा-या त्याच्या मित्रांनाही आनंद झाला होता. त्याची खुप चांगली तयारी झाल्याने तो दिल्लीला जाऊन मुलाखत देवून आला. त्याची मुलाखत चांगली झाली. त्याने केलेली तयारी, त्याच्या सोबत झालेली चर्चा या सर्वांच्या आधारेच मुलाखत झाली. काही प्रश्न चर्चेतलेच आले, अचानक आम्ही दोघेही मुलाखत स्तरापर्यंत पोहचलो होतो. घरात तर खुपच आनंदाचे वातावरण होते. पण ते व्यक्त करण्याची एक मर्यादा होती, कारण तो काय, मी काय आम्हा दोघांचेही फायनल निकाल लागलेले नव्हते,घरच्यांना आशा होत्या पण अव्यक्त! कारण निकाल नकारात्मक लागला तर?? खुप मोठा अपेक्षाभंग झाला असता. आमच्या निकालाच्या कल्पनेने आई वडील ही थोडेसे चिंतायुक्त होते पण तसे ते दाखवायचे नाहीत. काय करणार त्यांना आमचा अभ्यास, तयारी याची चर्चा करण्यासाठी कोणी नसायचे, आणी जे करू शकतील अशा लोकांकडून त्यांना तशी संधी मिळायची नाही. गरीबांची स्वप्नेही दबकी असतात....निमूट पहायची..वास्तवात आली तर डंकाच!!! पण नाही आली तर दबके दुःख....आणी उपहास...इज्जतीला जपणारे माझे आईवडील कोणी उपहास करू शकणार नाहीत एवढ्याच मर्यादेत व्यक्त व्हायचे..त्यांना खात्री होती काही तरी नक्कीच चांगले होईल पण ते व्यक्त करू शकत नव्हते...तसेच आमचेही!! पण तरीही हे माझे माझ्या मर्यादे विरूध्द पुकारलेले बंड होते..जे मला जिंकायचेच होते..मी करणार नव्हतो...जिथे कल्पनाही होवू शकत नव्हती अशा ठिकाणी मी स्वप्न पाहीले होते...आणी निव्वळ ते पाहून मी थांबलो नव्हतो तर जिवाच्या आकांताने, जवळपास काहीच सामुग्री नसण्याची अवस्था असतानाही मी या टप्प्यावर आलो होतो...मी हरणार नव्हतो. मी सुरूवातच जिंकण्यासाठी व मर्यादा लांघण्यासाठी केली होती...मुळात राज्यसेवा परीक्षेची तयारी करायची हे ठरवणेच मुळात एक मर्यादा तोडणे होते....आणी मी तर आता एवढ्या दुर आलो होतो...आता थांबणे नव्हतेच!!!
                दरम्यानच्या काळात निलराज बनसोडे(जलसंपदा विभाग),आलोक चिंचोलकर( तलाठी), किशोर गवळी, हे पण कालेजचे क्लासमेट व अत्यंत जिवाभावाचे मित्र अभ्यासाला बसू लागले, काही मित्रांचे लहान भाऊ, काॅलेजचे सिनीयर, ज्युनिअर, गावातले मित्र हे ही क्लासला येवू लागले, त्यांना शिकवत होतो, योगदान देण्याचा प्रयत्न सुरू होता. एक काळ होता की सा-या लातुरला वाटायचे हा मूर्खपणा आहे की लातुर मधे राहून MPSC करणे..पण आता तेथेच खुपजण अभ्यास करू लागले, दरम्यानच्या काळात लातुर SP ऑफिसची लायब्रेरी व स्टडीरूम बंद झाल्याने आम्ही लातुरच्या नगरपरिषदेच्या वाचनालयात ही (टाउन हाॅल) अभ्यास करून दुसरी पुर्व परिक्षा दिली होती.

            लातुरात चिकनगुनियाची साथ आली होती, ग्रामीण भागात त्याने थैमान घातले होते. त्यात आईला त्या आजाराने ग्रासले. ती खुप आजारी पडली, त्या आजारात व्यक्तीला सांध्याचा त्रास होतो,धड उठता बसताही येत नाही ती झोपून रहायची,वडील घरकाम करायचे, तीला दवाखान्यात नेवून आणले पण तरीही ती आजारीच होती. पहायला गेलो..घर पडके असेल तरी चालते पण माणसे पडलेली नसावीत..पण आई आजारी होती.घरी थांबायला लागु नये आम्हालाही ती लगेच जायला सांगायची, वडील ही थांबू देत नव्हते. खुप निराशा येवू लागली.निकाल नाही, कसं होणार याची कायम टांगती तलवार..मी आणि मोठा भाऊ दोघेही खुप परेशान होतो...कसा तरी स्वयंपाक करायचा, खायचा, अभ्यास..पुर्व परिक्षा होवून गेल्याने क्लासेस ही नाहीत...काहीतरी खटाटोप करावी म्हटले तर अभ्यास सुटेल वाटायचे..खिशात गेल्या 7 दिवसापासुन फक्त तिन रूपये शिल्लक होते..वावड्या उठत होत्या निकाल लागणार आहे, लवकरच लागेल...रूम बदलली..फक्त ठिकाण..पण तशीच पत्र्याची.. अगोदरच्या पेक्षा स्वस्त...जेथे पोटासाठी आलेले परराज्यातील मजूर मुलेही आमच्यापेक्षा चांगल्या रूममधे राहत त्या गल्लीत...आणी तिचेही चार महिन्याचे भाडे थकलेले...

         एके दिवशी असाच बरिश्तावर गेलो, त्या दिवशीही निकाल लागेल अशी चर्चा होती..रहिमभाई हाॅटेलवर होते..काही असो पण कोणाला उधार मिळो की न मिळो हिमायतभाई व रहिमभाई मला हमखास उधार द्यायचे..कदाचित माझ्याकडे भेटायला येणारे एक तर खुप जण होते. त्यामुळे त्यांचे हाॅटेल खुप चालायचे..आणी आम्ही सारे चर्चेसाठी व व्हिजीटर्सला भेटायलाही तेथेच बोलवायचो त्यामुळे पुर्ण लातुरात बरिश्ता खुप फेमस झाले होते. आणी या दोन्ही भावांना माझी परिस्थिती व स्थिती दोन्ही माहिती होती.त्यामुळे ते मला खुप प्रेमाने, आदराने व अभिमानाने वागवायचे..मीही झालेली उधारी मी अत्यंत नियमीत द्यायचो.मुलं भेटायला यायचे, मित्र भेटायला यायचे त्यामुळे MPSC करायचीय का? बरिश्तावर जा! असा सल्ला नविन लोकांना मिळायचा.माझा अभ्यास आणी बरिश्ता जवळपास एकदाच सुरूवात झाली... होती.. .गेलो..बसलो..एकटाच होतो..खुपवेळ एकटाच बसलो.सगळेजण येणार होते... वाट पाहत होतो..तेवढ्यात काॅलेजचा एक जुना क्लासमेट खुप दिवसानंतर भेटला, एका संस्थेवर शिक्षक होता, सोबत गावातले प्रतिष्ठित लोक होते. SP office मधे काम असल्याने तो तेथे आला होता, त्याने विचारपूस केली, सोबतच्या लोकांशी ओळख करून दिली..आणि सोबतच त्यांना सांगीतले " हा खुप हुशार पण मुर्ख ठरलेला माझा जिगरी दोस्त ! त्याचवेळी 12 वी झाल्यास याला म्हटले होते डी एड कर पण केले नाही. MPSC करत बसला, आज बघ मी, शेतात बोअर केला, चांगले उत्पन्न होते, नोकरी आहे. तु ही सेटल झाला असतास आत्तापर्यंत, ते MPSC करायला ईथुन होत नाही बाबा,ते आपलं काम असत नाही, आपण खेड्यातले लोक आहोत, हातानं खराबा करून घेतलास" तो खुप तळमळीने बोलत होता त्याला फक्त आपला मित्र गरीब कुटुंबातला आहे, डी एड ला नंबर लागत असुनही गेला नाही, आणी आता बेकार बसला आहे याचे वाईट वाटत होते. तो खुप वेळ बोलला..आणी आत निघून गेला.सोबतचे 2/3 जण तिथेच बाजुला बसुन राहिले.त्यांनाही माझी किव येत होती. ते अधुन मधुन माझ्याकडे पाहत होते...त्याची तळमळ पाहून मी त्याला काही बोललो नव्हतो..

                        थोड्या वेळाने सारे मित्र जमा झाले...विजय, दिनेश,राजेंद्र, संदिप तर तांदळे सर, अतुल पाटील,अशोक मोहाळे हे सगळे जण आपल्या काॅलेजला गेले होते. आज नक्कीच निकाल लागणार आहे यावर चर्चा सुरू होती, राजेंद्र फोन करून तिकडे पुण्यात कोणाला तरी बोलला...आणी म्हणाला..निकाल आहे बे आज तुमचा!! अचानक वातावरणात टेन्शन वाढले..विजय ने पण कन्फर्म केले..खात्री पटली आज निकाल आहे...वातावरण खुप तणावपूर्ण झाले होते..मी सगळ्यात असून नसल्या सारखा झालो होतो..प्रत्यकाची अवस्था तणावाची होती. संजय औताडे पण आले..याच चर्चा दर 10 मिनिटाला बघा रे, कन्फर्म करा! लागेल यार आज निकाल, काय होतंय माहिती नाही ! लागला पाहिजे रे, सिलेक्शन व्हायला पाहिजे नाही तर काही खरं नाही!!! वातावरण एकदम गरम, सुन्न, अस्थिर....तगमग तगमग नुसती...वेड्यासारखी चुळबुळ...परेशान...दबाव वाढलेला..निकाल मुंबईत लागणार, सुट्टीचा दिवस, कलेक्टर ऑफिसला फॅक्स येईल पण वर्किंग डे उजडे पर्यंत काही खरे नाही...कसा समजेल तो लागला तर..?? चिंता निव्वळ चिंता..कोणीतरी तो सांगेल म्हणून सतत इकडे तिकडे संपर्क सुरू..आणी अचानक ...
सुधिर पोतदार सरांचा फोन आला..निकाल लागला!!!! धस्स!!
अरे विचारा कोणाकोणाचे सिलेक्शन झाले?
सध्या लागला एवढीच माहीती मिळाली आहे, प्रबोधिनीत विचारत आहे..
जिव कासाविस होत होता
थोड्यावेळाने समजले
........राहुल माकणीकर -Dysp
..........महेश वरूडकर- DO
आमचा निकाल काही समजेना...राजेंद्रने त्याच्या मुंबईच्या कुठल्या तरी मित्रांला फोन लावला.....".जा..कुठलीही लोकल पकड..तु जवळच राहतोस.. MPSC ऑफिसमधे जाऊन ही नावे यादीत पहा...निघ लवकर...."
त्याचा मित्र निघाला....इकडे आम्ही राजाला दरम्यानच्या काळात अक्षरशः भंडावून सोडले..बघ रे पोहचला का? इतका वेळ लागतो का?....पोहचला असेल ना...काय माणुस आहे यार...राजा परेशान...तो मग आमचा भडिमार पाहून..इकडे तिकडे..जात होता..बोलत होता...आम्ही भांबावून दमून गेलो..इतक्यांदा विचारले होते त्याला की....आता काही का येईना रिझल्ट शांत रहा म्हणून संदिप ओरडला...येईल रे सगळंयाचा निकाल अभ्यास काही कमी होता का आपला....(अरे भाऊ तु सोड ते! मित्र पोहचला का बघ राजाचा...) शेवटी थकून बसलो...राजू बाजुला गेला होता...तो खाली मान घालून आला...(संदिप उगीच त्याला ग्यानी म्हणत नाही) चेहरा गंभीर...माझ्या काळजात धस्स!! विजय परेशान ...
यार ! तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी नाहीत! क्षणात आभाळ फाटले...सुन्न.....काळीजच हलले....
आणी थोडं थांबून ओरडत म्हणाला," पण सगळे यादीत आहात बे तुम्ही........."
अर्थ लागायला क्षणभर उशिर लागला...
आणी अचानक उलगडा झाला..आपले सिलेक्शन झाले!!!!!! आपण यादीत आहोत
कल्लोळ, जल्लोष, गळाभेटी...अश्रु..हसू...सिलेक्शन झालेले परिक्षा न दिलेले...सारेच एकरूप..सारेच चिंब........
आनंद गगनात मावत नव्हता...दुःख होतेच हवे ते मिळाले नाही पण आवडीचे डिपार्टमेंटची पोस्ट मिळाली हेच समाधान....
धावत PCO कडे गेलो..गावात बाजुच्या मामाच्या घरात फोन होता..त्यावर काॅल केला..
मामाच्या मुलाने फोन उचलला
हॅलो, नितीन
अरे पिताजीला बोलंव...
थांबा बोलवतो...फोन प्रतिक्षेत, काॅइन संपला, दुसरा टाकला....मागे गोंधळ, जल्लोष सुरू होता...दुसरा काॅइन डयुरेशन संपला...टेन्शन शेवटचा काॅइन टाकला...आणी लगेच आवाज आला.."हॅलो! बोला बाबा काय म्हणता?"
आवाज कापतोय, गळा भरून आलाय," पिताजी! निकाल लागला"
तिकडून," काय मिळाले?"(किती आत्मविश्वास! कित्ती आस! काय म्हणायचं या जिगर ला?)
"नायब तहसीलदार!"
शाब्बास! बेटा,घरी या! आईला सांगतो!..गळा दाटलेला आवाज, आणी इकडे गालावर कोसळणारे अश्रु!!
(त्याच धुंदीत STD वाल्या कडून मी चौथा काॅइन घेतला आणि अजुन एक काॅल केला...तो काॅल एवढाच महत्वाचा होता...! ना त्यांनी पैसे मागितले ना मला द्यायचे भान..मागे थांबलेल्या मित्राने ते दिले)
तो पर्यंत रहिमभाईने शिवाजी चौकातुन बुके आणले होते! आयुष्यातला पहिला सन्मान!
पाॅलिटेक्नीक काॅलेज मधून मिठाईसह मित्र आले..दोन्ही भाऊ आले...नि:शब्द गळाभेट ..अंतरीचा उमाळा संयमी शांत..
                              सर्वांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ओल्या डोळ्यांनी शुभेच्छा दिल्या...तेवढ्या गडबडीतही..माझ्या आत गेलेल्या शिक्षक मित्रांसोबत आलेल्या लोकांना मी मिठाई दिली...त्यांना धक्का बसला होता..मी त्यांना माझ्या मित्राला निरोप द्यायची विनंती केली...आणी निघालो....ज्या चिखलाने मला दान दिले होते फुलण्याचे.. ज्या पडक्या घरात मी पडझड न होणारे स्वप्न उभारले होते..ज्या गावात माझ्या स्वप्नासाठी माझ्या आईवडीलांची परवड झाली होती, अनंत स्वप्ने जिथे त्यांनी जपली होती...पावसाळ्यात जे घर सतत पाणी चिखलात असायचं त्या घरातल्या या मोसमाच्या चिखलाला आलिंगन द्यायला मी निघालो...सोबत मित्रांचा लोंढा...त्यांना कोण आनंद मला जेवढा..त्याही पेक्षा जास्त त्यांना.सगळे दोस्तवेडे......!!
ते माझ्या आईवडीलांचा आनंद पहायला माझ्या अगोदर तयार!!
गावात पोहचलो....आई ताडकन उठून चुल पेटवत होती...ती खरंतर नि:शब्द झाली होती..वडील 10 वेळा रस्ता तपासत होते
गल्लीत वळलो...घरासमोर गर्दीच गर्दी...पावसाच्या पाण्याने वेढणारे घर गावच्या लोकांनी वेढले होते...दारात ओल्या जागेवर.. एक चटई टाकलेली होती...मी अभ्यास करतो म्हणून कधी तरी घेतलेली..एक जुनी लोखंडी खुर्ची ठेवली होती..
घर डोळ्यातल्या पाण्याने ओले दिसत होते...मी आईवडीलांच्या चिखल लागल्या पायावर डोकं टेकवत होतो...कोरडा..ठाम हात ओले डोळे पुसत पाठीवर पडत होता...आजारातुन नुकतीच बरी झालेली आई माझ्या चेह-यावरून हात फिरवत होती, कानशिलावर बोटे मोडून दृष्ट काढत होती...मी ओल्या डोळ्यांने हसता चिखल पाहत होतो....कित्येक पदर डोळ्याला लागत होते...किती तरी ओल्या नजरा हा नजारा पाहत होत्या...माझं फुललं माळरान माझी वाट पाहत होतं...... (प्रताप)
(क्रमशः)




Tuesday, February 25, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 22: मुलाखत......(2)

              मुलाखत कक्ष डाव्या हाताला होता. बाहेर एक खुर्ची होती, दारावर एक शिपाई होते.आत मधे एका मुलाची मुलाखत सुरू होती. पोर्च मधे सन्नाटा होता. खाली किमान इतर उमेदवार तरी होते.समूहात असलेली मानसिक सुरक्षितता तरी होती तिथे...पण ..इथे मात्र निखळ एकटेपणा,तुटलेपणा...ही फार नाजूक अवस्था होती सर्व तयारीच्या काळातील...जर इथे भिती हावी झालीतर आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचा काहीच फायदा होत नाही.राजेंद्र ढाकणे(शालेय पोषण आहार अधिक्षक) हा या बाबत जाण असलेला मित्र! सुदैवाने त्याने मुलाखतीच्या काळात स्थिर कसे रहायचे या बाबत चर्चा केली होती..मी ते आठवू लागलो...सर्व मित्रांनी दिलेले सल्ले डोक्यात आणू लागलो..तसे पाहिले तर भिती वाटत नव्हती पण दडपण होते...सहज दुरवर पाहीले ...दिनेश झांपले,विजय कबाडे थांबले होते..पाहत होते..शांत राहण्याचे व 'तोड डालो' वाले इशारे सुरू होते. मी काही क्षण डोळे बंद केले..मागील दोन वर्षाची साधना, मेहनत डोळ्यासमोर आली..आतील स्पर्धक फुरफुरू लागला..अचानक खुमखुमी दाटून आली..मी येणारे दडपण झटकले..आणी त्या दबावाच्या अवस्था जाऊन उत्सुकता निर्माण झाली....आणी आतला मुलगा कधी बाहेर येतो आणि माझा इंटरव्ह्यु कधि सुरू होतो..वाटायला लागले...मी दबावावर मात करून स्थिर झालो होतो...स्पर्धक संचारला होता आतला....आता फक्त टक्कर!! ...दुसरीच दुनिया होती ती...कदाचित माझे शब्द तेवढे समर्थ नाहीत ते मांडायला....अचानक दरवाजा उघडला ..आतला मुलगा बाहेर आला..मी त्याच्याकडे पाहून इशारा केला "कसं काय?" त्याने इशा-यानेच सांगीतले इतके काही ठिक नाही..लक्षात आले आपल्याला टफ अवस्थेला तोंड द्यावे लागू शकते..मी सज्ज झालो...मला आत येण्यासाठी निरोप मिळाला...मी लक्ष विचलित होवू नये म्हणून कुठेही न पाहता कक्षाकडे निघालो.
"मे आय कम इन सर?" "या, बसा!" "धन्यवाद सर" गुड माॅर्निंग सर, गुड माॅर्निंग मॅडम" आपोआप घडले..डोळ्यासमोर कोणीच दिसत नव्हते.मी खुर्चीत बसलेलो होतो,हातातली फाईल सन्माननीय पॅनेल सदस्यांकडे तोंड करून टेबल वर ठेवली गेली...मी परत स्थिरतेकडे धावू लागलो...MPSC चे अध्यक्षांचेच पॅनेल,करकेट्टा मॅडम(IAS),बनसोडे सर(मेंबर),देशमुख सर(मेंबर) यांचे चेहरे हळुहळु क्लिअर व्हायला लागले..."नाव काय आहे?" उत्तर.."शिक्षण?"....उत्तर...नाॅर्मल होवू लागलो...आतुन सावध झालो...आता प्रश्न येणार. आलाच!!! पण माझ्या लिंकचा...लिंकींग मेथड की जय! " तुम्ही छंद वाचन लिहीला आहे, ते ययाती,मृत्युंजय वगैरे सोडून अलिकडचे काय वाचले ते सांगा, तुम्ही सगळे जण ही दोनच पुस्तके वाचता का?" मी" सर, अत्यंत आदरपुर्वक सांगतो ही दोन पुस्तके मी अकरावीला असतानाच वाचली आहेत, सध्या मी " द अल्केमीस्ट" हे पुस्तक वाचले आहे "(मराठीची अनुवादित प्रत बाजारात येवून एक महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला होता आणी हे खरंच अलिकडचे पुस्तक होते, अरूणभैय्याचे आभार एवढे सुंदर पुस्तक त्यांनी वाचायला आणले होते .) अध्यक्षांनी लगेच प्रश्न केला" त्यातुन आपल्याला काय संदेश मिळतो?" ( लक्षात आले सरांनी पण हे पुस्तक वाचले आहे, जे पुस्तक एवढे आवडले होते आणी भारलेही होते त्या अगदी हृदयात बसलेल्या पुस्तकाबद्दलचा प्रश्न...मग काय मी जणु सॅतिएगो आणी तो प्रश्न म्हणजे शकुन!! मी तेथुन जे उत्तरे द्यायला सुरूवात केली आणी जो आत्मविश्वास आला तो शेवटपर्यंत अगदी सुभेदार गेस्टहाऊसचा परिसर सोडला तरी फाॅर्म कायमच होता...) मी काय संदेश मिळतो ते अगदी सुस्पष्ट सांगीतले, अध्यक्ष उत्तरले"गुड!"मी "धन्यवाद सर" दुसरा प्रश्न "अजुन काय वाचले?" मी " दि गाॅड ऑफ स्माॅल थिंग्ज" त्याच्या लेखिका,त्यांचा पुरस्कार , बिए चे इंग्रजी साहित्य, शेक्सपिअर,त्याची लेखनशैली, त्याची साहित्यकृती,भारतीय इंग्रजी लेखक, त्यांचे वैशिष्ट्य....मुलाखत बहारदार पध्दतीने सुरू होती, सफाईदारपणे उत्तरे देत होतो,कुठलाही किंतु परंतु राहिला नव्हता.. आणी अचानक दुस-या सदस्यांकडे धुरा गेली...मग विषय लोकप्रशासन, व्यवस्थापन त्यातील फरक, व्याख्या, विचारवंत,त्यांचे योगदान अशा विविध बाबींचे प्रश्न विचारले जाऊ लागले. लोकप्रशासन माझा एम ए चा विषय,राज्यसेवेचा ऐच्छिक विषय. एक तर त्यात आवड वरून तो दयानंद काॅलेजच्या प्रा.सुभाष भिंगे सरांच्या तालमीत शिकला असेल तर..मग काय किंतु काय परंतु! सगळं लख्ख, स्वच्छ घडाघडा उत्तरे देत होतो.. मुलाखत समाधानकारकरित्या चालू होती अचानक मॅडमचा प्रश्न "द गाॅड ऑफ स्माल थिंग्ज"ची थीम सांगा,त्यात काय आहे? शेक्सपिअर व अरुंधती रॉय यांची तुलना करा, दोघात कोण श्रेष्ठ आहे? दृष्टीकोन असणारे विश्लेषणात्मक प्रश्न यायला सुरू झाले..अलर्ट!! मानवाधिकार व मुलभुत अधिकार काय फरक आहे? कोणते अधिकार श्रेष्ठ आहेत? तुम्ही कुठल्या अधिकारांना प्राधान्य द्याल?वगैरे इंडियन ऑथर मधे कोण आवडतं? का? फिक्शन लिटरेचर म्हणजे नक्की काय? इत्यादी त्यानंतर शेवटचे सदस्य "लातुर?" मी"हो सर" कधी निर्माण झाला?..या प्रश्ना पासून जे वस्तुनिष्ठ प्रश्न सुरू झाले ते थांबायचे नाव नाही..प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर...ते विचारत आहेत मी उत्तर देत आहे..प्रश्न खाली पडतच नव्हता..भुगोल,राज्य घटना, कृषी फक्त विषय बदलत होते..आणी अचानक..."मोगलांची वंशावळ सांगा" एकदम स्पीडब्रेकर....काही केल्या आठवेणा...मी"सारी सर" "मग शिवाजी महाराजांची वंशावळ सांगा " सांगीतली..पुन्हा अध्यक्षांचे प्रश्न सुरू झाले पद, पसंतीक्रम, पदाची कर्तव्य...पसंतीक्रम असाच का दिला..महसुलच्याच पदांना पसंती का? उत्तर देत होतो...सरतेशेवटी अध्यक्ष म्हणाले "ठिक आहे,तुम्ही जाऊ शकता" मी उठून सर्वांना शुभेच्छा दिल्या,आभार व्यक्त करून बाहेर पडलो...थोडासा संभ्रम झाला , आपला इंटरव्ह्यु किती वेळ चालला? माझ्याकडे घड्याळ नव्हते...तर त्याची सोय मित्रांनी केलेली..मी किती वाजता आत गेलो..किती वाजता बाहेर पडलो या वरून त्यांनी समाधानकारक वेळ चालला असा निष्कर्ष काढला.काय काय विचारले , काय उत्तरे दिली याची चर्चा झाली. झांपले सर सिनियर होते म्हणाले "भारी झाला की इंटरव्ह्यु!" पण मला शंका आली म्हटले "सर! किमान अर्धा तास तर चालायला हवा होता फक्त 19 मिनीट म्हणजे कमी झाला ना?:" त्यावर ते म्हणाले " प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळाले तर ते कशाला ताणत बसतील? मळभ दुर झाले......विजयच्या घरी परतलो..झांपले सरांची मुलाखत पण खुप चांगली झाली..एकतर ते ऑलरेडी सिलेक्टेड,त्यात पुर्णतः मॅच्युअर, अनुभवी... त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यु चांगला जाणारच यात शंका नव्हती...कारण त्या सोबत त्यांना आम्ही आमचे प्रश्न, अॅगल सांगू सांगू परेशान केलेलेच होते( दिनेशरावचे मोठेपणच!! आम्ही तुलनेने खुप ज्युनियर असूनही त्यांनी आमच्या इनपूटला अत्यंत आदर दिला अर्थात त्यांनी केलेली सुचना तर आम्ही खुप गांभीर्याने घ्यायचो) पण दिनुभाऊ आपल्या अनुभवी आणी व्यवहारी आवाजात म्हणायचे "बघु ! दिला तर एकदाचा इंटरव्ह्यु, पाहू काय होतंय"

          आम्ही औरंगाबादहून लातुरला परत आलो. घरी भेटून सगळंयाना सांगीतले मुलाखत चांगली झाली. आई वडिल म्हणाले आता आराम कर थोडा, रहा चार पाच दिवस पण मी म्हटले "विजयचा इंटरव्ह्यु राहिला आहे, मिळुन तयारी करायची आहे" वडील म्हणाले "जा ! स्वतःचा इंटरव्ह्यु आहे तशीच तयारी करा,हयगय करायची नाही " किती सहज बोलले पण त्यांची मनोवृत्ती समजली इमानदारीने मित्रासाठी पण योगदान द्या!! मी लातुरला आलो विजय सोबत बसून रोज तयारी करू लागलो,चर्चा, ऊणिवा, दुरुस्त्या,...एक जाणवले...पुणे सोडून विजय लातूर मधे तयारी करत आहे म्हणजे आपली जबाबदारी जास्त आहे..आम्ही जिव लावून तयारी करू लागलो.विजयचा इंटरव्ह्यु जणू माझाच आहे असे समजून......विजयची तयारी पण मुळातच खुप चांगली होती त्यात काही भर पडेल का? याचाच प्रामाणिक प्रयत्न असायचा आमच्या ग्रुपमध्ये एक वैशिष्ट्य आहे जर एखाद्या गोष्टी बद्दल स्वतः सोडून इतराला खात्री आहे आणी तो त्या बद्दल सांगत आहे तर निर्धास्तपणे त्याच्यावर विश्वास ठेवायचा...विजयच्या इंटरव्ह्युचा दिवस जवळ येत होता. औरंगाबादला विजयला सोबत म्हणून मीही निघालो...त्या काळात कुठल्याच सोबत्यावर कसलेच दडपण येणार नाही याची सामूहिक काळजीच आम्ही घेत होतो...विजयाचा इंटरव्ह्यु जवळपास शेवटच्या दिवसात होता...औरंगाबादचे MPSC चे इंटरव्ह्यु शेड्युल जवळपास संपत आले होते....मनात एक विचार सतत येत होता, सर्व पॅनल मेंबर खुप दिवसांपासून मुलाखती घेत आहेत ते आपल्या प्रश्नात नाविन्य आणतील...सतत जाणवत होते, मी विजयला म्हणालो," मास्तर! काही तरी वेगळ्या सरप्राइजिंग प्रश्नाची पण तयारी ठेवावी लागेल"(मी आणी विजय त्या काळात (आणी आत्ताही कधी कधी )एकमेकांना मास्तर म्हणायचो) विजय पण मुलाखतीच्या या चक्रात जसा उमेदवार ओव्हरलोडेड होतो तसेच झाले होते. पण तरीही विजुने विश्वास दाखवला..मग प्रचलित प्रश्न, नविन प्रश्न, संभाव्य प्रश्न, लिंकींग प्रश्न सर्वत्र आमचा धुंडाळा सुरू होता...जी अवस्था माझी तीच विजयची...काय फरक असणार.....मनात झटपट...

             विजयच्या मुलाखतीचा दिवस उगवला ,विजयची तयारी झाली ..आम्ही सुभेदार गेस्टहाऊस कडे निघालो... जातानाही आमची चर्चा सुरू होती. जाण्यापूर्वी काही तरी खायला हवे असे ठरले..माझी बडबड सुरू होती, त्यातुन मी खरंतर मुलाखतीचा दबाव विजयवर येणार नाही याची माझ्यापरीने काळजी घेत होतो.आम्ही नाश्ता करायला थांबलो. का कोण जाणे मी विजयला अचानक म्हटले "आजचा पेपर वाचायला हवा" विजयला शांती हवी होती डोक्यात आता नविन काही नको होतं...त्याचा आदर करत मी म्हटलं ठिक आहे मी वाचतो ! सहज डिस्कस करू! आणी मी पेपर हातात घेवून वाचु लागलो , काही महत्वाच्या बातम्या निवडून आम्ही चर्चा केली. आठवत नाही पण त्यात साखर कारख्यान्या बाबत एक बातमी होती. आम्ही मुलाखत स्थळी गेलो..मग ठरल्या प्रमाणे विजयला आत सोडले.मी बाहेर थांबलो...प्रतिक्षा सुरू होती.विजयची मुलाखत झाली. विजय बाहेर आल्याबरोबर सांगीतले, बरं झालं ! तुम्ही सकाळी पेपर वाचून सांगीतले , मला पॅनलने विचारलेला पहिला प्रश्न होता" आजच्या पेपर मधल्या महत्वाच्या पाच बातम्या सांगा"!!!! आम्ही दोघेही स्तब्ध झालो.आणी अचानक खुश ही ...सगळे हात एकमेकांना सावरायला असतील तर पडण्याची भिती कसली!!! विजयचा इंटरव्ह्यु खुप छान गेला होता. ..सगळ्या मित्रांचा शेवटचा टप्पा सुखद गेला होता..आम्ही लातुरला परतलो.....

         सगळे जिवश्च कंठश्च मित्र, आमचे सुख दुःख हेच, हेच आमचे जगणे झाले होते, हीच आमची दैनंदिन. सगळे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे,परिस्थितीचे..पण अखंड एकजीव..आमच्या ध्येयाने आमच्यातील भेद गाळुन टाकले होते...आता प्रतिक्षा होती फक्त निकालाची...!! पण तो काही लवकर लागत नव्हता, दरम्यान पुढची अॅडव्हर्टाईज आली होती..आम्ही सगळे जुने नवे मित्र पुन्हा अभ्यासाला लागलो..तेच झपाटलेपण..तेच समर्पण...तोच भाव...पण मनात कायम एक आस निकाल कधी लागणार??? काहीच उत्तर नाही दिर्घ प्रतिक्षा.....

            मी जरी सगळ्यात होतो तरी आतुन एकटा होतो...जर निकाल नकारात्मक आलाच तर मी कदाचित किती मागे फेकला गेलो असतो..कल्पना ही करवत नव्हती..मनात कायम ते अर्धपडके घर.... आईवडील... आठवत रहायचे....एकदा गावाकडे गेलो...आत साचल्या पण कोणाशीही बोलू न शकणा-या भावना घेवून माळरान गाठले...सांजवेळ..माळरान..गावात लागणारे दिवे...गावाकडे परतण्याची घाई झालेले गुरे...मी मात्र तसाच गावाकडे पाठ करून मुक माळरान तुडवत निघालो.. किती बोललो..किती मुक राहिलो...माळरान ऐकत होतं.......मी त्यावर पेरल्या स्वप्नांच्या बिया फुलतील का? हा प्रश्न मी त्याला विचारला....माळरान हसल्याचा भास झाला......मी पावश्याची पाऊस तगमग मनात घेवून निकाल कसा लागेल याची कल्पना करत होतो........मुक मनात नुसता कल्लोळ सुरू होता....(प्रताप)
(क्रमशः )

Monday, February 24, 2020

स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस भाग 21: मुलाखत....(1)


स्पर्धा परीक्षेची बखर: 'मी' ते अधिकारी ...एक आठवणींचे मोरपीस

भाग 21: मुलाखत....(1)

मुलाखतीची तयारी!! एक खेड्यातून आलेला, जिल्हा परिषद शाळेत शिकलेला अत्यंत विवंचना असुनही अधिकारी बनण्याचं माझं स्वप्न! अक्षरशः मलाच माझी किव यायची काय करणार होतो मी जर या टप्प्यावर आलो नसतो, मुख्यपरिक्षा नापास झालो असतो तर....खाडकन डोळे उघडले! ट्रॅव्हल्स पुण्याकडे धावत होती.मी एकटक अंधाराकडे पाहत माझी कथा आठवत होतो..गावाकडे आई वडील अर्ध पडक्या घरात आहेत, दोन्ही भाऊ लातुरच्या मध्यभागी पण जुन्या वाॅशिंग सेंटरचा भाग असलेल्या माती पत्र्याच्या खोलीत झोपले आहेत.सकाळी आलेला डब्बाच त्यांनी रात्री खाल्ला असेल..एका लहान परिघात जगणारे माझे कुटुंब आणी त्यात माझ्या मनाला हे विशाल होण्यासाठीचे लागलेले डोहाळे...कुठलाच शिधा नसताना अनंत अवकाशाकडे चालत निघावे..आणी मी परतेलच खजिन्यासह हा विश्वास घेवून माझ्या घरच्यांनी निर्धास्त रहावे...कशी जिद्द पेटणार नाही, कसे बाहू फुरफुरणार नाहीत, का मस्तक टक्कर द्यायला सज्ज होणार नाही? पुण्याला निघायच्या अगोदर स्वतःकडील साठवून ठेवलेला पैसा सोबत होता त्यासह अगोदर गावी जाऊन आई वडिलांना भेटलो होतो.खुप दिवसानंतर घरी बसुन आम्ही सगळे बोललो होतो..अंतःकरणात खुप काही पण एकमेकाला आधार मिळेल अशा शब्दांची पेरण करत वडील बोलत होते..त्यांना कोठून विश्वास होता माहित नाही? अक्षरशः अन्नान्न दशा पण ते बोलायचे मात्र जिगरीचे!! बाबा! या वेळी सलेक्शन होईल असाच इंटरव्ह्यु द्यायचा, आपलं सलेक्शन तर होणारं!! पण नाहीच झालं तर घाबरायचं नाही, नाराज व्हायचं नाही, हिमतीनं करत रहायचा अभ्यास! बंडाळ काय आपल्या जन्माची आहे , काढू कसे तर दिवस!! माझ्या मनात विश्वास आहे तुम्ही होणारच!!! अर्थात स्वतःच्या मुलांना अहोजाहो करत बोलण्याची त्यांची संस्कार शैली!! ते जेंव्हा आत्मविश्वास द्यायचे , टक्कर द्यायचे बोलायचे तेंव्हा भाकरी थापत थापत आई बोलायची, बस करा आता ! जेउ द्या लेकराला अगोदर!! तीला हे एवढं मोठ्ठं स्वप्न खरं तर वाटायचं पण तीला विश्वासयुक्त भिती असायची, आणी तिला अजब वाटायचं एवढासा हा पोरगा काय करायला निघाला आहे, तिला कळायचं मी खुप डोक्यात घेवून हे सगळं करत आहे,पण तिला भितीही वाटत रहायची ह्याला नाही झेपलं तर....ती या भितीनं विषय बदलण्याचा प्रयत्न करायची,तब्येत खुप खराब झाली म्हणून डोळ्यात आलेलं पाणी पुसायची..मी वडीलांचा आग्रही आत्मविश्वास आणी आईचा दबका आशावाद यातुन मार्ग काढायचो...
रात्रीच्या अंधारात लख्ख भुतकाळ आठवत होता..तो पाऊस,तो चिखल,एकवेळचं जेवण, पुस्तक वह्या भेटत नाहीत म्हणून कुढणं, आपल्या सारख्याच फाटक्या मित्रांत आशावादी बोलणं, त्यांनाही सोबत अभ्यास करा म्हणनं...किती बदल,किती धाडंस...पण एक विश्वास होता काही होवो हे सिध्द करून दाखवायचंच!!! मन पेट घेत होतं..खिशातली छोटी डायरी काढून मुलाखतीचे मुद्दे आठवत बसलो..पहाटे पुणे आलं ...मित्र घ्यायला आला गळ्यात पडला,गहिवरून बोलला आलास भावा!चल आज माॅल मधे जायचंय आपल्याला. सगळ्यात वेगळा ड्रेस आपल्या डोक्यात आहे..तु बघत रहा..तो बडबड करत होता मी हसत होतो...कित्ती लोकांना माझ्या ध्यासानं वेडावलं होतं......

आयुष्यात पहिल्यांदा माॅल मधे गेलो..चांगले दोन ड्रेस, आणी आठवणीनं न भेटलेला शुज आणी इतर साहित्य घेतलं..दिवसभर इंटरव्ह्युची तयारी यावर बडबडत तिथल्या मित्रासोबत फिरलो...आणी लगेच रात्री परत निघालो...हे सगळं लातुरात ही करता आलं असतं पण पुण्यात मित्र आठवण करत असल्याने व त्यांचा उत्साह टाळता न येण्याजोगा असल्याने जावं लागलं...शेवटी ते हिंमत देत होते म्हणून तर मी इथपर्यंत पोहचलो होतो...आणी ते ही माझ्या वेडातुन हिंमत बांधून घेत होते स्वतःची......

परत आलो, जोमाने तयारीला लागलो, आम्ही सगळे मिळून तयारी करत होतो.एकमेकांना एकमेकांच्या उणीवा दाखवून देत होतो,त्या कशा दुरूस्त करता येतील त्याही सांगत होतो.ना कुठला क्लास ना कुठले मार्गदर्शन तरीही एका सुरात,लयीत तयारी सुरू होती,आत्मविश्वास म्हणायचा तर काळजात किंचीतही थरकाप नाही सरळ आभाळाला भिडण्याची तयारीच जणु...स्वतःच्या,घरच्यांच्या,मित्रांच्या आणी आम्हाला पाहून MPSC करायला सुरूवात केलेल्या नविन मुलामुलींच्या किती अपेक्षा होत्या...आमच्यावर..मनात कायम एक दिवा पेटलेला असायचा..ध्यासाचा नंदादीप जणु! मुलाखतीचा दिवस जवळ येत होता. ठरले की चार दिवस अगोदरच औरंगाबादला जायचे,तेथे रूळायला मदत होईल.. शेड्युल मिळाले...माझा इंटरव्ह्यु अगदी सुरूवातीच्या काळात होता,नंतर दिनेश झांपले, आणी शेवटी शेवटी विजय कबाडे.
माझा इंटरव्ह्यु होता तरी सगळेजण निघायचे ठरले..(आधार देणे काय असते ते येथून समजत होते) पण निव्वळ एक रात्री राहता येईल एवढीच माझी तयारी होती..माफक पैसे होते.मी बोलणार कसा? (पण न सांगता ओळखणार नाहीत ते मित्र कसले? आणी तेही कळलंय त्यांना हे न दाखवता!!! ) विजयराव यांनी डिक्लेअर केले"आपले औरंगाबादला घर आहे तेथे कोणीच राहत नाही आपण सगळे तेथेच थांबू" नियती की नियत? कदाचित त्याही पलीकडचे विशाल -हदय माझ्या मित्राकडे होते..तरीही संदिप अगदी शिव्या घालत गुपचूप विचारणार'पैसे लागणार आहेत का बे?" , तांदळेसर बाजुला घेवून बोलणार"प्रतापराव अडचण असेल तर सांगा बरं!" इंद्रजित न सांगता मदतीला हजर, गज्या तर काहीच संबंध नसताना MPSC चा माझ्या सोबत केस एवढे काप, असा थांब तसे बस.....हे सांगणार...मदतीच्या किती हाताची मोजदाद करावी?
जे मुलंमली परिस्थिती गरीब आहे हे कारण देतात त्यांना एकच सांगणे...तुम्ही फक्त निघा...थांबू नका..नियती अनेक रूपे घेवून सज्ज असते मदतीला...घाबरू नका परिस्थिती वाईट असल्यावरच ती चांगली करण्याची संधी आपल्याला मिळते...!!

घरी जाऊन आई वडिलांना भेटलो, भावांचा निरोप घेवून औरंगाबादला निघालो..मुख्य परिक्षेलाच ईथे आलो त्या नंतर आत्ताच..विजुच्या घरी पोहचलो..मुलाखतीची तयारी शेवटच्या टप्प्यात आली होती..फक्त एकदाच सुभेदार गेस्टहाऊसला जाऊन मुलाखतीचे ठिकाण पाहून घेतले..मुलाखती देवून परत येणा-या मुलामुलींना पाहीले..काय काय विचारत आहेत म्हणून बाहेरच्या मुलामुलींचा घोळका त्यांना घेरत होता,ज्यांची मुलाखत चांगली झाली ते सांगायचे त्रोटक,ज्यांची मुलाखत चांगली झाली नाही ते गुपचुप निघून जायचे.त्यांच्या चेह-यावरील भाव स्पर्धेची क्रूरता अधोरेखित करत होते..मी सावध झालो..तडक परत येवून अभ्यासाला लागलो..कारण आतुन आवाज येत होता..हा अॅटेम्प्ट गमावणे आपल्याला परवडणारच नाही, दुस-याचा इंटरव्ह्यु कसा का जात असेल पण आपला चांगलाच झाला पाहिजे...थोडे दडपण जाणवायला लागले..प्रश्नाच्या लिंक पुन्हा पुन्हा तपासून घेवू लागलो...मनात सतत कोणते प्रश्न विचारतील?काय उत्तर द्यायचे याची उजळणी सुरू असायची दोन दिवस झाले...उद्या मुलाखत होती...मित्रांनी लवकर झोपायला सांगीतले ...खाली अंथरुण टाकून सारेच झोपलो होतो..लाईट बंद झाला आणी मला झोप काही केल्या येईना...सगळे झोपले होते..मी या कुशीवरून त्या कुशीवर वळत होतो..झोप पार उडाली होती..डोळ्यासमोर उद्याची मुलाखत..घर, गाव,आईवडील, भाऊ, मित्र, त्यांचे अपेक्षायुक्त चेहरे...विचारले जावू शकणारे प्रश्न सगळा गोंधळ सुरू झाला...मला काय चालले आहे समजत नव्हते...फक्त एक माहिती होतं..माझ्या आयुष्यातला उद्याचा खुप महत्त्वाचा दिवस होता..मला तो जिंकायचा होता..मला खरंच हे सारं गमावणं परवडणार नव्हतं...जर मुलाखत चांगली नाही झाली तर मी काय करेन....??? उत्तरच सापडेना...मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होतो..सारे विचार सारून उद्या हे विचारले तर असे उत्तर द्यायचे..ते विचारले तर तसे....मी अक्षरशः आयुष्यभराचा झगडा झगडत होतो जणू....कधी तरी रात्री तिन वाजता वगैरे झोप लागली ..सकाळी लवकर उठलो..थोडा थकवा जाणवला..पण भावनांचा बहर रात्रीच विरून गेला होता...त्यामुळे मी माझ्या मुळ भुमीकेत परत आलो...मी खुणगाठ बांधूनच उठलो...आणी डिक्लेअर करून टाकले..ग्रुप मधला माझाच इंटरव्ह्यु पहिला आहे...तो भारी देणार...सर्वांनी साथ दिली चिअरअप केले...मी तयार होवून निघालो...ठरवले ढासळायचे नाही...

सुभेदार गेस्टहाऊसला पोहचलो..वारंवार सर्व बाबी तपासून घेतल्या असल्याने आत्मविश्वास होताच,सोबत सारेच मित्र होते...पाहीले सेंटरवर मीच वेगळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे...स्वतःचे वेगळेपण एक नवा आत्मविश्वास देवून गेले..आत जाण्याची वेळ आली, सर्व मित्रांनी शुभेच्छा दिल्या...मी एक दीर्घ श्वास घेतला आणि निघालो..आजपर्यंत केलेल्या अभ्यासाचे चिज करण्याचा हा दिवस होता. गेट मधे शिपाई काकांनी अडवले..विचारले.. सांगीतले..इंटरव्ह्यु आहे..कौतुक भरल्या नजरेने त्यांनी आत सोडले...(माझ्या बॅच मधला सर्वात लहान वयाचा मीच आहे..बहुधा ते लहानपण त्यांना नवलाचे वाटले) आत गेलो, कागदपत्रे तपासून घेत होते. बिए झाल्यावर पदवीदान समारंभ व्हायच्या अगोदरच मेन्सचा फाॅर्म भरला होता त्यावेळी डिग्री भेटली नव्हती पण मुलाखती अगोदर ती सादर करण्यास सांगितले ती दिल्यास परवानगी मिळाली मी हाॅल मधे बसलो..हाल मधे सिनियर मुले दिसत होते....मी निरखु लागलो..सगळे नविनच होते मला...पहिल्यांदाच सगळे पाहत होतो...एक सिनियरने विचारले" कितवा अॅटेम्प्ट?" मी, "पहिलाच" सांगीतले. त्यावर ते म्हणाले "मित्रा ! माझी ही चौथी मुलाखत, ट्रायल म्हणून दे या वेळची मुलाखत!" मी शांतपणे सांगीतले " हज्जार वेळा ट्रायल झालीय, ही फायनलच असणार"
ते हसले म्हणाले "भारी काॅन्फिडन्स आहे राव तुझा!, असाच ठेव मुलाखत होईपर्यंत " शुभशकून...हुरूप...आणी तरीही सावधान अवस्था! मी धन्यवाद म्हटले...माझ्या नावाचा पुकारा झाला....मला वरच्या मजल्यावर मुलाखत कक्षाबाहेर वेटिंगला बसायचे होते...आतल्या उमेदवाराची मुलाखत संपेपर्यंत....!! मी पाय-या चढताना स्वतःलाच सांगु लागलो...चांगलीच होणार आपली मुलाखत, फक्त शांत राहून द्यायची....पण आत खळबळ सुरू झाली होती...(प्रताप)
(क्रमशः)
..

अंतरात...